Monday, April 3, 2017

ग्रंथप्रेमी न्यायमुर्ती

15 वर्षांपुर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या एका सामाजिक निकालपत्रावर टिका करणारा लेख मी सकाळमध्ये लिहिला होता.
त्या निकालपत्रात सामाजिकदृष्ट्या असलेल्या उणीवांवर मी भर दिला होता. लेख विश्लेषणात्मक असला तरी जहाल होता. टोकदार होता.
निकाल देणारे न्यायमुर्ती अतिशय नि:स्पृह आणि कडक म्हणून ओळखले जात. 
लेख वाचून माझ्या काही वकील आणि जिल्हा न्यायाधीश असलेल्या मित्रांनी माझ्यावर बहुधा न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवला जाणार असा कयास व्यक्त केला.
मग मीही आपल्याला काही दिवस येरवडा विद्यापीठात पाठवलं जाणार अशी मनाची तयारी केली.
माझ्या एक प्रसिद्ध नाटककार मित्रानं त्याला ते मा. न्यायमुर्ती क्लबमध्ये भेटले असताना त्यांचा मूड बघून माझ्या लेखाचा विषय काढला. न्यायमुर्तींनी तो लेख वाचलेला होता.
"कसा वाटला तुम्हाला तो लेख?" त्यानं त्यांचा अंदाज घेण्यासाठी खडा टाकून बघितला.
न्यायमुर्ती म्हणाले, " लेखातले काही मुद्दे मला नवे होते. ते माझ्यासमोर वकीलांनी मांडले असते तर कदाचित माझा निकाल वेगळा आला असता. शेवटी आम्हाला समोर आलेले मुद्दे, संविधान आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय द्यावा लागतो."
मित्रांनं खूष होऊन मला ही वार्ता लगेच फोनवर कळवली.
काही दिवसांनी त्या न्यायमुर्तींची मुंबईला बदली झाली. माझ्या एका वकील मित्रानं त्यांच्याकडं पुन्हा माझ्या त्या लेखाचा विषय काढला. आमची मैत्री असल्याचं सांगितलं. न्यायमुर्ती म्हणाले, "त्यांना माझ्या चेंबरला चहाला बोलवा."
मी त्यांच्या चेंबरला गेलो. ते अतिशय आपुलकीनं वागलं. ते ग्रंथप्रेमी होते. त्यामुळं आमच्या आवडीचे ग्रंथ या विषयावर भरपूर गप्पा रंगल्या.
ते निवृत्त होईपर्यंत आम्ही अनेकदा भेटत असू. निवृत्तीनंतर ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यासाठी दिल्लीला राहायला गेले.
ते जेव्हा न्यायमुर्ती झाले तेव्हाचा एक प्रसंग मला वकिलमित्रानं सांगितला होता.
त्यांच्या खेड्यातला एक वर्गमित्र त्यांना भेटायला आला. तो त्यांचा शाळेतला अतिशय जिवलग मित्र होता.
त्याच्या जमिनीची एक केस न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित होती. त्याच्या वकिलानं सांगितलं होतं, केस तुमच्या न्यायमुर्ती झालेल्या मित्रासमोरच चालणार आहे. तुम्ही त्यांना भेटून तुमच्या बाजूनं निकाल देण्यासाठी गळ घाला, म्हणून तो आला होता.
न्यायमुर्तींनी मित्राला समजावून सांगितलं, "एकतर आपण जुने मित्र असल्यानं तुझी ही केस मी चालवणं बरोबर होणार नाही. ती दुसर्‍या न्यायमुर्तींपुढं चालवावी असं मी माझ्या वरिष्ठांना सांगेन. अमूकच निकाल द्या असं सांगणं हा गुन्हा आहे."
पण मित्र काही ऎकायलाच तयार नव्हता. शेवटी न्यायमुर्तींनी त्याला जायला सांगितलं. मित्र चिडला. अद्वातद्वा बोलायला लागला. न्यायमुर्तींनी पोलीसांना बोलावलं. मित्राला दबाव आणण्याचा प्रयत्न केला म्हणून अटक करायला लावली.
न्यायमुर्तींनी नंतर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना फोन करून सांगितलं, "तो चांगला माणूस आहे. माझा शाळेतला जवळचा मित्र आहे. खेड्यातला आणि अल्पशिक्षित असल्यानं त्याला कायदेशीर बाबी, न्यायालयीन शिष्टाचार माहित नाहीत. त्याच्यावर एफआयआर दाखल करू नका. फक्त रात्रभर त्याला पोलीस चौकीत बसवून ठेवा. सकाळी समज आणि दम देऊन सोडून द्या. मी माझ्या पीएजवळ त्याच्या बसच्या तिकीटाचे पैसे पाठवून देतोय. त्याला गावच्या एसटीत तिकीट काढून बसवून द्या. मी पैसे पाठवलेत हे मात्र त्याला सांगू नका."
दुसर्‍या दिवशी पोलीसांनी दम देऊन सोडल्यावर मित्र गावी गेला. सार्‍या गावभर त्यानं न्यायमुर्तींना शिव्या घातल्या. "मोठा काय झाला? गावाला आणि मित्रांना विसरला, वगैरे."
यथावकाश त्याच्या शेतीच्या केसचा निकाल लागला. केस दुसर्‍या न्यायमुर्तींपुढे चालली होती. निकाल मेरीटवर त्याच्या बाजूचा होता.

No comments:

Post a Comment