Friday, July 20, 2018

हिंदुधर्म सुधारक आर्यसमाज, स्वामी अग्निवेश, लोकशाही आणि हिंसेचा विखार -





आर्य समाजाचे संस्थापक आणि सत्यार्थप्रकाश या ग्रंथाचे लेखक स्वामी दयानंद सरस्वती यांची 1875 मध्ये पुण्यात भाषणे आयोजित करण्यात आलेली होती. सुधारकांतर्फे त्यांची पुण्यात
मिरवणूक काढण्यात येणार असल्याचे समजताच सनातन्यांनी त्याच रस्त्यावरून गर्दभानंदाची [गाढवाची] मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.

न्या.म.गो.रानडे यांच्या विनंतीवरून स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मिरवणूकीला महात्मा जोतीराव फुले यांनी समर्थन दिले. खरं तर कट्टर वेदाभिमानी असलेल्या दयानंदांबरोबर फुल्यांचे काही मतभेद होते.

तरिही आर्य समाजाची समाजसुधारणावादी भुमिका लक्षात घेऊन फुले त्यांच्या रक्षणासाठी धावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 1936 साली लाहोरच्या ज्या जातपात तोडक मंडळाने भाषण आयोजित केले होते ती मंडळी आर्य समाजाची होती. पुढे मतभेदांमुळे तो कार्यक्रम रद्द केला गेला. "अ‍ॅनिहीलेशन ऑफ कास्ट" हे क्रांतिकारी पुस्तक म्हणजे त्याच कार्यक्रमासाठी लिहिलेले भाषण होय.

स्वामी अग्निवेश [वय 78 वर्षे] हे आर्य समाजाचे प्रमुख नेते. गेली 60 वर्षे ते सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय आहेत.
एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अमाणूस हल्ला केला. झारखंड मधील या हल्ल्याचा निषेध.
मतभेद असतील तर त्यावर बोला, लिहा, ते जाहीरपणे मांडा. न्यायालयात जाऊन खटला भरा. घटनेच्या चौकटीत राहून शांततामार्गाने निदर्शने करा.
लोकशाहीत हिंसेला स्थान नाही.

हल्लेखोरांच्या पक्षाच्या मिडीया सेलच्या एका नेत्याने त्यावर फेसबुकवर लिहिले "यह था वो विवादित भाषण जिसके बाद हमारी पार्टीके कार्यकर्ताओं ने वामपंथी अग्निवेश को जमकर धोया 👊😁 #शाबास_शेरों 👍"
आता झारखंडचे एक मंत्री म्हणतात, "प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वामी अग्निवेश यांनी स्वत:वरचा हा हल्ला प्रायोजित केलेला होता."

जो स्वामी अग्निवेश यांची हत्त्या करेल त्याला आपण दहा लाखाचा पुरस्कार देऊ असे एकाने याच फे.बु. पोस्टवर घोषित केलेय.
एकाने स्वामी अग्निवेश हे जयभीमवाले असल्याने त्यांच्यावर हल्ला झाला ही कौतुकास्पद बाब असल्याचे म्हटलेय. एकाने म्हटलेय त्यांना खूप कमी मारले, त्यांची जीभ कापायला हवी होती. एकाने म्हटलेय त्यांना जिवंतच का सोडलेत?

कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा? 1875 साली पुण्यात दयानंदांना विरोध झाला. आता दीडशे वर्षांनी स्वामी अग्निवेश यांना झारखंडमध्ये थेट मारहाण. आपण 1875 च्याही मागे चाललोय का? हा उन्माद भारताला विकासाकडे घेऊन चाललाय की हिंसाचाराकडे? की विकासाच्या नावाखाली हिंसाचाराकडे? महासत्ता होण्याचा बहुधा हाच एकमेव मार्ग असावा!

-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment