Sunday, July 29, 2018

भुतान आनंदी राष्ट्र कसे बनले?



भुतान, हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांतसुंदर देश आहे. शून्य प्रदुषण. देशभर कमालीची स्वच्छता, शांतता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.

मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांचे मोजमाप केले जाते. आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान भारताच्या कितीतरी पुढे आहे. आपल्याकडे लोकशाही आहे तर तिकडे आजही राजेशाही आहे. समाज प्रामुख्याने स्त्रीप्रधान, मातृप्रधान आहे.

खरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही तिथला माणूस भारतापेक्षा खूप जास्त आनंदी आहे. सुखी आहे.

का ? कसं जमलं त्यांना हे?
भुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.
भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.
भुतानमध्ये शीलाचे पालन मुख्य मानले जाते त्यामुळे चोर्‍या होत नाहीत.
समाज प्रसन्नचित्त आहे.

हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.
थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.

शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. ट्रॅफिक सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.

तुम्ही जगात कुठेही गेलात तरी तिथल्या प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध राहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.

भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील इतरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा चोर्‍या करायच्या नाहीत. असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.

हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारशे नाहीत. प्रत्येक माणूस मेहनती आहे.
चोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.

भारतीय माणसांना त्यांच्या नोटा बदलून घ्यायची गरज नाही. आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही. असेल तर ठीक. नाहीतर निवडणुक ओळखपत्रांवर भारतीयांना प्रवेश दिला जातो. खर्च अगदी माफक येतो. आपल्या पुण्या-मुंबईच्या तुलनेत बरीचशी स्वस्ताई आहे.

भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे. तो आपला सर्वात जुना, विश्वासू आणि कायम मित्र देश आहे.

इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा असल्याचे मला तरी आढळलेले नाही.

यातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.

माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि
कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?

हे प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.

भारतानं भुतानकडून हे शिकायला हवं.

- प्रा. हरी नरके

No comments:

Post a Comment