Friday, July 6, 2018

सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर- समाजसुधारक आणि प्राच्य विद्येचे महान पंडीत


सर रामकृष्ण भांडारकरांचा जन्म मालवणला 6 जुलै 1837 ला झाला.
1862 साली मुंबई विद्यापीठातून पहिली तुकडी पदवीधर झाली. त्यात न्या.रानडे आणि रा.गो. भांडारकर होते.
त्यांनी जर्मनीमधील गोटीन्जेन विद्यापीठातून 1885 ला पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

मुंबईच्या एल्फिन्स्टन आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते महिला शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, जातीनिर्मुलन यांचे पुरस्कर्ते होते.
त्यांनी 1917 साली मुंबईतील समता परिषदेत आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला होता.
ते पुण्याच्या हुजुरपागा शाळेचे संस्थापक होत.

ब्रिटीश सरकारने शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची 1903 साली ब्रिटीश भारताच्या कौन्सिलवर निेयुक्ती केली होती. त्यांच्यासोबत गो.कृ.गोखले यांचीही नियुक्ती झालेली होती.
ते परम हंस सभा आणि प्रार्थना समाजाचे क्रियाशील पदाधिकारी होते. केशवचंद्र सेन, न्या.रानडे, महर्षि कर्वे, महर्षि वि.रा.शिंदे यांच्यासमवेत ते समाज सुधारणा चळवळीत आयुष्यभर क्रियाशील राहिले. परम हंस सभेचे अध्यक्ष आणि भांडारकरांचे निकटवर्ती रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना महात्मा फुले यांनी आपला शिवाजी राजांचा पोवाडा अर्पण केलेला होता.
संत तुकाराम यांना ते आपला आदर्श मानत.

दख्खनचे इतिहासकार व संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले योगदान बहुमुल्य ठरलेले आहे. 1917 साली ब्रिटीश सरकारने त्यांना सर हा किताब बहाल केला.
ते प्राच्य विद्येचे जागतिक किर्तीचे महान पंडीत होते. त्यांच्या 80 व्या वाढदिवशी 1917 मध्ये त्यांच्या विद्यार्थी आणि चाहते यांनी पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेची स्थापना केली.

या संस्थेत पाली, संस्कृत, अरेबिक, अवेस्ता, प्राकृत आदी भाषांमधील 30 हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. या संस्थेने प्रसिद्ध केलेले छत्रपती संभाजी राजे लिखित बुधभूषण,[1927] भारत रत्न पां.वा. काणे यांचा धर्मशास्त्राचा इतिहास, [1964] आणि पाच पिढ्यांनी 55 वर्षे मौलिक संशोधन करून प्रकाशित केलेली 19 खंडातील महाभारताची चिकित्सक आवृत्ती जगप्रसिद्ध आहेत.

महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकदा भेटी देऊन संस्थेच्या संशोधनपर कार्याचा जाहीरपणे गौरव केलेला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत मध्ये सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा संत तुकाराम, संत कबीर, महात्मा फुले यांच्या मालिकेतील महान संत असा तीन वेळा गौरव केलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भांडारकर संस्थेत अनेक भाषणे दिलेली आहेत.
या संस्थेच्या नियामक मंडळावर महान पंडीत डॉ. आ.ह.साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सदानंद मोरे आदींनी अनेक वर्षे काम केलेले आहे.
-प्रा.हरी नरके
...........................

No comments:

Post a Comment