Friday, July 23, 2021

दोन अनुभव


१)गेले २ महिने मी "ओबीसीचे पंचायत राज्यातील आरक्षण" या विषयावर दररोज बोलतोय, लिहितोय, तरीही हा काय विषय आहे जरा थोडक्यात सांगा असे आजकाल काही अनोळखी पत्रकारांचे फोन येतात. एव्हढा गदारोळ आजूबाजूला चाललेला असताना ह्या विषयाची प्राथमिक माहितीही नसलेले हे नवोदित पत्रकार खरंच धन्य होत. आपल्याला या विषयाची किंचितही माहिती नसल्याची तिळमात्रही खन्त त्यांना नसते. मला एक प्रसंग आठवला, पुलंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला इंग्रजी वर्तमानपत्राच्या एक विदुषी आलेल्या होत्या. त्यांनी पहिलाच प्रश्न विचारला, मि. देशपांडे, मी असं ऐकलंय की तुम्ही काही पुस्तकं सुद्धा लिहिलीयत तर मला जरा त्यातल्या काहींची नावं सांगता?
२) मी ज्या विषयावर लिहितोय,बोलतोय त्याच्याशी काडीमात्र देणेघेणे नसलेले अनेकजण तुम्ही यावर का लिहित नाही? त्यावर का नाही बोलत? असं विचारीत असतात. जगात अनेक प्रश्न आहेत.तुमचा प्रश्न हेच एकमेव जग आहे असे वाटण्याचा तुम्हाला हक्क आहे. पण मी सर्वज्ञ नाही. मी फार छोटा माणूस आहे. जगातल्या सगळ्या विषयांचं मला ज्ञानही नाही, नी एकना धड भाराभर चिंध्या करून मला माझ्या विषयाचा फोकस/मोसम कट करायचा नाही. या बाबतीत एकेक विषय घेऊन काम करणारे डॉ नरेंद्र दाभोलकर, मेधा पाटकर हे माझे आदर्श आहेत. तेव्हा सतत नवे आणि माझ्या मिशनशी संबंधित नसलेले विषय हाताळता येणार नाहीत, याबद्दल दिलगीर आहे.- प्रा. हरी नरके

Sunday, July 18, 2021

OBC वृत्ती

 मी नाशिककर यांची प्रतिक्रिया अवश्य वाचा : विचार करा

फेसबुकवर(आणि एकूणच सोशलमीडियावर)

विविध मनोरंजक विषयांवर किंवा धार्मिक-सण

उत्सवावर सगळेच आनंदाने व्यक्त होत असतात.

पण स्वतःच्या सामाजिक प्रश्नांवर केवळ ब्राम्हण,बौद्ध, मराठा हे समाजच आत्मविश्वासाने व्यक्त होत असतात.

त्यांच्या प्रश्नांबद्दल हिरीरीने बाजू मांडत असतात.आणि त्यांच्या हितशत्रूंचा सडेतोड विरोध पण करत असतात.

मात्र सर्वात जास्त लोकसंख्या असलेला OBCसमाज त्यांच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक प्रश्नांवर एकदम मुक्या-बहिऱ्याप्रमाणे वागत असतो.हे चुकीचे आहे.

(सामाजिक आत्मविश्वासाचा अभाव किंवा

धार्मिक शुद्रत्वाचा न्यूनगंड ह्या पैकी कारण

असू शकते काय...??)

ह्या विराट OBCसमूहाला कायमच त्यांच्यासाठी

कोणीतरी बोलणारा, लढणारा, भांडणारा लागत असतो.

('तुम लढो, हम कपडे सम्हालते है'अशी

वृत्ती बळावलीय..!!)

OBCबांधवांनी ही किल्मिशे झुगारून,स्वतःच्या न्यायहक्कांसाठी समोरच्या जबबदार यंत्रणांना

जाब विचारायला शिकले पाहिजे..!!

👍👍👍

#OBCReservation

उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा

 फेसबुकवर फक्त हुकूम सोडणारांची मला तीव्र नफरत आहे.ह्यावर लिहा,त्यावर लिहा असे आदेश आले की माझी प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे असते.(एकाने मला अमूकवर लिहा अशी आज्ञा केली) "मालक,या नोकरासासाठी आपला आदेश शिरसावंदय. आपण का नाही लिहीत त्यावर? तुम्ही फेसबुकवर काय फक्त इतरांना आदेश देण्यासाठी आहात काय? सूचना किंवा विनंती समजू शकते,पण थेट आदेश? उंटावरून शेळ्या हाकणे बंद करा नी स्वतः लिहा. हरी नरके तुमच्यासारख्या टिकोजीरावाचा नोकर नाही.पुन्हा आदेश द्याल तर सरळ ब्लॉक करीन.सगळं जर मीच करायचं तर तुम्ही काय फक्त फायदे घेण्यापूरते आहात काय?तुम्ही काय फक्त ** उपटणार का? मला असल्या फुकटेपणाची,आयतोबांची चीड आहे.

सेनापती बापट परिसर स्वच्छता करण्यासाठी हातात झाडू घेऊन संत गाडगेबाबांसारखे रस्ते झाडायचे.एक दिवस ते आजारी असल्याने झाडू मारू शकले नाहीत,तर सदाशिव पेठेतल्या एक अतिविशाल महिला ओरडल्या, " काल का आला नाहीस? माझ्या घरातला कचरा कोण नेऊन टाकणार रे ***!" तेव्हा मला सेनापती बापट व्हायचे नाहीये!-- प्रा. हरी नरके, #obc_merit

ओबीसी/भटके/विमुक्त/विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना कशासाठी?

 ओबीसी/भटके/विमुक्त/विशेष मागास प्रवर्ग यांची जनगणना कशासाठी? - प्रा. हरी नरके

१) ब्रिटिशांनी भारत जिंकला तेव्हा पहिले काम केले ते म्हणजे दर १० वर्षांनी त्यांनी जातनिहाय जनगणना सुरू केली.ज्यांच्यावर राज्य करायचे त्यांचा अभ्यास करण्यासाठी जनगणना आवश्यक आहे,असे त्यांना वाटले.विद्यमान राज्यकर्त्यांना ती नकोय कारण त्यांना कोट्यावधी लोकांना अंधारात ठेवून त्यांची लूट करायची आहे.जनतेला वास्तव कळले तर ते धार्मिक गुलाम राहणार नाहीत, म्हणून संघ परिवाराला ओबीसी जनगणना नकोय.     

२)१९४६ साली बाबासाहेबांनी त्यांच्या  "शूद्र पूर्वी कोण होते?" या ओबीसी विषयक पुस्तकात ओबीसी जनगणनेची मागणी केली.ओबीसीच्या अडीअडचणी कळण्यासाठी ती गरजेची आहे असे त्यांनी लिहिले.

३)पहिल्या राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने (कालेलकर कमिशन)१९५५ साली ओबीसी जनगणनेची मागणी केली.  

४)१९८० साली दुसऱ्या राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाने (मंडल आयोग) ओबीसी जनगणनेची शिफारस केली. 

५)१९९४ साली नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे ते सरकारला पटवून दिले. 

६) २०१० च्या ५ मे ला संसदेत समीर भुजबळ,गोपीनाथ मुंढे व १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी छगन भुजबळ यांनी खूप परीश्रम घेतले.  

७)२०११ ते २०१४ ओबीसी जनगणना करण्यात आली. त्यासाठी जनतेचा पैसा खर्च झाला. हे ४ हजार कोटी रुपये मोदींनी आकडेवारी दाबून पाण्यात घातले.  

८)संसदेतील चर्चा,जनगणनेची गरज नी महत्व यावरचे प्रा.हरी नरके यांचे ३०० पाणी पुस्तक २०१२ साली प्रकाशित झाले.  

९) मोदी ज्या विकास परिषदेचे सदस्य होते,(गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून) तिने व केंद्रीय नियोजन आयोगाने ओबीसीचे शिक्षण, रोजगार,निवारा,आरोग्य यासाठी धोरणे आखण्यासाठी ओबीसी जनगणना करावी असा ठराव केला.  

१०)संसदेच्या सामाजिक न्याय स्थायी समितीने (सुमित्रा महाजन समिती) ओबीसी जनगणनेची शिफारस केली.  

११)महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री नाना पटोले यांनी विधानसभेत स्वतः ओबीसी जनगणनेचा ठराव मांडला तो सर्वानुमते मंजुर झाला. महाराष्ट्राच्या २८८ आमदारांनी एकमताने केलेली मागणी धुडकावणारा संघ परिवार ओबीसी व लोकशाहीचा दुष्मण आहे.

१२) आणखी शेकडो परिषदा,आंदोलने, संस्था,संघटना ओबीसी जनगणनेचा आग्रह धरीत असताना एकटा संघपरिवार विरोधात आहे म्हणून जनगणना न करणारे मोदी सरकार ओबीसीद्रोही आहे. 

- प्रा. हरी नरके,

१८/७/२०२१  #anti_obc_Rss #anti_obc_bjp  #obc_janganana #obc_census


माणूस श्रेष्ठ की सिंह?


एकदा एक शिकारी आणि जखमी सिंह यांच्यात वाद चालू होता. माणूस म्हणे आम्ही श्रेष्ठ तर सिंह म्हणे सिंह श्रेष्ठ. वाद काही मिटेना. तेव्हा माणसाने सिंहाला एक प्राचीन शिल्प दाखवले,ज्यात माणसाने सिंहाला बाणाने मारलेले दाखवले होते. ते दाखवून माणूस म्हणाला,आता तरी पटले का की माणूस श्रेष्ठ असतो ते? सिंह म्हणाला नाही. या शिल्पात असे कोरलेय कारण हे शिल्प माणसाने तयार केलेय,सिंहाने नाही. दुसरी गोष्ट माणसाने नाही मारले,बाण हे शस्त्र माणसाकडे आहे, त्याने मारलंय. तर मित्रांनो, आजचे शस्त्र ज्ञान हे आहे.इतिहासात आपण कायम पराभूत का दाखवले गेलो,आपण मानसिक,धार्मिक,आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक गुलाम का राहिलो? याचा शोध घ्या... प्रगती करा..

प्रा. हरी नरके,
१८/७/२०२१

RSS नी मुस्लिम समाज


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांनी मुस्लिम समाजाबद्दल व्यक्त केलेली भूमिका फक्त बोलण्यापूरती आहे की संघ स्वयंसेवक ती अमलातही आणणार आहेत? संघ बदलला यावर विश्वास कसा ठेवायचा? सनातनी बदलले तर ते सनातनी कसे राहणार? मुस्लिम द्वेष,मुस्लिम समाजाविषयीचा विखार हा तर संघाचा प्राणवायु आहे.त्यावरच तर त्यांचे हिंदुत्व उभे आहे. भाजपाची हिंदू मतपेढी उभीच मुळी या तिरस्कारावर आहे. भागवतांनी संघाच्या आजवरच्या मुस्लिमविषयक भूमिका चुकीच्या होत्या असे जाहीर करून त्यांचे खंडन केलेले नाही. त्यामुळे सोयीनुसार कधी जुनी भूमिका व उत्तरप्रदेश निवडणुकीपुरती ही भूमिका असे नसेल याची खात्री कोण देणार? त्यामुळे भागवतांचे हे ग्लॅस्नोस्त नसून निवडणुका-मुस्लिम वोट बँक नी ईव्हीएम  बचाव धोरणच दिसते.योगी हा खरा चेहरा नी नवे प्रवचनकार भागवत हा त्यांचा मुखवटा आहे. ह्याला कुणीही  भुलणार नाही. हा फक्त चुनावी जुमला आहे. इलेक्शन मॅनेजमेंटचा फंडा.

- प्रा.हरी नरके,

Thursday, July 1, 2021

ओबीसी आरक्षणाचे मारेकरी मोदी - फडणवीस कसे? - प्रा. हरी नरके

 हे घ्या लेखी पुरावे-

१] आठ आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाला ओबीसीचा इंपिरिकल डेटा {वस्तुनिष्ठ माहिती} देतो असे फडणविसांनी कोर्टाला वचन दिले, त्यानंतर पुढचे आठ आठवडे तेच सत्तेवर असतानाही त्यांनी ती माहिती न्यायालयाला दिली नाही म्हणून ओबीसी आरक्षण गेले. { पाहा- पंकजा मुंडे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना पत्र}

२] आरक्षणमुक्त भारत हा रा. स्व. संघाचा अजेंडा असल्यानेच त्यांनी ओबीसींची माहिती जमवण्याच्या मनमोहन सिंग सरकारच्या निर्णयाला लेखी पत्रक काढून विरोध केला. { पाहा- संघाचे सरकार्यवाह भयायजी जोशी यांचे २४ मे २०१० चे पत्रक}

३] तीन महिन्यात डेटा जमवला नाही तर राजकीय संन्यास घेण्याच्या वल्गना करणारे फडणवीस २०१४ ते २०१९ या काळात पाच वर्षे [ साठ महिने] सत्तेवर होते तेव्हा तर करोनाही नव्हता मग का जमवला नाही डेटा?

४] आज रोजी भाजपा शाषित उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक अशा कोणत्याही राज्यात तिथल्या भाजपा सरकारने हा डेटा जमा केलेला नाही. असे का?

[विकास गवळी निकाल लागून मार्च, एप्रिल, मे, जून असे चार महिने होऊन गेलेत.]

५] काँग्रेस सरकारने २०११ ते २०१३ मध्ये जमवलेला ओबीसी डेटा फडणविसांनी मोदींकडे १ ऑगष्ट २०१९ ला पत्राद्वारे मागितला. तो मिळाला नाही, तर पुढची तीन महिने फडणविसांचीच सत्ता होती, का नाही जमवला त्यांनी तीन महिन्यात डेटा? तेव्हा तर कोविडचीही अडचण नव्हती. { पाहा- मुख्यमंत्री फडणविस यांचे केंद्रीय निती आयोगाचे राजीव कुमार यांना पत्र }

६] २०११ च्या सामाजिक गणनेचा डेटा सदोष असल्याने कोणालाही द्यायचा नाही हा निर्णय मनमोहन सिंग सरकारचा होता अशी लोणकढी थाप भाजपावाले मारताहेत. हा निर्णय तर १८ जून २०१८ ला मोदी सरकारने घेतलाय.

[पाहा- केंद्र सरकारचे फडणविस सरकारला २० नोव्हेंबर २०१९ चे लेखी उत्तर]

७] आणि तरीही दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्ती रोहिणी यांना मोदींनी हा डेटा दिला. रोहिणी आयोगाच्या शिफारशींमुळे यापुढे तेली, कुणबी, माळी, धनगर, वंजारी, आग्री, भंडारी, कुंभार, नाभिक या जातींना २७ टक्के आरक्षण मिळतेय त्यात छटणी करून फक्त २ टक्केच मिळणार आहे. जागो ओबीसी जागो. 

८] मोदी जी आकडेवारी ओबीसींची कत्तल करण्यासाठी न्या. रोहिणी या निवृत्त न्यायमुर्तींना देतात तीच माहिती देशातील नऊ लाख ओबीसी पदाधिकार्‍यांचे राजकीय आरक्षण वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात बसलेल्या विद्यमान न्यायमुर्तींना [ जे न्या. रोहिणी यांचे बॉस आहेत] बंद पाकीटातून का देत नाहीत? कारण ओबीसी आरक्षण घालवायचेच होते.

९] ओबीसीचा त्रिसुत्री आणि वस्तुनिष्ठ माहिती जमवण्याचा मूळ निकाल मे २०१० मधला आहे. म्हणुन तर छगन भुजबळ, समता परिषद, स्व. गोपीनाथ मुंडेसाहेब, समीर भुजबळ यांनी संसदेत ५ मे २०१० ला ओबीसीचा डेटा जमवण्याचा ठराव पास करून घेतला होता. तीच माहिती मोदींनी गेली सात वर्षे अभ्यास चालूय अशा थापा मारीत दाबून ठेवलेली आहे.

[ पाहा- केंद्र सरकारचे फडणविस सरकारला पत्र, दि. २० नोव्हेंबर २०१९ आणि पाहा- के. कृष्णमुर्ती केस,२०१० ]

१०] शब्दच्छल करणे, बुद्धीभेद करणे, सराईतपणे खोटे बोलणे यात मोदी -फडणविस पटाईत आहेत. जागो, ओबीसी जागो.

११] उद्धव ठाकरे सरकारने ओबीसींचा इंपिरिकल डेटा जमवण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोग स्थापन केलेला आहे. त्याला हे काम २९ जून २०२१ च्या अधिसुचनेद्वारे सोपवलेले आहे.

[पाहा-राज्य सरकारची अधिसुचना]

१२] भाजपा, संघातले ओबीसी नेते हे सत्तेचे लाभार्थी असल्याने ते भाजपाचा बचाव करीत आहेत. त्यातून त्यांचे करियर होईलही. पण ओबीसींची कत्तल होईल. फडणविसांनी कालपर्यंत अडगळीत फेकलेले भाजपातले हे ओबीसी नेते आता अचानक प्रकाशझोतात आणलेत. ही पेशवाईनिती आहे मोदी फडणविसांची, ती ओळखा. कुर्‍हाडीचा दंडा गोतास काळ होऊ नका. ओबीसी समाज जागा झाल्यावर तुम्हाला माफ करणार नाही.

- प्रा. हरी नरके, 

०२/०७/२०२१