Wednesday, December 25, 2019

बाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?- प्रा. हरी नरके




बाबासाहेबांनी मनुस्मृती ३ वेळा का जाळली?- प्रा. हरी नरके

मनुस्मृती हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून ते एक कायद्याचे पुस्तक होय. बाबासाहेब म्हणतात, मनुस्मृती वॉज लिगल ॲण्ड पिनल कोड. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात ज्याप्रमाणे ब्रिटीशांचे अन्याय कायदे आम्ही मानत नाही असे सांगण्यासाठी कायदेभंगाचे आंदोलन केले गेले तसेच आंदोलन म्हणजे मनुस्मृतीचे दहन करणे होय. विदेशी कापडांची होळी करणे जसे जन आंदोलन होते तसेच मनुस्मृती या माणूसघाण्या पुस्तकाची प्रत जाळण्याचे कृत्य प्रतिकात्मक होते. बाबासाहेब पुस्तकप्रेमी असताना त्यांनी पुस्तक कसे जाळले? मनुस्मृतीत काहीच चांगले नव्हते का? मनुचा काय दोष, त्याने तर तत्कालीन कायद्यांचे संकलन केले, मनु ब्राह्मण नसून क्षत्रिय होता, अशा नानाविध युक्तीवादांद्वारे या गलिच्छ पुस्तकाचे व कर्त्याचे समर्थन केले जाते.

कोण असतात हे लोक?
१. मनुस्मृतीचे पिढीजादा लाभार्थी,
२. अशा लाभार्थ्यांकडे बुद्धी गहान टाकलेले स्त्री किंवा पुरूष = पाळीव पोपट,
३. आंत्यंतिक अज्ञानी, सनातनी, विकृत, वेडे,

मनुस्मृतीचे समर्थन करणारा कुणीही प्राणी माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचा असत नाही. अशा विकृतांना चार जोडे मारून एक मोजला पाहिजे. अशी घाण दूरच ठेवलेली बरी. पिढ्यानपिढ्या वरील ३ वर्गात मोडणार्‍या या इसमांची किंव किंवा किळसच करायला हवी. मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, सराईत गुन्हेगार किंवा राष्ट्रद्रोही इसमांच्या वर्तनाचे समर्थन करणे होय.

मूठभर त्रैवर्णिक पुरूषांना उच्च आणि तमाम बहुजनांना नीच मानणारा हा कायदा, सरसकट समस्त स्त्री वर्गाला गुलाम मानणारा हा मनू, उच्चवर्णियांचे हितरक्षण करताना माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ तिनदाच काय पुन्हापुन्हा जाळायला हवा. जोपर्यंत मनुची पिळावळ जिवंत आहे, तोवर नियमितपणे जाळायला हवा. नाकारायला हवा. गटारात फेकायला हवा.

बाबासाहेबांना कुठे संस्कृत येत होते? त्यांना काय माहित मनुस्मृतीत काय होते? असले साळसूद प्रश्न विचारणार्‍यानो, तुमच्या बापजाद्यांनी त्यांना संस्कृत शिकू दिले नाही. त्यांना शाळेत त्याऎवजी पर्शियन शिकावे लागले. तरिही त्यांनी पुढे गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, सोहनलाल शास्त्री अशा मान्यवरांच्या खाजगी शिकवण्या लावून संस्कृतवर हुकमत मिळवली.

ज्या माणुसकीच्या शत्रूने म्हणजे मनूने [ ती व्यक्ती असो, संस्था असो, मठ असो, ब्राह्मण किंवा क्षत्रिय असो ] गटारगंगा पसरवली, ज्या नीच प्रवृत्तीने ८५ % स्त्री शूद्रांना जनावरांपेक्षा हीन वागणूक दिली, उच्च प्रतीची गुणवत्ता असतानाही शूद्रांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही, संडासला बसतानाही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्रांनी वेगवेगळ्या दिशांना तोंडे करून बसावे, ब्राह्मणाचे नाव मंगलवाचक तर शूद्राचे नाव किळसवाणे ठेवावे, स्त्री- शूद्रांनी शिक्षण घेणे हा गुन्हा आहे, स्त्रियांना कधीही स्वातंत्र्य देऊ नये असल्या गलिच्छ विचारांची पोतडी म्हणजे मनुस्मृती.

काय आहे मनुस्मृतीत?

" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]
" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]

" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]

" स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]
" पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]
" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[9/46]

सार्थ श्रीमनुस्मृती हा मूळ संस्कृत श्लोकांसह त्यांचा मराठी अनुवाद देणारा वेदशास्त्रसंपन्न विष्णुशास्त्री बापट यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचायला हवा. विशेषत: सर्व सामाजातील स्त्रिया आणि माळी, साळी, तेली, कुणबी, वंजारी, आगरी, भंडारी, शिंपी, सोनार, सुतार, नाव्ही आदींनी वाचायला हवा.

संस्कृत पाठशाळा चालवणारे बापटशास्त्री प्रस्तावनेमध्ये लिहितात, " मनुस्मृती हे धर्मशास्त्र आहे व त्याची योग्यता इतर कोणत्याही स्मृतीपेक्षा अधिक आहे.सनातन धर्माचा जीव असे जे चार आश्रम व चार वर्ण त्यांची व्यवस्था या स्मृतीमध्ये जशी स्पष्ट दिसते तशी ती वेदांमध्ये आढळत नाही...स्त्रीधर्म व पुरूषधर्म यांचा या स्मृतीमध्ये पूर्णपणे विचार केलेला आहे"

मनुस्मृतीवर मेधातिथी, सर्वज्ञनारायण, कुल्लकभट्ट, राघवानंदसरस्वती, नंदन,रामचंद्र, गोविंदराज, श्रीमाधवाचार्य, धरणीधर, श्रीधरस्वामी, रूचीदत्त, विश्वरूप, भोजदेव व भारूचि अशा एकंदर चौदा महापंडितांनी निरनिराळ्याकाळी केलेल्या चौदा टिका सर्वमान्य आहेत."

या सर्व टिकांचे आठ खंड भारतीय विद्या भवनने प्रकाशित केलेले आहेत.

आचार्य नरहर कुरूंदकर, डॉ. प्रदीप गोखले, डॉ. आ.ह.साळुंखे व भदन्त आनंद कौशल्यायन यांचे मनुस्मृतीवरचे ग्रंथ अतिशय मौलिक आहेत.

मनुस्मृती हा ग्रंथ बारा अध्यायांचा असून त्याचे 2634 श्लोक आहेत.

बापटशात्रींचा मराठी अनुवाद पुढे देत आहे. [कंसात अध्याय व श्लोक क्रमांक दिलेला आहे.]

" सहज शृंगार चेष्टेने मोहित करून पुरूषांस दुषित करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे.यास्तव ज्ञानी पुरूष स्त्रियांविषयी कधी बेसावध राहात नाहीत." [2/13]

" माता, बहीण व कन्या यांच्या बरोबरही पुरूषाने एकांतात बसू नये." [2/15]

" ज्यांना फक्त मुलीच झालेल्या असतील त्यांच्या मुलींशी लग्नं करू नयेत." [3/8]

" जिला भाऊ नसतील तिच्याशी शहाण्याने विवाह करू नये." [ 3/11]

" ज्या कुळामध्ये पिता, पती द्वारा स्त्रियांची पूजा होत असते तेथील देवता प्रसन्न होतात." [3/56]


" नवर्‍याने बायकोसोबत एका ताटात जेवन करू नये. तसेच पत्नीला जेवताना, शिंकताना, जांभई देताना पाहू नये." [4/43]

" आता स्त्रियांचे धर्म सांगतो, ते ऎका- बाल्यावस्थेत मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वृद्ध बाईनेही घरातील लहानसे कार्यही स्वतंत्रपणे करू नये." [5/47]

" स्त्रीने कधीही स्वतंत्र होऊ नये." [5/48]

" पिता, पती,पुत्र यांच्यावेगळी राहणारी स्त्री दुष्ट झाल्यास आपल्या दोन्हीं कुळांस निंद्य करते." [5/49]
" पति जरी विरूद्ध असला तरी स्त्रिने प्रसन्न मुद्रेने असावे. गृहकर्मामध्ये दक्ष होऊन राहावे. घरातील सर्व भांडी तिने घासून पुसून स्वच्छ ठेवावीत." [5/150]

" लग्नात वधूचे दान केले जाते, त्यामुळे ती पतीच्या मालकीची वस्तू असते हे तिने कायम ध्यानात ठेवावे." [5/152]

" पती सदाचारशून्य असो, तो दुसर्‍या बाईवर प्रेम करीत असो, विद्येने तो गूणशून्य असो, तो कसाही असला तरी पत्नीने त्याची देवाप्रमाणे सतत सेवा करावी." [5/154]

" पतीची सेवा हेच पत्नीचे व्रत होय. तिचा यज्ञ होय. त्याच्या आज्ञेत राहाणे हाच तिचा स्वर्ग होय." [5/155]

" स्त्रियांनी पहिला पती वारला तरी कधीही दुसरा नवरा करू नये." [5/162]

" स्त्रीधर्माप्रमाणे मन, वाणी, देह, यांच्याद्वारे जी आपली पतीची कायम सेवा करते तिलाच स्वर्ग मिळतो." [5/166]


" पहिली पत्नी वारली तर तिचे दहन करून पतीने दुसरे लग्न करावे." [5/168]

" पिता,पती, आप्त यांनी स्त्रियांस सर्वदा आपल्या आधीन ठेवावे. सामान्य विषयांमध्ये त्या आसक्त झाल्यास त्यास आपल्या वश करून घ्यावे." [6/2]

" विवाहाच्या पुर्वी पित्याने, त्यानंतर पतीने, म्हातारपणी पुत्राने तिचे रक्षण करावे. सारांश कोणतीही स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही.योग्य नाही." [ 6/3]

" स्त्रीसाठी मद्यपान, दुर्जनसमागम, पतीपासून दूर राहणे, इकडे तिकडे भटकणे, अयोग्य वेळी निजणे, दुसर्‍याच्या घरी राहणे हे सहा व्याभिचारदोष होत." [9/13]

"स्त्रिया सुंदर रूप पाहात नाहीत, त्यांना यौवनादी वयाबद्दल आदर नसतो, पुरूष सुरूप की कुरूप कसाही असला तरी तो पुरूष आहे एव्हढ्याच कारणाने त्या चा भोग घेतात." [9/14]

"पुरूषाला पाहिल्याबरोबर संभोगाविषयी अभिलासा उत्पन्न होणे हा स्त्रिचा स्वभाव असतो. त्या चंचल असतात. त्या स्वभावत: स्नेहशून्य असतात. [9/15]

" स्त्रियांना वेदांचा अधिकार नाही. स्मृतींचा नाही. धर्माचा नाही. त्या धर्मज्ञ बनू शकत नाहीत. त्या अशुभ असतत." [9/18]

" व्याभिचार हाच स्त्रियांचा स्वभाव आहे." [9/19]

" नवर्‍याने बायको सोडली किंवा विकली तरी त्याची मालकी कायम राहते."[9/46]

आय हेट मनुस्मृती. आय सॅल्युट बाबासाहेब, कुरूंदकर, गोखले, साळुंखे ॲण्ड कौशल्यायन.

२५ डिसेंबर १९२७ ला पहिल्यांदा, भारतीय राज्यघटनेच्या १३ व्या कलमाद्वारे दुसर्‍यांदा आणि बौद्ध धर्म स्विकारून तिसर्‍यांदा भारतरत्न बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली.

मनुस्मृतीचे समर्थन करणे म्हणजे बलात्कारी, स्मगलर, राष्ट्रद्रोही इसमांचे समर्थन करणे होय. अशांना जवळपासही फिरकू देऊ नका. हे प्लेगचे उंदीर जाळलेलेच बरे. कारण ते निकोप आरोग्याला घातक आहेत. भयंकर व्हायरस आहेत. त्यातनं साथीचे रोग पसरतात.

- प्रा. हरी नरके, २५ डिसेंबर, २०१९

No comments:

Post a Comment