Tuesday, June 19, 2018

मीही माझ्या वडीलांचा एक फोटो काढला असता-



माझ्याकडे माझ्या वडलांचा फोटोसुद्धा नाही. ते गेले तेव्हा आमची गरिबी इतकी होती की ते खुप आजारी असताना त्यांना दवाखाण्यात न्यायला किंवा औषधे आणायलाही पैसे नव्हते. फोटो कुठून काढणार?

त्यांचा आजार खूप वाढला तेव्हा वेदनेने ते कळवळायचे. त्या वेदना खूप वाढल्या की त्यांना गुंगी यायची किंवा ते बेशुद्ध पडायचे. त्यांच्या पोटात खूप दुखत असायचं. चक्कर यायची आणि दोन शब्द बोलले तरी दम लागायचा.

त्याकाळात ते आमच्या झोपडीत न राहता मोकळ्या आभाळाखाली शेतातल्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली राहायचे. बहुधा आपल्या सततच्या कण्हण्यामुळे, भयंकर वेदनांमुळे आपल्या छोट्या लेकरांना त्रास व्हायला नको, किंवा शेतात खुल्या आभाळाकडं बघत मोकळ्या हवेत त्यांना बरं वाटत असावं म्हणून असेल.

सकाळ, दुपार, संध्याकाळ मी त्यांच्यासाठी शेतात भाकरी घेऊन जायचो. मला शेतातल्या साप, विंचू यांची भिती वाटायची. एकदा भाकरी घेऊन जाताना मला विंचू चावला होता. तेव्हा खूप दुखलं होतं. मी दिवसभर रडत होतो.

बाबा, गोधडीवर मलूल पडलेले असायचे. त्यांना जेवन जातच नसे. आंघोळ करण्याइतकं त्यांच्या अंगात त्राण नसायचं. मग मी विहीरीतनं पाणी काढून फडक्यानं त्यांचं अंग पुसून द्यायचो.

त्यांच्या वेदना फारच वाढल्या की कधीतरी ते खिशातून दहा किंवा वीस पैसे काढून माझ्याकडे द्यायचे. मी औषधाच्या दुकानात जाऊन क्रोसिनच्या गोळ्या आणून त्यांना द्यायचो.

ससूनला जायला आई, वडील दोघेही घाबरायचे. तिकडे सरकारी डॅाक्टर गरिबाला "ढोस" देऊन मारून टाकतात असं त्यांना सांगण्यात आलेलं होतं. खाजगी डॅाक्टर परवडणं शक्यच नव्हतं. आई पहाटेपासून संध्याकाळपर्यंत कुठेकुठे राबायची तेव्हा झोपडीतली चूल पेटायची.
परीक्षेला जाताना मी त्यांच्या पाया पडलो तेव्हा ते काहीतरी पुटपुटले. " चांगली शाळ शिक. पास हो. तुझा निकाल येईपर्यंत मी असेन की नाही मला माहित नाही," असं ते म्हणत होते असं आई म्हणाली.
ते तिथेच झाडाखालीच गेले. अकाली गेले. वयाच्या 50 च्या आतच.

ते गेले तेव्हा मी इतका लहान होतो की आई रडली म्हणून मी रडलो. तोवर मी मृत्यू पाहिलेला नव्हता.

वडील म्हटलं की मला नेहमी फक्त एव्हढंच आठवतं. बाकी आठवणी काही नाहीतच.

पुढे बरे दिवस आले तोवर ते जगले असते तर मीही त्यांचा एक फोटो काढला असता.

-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment