Wednesday, February 6, 2019

एक भाषा- एक विचार-एक दृष्टी हे सूत्र विनाशकारी







लाखो वर्षात माणसाने जमवलेल्या अनुभवाची सारी स्मृती शब्द माध्यमात आहे. आज जर आपण भाषिक विविधता जपली नाही तर आत्तापर्यंत जमवलेले अनुभव वैविध्य आपण गमावून बसू. त्यासाठी विविधता हे तत्व जीवनाच्या सर्व क्षेत्रात स्विकारले पाहिजे. त्यासाठी जैविक विविधता, सांस्कृतिक विविधता, मत वैविध्य हे सारे एका प्रगतीशील दृष्टीकोनातून स्वीकारणारे समाज, सरकारे, देश, संस्था निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. 

त्याऎवजी "एक भाषा- एक विचार-एक दृष्टी" अशा मताच्या संस्था, सरकारे यांना आपण कवटाळले तर आपण स्वत:च्या हाताने मनुष्यजातीचा विनाश ओढवून घेऊ. 

भाषा हे सर्वाधिक महत्वाचे सांस्कृतिक भांडवल आहे. भाषा जगवायच्या असतील तर त्या बोलणार्‍या लोकांना सन्मानाने वागवले पाहिजे. 

रोजगार आणि सामाजिक प्रतिष्ठेसाठी एखाद्या भाषिक समाजातील बुद्धीजिवी जेव्हा त्या भाषेचा हात सोडून दुसरीच्या मागे पळू लागतात तेव्हा ती भाषा मरू लागते. 

समाजाच्या जाणीवा आणि भाषा यांचा जागतिक अर्थव्यवहाराशी संबंध असतो. ही पृथ्वी आणि तिच्यावरचे सगळे काही आपल्या एकट्याच्याच मालकीचे आहे असे समजून तिला ओरबाडीत सुटलेले विकासाचे मॉडेल आणि आणि ते देणारी भाषा ह्या दोन्हींना आपण नकार दिला पाहिजे. 

एखादी भाषा निर्माण व्हायला शतकानुशतके लागतात. या भाषा हे आपले सांस्कृतिक संचित आहे. त्या नष्ट करणारा भाषासंहार आपण रोखायला हवा.

-प्रा. गणेश देवी,
त्रिज्या, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती ५ नोव्हेंबर २०१८, पृष्ठे-१६८, मूल्य, रू. २३०, 

संपर्क- मो.७३ ५० ८३ ९१ ७६, ०२०-२५ ४४ २४ ५५, इमेल p.padmagandha@gmail.com

No comments:

Post a Comment