Monday, July 16, 2018

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुचा गौरव केला होता हा भिडे यांचा दावा निराधार


मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते हे विधान बिनबुडाचं-प्रा.हरी नरके

मनुस्मृतीचा अभ्यास करून आपण भारतीय संविधान लिहिलं असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते असा दावा श्री. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केला. आय.बी.एन. लोकमत वाहिनीवर बेधडक कार्यक्रमात आज डॉ. उदय निरगुडकरांनी त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते बोलत होते. श्री. भिडे यांचा हा दावा खरा नाही.

ते म्हणाले, राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा बसवलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वत: उपस्थित होते. त्या पुतळ्याखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मनुचा गौरव करणारे विधान दिलेले आहे.

प्रत्यक्षात राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात किंवा प्रांगणात मनुचा पुतळाच नसल्याने श्री.भिडे यांचे हेही विधान बिनबुडाचे आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडला मनुस्मृती जाळली होती. तो ठराव श्री. गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे या त्यांच्या ब्राह्मण सहकार्‍याने मांडला होता. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समर्थन दिले आणि सभेला जमलेल्या अस्पृश्य साधूसंताच्या हस्ते मनुस्मृती जाळण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान सभेतील सर्व भाषणे लोकसभा सचिवालयाने "संविधान सभेतील चर्चा,खंड 1 ते 12" मध्ये छापलेली आहेत.
त्यात मनुचा गौरव करणारे एकही विधान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले नाही.

उलट भारतीय संविधानाच्या मुलभूत अधिकाराच्या कलम 13 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा मनुस्मृती नाकारलेली आहे.
मनुस्मृतीसारख्या घटनेतील मुलभूत अधिकारांशी विसंगत असलेल्या सर्व
ऎतिहासिक कायद्यांचे उच्चाटन 26 जानेवारी 1950 रोजी केल्याची नोंद बाबासाहेबांनी केलेली आहे.

तेव्हा श्री.भिडे यांच्या वरिल दोन्ही दाव्यात सत्यता नाही, ते चुकीची माहिती देत आहेत.
...............
टीप-
राजस्थान विधीमंडळाच्या सभागृहात मनुचा पुतळा आहे असं श्री. भिडे म्हणाले होते. तिथे मनुचा पुतळा नाही.

भिडेसमर्थक आता विषयांतर करून राजस्थान उच्च न्यायलयाच्या प्रांगणात मनुचा पुतळा आहे असे सांगत आहेत.

राजस्थान उच्च न्यायलयाच्या प्रांगणातला मनुचा पुतळा 28 जून 1989 ला बसवण्यात आलाय.

तो पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीतला नसल्याने त्याच्या अनावरणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण त्याच्या खूप आधीच 6 डिसेंबर 1956 रोजी झालेले होते.
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment