Sunday, August 18, 2019

आंबेडकरी चळवळीतले महत्वाचे लेखक- शंकरराव खरात,




शंकरराव खरात यांची पुढील वर्षी जन्मशताब्धी सुरू होत आहे. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास लाभलेला होता. ते आंबेडकरी चळवळीतले महत्वाचे लेखक आणि इतिहासकार होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्मकथा संपादीत केली. त्यांचे स्वत:चे आत्मकथन "तराळ अंतराळ" खूप गाजले. त्यांनी ललित आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारचे मुलभूत लेखन केले.

त्यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात, अस्पृश्यांचा मुक्तीसंग्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मांतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय विचार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक विचार, महाराष्ट्रातील महारांचा इतिहास, हे वैचारिक ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून जाणकारांच्या पसंतीस उतरले.

त्यांच्या दहा कादंबर्‍या आणि १३ कथासंग्रह आहेत. याशिवाय इतरही विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.

११ जुलै १९२१ ला त्यांचा जन्म झाला. वयाच्या ७९ व्या वर्षी ९ एप्रिल २००१ ला त्यांचे निधन झाले. १९८४ ला जळगावला झालेल्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना लाभले होते.  ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते.

ते शासकीय तंत्रनिकेतन, पुणेच्याशेजारी, चतु:शृंगीला राहात. मला त्यांचा जवळून सहवास लाभला. ते अतिशय ऋजु स्वभावाचे होते. आम्ही त्यांचा बालगंधर्वमध्ये राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते सत्कार केला होता.

त्यांची सर्व पुस्तके माझ्या संग्रही आहेत. त्यांच्या स्वाक्षर्‍या लाभलेले त्यांचे बहुतेक सगळे ग्रंथ मला वाचता-अभ्यासता आले याचा आनंद वाटतो.

त्यांचे कथा आणि कादंबरी विश्व पुढीलप्रमणे आहे.
आज इथं तर उद्या तिथं (१९८३, ललितलेखसंग्रह)
आडगावचे पाणी (१९७०, कथासंग्रह]
गावचा टिनपोल गुरुजी (१९७१, कादंबरी)
गाव-शीव (१९७०)
झोपडपट्टी (१९७३, कादंबरी)
टिटवीचा फेरा (१९६३, कथासंग्रह)
तडीपार (१९६१)
दौण्डी (१९६५) (कथासंग्रह)
फूटपाथ नंबर १ (१९८०, कादंबरी)
बारा बलुतेदार (१९५९)
मसालेदार गेस्ट हाऊस (१९७४, कादंबरी)
माझं नाव (१९८७, कादंबरी]
सांगावा (१९६२)
सुटका (१९६४, कथासंग्रह)
हातभट्टी (१९७०, कादंबरी)


-प्रा.हरी नरके, १८ ऑगष्ट २०१९

No comments:

Post a Comment