Monday, April 3, 2017

सनातनी केशवराव विचारे

तरूणपणी केशवराव विचारे कमालीचे सनातनी होते. तासंतास देवपुजा, व्रतवैकल्यं आणि नवससायास यात बुडून जायचे.
सत्यशोधक भास्करराव जाधव हे गावोगाव, शिक्षणाचं महत्व सांगणारी भाषणं करायचे.
ते अंधश्रद्धांवर टिका करायचे. अडाणीपणा, लाचखोरीवर तुटून पडायचे.
जुन्या विचारांची काही मंडळी त्यांच्यावर चिडून असायची. भास्करराव आपल्या देवाधर्माला शिव्या देतात, त्यांना कायमचा धडा शिकवा, त्यांचा आवाज बंद पाडा, असा अपप्रचार त्यांनी चालवला होता. भास्कररावांची सभा उधळून लावायची, त्यांना मारहाण करायची आणि तरिही नाहीच ऎकलं तर त्यांना ठारच मारायचं असा प्लॅन केशवराव विचारे व त्यांच्या मित्रांनी आखला.
केशवराव व त्यांचे पंधरावीस पहिलवान मित्र तयारीनिशी भास्कररावांच्या कार्यक्रमाला गेले.
भास्कररावांनी त्यांच्या भाषणात देवाधर्माला पहिली शिवी दिली की त्यांच्यावर हल्ला करायचा असं केशवरावांनी सर्वांना सांगून ठेवलं होतं.
भास्करराव अतिशय विद्वान होते. संपुर्ण मुंबई राज्यात ते मॅट्रीकच्या व पदवी परीक्षेत पहिले आलेले होते.
त्यांचं भाषण अतिशय रंगलं. भाषण संपलं.
केशवराव त्यांना भेटायला गेले. म्हणाले, " तुम्ही तर आमच्या देवाधर्माला शिवीगाळ करता असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आज काय विसरलात काय शिव्या द्यायला?"
भास्करराव म्हणाले, " मी आजवर कधीच शिवीगाळ केलेली नाही. करणार नाही. ज्यांच्याकडं विचार नसतात, ते शिवीगाळ करतात. मला काय गरज शिवीगाळीची?"
केशवराव विचारे त्या दिवसापासून सत्यशोधक झाले.

No comments:

Post a Comment