Saturday, December 2, 2017

कोपर्डी आणि खर्डा- जिल्हा एकच, न्यायाचं काय?


नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या मुलीवर झालेले अत्याचार भयंकरच होते. चीड आणणारेच होते.
दोषींना कडक शिक्षा व्हायलाच हवी होती. तशी ती झाली. फाशीचा जल्लोष सर्वदूर करण्यात आला. योग्यच झाले अशी भावना सर्वत्र उमटली.
नगर जिल्ह्यातील खर्डा, नितीन आगे हत्या प्रकरणातले सगळे आरोपी मात्र निर्दोष सुटले, याची हळहळ काही मोजक्यांनाच वाटली.
नगर जिल्ह्यातले हेरंब कुलकर्णी कळवळले. इतर चारदोन लिहू बोलू लागले.
मला वाटते दिवंगत नितीन आगेचे अनेक गुन्हे होते.

* नितीननं बहुसंख्याक जातीत जन्म का घेतला नाही?
1. नितीनने दलित जातीत जन्माला येऊन एका सवर्ण मुलीवर प्रेम केले. तीही प्रबळ, संघटित, लढाऊ आणि सत्ताधारी जातीतली. त्यानं प्रेम करण्यापुर्वी जात बघून प्रेम करायला हवे होते. जिवंत असलेल्या संभाव्य नितीन आगेंनी याची नोंद घ्यावी.
2. नितीनने बहुधा स्वत: आत्महत्त्या केली असावी. आणि निर्दोष अशा गरिब मुलांवर हत्येचा नाहक आरोप लादण्यात आला असावा. ते सर्व सुटले ते "योग्यच" झाले. त्यांनीच आता नितीनच्या आईवडीलांवरच बदनामीची फिर्याद दाखल करावी. चांगली अद्दल घडायला हवी त्यांना.
3. सगळेच साक्षीदार फिरले.
त्यांना बिच्यार्‍यांना त्या गावात आणि महाराष्ट्रात राहायचंय ना?
यापुढे महाराष्ट्रात राहायचे असेल किंवा निवडून यायचे असेल तर प्रबळ, संघटित, लढाऊ आणि सत्ताधारी जातीला दुखावण्याची हिम्मत कोणताही राजकारणी करणंच शक्य नाही.

4. पोलीस त्यांचे. सरकार त्यांचे. सत्तेतील बी टीमही त्यांची. सगळेच साहेब त्यांचे. अशावेळी नितीन आगेसाठी नाहक अश्रू कोण गाळणार? आमची संवेदनाच जिथं जातीय झालीय, तिथं कोणी कोणासाठी रडावं, लढावं, बोलावं, लिहावं, वाईटपणा घ्यावा?
5. दिवंत राष्ट्रवादी आर.आर. आबापाटील तेव्हा गृहमंत्री होते. ते म्हणाले होते, फास्ट ट्रॅक कोर्ट नेमू. उज्ज्वल निकमांची नियुक्ती करू.
प्रत्यक्षात काहीही झाले नाही.
कारण गोष्ट राजकीय समीकरणात उलटी होती. तसं करायचं तर स्वजातीयांना दुखवावे लागले असते. अशी पॉलीटिकली करेक्ट नसलेली गोष्ट कोणतेही साहेब घडूच देणार नाहीत.

6. भांडारकर हल्ला प्रकरणातील 72 जणही निर्दोष सुटले. ही 4 जानेवारी 2004 ची घटना घडली तेव्हाही आबाच गृहमंत्री होते.
इथे तर भांडारकर संस्थेतलेच साक्षीदार फिरले. जणू आरोपींनाच सामील झाले. भांडारकरमधल्याच लोकांनी बहुधा हल्ल्याचं नाटक करून निर्दोष ब्रिगेडींना नाहक गुंतवलेले असणार.खरंतर या 72 जणांनी भांडारकरवर बदनामीचा दावा लावायला हवा.
काय करणार, पुन्हा पुन्हा जानेवारी 1948 परवडत नसते मालक.

7. लोकशाहीमध्ये बहुसंख्यांकच राज्य करत असतात. त्यांच्या मेहरबानीवर तुम्ही आम्ही जगत असतो. त्यांना दुखवले की तुमचा दाभोळकर, पानसरे होणं अटळच असतं.
8. नितीन आगेप्रकरणी आता मा. महाकवी आणि केंद्रीय मंत्री श्री. रामदास आठवले म्हणतात, हायकोर्टात लढू.
हायकोर्टात साक्षीपुरावे होत नसतात.
जिथे सगळेच साक्षीदार फिरले तिथे हायकोर्ट तरी काय करणार?

8. जेसिका लाल प्रकरणात वेगळे घडले होते कारण तेव्हा जनताच रस्त्यावर आली होती. नितीनसाठी "आगे" कोणी यावं?
जिवावर उदार होऊन साक्ष द्या म्हणणं सोपं. प्रत्यक्षात अशी वेळ आल्यावर समजतं मालक. जातीय दहशत किती भयानक असते.

9. माध्यमे- वर्तमानपत्रे आणि वाहिन्यांबाद्दल लिहित नाही. त्यांनाही वाचक/टीआरपीची मजबुरी आहे. तेही शेवटी नोकरदार आहेत.त्यांनाही त्यांचे संसार, मुलंबाळं आहेत.
10. सगळ्या वाहिन्यांवरच्या चर्चा बघा. दलित, ओबीसी, आरक्षण असले काही विषय असतील तरच औषधापुरते त्या त्या समाजघटकातले प्रतिनिधी चर्चेला बोलावले जातात.
एरवी बाकी तमाम सगळ्या विषयांमध्ये "तज्ञांना" बोलावले जाते. तेथे पाहिजे जातीचे.
हे तज्ञ सध्या तरी दोनतीनच जातीत जन्मलेले आहेत हा निव्वळ योगायोग आहे. त्याला ते तरी काय करणार?
11. जिथे आम्ही आमच्या महान संतांचे उल्लेख करतानाही नावामागे त्यांच्या जाती लावतो. उदा. सावता माळी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, सेना न्हावी, चोखा मेळा, नामदेव, [संत नामदेव यांच्या नावामागे जातीचा थेट उल्लेख नसला तरी याच नावाची शिंपी समाजाची एक पोटजात आहे....]......
फक्त दोनतीन जातीतले संत याला अपवाद असतात. कारण ते सर्वांचेच असतात. बाकीचे संत मात्र त्या त्या जातीचे असतात.

12. चालयचंच. उत्तमच आहे म्हणा. कधीकाळी याच महाराष्ट्राचा मला अतिशय अभिमान वाटायचा. आता फक्त, दहशत, उबग आणि खेद. आपल्याच राज्यात आपण गुलाम असल्याची खंत.

13. या देशात बळी हा माणूस होता यापेक्षा त्याची जात महत्वाची असते. नितीन आगे दलित असला तरी तो हिंदू मातंग या जातीचा. राज्यात सत्ता हिंदुत्ववाद्यांकडे आहे. पण तमाम हिंदुत्ववादी पक्ष-संघटना नितीनच्या हत्त्येवर मिठाची गुळणी धरून आहेत. कारण सरळ आहे. बहुसंख्याक जातीचे हिंदू विरूद्ध अल्पसंख्याक जातीचे हिंदू असा जेव्हा संघर्ष असतो तेव्हा सत्तेसाठी बहुसंख्याक महत्वाचे. न्याय, निती, सत्य हे काय कामाचे? 
हरी नरके, नितीन आगे प्रकरणावर तुम्ही का लिहित नाही अशी फे.बु.वरून वारंवार विचारणा व्हायला लागली म्हणून मग स्पष्टच लिहिले.

14. दु:खाची गोष्ट म्हणजे फेबुवरच्या अनेक प्रतिभावंतांना उपरोधही कळत नाही.
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment