Sunday, October 20, 2019

अंतर्नादच्या २५ व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन -









मराठीला दिवाळी अंकांची ११० वर्षांची समृद्ध परंपरा आहे. दरवर्षी ५०० दिवाळी अंक निघत असत. औद्योगिक मंदी, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कंबरडे मोडल्याने व्यापारी व उद्योगपतींनी दिवाळी अंकांना जाहीराती देणे बंद केले किंवा आधीच्या तुलनेत ते एकदम अवघ्या २५% वर आणले. परिणामी गेल्या ५ वर्षात सुमारे २५० दिवाळी अंक बंद पडले. यावर्षी निवडणुका आणि राज्यातील काही भागात दुष्काळ तर उर्वरित भागात महापूर आल्याने आणखी बर्‍याच दिवाळी अंकांची आरेतील झाडांप्रमाणेच कत्तल होणार असे समजते.

मराठीतील सर्व दिवाळी अंकांमधले सर्वश्रेष्ठ तीन अंक निवडले तर जो दिवाळी अंक गेली २५ वर्षे पहिल्या ३ अंकांमध्ये असतोच तो म्हणजे अंतर्नाद.

भानू काळे व वर्षा काळे यांनी अतिशय मेहनतीने, निगुतीने आणि साक्षेपाने प्रकाशित केलेला हा २५ वा अंक बहुधा शेवटचाच असण्याची शक्यता आहे. यापुढे तो आजच्या स्वरूपात निघणार नाही. तथापि तो इ फॉर्ममध्ये किंवा अन्य स्वरूपात कदाचित निघेल अशी आशा आहे.

मराठीची ११० वर्षांची दिवाळी अंकांची ही परंपरा मराठी माणसांच्या भाषक अनास्थेमुळे आता लवकरच मोडीत निघण्याच्या दिशेने चाललेली आहे.

आज पुण्यात अंतर्नाद या दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रा.हरी नरके यांच्या हस्ते झाले. गेले २ दिवस पुण्यात सलग आणि धोधो पाऊस पडत असल्याने कार्यक्रमाला सभागृह रिकामेच असेल अशी भिती होती. तथापि अंतर्नादवर प्रेम करणार्‍या साहित्यिक आणि वाचकांनी कार्यक्रमाला मोठी गर्दी केलेली होती. ७०% खुर्च्या भरलेल्या होत्या. स्वत:चे भाषण नसूनही मोठमोठे साहित्यिक केवळ ऎकायला आलेले होते हा चमत्कारच होय.

अंतर्नादचा हा २५ वा दिवाळी अंक आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तप्रसाद दाभोळकर होते. यावेळी व्याकरणकार यास्मिन शेख आणि विज्ञान कथाकार सुबोध जावडेकर यांचे सत्कार करण्यात आले. २३ वर्षे अंतर्नाद हे मासिक चालवून २ वर्षांपुर्वी ते बंद करावे लागले. मात्र ही २ वर्षे ते दिवाळीत प्रसिद्ध होत असे.
या कार्यक्रमाला मिलिंद बोकील, मेघना पेठे, उमा व विरूपाक्ष कुलकर्णी, राजन खान, सुहास व साधना बहुळकर, विनय हर्डीकर, अनंत सामंत, विजय पाडळकर, एम के सी एल चे विवेक सावंत, विनया खडपेकर, विलास पाटील, सनदी अधिकारी बापू करंदीकर, मिलिंद जोशी, सुधीर जोगळेकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्यानंतर चंद्रशेखर महामुनी यांचा "त्या सुरांच्या गंधकोशी" हा दर्जेदार कवितांचा, भावगीतं आणि चित्रगीतांचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.

प्रा. हरी नरके, २०/१०/२०१९

No comments:

Post a Comment