Tuesday, March 10, 2020

शेण नाही, ही तर फुलं आहेत-







शेण नाही, ही तर फुलं आहेत- प्रा. हरी नरके, kolaj.in कोलाज.इन
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाला खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. यंदा २०१९ ला जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख.....

‘जोतिबांपेक्षा त्यांच्या पत्नीचे कौतुक करावे तेवढे थोडेच होईल. तिची योग्यता काय सांगावी? आपल्या पतीबरोबर तिने संपूर्ण सहकार्य केले आणि त्यांच्याबरोबर राहून वाट्यास येतील त्या हालअपेष्टा भोगल्या. उच्चवर्णीयांतील उच्चशिक्षण घेतलेल्या स्त्रियांतही अशा प्रकारची त्यागी स्त्री आढळून येणे कठीण आहे. त्या उभयतांनी लोककार्यार्थ आपले सारे जीवन खर्च केले.’
- नारायण महादेव उर्फ मामा परमानंद (३१ जुलै, १८९०)

स्वातंत्र्यापूर्वी आपल्या देशात, आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय सुधारणा, यावर एक वाद झालेला होता. इंग्रजांच्या रूपात शत्रू समोर दिसत असल्याने आपण स्वाभाविकच राजकीय स्वातंत्र्याला अग्रक्रम दिला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवल्यानंतर आता आपले सामाजिक प्रश्न आपसूक सुटतील असा लोकांचा समज होता. परंतु जसजसे दिवस उलटू लागले, तसतसा लोकांचा भ्रमनिरास होऊ लागला. त्यातून सामाजिक चळवळी हळूहळू जोर पकडू लागल्या.

जोतीराव सावित्रीबाईंची ‘विषयपत्रिका’

विविध क्षेत्रातल्या सामाजिक न्यायाच्या चळवळी संघटित करणाऱ्यांच्या हे लक्षात येऊ लागलं की या विषयाची जोतीराव सावित्रीबाईंनी लिहिलेली ‘विषयपत्रिका’ आजही मार्गदर्शक आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचं समग्र क्रांतिकारी चिंतन आजही प्रस्तुत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना यांच्या जीवनकार्य आणि विचारांबद्दल विशेष रस वाटू लागला. आज जो त्यांचा अभ्यास चालू आहे, त्यामागे हे समाजशास्त्रीय वास्तव दडलेलंय.
जोतीराव सावित्रीबाईंवर मराठीत आजवर दोनशेहून अधिक ग्रंथ लिहिले गेलेत. मराठीबरोबरच हिंदी, इंग्रजी, तेलगू, बंगाली, कन्नड, पंजाबी, ऊर्दू, सिंधी, गुजराती या भाषांमधेही काही ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. यातल्या सावित्रीबाईंवर लिहिल्या गेलेल्या छोट्यामोठ्या पुस्तकांची संख्या ४० आहे. त्यातील ललितेतर वैचारिक ग्रंथ लक्षात घेतले तर त्यात मुंबईच्या कु. शांताबाई रघुनाथ बनकर यांची १९३९ मधे प्रकाशित झालेली ‘सावित्रीबाई जोतीराव फुले यांचे अल्पचरित्र’ ही पुस्तिका आणि त्यानंतर १९६६ साली सौ. फुलवंताबाई झोडगे यांनी लिहिलेलं ‘क्रांतिदेवता साध्वी सावित्रीबाई फुले’ हे चरित्र महत्त्वाचं आहे.

सावित्रीबाईंचं चिकित्सक चरित्रच नाही

त्यांनाच वाट पुसत डॉ. मा. गो. माळी यांनी ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ हा चरित्र ग्रंथ १९८० साली लिहिला. डॉ. कृ. प. देशपांडे यांनी सावित्रीबाईंच्या जीवन आणि साहित्यावर ‘अग्निफुले’ हा ग्रंथ १९८२ साली प्रकाशित केला. नंतरचे सगळे ग्रंथ याच माहितीवर आधारित असून त्यात फारसं नवीन काहीही नाही. मात्र सावित्रीबाईंचं आजवर एकही चिकित्सक चरित्र लिहिलं जाऊ नये, हे खेदजनक होय.

सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला झाला. पुण्यापासून जवळपास ५० किलोमीटरवर नायगाव हे त्यांचं जन्मगाव आहे. पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळपासून ५ किलोमीटरवर हे गाव वसलेलं आहे. सावित्रीबाई या खंडोजी नेवशे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत. १८४० साली वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचं जोतीरावांशी लग्न झालं. ११ एप्रिल १८२७ ला पुण्यात जन्मलेले जोतीराव त्यावेळी १३ वर्षांचे होते.

लग्नानंतर जोतीरावांनी सावित्रीबाईंना घरीच शिक्षण दिल्याचं शासकीय कागदपत्रांवरून दिसून येतं. १ मे १८५१ ते ३० एप्रिल १८५२ च्या शैक्षणिक अहवालात म्हटल्याप्रमाणे, ‘जोतीरावांनी स्वत:च्या पत्नीला घरी शिक्षण देऊन शिक्षिका बनवले.’ २२ नोव्हेंबर, १९५१ च्या ‘बॉम्बे गार्डियन’ वृत्तपत्रातल्या बातमीवरून सावित्रीबाईंच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी जोतीरावांचे मित्र सखाराम यशवंत परांजपे आणि केशव शिवराम भवाळकर (जोशी) यांनी घेतल्याचं दिसतं. सावित्रीबाईंनी अहमदनगर इथे फॅरारबाईंच्या आणि पुण्यात मिचेलबाईंच्या नॉर्मल स्कूलमधे अध्यापनाचं प्रशिक्षणही घेतलं. त्यामुळे सावित्रीबाई याच आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत, हे तत्कालीन दस्तऐवजांवरून स्पष्ट होतं.

शेण नाही, ही तर फुलं आहेत

सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्याबाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरवात होय. समाजाकडून होणारा कडवा विरोध सहन करीत आणि शिव्याशाप शांतपणे ऐकत सावित्रीबाई काम करत होत्या. त्या शाळेत जाता  येताना टोळभैरव मुद्दाम रस्त्यावर थांबत. अचकट-विचकट बोलत. कधीकधी दगड मारीत. अंगावर चिखल किंवा शेण टाकीत असत.

शाळेत जाताना सावित्रीबाईंना सोबत दोन साड्या न्याव्या लागत. रस्त्याने जाताना खराब झालेली साडी शाळेत गेल्याबरोबर बदलावी लागे. दुसरी परतताना खराब होई आणि तरीही सावित्रीबाई आपल्या कामात खंड पडू देत नव्हत्या. हा छळ असाच चालू राहिल्याने त्यांच्या आणि लहान मुलींच्या संरक्षणासाठी संस्थेने एका शिपायाची नियुक्तीस केली.

त्याने लिहून ठेवलेल्या आठवणीनुसार सावित्रीबाई आपल्या अंगावर दगड किंवा चिखल फेकणाऱ्यांना म्हणत, ‘मी माझ्या भगिनींना शिकविण्याचे पवित्र कार्य करीत असताना तुम्ही माझ्यावर शेण अगर खडे फेकीत आहात, ही मला फुलेच वाटतात. ईश्वर तुम्हाला सुखी ठेवो!’ बळवंत सखाराम कोल्हे यांच्या या आठवणी सावित्रीबाईंच्या धैर्यावर प्रकाश टाकणाऱ्याच आहेत.

ब्राम्हण विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह

१८६३ मधे जोतीराव सावित्रीबाईंनी विधवांसाठी ‘बालहत्या प्रतिबंधक गृह’ सुरू केलं. याबाबतची अस्सल माहिती अलीकडेच उपलब्ध झालीय. एक तर हे गृह फक्तर ‘ब्राह्मण विधवांसाठीच’ सुरू करण्यात आलेलं होतं आणि त्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. ४ डिसेंबर १८८४ ला जोतीरावांनी मुंबई सरकारच्या अवर सचिवाला लिहिलेल्या पत्रात याबाबतची सगळी माहिती नोंदवलेली आहे.

जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

बरोबर काय न्यायचं आहे?

दुसऱ्या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्न दान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्श शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तयजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ मधे सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचं अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्यागच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणाऱ्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्यांनी आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणाऱ्या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

(लेखक ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि विचारवंत आहेत.)

http://kolaj.in/published_article.php?v=-Savitribai-Phule-storyHJ4370693&fbclid=IwAR1C1XbFRV5FEA7yZsK6Wq30FHm9wEBD3bZ5NeexgOBYNEByOpoaGSTyGbw

पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं






पुण्यात प्लेगच्या साथीत सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा जीवाचं रान केलं...हरी नरके, बीबीसी मराठीसाठी

ज्येष्ठ समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 10 मार्च हा स्मृतिदिन. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या कार्यरत होत्या. पुण्यात प्लेगच्या साथीचं तांडव सुरु असताना तळागाळातल्या लोकांना साथीतून वाचवणाऱ्या सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

मुंबई, पुण्यात 1896 आणि 1897 साली प्लेगच्या साथीने थैमान घातलं होतं. त्याच साथीत 9 फेब्रुवारी 1897ला कामगारांना मदत करताना नारायण मेघाजी लोखंडे यांचं निधन झालं. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचे ते खंदे नेते होते.

जोतिबांच्या विचाराने प्रेरित होऊन 'दीनबंधू' नावाचं समाज प्रबोधन नियतकालिक चालवित. लोखंडे यांनां भारतातल्या कामगार चळवळीचे जनक म्हटलं जातं.

जोतिबांचे विचार आणि कार्य ही त्यांच्या कामाची प्रेरणा होती. मुंबईत फुल्यांना महात्मा उपाधी देणाऱ्या सोहळ्याच्या आयोजनात लोखंड्यांचा पुढाकार होता. महात्मा फुलेंचं निधन झाल्यानंतर सत्यशोधक चळवळीचा ते मोठा आधारस्तंभ राहिले होते. चळवळीतला जवळचा सहकारी गेल्याने सावित्रीबाईंना मोठा धक्का बसला.

मुंबई पाठोपाठ पुण्यात साथ पसरू लागली, तशा जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. एकतर लोकांना प्लेगविषयी फारशी माहिती नव्हती, त्यामुळे प्रचंड घबराटीचं वातावरण पसरलं. प्लेगवर औषधंही परिणामकारक नव्हती. त्यामुळे उपाययोजना काय करायच्या याविषयीही माहिती नव्हती. त्यात समाजामध्ये देवीचा कोप यासारख्या अंधश्रद्धा होत्या. साहजिकच प्लेगच्या आजाराने माणसं मरत होती तेव्हा ते देवीच्या कोपाने मरतायत अशी अनेकांची भावना झाली.

पुण्यात जसजसं मृत्यूचं थैमान सुरु झालं तसं लोकच नाही तर बडे राजकीय नेतेही पुणे सोडून दुसरीकडे राहायला निघून जात होते. उंदरांमार्फत प्लेगचा प्रसार होत होता, उंदीर मरून पडलेले लोकांना दिसायचे. लोक बिथरून जायचे. ताप येऊन काखेत गाठ यायची आणि माणसं कोलमडून पडायची, हे सावित्रीबाई आजूबाजूला पाहात होत्या.

यशवंतच्या मदतीनं रुग्णांवर उपचार

सावित्रीबाईंनी स्वतः आपल्या मुलाला दक्षिण आफ्रिकेतून तार करून बोलावून घेतलं. डॉक्टर यशवंत फुले ब्रिटीश मिलिटरीमध्ये नोकरी करत होते. रजा घेऊन आलेल्या यशवंतकडून परिस्थिती समजून घेऊन सावित्रीबाईंनी कामाला सुरूवात केली.

हा संसर्गजन्य रोग जीवघेणा असल्याने आईने धोका पत्करू नये, असं डॉ. यशवंत यांचं म्हणणं होतं. पण त्यावर सावित्रीबाईंना वाटायचं आज महात्मा फुले असते तर ते परिस्थिती पाहून शांत बसले नसते. खेरीज नारायण मेघाजी लोखंडेंचा प्लेगने मृत्यू झालेला असताना आजाराच्या भीतीने त्या दूर राहू शकल्या असत्या. पण लोकांच्या दुःखापुढे त्यांना आपल्या जीवाची पर्वा नव्हती.


महात्मा फुलेंचं नाव घेतो तर लोकांसाठी काम केलं पाहिजे या विचारावर त्या ठाम होत्या. असं म्हणून त्या कामाला लागल्या. पुण्यात हडपसरजवळ आताच्या मोहम्मदवाडी, ससाणेनगर परिसरात यशवंत यांच्या सासऱ्यांची शेती होती.

हा भाग तेव्हा पुणे शहराच्या वेशीवर होता. इथल्या माळावर काही झोपड्या बांधल्या आणि त्यांनी दवाखाना सुरू केला. विशेषतः मुली आणि महिला घरोघरी जाऊन कोणाला ताप आला असेल किंवा प्लेगची लक्षण दिसत असतील तर त्या पेशंट्सना दवाखान्यात घेऊन येत. आणि यशवंतच्या मदतीने उपचार करत.
तेव्हा पुण्यात प्लेगची इतकी दहशत पसरली की सरकारी दफ्तरं ओस पडली होती आणि लोक उपचारासाठी आपणहून घराबाहेर कमी संख्येने बाहेर पडत होते. देवीचा कोप असेल या भीतीने घरात आजारी माणसांना दडवून ठेवलं जात होतं.

ब्रिटीश सरकारसमोर साथ आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छता ठेवण्याचं मोठं आव्हान होतं. सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा बडगा उगारला. त्यात रँड या ब्रिटीश पोलीस अधिकाऱ्याच्या बडग्याने लोकांमध्ये असंतोष पसरू लागला होता.

पुणे शहरात घराघरात आरोग्यसेवा पोहचवणं जिकिरीचं होतं. भीतीमुळे लोक मदत करायलाही पुढे सरसावत नसत. गाडी-घोडे, रुग्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता.
तत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.

रुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण

सावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची नोंद कागदोपत्री आहे. मुंढव्याच्या दलित वस्तीत पांडुरंग प्लेगने आजारी असल्याची माहिती सावित्रीबाईंना मिळाली. अकरा वर्षांच्या पांडुरंगाला त्यांनी चादरीत गुंडाळून पाठीवर घेतलं.

मुंढव्यापासून आठ किलोमीटर चालत त्यांनी ससाणेनगर गाठलं. माळावरच्या दवाखान्यात येऊन त्याच्यावर उपचार केले. पांडुरंग वाचला खरा पण दरम्यानच्या काळात सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली होती. काम करताना तापाने सावित्रीबाई फणफणल्या. अखेर 10 मार्चला त्या अविरतपणे काम करत असताना गेल्या.
सावित्रीबाईंना 1 जानेवारी 1848 साली शाळेचं पहिलं काम सुरू केलं होतं, आणि त्या गेल्या 1897 साली. जवळपास पन्नास वर्षं त्यांनी शिक्षणक्षेत्रात, सामाजिक सुधारणेसाठी आणि सेवेसाठी धडाडीने काम केलं.
शिक्षणाखेरीज समाजसेवेचं आणि लोकांना मदत करण्याचं सावित्रीबाईंचं काम पाहाताना नेहमी वाटतं, की आपल्याकडे झाशीच्या राणीने केलेल्या पराक्रमाची गोष्ट सांगितली जाते. जितकी ती शौर्यगाथा राजकीयदृष्ट्या रोमांचक आहे तितकंच तोलामोलाचं सावित्रीबाईंचं हे शौर्य आहे.

सावित्रीबाईंच्या कार्याकडे दुर्लक्ष

आपल्याला इतिहास नेहमी लढाया, पराक्रम यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा वाटतो. आपण सामाजिक सेवेत हौतात्म्य पत्करणाऱ्यांच्या इतिहासाकडे कमी आकर्षित होतो. जेव्हा सावित्रीबाई पांडुरंगाला पाठीवर घेऊन चालत होत्या तेव्हा एकप्रकारे त्या प्लेगशी झगडत होत्या. मृत्यूशी झुंज देणाऱ्या पाठीवरच्या पांडुरंगाला त्यांनी अखेर वाचवलं.

पुणे नगरपालिकेचा त्यावेळचा रेकॉर्ड पाहिला तर भयावह चित्र डोळ्यासमोर येतं. मृत्यूचा दाखला मिळण्यासाठीही कर्मचारी नसायचे. त्यामुळे पालिकेत फक्त आकड्यांच्या नोंदी आहेत. 10 मार्च 1897 या दिवशी किती माणसं मरण पावली याचाच आकडा मिळतो.

एकेका दिवसाला 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहाकार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात.
त्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही.

साहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.

माध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते.

पुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.

१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. (मराठी विश्वकोश)

(डॉ. हरी नरके हे लेखक आणि फुले यांचे विचार, साहित्य तसंच चळवळीचे अभ्यासक आहेत. वरील लेखाचे शब्दांकन आणि संपादन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केले आहे)

https://www.bbc.com/marathi/india-51815816?fbclid=IwAR0el49CLu8FmZNO38WoRq1sX9g2PxoMWuuWl1-VjB8t5aV6iW0xji1EkqY

जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट







सुमारे ४० वर्षांपुर्वीची गोष्ट. माझ्या मित्राची आई महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका होती. अतिशय बुद्धीमान आणि कर्तबगार महिला. उत्तम वाचन आणि सामाजिक जाणीवेतून वंचितांसाठी सतत कार्यरत असलेल्या. एकदा आमच्यात बोलता बोलता सावित्रीबाई फुलेंचा विषय निघाला. सावित्रीबाई झाल्या नसत्या तर आज तुम्ही प्राध्यापिका होऊ शकला नसतात, असं मी बोलून गेलो. त्यांना खूप राग आला. त्या म्हणाल्या, असंच काही नाही. त्यांनी जे काही महिलांच्या शिक्षणासाठी केलं, ते त्या झाल्या नसत्या तरी अन्य कुणीतरी केलंच असतं. काळ कुणासाठी थांबत नसतो. कामं कुणासाठी अडून राहात नसतात."
" जी गोष्ट गरजेची असते ते काम होतेच. कोणी होवो अगर ना होवो. सावित्रीबाईंचे उगीच देव्हारे माजवण्याची गरज नाही."
मी खूप हिरमुसलो. दुखावला गेलो.
मित्राची आई माझ्याबद्दल जिव्हाळा आणि आत्मियता असलेली व्यक्ती असल्याने त्यांचं म्हणणं पटलं नाही तरी मी गप्प बसलो.
पण मुद्दा मनात ठसठसत राहिला.
त्यांच्या महाविद्यालयाला स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या, एका महान राष्ट्रीय नेत्याचे नाव देण्यात आलेले होते. त्या नेत्यांच्या जयंतीनिमित्त एकदा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. राजकीय स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान दिलेले हे नेते सामाजिक बाबतीत सनातनी असल्याचा माझा आक्षेप ऎकून त्या खवळल्या. "हरी, अरे तू काय बोलतोयस ते तुला कळतंय तरी का? ते झाले नसते तर आपला देश स्वतंत्र झालाच नसता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना माणसांनं आपलं वय, पात्रता आणि अक्कल यांचा विचार करावा" असंही त्या मला म्हणाल्या.
मीही हट्टाला पेटलो आणि म्हणलो, " त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी काम केलं ते मोठंच होतं. पण समजा त्यांनी ते केलं नसतं तरी स्वातंत्र्य मिळालंच असतं. कामं कुणासाठी अडून राहात नसतात, असं तुम्हीच म्हणता ना?"
त्या अतिशय संतापल्या आणि मला " मुर्ख आहेस. चालता हो," म्हणाल्या.
मी म्हटलं, " मी काय वावगं बोललो? जो न्याय सावित्रीबाईंना तोच लोकमान्यांना का नाही?"
त्यांना ते पटलं नाही. त्या म्हणाल्या, " ते वेगळं, हे वेगळं."
माणसं असा दुटप्पीपणा का करतात? जात माणसाच्या अबोध मनात [नेणीवेत] दडलेली असते नी ती नकळत काम करत असते हेच खरं काय?
एरवी अतिशय समतोल वागणारी ही माझ्या मित्राची आईसुद्धा नकळत असं वागून गेली असावी काय? मी त्यांना जातीयवादी म्हणणार नाही.
एरवी उत्तम युक्तीवाद करणार्‍या बुद्धीजिवी माणसांचाही जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट असतो काय?
-प्रा.हरी नरके, १० मार्च, २०२०


Monday, March 9, 2020

१२४ वा स्मृतीदिन - शहीद सावित्रीबाईंची शौर्यगाथा - प्रा. हरी नरके






१८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे...........




जोतीराव सावित्रीबाईंनी स्वत:च्या घरात एक वसतिगृह चालवलं. दूरदूरहून मुलं शिक्षणासाठी तिथे येत असत. लक्ष्मण कराडी जाया या मुंबईच्या विद्यार्थ्याने या वसतिगृहात राहून सावित्रीबाईंच्या मायेची पाखरण अनुभवली होती. त्याने आठवणीत म्हटलंय, ‘सावित्रीबाईंसारखी दयाळू व प्रेमळ अंत:करणाची स्त्री मी अजूनसुद्धा कोठे पाहिली नाही. त्या आम्हा मुलांवर आईपेक्षासुद्धा जास्त प्रेम करीत असत.’

दुसर्‍या एका मुलाने आपल्या आठवणींमधे सावित्रीबाईंचा स्वभाव, त्यांची साधी राहणी आणि जोतीराव सावित्रीबाईंचे परस्परांवरील अपार प्रेम यांची विलक्षण हृदय नोंद केलीय.

बरोबर काय न्यायचं आहे?
हा महादू सहादू वाघोले लिहितो, ‘सावित्रीबाई फारच उदार होती. तिचे अंत:करण दयेने भरलेले होते. गोरगरिबांवर ती फार दया करी. ती अन्नदान पण फार करी. ती कोणासही जेऊ घाली. गरीब बायांची अंगावरची फाटलेली लुगडी पाहून त्यांना ती आपल्या घरातील लुगडी देई. त्यामुळे तात्यांचा खर्च फार होत असे. एखादेवेळी तात्या तिला म्हणत, ‘इतका खर्च करू नये.’ त्यावर ती शांतपणे बारीक हसत असे आणि ‘बरोबर काय न्यायचे आहे?’ असे तात्यांना विचारीत असे. त्यावर तात्या शांतमुद्रेने थोडावेळ गप्प बसत असत. ते दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करीत असत.’

सावित्रीबाईंना स्त्रीजातीच्या उन्नतीची फार कळकळ असे. त्या सुस्वरूप आणि मध्यम बांध्याच्या होत्या. त्यांची मुद्रा नेहमी शांत असे. राग म्हणून काय चीज आहे, ती या बाईच्या गावीच नव्हती. ती नेहमीच हसतमुख असे. मात्र तिचं हसू गालांवर तेवढे दिसून येईल इतकेच ते मर्यादित असे. सावित्रीबाईंना सर्व लोक काकू म्हणत असत. पाहुणे मंडळी घरी आली म्हणजे तिला कोण आनंद होत असे. त्यांच्याकरिता मोठ्या आवडीने ती गोडधोड जेवण करीत असे.

जोतीराव सावित्रीबाईंना मोठा मान देत असत. तिला ते बोलताना ‘अहो जाहो’ या बहुमानदर्शक शब्दांनी हाका मारीत असत. सावित्रीबाई तात्यांना ‘शेटजी’ म्हणत. या दोघांत पतीपत्नीत्वाचं खरे प्रेम भरलेलं होतं. सावित्रीबाईंनी नको म्हटलेले काम तात्या कधीही करत नसत. सावित्रीबाई सुविचारी आणि दूरदृष्टीची होती. तिच्याविषयी आप्तजनांत मोठा आदर होता.

पुण्यातल्या शिकलेल्या बायकांचा घरी राबता

मुलींच्या शाळांतून तिने शिक्षिकीणीचे काम केलेलं असल्यामुळे स्त्रीशिक्षणाचा विस्तार झाल्यानंतर सुशिक्षित बायांत तिच्याविषयी पूज्यभाव वाढलेला दिसत होता. तिच्याकडे आलेल्या मुलींना आणि स्त्रियांना ती नेहमी सदुपदेश करीत असे. पुण्यातील मोठमोठ्या सुशिक्षित बाया, पंडिता रमाबाई, डॉ. आनंदीबाई जोशी आणि रमाबाई रानडे तिच्या भेटीस येत असत.

सावित्रीबाईंचा पोषाख तात्यांप्रमाणेच अगदी साधा असे. तिच्या अंगावर अलंकार नसत. तिच्या गळ्यात एक पोत आणि मंगळसूत्र असे. कपाळावर भलंमोठं कुंकू लावलेलं असे. रोज सकाळी त्या सूर्योदयापूर्वी आंघोळ करून सडासंमार्जन उरकून घेत. त्यांचं घर नेहमी स्वच्छ असे. काकूंना दिवाणखान्यात थोडाही केर अथवा धूळ पडलेली खपत नसे. त्यांच्या घरातील भांडी आणि इतर सामान स्वच्छ असून टापटीपीने ठेवलेलं असे. त्या स्वयंपाक स्वत: करीत. तात्यांच्या खाण्याची आणि प्रकृतीची त्या फार काळजी घेत.

जोतीरावांच्या पश्चात सावित्रीबाईंनी सत्यशोधक चळवळीचं नेतृत्व केलं. शेवटपर्यंत त्या काम करीत राहिल्या. यशवंत डॉक्टर झाल्यानंतर मिलिट्रीत नोकरीला लागला. त्याला नोकरीनिमित्त अनेक देशात जावं लागलं. त्याची बायको राधा उर्फ लक्ष्मी हिचं ६ मार्च १८९५ ला अपघाती निधन झालं. सावित्रीबाई घरी एकट्या उरल्या. यशवंत नोकरीनिमित्त त्यावेळी परदेशात होता.

प्लेगच्या साथीत लोकांचे जीव वाचवण्याची धडपड

१८९३ साली सासवड येथे झालेल्या सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षस्थान सावित्रीबाईंनी भूषवलं. मुंबईत यावर्षी झालेल्या हिंदू मुस्लीम दंगलीत जीव धोक्यात घालून सावित्रीबाईंनी शांतता प्रस्थापनेचे काम केले. १८९६ च्या दुष्काळात सावित्रीबाई खूप राबल्या. १८९७ साल उजाडलं तेच प्लेगचं थैमान घेऊन. पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं मरू लागली. सरकारने रँड या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं.

सावित्रीबाईंनी यशवंतला रजा काढून बोलावून घेतलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळरानावर त्यांनी यशवंतला दवाखाना घालायला लावला. त्या स्वत: आजारी माणसांना उचलून दवाखान्यात आणीत, त्यांच्यावर उपचार करीत. हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवाशुश्रूषा करीत होत्या. मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचे कळताच सावित्रीबाई तिकडे धावल्या.

मुलाला पाठीवर घेऊन धावतपळत त्या दवाखान्यात पोचल्या. त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ ला रात्री ९ च्या सुमारास त्यांचं प्लेगमुळे निधन झालं. त्यांच्या मृत्यूची बातमी ‘दीनबंधू’ने शोकाकूल होऊन दिली. पाठीवर दत्तक पुत्राला घेऊन लढणार्‍या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या ‘वीरगाथा’ सांगणाऱ्या आम्ही आजारी मुलाला पाठीवर घेऊन वाचवणार्‍या या शौर्यांगणेची मात्र उपेक्षाच केली. सावित्रीबाई १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांसाठी राबत होत्या. सेवा आणि करुणेचा एक अनोखा आदर्श त्यांनी घालून दिला.

सावित्रीबाईंनी आयुष्यभर जोतिरावांना साथ दिली. पण किमान चार आंदोलनांमध्ये त्या आपल्या नेत्याही होत्या असे दस्तुरखुद्द जोतिरावांनीच लिहून ठेवलेले आहे.

* २५ डिसेंबर १८७३ रोजी झालेल्या सत्यशोधक विवाहाचे नेतृत्व सावित्रीबाईंनी केले.

* १८६३ साली स्थापन करण्यात आलेल्या बालहत्त्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंची होती. तिथे आलेल्या ३५ ब्राह्मण विधवांची बाळंतपणं त्यांनी पोटच्या मुलींची करावीत अशा मायेनं केली.
त्यातलाच एक मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवले.

* १८७२ ते १८७६ याकाळात पडलेल्या भीषण दुष्काळात गोरगरिबांची सुमारे एक हजार मुलं त्यांनी सांभाळली. जगवली. स्वत: स्वयंपाक करून त्यांना जेऊखाऊ घातलं.

* ब्राह्मण विधवांचे केशवपन करू नये म्हणून नाभिक समाजाला संघटित करून त्यांचे प्रबोधन करून विधवांचे केशवपन, मुंडन करणार नाही यासाठी त्यांचा संप घडवून आणला.

जोतिरावांच्या मृत्यूनंतर स्वत: सावित्रीबाईंनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. आधुनिक भारताच्या इतिहासातली अशी ही बहुधा पहिलीच घटना असावी.

सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री आणि शिक्षणतज्ञही होत्या. त्यांचा काव्यफुले हा कवितासंग्रह १८५४ साली प्रकाशित झालेला होता. त्यात पर्यावरण जागृती, शिक्षणाचे महत्व,
निसर्ग आणि माणसाचे नाते, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मुलन, स्त्रीपुरूष समता अशा विषयांवरच्या मौलिक कविता आहेत.

त्यांनी श्रमाचे आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणारे कृतीशील शिक्षण देण्यावर भर दिला. शिक्षणातला गळतीचा प्रश्न सोडवण्यासाठी ठोस उपाय सुचवले व ते अंमलात आणले.

स्त्री-पुरूष समता, ज्ञाननिर्मिती, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, संवाद, वादविवाद, चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी समाज प्रबोधनाचे काम केले. आधुनिक भारताचा स्त्रीपुरूष समतेचा पाया घालण्याचे कार्य त्यांनी केले. भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात त्यांनी केली.
आजच्या स्त्रियांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात भरारी घेतलेली आहे. त्यांना उर्जा देण्याचे कार्य सावित्रीबाईंच्या जीवनकार्यातून होत असते.

- प्रा. हरी नरके, १ मार्च, २०२०

संदर्भ-
प्रा. हरी नरके, सावित्रीबाई फुले चरित्र, नागानालंदा प्रकाशन, इस्लामपूर, २००५
प्रा.हरी नरके, [ संपा.] सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१३
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८
प्रा.हरी नरके, [संपा.] महात्मा फुले गौरवग्रंथ, महाराष्ट्र शासन, मुंबई, २०१८



[लेखक सावित्रीबाईंचे चरित्रकार असून त्यांनी महात्मा फुले समग्र वाड्मय व सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय यांचे संपादन केलेले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे ते प्रमुख व प्राध्यापक राहिले असून त्यांनी राज्य शासनाच्या महात्मा फुले ग्रंथ समितीचे सचिव म्हणून [१९९० ते २०१८] काम केलेले आहे.]







अनंत दीक्षित : एक निकोप आणि भला माणूस-प्रा.हरी नरके





अनंत दीक्षित : एक निकोप आणि भला माणूस-प्रा.हरी नरके

दीक्षितसरांच्या अकाली गेलेल्या मुलीनं, अस्मितानं लिहिलेलं "परतीचा पाऊस" हे पुस्तक मला वाचायचं होतं. ते पुस्तक पेठेत मिळालं नाही. म्हणून प्रकाशक कोण हे विचारण्यासाठी दीक्षितसरांना गेल्याच आठवड्यात फोन केला. पुस्तकाचे प्रकाशक प्रदीप खेतमर असून ते रसिक मध्ये मिळेल असं सर म्हणाले.

दीक्षितसर नेहमीप्रमाणेच अगत्यपुर्वक आणि ओढीनं बोलत होते. सध्या दर दोन दिवसांनी डायलिसिस चालू असल्यानं तब्बेत बरी नसते. ट्रीटमेंटवर खर्च होणारा पैसा, वेळ आणि वेदना यांच्याबद्दल सर बोलले. मला ऎकून वाईट वाटलं. मी आठवड्याभरात भेटायला येतो म्हणालो. तेव्हा मात्र दीक्षितसर खुपच कळकळीनं म्हणाले, नक्की या. लवकर या. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. हललो. खूप कालवाकालव झाली.

पण बाहेरगावी होतो. तर आज बातमी आली की दीक्षितसर गेले. मी नियतीवादी कधीच नव्हतो. पण निसर्ग, नियती किंवा अन्य जे काही असेल ते इतके कठोर का असते? गेली किमान ३० वर्षे माझी दीक्षितसरांशी मैत्री होती. आरपार, नितांत भला माणूस. अत्यंत संयमी. सम्यक. गुणी कन्या, अस्मिता आजारपणानं अकाली गेली. पत्नी, अंजलीताई आजारी असतात. थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असतात. आता दीक्षितसरही गेले. एव्हढी दु:खं एखाद्या भल्या माणसाच्या वाट्याला का यावीत?

दीक्षितसर कोल्हापूर सकाळला संपादक असताना माझ्या शाहू स्मारकातील भाषणांना प्रेक्षकात येऊन बसायचे. भेटून अभिप्राय सांगायचे. एकदा दुसर्‍या दिवशी त्यांना पुण्याला बैठकीला यायचं होतं. म्हणाले, चला, माझ्या गाडीतून सोबत जाऊ. त्यावेळी ५ ते ६ तास लागायचे कोल्हापूर पुणे प्रवासाला. गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते कळलंच नाही.

पुढं ते पुण्याला आले. मुख्य संपादक झाले. पदाचा दर्जा आणि पगार वाढला तरी दीक्षितसरांच्या वागण्याबोलण्यात किंचितही फरक पडला नाही. दीक्षित आडनाव सोडलं तर सरांचं सगळं वागणं- बोलणं एव्हढं बहुजनांसारखं होतं की कुणी मुद्दाम सांगितल्याशिवाय ते ब्राह्मण असावेत असं वाटायचंच नाही. कॉ गोविंद पानसरे आणि सर जानी दोस्त.

औंधच्या त्यांच्या घरी कितीदा तरी गेलोय. मनसोक्त गप्पा मारल्यात. पुस्तकांची देवाणघेवाण केलीय. विनायकराव कुलकर्णी आणि अनंत दीक्षित या दोघांनी आयुष्यभर बहुजन समाजाबद्दल कळवळा आणि आस्था बाळगली.

भांडारकरवर हल्ला झाला तेव्हा दीक्षितसर पुणे सकाळचे संपादक होते. त्यांनी हेडलाईन केली आणि हल्लेखोरांबद्दल कठोर शब्द वापरले. मला त्यांची भुमिका पटली. प्रगतीशील विचारसरणी, मागास-दुबळ्या समाजांविषयी कळवळा आणि वैचारिक स्पष्टता हे त्यांचे गुणविशेष. माझ्याबद्दल त्यांनी कायम आपुलकी बाळगली. हरी, तू बहुजन समाजाचं वैचारिक नेतृत्व करायला हवं असं कायम प्रोत्साहन द्यायचे. कोल्हापूरचा मोकळेढाकळेपणा आणि पुणेरी चकटफू, आप्पलपोटी पेठीयवृत्ती यावर ते सडकून टिका करायचे.

सकाळने त्यांना अवमानकारक पद्धतीनं मुख्य संपादकपदावरून जायला सांगितलं. कटुता न ठेवता त्यांनी पद सोडलं. सिंबॉयसिसच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात त्यांना निवासी लेखकाचे पद मिळाले. पण आजारपणामुळे त्यांना कार्यकाळ पुर्ण करता आला नाही.

अधूनमधून दीक्षितसर एखाद्या वाहिनीवरील चर्चेत दिसायचे. अतिशय समतोल बोलायचे. कित्येकदा माझ्या आवडीच्या विषयावर बोलायचं असलं तर फोन करून मुद्देही विचारायचे. कोणताही अहंकार नाही. अतिरेकी भुमिका नाहीत. पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी एका मागासवर्गीय अर्थशास्त्रज्ञाची नियुक्ती झाली तेव्हा दीक्षितसरांना कोण आनंद झालेला. मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे सरांनी मोहन धारियांच्या घरच्या बैठकीत मन:पुर्वक आभार मानलेले. अलिकडे हे अर्थतज्ञ आपला बाप बदलून सत्ताधार्‍यांचा पट्टा गळ्यात बांधून मिरवू लागले. दीक्षितसरांना खूप दु:ख झाले. सत्तेचा लोभ, खासदारकीची खुर्ची माणसाचं किती आणि कसं पतन घडवते यावर दीक्षितसर दोनतीनदा बोलले.

मध्यंतरी एका सामाजिक-राजकीय बैठकीत दीक्षितसर भेटले तेव्हा त्यांची तब्बेत खूपच खालावलेली दिसली. चरकलो.

दीक्षितसर एव्हढ्या लवकर जातील असं नव्हतं वाटलं. डेस्टीनी एव्हढी हलकट असते? ती भल्या माणसांशी असं का वागते?

दीक्षितसर, तुम्ही आयुष्यभर मूल्यनिष्ठेनं जगलात. आरपार भलेपणानं जगलात. पानावलेल्या डोळ्यानं तुम्हाला निरोपाचा सलाम करतो.

-प्रा.हरी नरके, ०९ मार्च, २०२०


Sunday, March 8, 2020

अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार-

#Vaibhav_Chhaya - या मित्राचा मालिका आणि दूरदर्शन याबद्दलची साक्षरता वाढवणारा हा महत्वाचा लेख अवश्य वाचा- अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार- वैभव छाया सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार.पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. बीएआरसी बार्क ही जगातील सर्वात मोठी टेलिव्हीजन मेजरमेंट सायंस इंडस्ट्री बॉडी म्हणून लौकिक मिळवून आहे. आपण जे कार्यक्रम टिव्हीवर पाहतो त्याचं रेटिंग सांगणारी ही संस्था आहे. कोणता कार्यक्रम, किती व कोणत्या लोकांनी, किती वेळ पाहीला. कार्यक्रमादरम्यान किती लोकांनी पूर्ण पाहीला, जाहीराती किती टक्के लोकांनी पाहील्या, एकुण किती मिनिटे वा सेकंद किती टक्के प्रेक्षक टिव्हीसमोर होते याची इत्थंभूत माहीती बीएआरसी देत असते. यासाठी ऑडिओ वॉटरमार्किंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. ज्यातून टीव्ही चॅनेल्सची व्हिवरशीप मोजता येते. यासाठी बीआयओ न्यूज ही सर्विस न्यूज चॅनेलचे रेटिंग मोजते. तर बीआयओ एडव्हिजन जाहीरातींच्या व्हिवरशीप मोजते. टीव्ही प्लस ओओएच सार्वजनिक ठिकाणी असलेल्या टेलिव्हिजन सेट्सवरील रेटिंग काऊंट करते. असे अनेक प्रोडक्ट आणि सर्विस बीएआरसी पुरवत असते. ही मोजणी करताना दोन प्रकारांत शहरांची विभागणी केली जाते. ज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि औरंगाबाद ही पाच प्रमुख शहरे आहेत. जी पहिल्या श्रेणीत मोडतात तर ऊर्वरीत शहरे दुसऱ्या श्रेणीत येतात. जसे पिंपरी, नांदेड, कोल्हापूर, सांगली इत्यादी. जाहीरातदारांच्या दृष्टीने पहिल्या श्रेणीतील पाच शहरे महत्त्वाची असतात. कारण ती शहरेच त्यांच्या मुख्य बाजारपेठा आहेत. तिथे राहणारा वर्ग हा त्यांचा मुख्य खरेदीदार आहे. इतर शहरांत त्या तुलनेने लोकल ब्रँड्स जास्त पॉप्युलर असतात. ही आकडेवारी ठरवण्यासाठी जे सँपलिंग तयार केलं जातं त्याचे वयोगट पुढीलप्रमाणे असतात. लहान मुले 4 ते 8 वर्षे, 9 ते 14 वर्षे वयातील शाळकरी मुले, 15 ते 21 मधील तरूण, 22 ते 30 मधील युवक, 31 ते 40 हा प्रौढ गट, 41 ते 50 पूर्ण प्रौढ, 51 ते 60 प्रगल्भ गट, 61 च्या पुढे ज्येष्ठ नागरिक. यांचे मॅपिंग न्यू कंस्यूमर क्लासिफिकेशन सिस्टीम द्वारे केले जाते. ज्यास NCCS असे म्हटले जाते. बीएआरसी च्या आधी ही कामे TAM द्वारे केली जात होती. TAM मध्ये सोशिओ इकॉनॉमिक क्लासिफिकेशनचा वापर व्हायचा. ज्यास SEC म्हटले जायचे. एसईसी मध्ये घरातील कमावत्या व्यक्तीचे शिक्षण आणि उत्पन्न यांच्या आधारावर कंटेटची टेस्ट, चॉईस आणि प्लेसमेंट ठरवली जायची. परंतू NCCS मध्ये शिक्षण, उत्पन्न, वीज, उपलब्धता, शेतजमीन पासून अकरा विविध पॅरामीटर्सवर जोखूनच रेटिंग आणि त्याचे एनालिसिस केले जाते. आता येऊयात मुख्य मुद्द्यावर. जसे वर म्हटलेय तसे.. आताच्या घडीला बीएआरसी मुळे टिव्हिवर कोण कोणतं कंटेट किती वेळासाठी पाहतंय हे कळतं पण त्यासोबत कोणता वर्ग तो सामुहिक पद्धतीने पाहतोय हे देखील नीट कळू लागलं आहे. साहजिक आहे. बाजारपेठा त्याच हिशोबाने वर्कआऊट होणार. मराठी इंडस्ट्रीत झी, तेव्हाची अल्फा ही पायोनिअर कंपनी होती. पहिल्या पाच शहरांची चौकट लक्षात ठेवताना त्या शहरात राहणाऱ्या लोकांना जे कंटेट आवडेल तेच कंटेट टिव्हीवर आलं. तोच कित्ता इतर चॅनेल्सने गिरवला. भारतीय कलाक्षेत्र असंही रेसिस्ट आणि कास्टिस्ट आहेच. त्यात वाद नाही. गोऱ्या रंगापलीकडे रंग असलेल्यांना अभिनय येत असला तरी कलाकार म्हणायचं नाही याचे नीट आखीव रेखीव ठोकताळे रचून काम करणाऱ्या इंडस्ट्रीत ठराविक वर्गालाच प्रतिनिधित्व मिळेल याची सोय करून ठेवलेली होती. सिनेमा हे माध्यम सोपं नाही. सिनेमासारखं सिरिअलचं ही माध्यम निश्चित सोपे नाही. ते शिकावं लागतं. शिकण्यासाठी भली मोठी गुंतवणूक करावी लागते. या गुंतवणूकीला आपल्या आजूबाजूच्या जगाने स्विकारार्हयता दाखवणेही तितकेच गरजेचे असते. मागासवर्गीय मुलामुलींना अभिनय शिकणं ही एकतर न परवडणारी गोष्ट असते. त्यात तंत्र शिकण्यासाठी जी गुंतवणूक करावी लागते त्याची वानवा असते. सवर्ण जातीतींल मुलांना लहानपणापासून अभिनय आणि तंत्र शिक्षणाचे जे प्रिविलेजेस मिळतात ते वाड्या वस्त्यांतील शाळांमध्ये किंवा वातावरणात कुठेच मिळत नाहीत. अभिनय, नृत्य प्रशिक्षण शाळा, शिबिरे, वर्कशॉप आयोजित होण्याचं किंवा कुणीतरी पुढे येऊन शिकवण्याचं कल्चर अजून डेवलप व्हायला वेळ लागणार आहे. पिढ्या न पिढ्यांचा बॅकलॉग आहे हा. असे कितीतरी मुद्दे आहेत जे सांगता येतील. पण ही काही प्रमुख कारणे आहेत मागासवर्गीय कलाकारांचा टक्का कमी दिसण्यामागे. मराठीने मागासवर्गीय कलाकारांना कायम साईड रोल किंवा कॉमेडिअन म्हणूनच स्विकारलेलं आहे. इंडस्ट्री सुद्धा त्यांच्यात म्हणावी तशी गुंतवणूक करत नाही. आणि हे कलाकार सुद्धा स्वतःचा सेफ झोन सांभाळून कोणतीही भूमिका न घेता कातडीबचाव वागत राहतात. आता मुद्दा दुसरा... सगळ्या मालिकांत ब्राह्मण कॅरेक्टर का असतात? त्या निभावणाऱ्या कलाकारांची आडनावे सवर्ण जातीतीलच का असतात? तर खुप साधं गणित आहे. त्यांनी बाजारपेठेतील स्वतःचं ग्राहक म्हणून असलेलं स्थान अधोरेखित केलेलं आहे. गोऱ्या रंगाचं, सुडौल, शरिराचं, ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचं ठळकपण मार्केटमध्ये अधोरेखित केलं आहे. साहजिकच अख्खं कंटेट मार्केट त्यांच्याच बाजूने धावणार. पण ही स्थिती बदलता येऊ शकते.. यासाठी दोन उदाहरणे.. उत्कर्ष व आदर्श शिंदे सारखा गायकांनी त्याचं मार्केटमधील स्थान आणि डिमांड अतिशय शिताफीने प्रेझेंट केली. मार्केटला झक मारून दखल घ्यावी लागली. दुसरं उदाहरण, महामानवाची गौरवगाथा, सावित्रीजोती सिरीयल. दोन्ही सिरीयलच्या निर्मात्यांनी रिस्क घेतली. का, तर त्यांच्या सामाजिक जाणिवा प्रगल्भ होत्या. त्यांना इंडस्ट्रीच्या ठोकताळ्यांना कसं बदलायचं हे ठाऊक होतं. त्यांनी इंडस्ट्री आणि रेटिंगच्या पटलावर नसलेल्या मागास जातींना अधोरेखित केलं. पण असा निर्माता एकच आहे हे ही वेगळं सांगायला नको. हे मागास समुह सुद्धा तुमचे ग्राहक आहेत हे वाढणाऱ्या रेटिंग वरून आपोआप स्वच्छ दिसू लागलं. हळूहळू जाहीरातींनी ठेवलेला अप्रत्यक्ष अस्पृश्यपणा सोडायला सुरूवात केली. आपल्याला ही कंटेटची भाषा आणि पॉलिटिक्स नीट समजून घेऊन काम करावं लागेल. नव्या गोष्टी, नव्या मंचांची निर्मिती करावी लागेल. स्वतःच्या रक्तकिंमतीवर ते मंच, गोष्टी, कलाप्रकार, कलाकार पोसावे लागतील. आणि हो सोबतीला ठासून बोलावं ही लागेल. उघड विरोध करावाच लागेल. नुसतं कलेतून बोला कलेतून बोला सारखं गांडू धोरण स्विकारून चालणार नाही. बाकी आपण सूज्ञ आहात. मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीवर जर नीट सर्वे केला तर लक्षात येईल, मुख्य चेहरे, आणि नफा कमावणारे लोक हे 80 टक्क्यांहून जास्त आहेत. जी बहुजन पोरं आहेत ती सगळी पडद्यामागची. कुणी स्पॉट तर कुणी मेकअप तर कुणी कपडे. ही स्थितीही बदलेल. आधुनिक तंत्रज्ञान ज्ञानशाखेवरिल मक्तेदारी मोडून काढत आहे. या सर्व मागास जातींना कुणीतरी एक नायक लागतोच. टिव्ही इंडस्ट्रीतही कुणी उभारून येईलच. तिथेही आंबेडकर निर्माण होईलच. मग पाच वर्षात सगळा बॅकलॉग भरून निघेल. आणि म्हणूनच.. सुजय डहाकेच्या वक्तव्याचे मी पूर्ण समर्थन करतो आहे. टीपः कंटेटचा बिजनेस शिकणं, त्याचं कमर्शिअल आत्मसात केल्याशिवाय कंटेटला कुणी पाहणार सुद्धा नाही. BARC (Broadcast Audience Research Council) - स्थापना 2010, कार्यरत- 2015 पासून. Indian Broadcasters Foundation (IBF), Advertisers (ISA) and Advertising & Media Agencies (AAAI).

Saturday, March 7, 2020

८ मार्च : यासाठीच तर हवेय हिंदुराष्ट्र - प्रा.हरी नरके






उद्या आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती दिन.

सातआठ वर्षांपुर्वी दिल्लीमध्ये निर्भया अत्याचार प्रकरण घडले. तो अत्याचार इतका भयानक होता की पिडीतेवर बलात्कार करून त्यानंतर तिच्या मायअंगावर लोखंडी सळीने शेकडो वार करून तिच्या ओटीपोटातील सगळी आतडी तोडून बाहेर काढून फेकून देण्यात आली होती. इतका नीचपणा करणारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होऊनही एव्हढे वर्षे जिवंत कसे?

न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा चतुरपणे वापर करणे आणि पोलीस, तुरूंग व्यवस्थापन, सरकार यांच्या वरिष्ठांचे आशिर्वाद असणे यामुळे गुन्हेगारांची फाशी वारंवार पुढे ढकलली जाते आहे.

या गुन्हेगारातील एक विनय शर्मा हा उच्चजातीय/उच्चवर्णिय असल्याने त्याला फाशी दिल्यास ब्रह्महत्त्येचे पातक लागेल म्हणून त्याला फाशी देऊ नका अशी मागणी जाहीरपणे केली जातेय.
यासाठीच हवेय धर्मावर आधारित राष्ट्र.

मनुस्मृती स्पष्टपणे सांगते ब्रह्महत्त्या वर्ज्य आहे. कितीही भयंकर गुन्हे ब्राह्मणांनी केले तरी त्यांची हत्त्या करायची नाही. असा मनु ज्ञानोबातुकोबापेक्षा दोन पावले पुढे होता असे भिडेगुरूजी सांगतात. रामतिर्थकरबाई, इंदुरीकरबुवा आणि भाटेबाई मनुचे गोडवे गातात.

धर्मावर आधारित राष्ट्र म्हणजे मनुस्मृतीवर आधारित राष्ट्र.

भारतात इतर धर्माचे अल्पसंख्यक लोक राहतात म्हणून भारत सेक्युलर नसून सर्व भारतीय हिंदु स्त्रिया आणि अनुसुचित जाती, जमाती, विजाभज, इमाव, विमाप्र, एसिबीसी यांच्या हितासाठी धार्मिक राष्ट्र नको म्हणून भारत सेक्युलर हवाय. अल्पसंख्यकांचे काय होईल हा नंतरचा मुद्दा आहे. पहिले सर्व स्त्रिया आणि सर्व मागासवर्गीय यांची मनुच्या कायद्यानुसार कत्तल होईल जशी पेशवाईत होत होती. तेव्हा निर्भयाला न्याय मिळावा हीच स्त्रीमुक्तीदिनाची मागणी.

पाहा: मनुस्मृती, अध्याय ८ वा श्लोक क्र.३८०/३८१

प्रा.हरी नरके, ७ मार्च २०२०