Monday, April 3, 2017

महत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2

ल. सि. जाधव यांचं महत्वाचं तरिही उपेक्षित आत्मकथन - 2
इतकं पारदर्शक, संतुलित आत्मकथन एव्हढं दुर्लक्षित का राहावं?
इतर दलित आत्मकथनांच्या वाट्याला डझनांनी पुरस्कार आलेले असताना ह्याची मात्र उपेक्षा का व्हावी? या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. त्यामुळं विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील? आचार्य अत्रे यांनी 1950 च्या दशकात महात्मा फुल्यांवर दर्जेदार चरित्रपट बनवला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. अत्रे म्हणाले,"चित्रपट ब्राह्मणेतराच्या जीवनावरचा असल्यानं ब्राह्मण प्रेक्षक तिकडे फिरकले नाहीत आणि दिग्दर्शक ब्राह्मण असल्यानं ब्राह्मणेतर चित्रपट बघायला गेले नाहीत." दलित आत्मकथन आणि त्यात होरपळ असं थेट शीर्षक असल्यानं मध्यमवर्गियांनी या पुस्तकाकडं दुर्लक्ष केलं असणार आणि दलित असूनही चढा सूर नाही, आक्रोश नाही, विद्रोह नाही, त्यामुळं मातब्बर दलित साहित्यिकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं...
त्रं. वि. सरदेशमुख यांच्या "डांगोरा एका नगरीचा" या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्र्यं.वि. सरदेशमुख हे ल. सि. जाधव यांचे प्राध्यापक. हे विद्यार्थी - शिक्षक संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. त्या मौलिक कादंबरीची मुद्रण प्रत जाधवांनी आपल्या सुंदर हस्ताक्षरात तयार केली. त्यांच्या ह्या कामाची दखल मौज प्रकाशनाचे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांनी आवर्जून घेतली.
या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेबाबतचा या पुस्तकातला भाग अत्यंत मनोज्ञ उतरलेला आहे. त्र्यं. वि.सरांच्या स्वभावाचे अनेक गमतीदार पैलू समजून घेताना वाचक या आत्मकथनात गुंतून पडतो.
आत्मसमर्थन हा प्रत्येक आत्मचरित्राचा अटळ भाग असतो. जाधव मात्र स्वसमर्थनार्थ काहीही न लिहिता उलट आपण कसे भित्रे, बुजरे, संकोची आणि कायम भेदरलेले कसे होतो त्यावर सातत्यानं प्रकाशझोत टाकतात. इतरांना आणि व्यवस्थेला दुगाण्या झाडण्याऎवजी ते आत्मपरिक्षण करीत जातात. लोक दागिने मोडून खातात तसे काही लेखक गरिबी मोडून खातात. जाधव मात्र वेदना मांडतानाही त्याचं भांडवल करायचं टाळतात.
दारिद्र्य, शोषण, बकाल जगणं यात व्यसनाधीनता अपरिहार्यच असते की काय असं वाटावं इतकं त्याचं चित्रण मराठीत आलेलं आहे. झोपडपट्टीत वाढलेला आणि सर्व नातेवाईक व्यसनाधीन असलेला हा माणूस मात्र चक्क निर्व्यसनी असावा हे मला बेहद्द आवडलं.
भावाला ब्रेन ट्यूमर झाल्याचं समजल्यावर कुटुंबाची उडालेली गाळण, त्यासाठीचे त्यांनी केलेले औषधोपचार या सार्‍याबद्दल मूळ पुस्तकातच वाचायला हवं.
सोलापूरच्या बहुतेक सगळ्या साहित्यिकांशी यांची मैत्री. त्यांच्याबद्दलचे अनेक अनुभव यात येतात.
लेखकानं सुरूवातीला सोलापूर मनपा कार्यालयात नोकरी केली. त्यानंतर ते प्राध्यापक होण्यासाठी दोन महाविद्यालयात पत्र आल्यानं रूजू व्हायला गेले. पण कोणीतरी त्यांना तिकडं त्रास दिला जाईल अशी भिती घातल्यानं हा माणूस रूजू न होता तिकडनं सरळ निघून आला.
स्टेट बॅंकेत नोकरी करताना मुंबई इंटर नॅशनल एअरपोर्ट ब्रॅंचचे अनुभव धमाल आहेत.
याकाळात पत्नीच्या एका नातेवाईकांना भेटायला ते झोपडपट्टीत जातात. नातेवाईक खूप गरिब आणि कर्जबाजारी असतात. पण जावई आणि मुलगी भेटायला आली म्हटल्यावर ते या दोघांना आहेर करतात, साडी, चोळी,पॅंट पीस, शर्ट पीस देऊन. नंतर जाधवांच्या लक्षात येतं की त्या गरिबानं चक्क बायकोचं मंगळसूत्र विकून हा आहेर विकत आणलेला असतो. हा सारा भाग गलबलून टाकणारा आहे.
जाधवांच्या आईच्या शेवटच्या आजारपणाची आणि तिच्या मृत्यूची यातली कहाणी चटका लावणारी आहे. आजारपणातल्या खर्चानं जाधव मेटाकुटीला आलेले असताना आई जाते. आता कर्ज काढूनच अंत्यविधी शक्य असतो. अशावेळी आईची पिशवी सापडते, त्यात तिनं आयुष्यभर जमवलेली पैनपै साठवलेली असते. त्यात साडेतीन हजार रूपये सापडतात हे वाचताना डोळे भरून येतात.
इतकं पारदर्शक, संतुलित आत्मकथन एव्हढं दुर्लक्षित का राहावं? सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनानं उत्तम निर्मितीमुल्यं असलेलं 280+8, पृष्ठांचं हे पुस्तक अवघ्या 230 रूपयांना दिलेलं आहे.
इतर दलित आत्मकथनांच्या वाट्याला डझनांनी पुरस्कार आलेले असताना ह्याची मात्र उपेक्षा का व्हावी? या आत्मकथनात पानापानावर ना विद्रोह ना आक्रोश. विद्रोह आणि अस्मितेच्या नावानं आदर्श कोंडवाडे चालवणार्‍या मठाधिपतींना जाधव कसे चालतील?
आचार्य अत्रे यांनी 1950 च्या दशकात महात्मा फुल्यांवर दर्जेदार चरित्रपट बनवला. त्याला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला पण चित्रपट काही चालला नाही. अत्रे म्हणाले,"चित्रपट ब्राह्मणेतराच्या जीवनावरचा असल्यानं ब्राह्मण प्रेक्षक तिकडे फिरकले नाहीत आणि दिग्दर्शक ब्राह्मण असल्यानं ब्राह्मणेतर चित्रपट बघायला गेले नाहीत."
दलित आत्मकथन आणि त्यात होरपळ असं थेट शीर्षक असल्यानं मध्यमवर्गियांनी या पुस्तकाकडं दुर्लक्ष केलं असणार आणि दलित असूनही चढा सूर नाही, आक्रोश नाही, विद्रोह नाही, दलित अस्मितेचा झेंडाही नाही. लेखक मातंग. ठराविक मातब्बर दलित साहित्यिकांनी त्याच्याकडं दुर्लक्ष केलं असावं.
उत्तम वाचणारांनी, दर्जेदार वाचणारांनी हे पुस्तक चुकवू नये.
ल. सि. जाधव ..9423858698
प्रकाशक- बाबुराव मैंदर्गीकर, सुविद्या प्रकाशन, 374 उत्तर कसबा, सोलापूर,413 007
ISBN 978-81-92/757-2-5

No comments:

Post a Comment