Monday, April 3, 2017

सामाजिक कार्य -

गोरगरिब जनता ही अमाप कष्ट करणारी, सचोटीनं जगणारी असते. मात्र त्यांच्यावर जगणारा एक परोपजिवी[बांडगुळ]वर्ग असतो. गावगाडा या 1915 सालच्या पुस्तकात त्रिं.ना.आत्रे यांनी कष्ट न करता जगणार्‍या या घटकाचं नेमकं चित्रण केलेलं आहे.
कष्टकरी, पापभिरू आणि मध्यमवर्गियांच्या मनात कणव असते. कळवळा असतो आणि काहींच्या मनात एक अपराधगंडही असतो. गोरगरीब, भटके अशांना मदत केली तर पुण्य मिळतं अशी धारणा असते. नेमकी हीच भावना वापरून कोणत्याही कष्टाविना जगणारा हा वर्ग तयार झालेला असतो.
सोलापूरच्या सेटलमेंट कॅंपमधील भटक्या-विमुक्तांचे पुनर्वसन करण्याचा प्रयोग करण्यात आला. कसण्यायोग्य सरकारी जमिन मोफत मिळवून त्यांना देण्यात आली. विविध सरकारी योजनांमधून त्यांना घरं बाधून देण्यात आली. विहीरीद्वारे पाण्याची सोय करण्यात आली. सोलापूरचे माजी महापौर भीमराव जाधव यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ही सारी माहिती विस्तारानं दिलीय. ते स्वत:ही याच समाजातले. खूप प्रयत्न करूनही हा प्रयोग अपयशी ठरला.
का?
कारण फारसे कष्ट न करता भिक मागून, खिसे कापून, दारू गाळून जर चैनीत जगता येत असेल तर लोक तोच पर्याय निवडतात, श्रमाचा, कष्टाचा नाही, असा गुरूजींचा अनुभव आहे.
पिंपरीला भटक्यांपैकी एका विशिष्ट समाजाच्या शेकडो लोकांना झोपड्यांच्या जागेवर उत्तम फ्लॅट मोफत बांधून देण्यात आले.
काही महिन्यांनंतर असं लक्षात आलं की त्यातल्या बहुतेकांनी आपले फ्लॅट विकले आणि ते परत रस्ताकाठी झोपड्या बांधून राहू लागले.
इचलकरंजीला यातल्याच एका समाजाच्या लोकांना शासनामार्फत मस्त चाळीवजा घरं मोफत बांधून देण्यात आली. उद्घाटन झालं. लोक राहायला गेले.
2 महिन्यांनंतर सरकारी अधिकारी भेटीला गेले तेव्हा एकाही घराला दरवाजे, खिडक्या शिल्लक नव्हत्या. चौकशीत समजलं, सर्वांनी दारं, खिडक्या जळण म्हणून वापरल्या होत्या. झोपडीला कुठं दारं, खिडक्या असतात ना?
काही दिवसातच ती घरं विकून ते परत उघड्यावर झोपड्या घालून राहू लागले.
मदत किंवा भिक देताना नेहमी विचार करा ती सत्पात्री जातेय ना? आपण ऎदीपणाला, आईतखाऊपणाला तर प्रोत्साहन देत नाही ना? वृद्ध आणि अपंग वगळता इतरांनी कष्ट करूनच जगायला हवं. फुकट्यांना, मग ते कोणत्याही स्तरातील असोत आपला विरोध असायला हवा.
.....................
डिसक्लेमर :- या क्षेत्रातील 40 वर्षांच्या अनुभवानंतर उमगलेले सत्य -- या क्षेत्रात काम करणारे बहुतेक नेते लोक पोटार्थी आहेत. ती त्यांची रोजगार हमी आहे. तरिही प्रामाणिकपणे काम करणारा एखादा, दुसरा अपवाद करायला हवा याची मला जाणीव आहे.

No comments:

Post a Comment