Tuesday, March 10, 2020

जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट







सुमारे ४० वर्षांपुर्वीची गोष्ट. माझ्या मित्राची आई महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापिका होती. अतिशय बुद्धीमान आणि कर्तबगार महिला. उत्तम वाचन आणि सामाजिक जाणीवेतून वंचितांसाठी सतत कार्यरत असलेल्या. एकदा आमच्यात बोलता बोलता सावित्रीबाई फुलेंचा विषय निघाला. सावित्रीबाई झाल्या नसत्या तर आज तुम्ही प्राध्यापिका होऊ शकला नसतात, असं मी बोलून गेलो. त्यांना खूप राग आला. त्या म्हणाल्या, असंच काही नाही. त्यांनी जे काही महिलांच्या शिक्षणासाठी केलं, ते त्या झाल्या नसत्या तरी अन्य कुणीतरी केलंच असतं. काळ कुणासाठी थांबत नसतो. कामं कुणासाठी अडून राहात नसतात."
" जी गोष्ट गरजेची असते ते काम होतेच. कोणी होवो अगर ना होवो. सावित्रीबाईंचे उगीच देव्हारे माजवण्याची गरज नाही."
मी खूप हिरमुसलो. दुखावला गेलो.
मित्राची आई माझ्याबद्दल जिव्हाळा आणि आत्मियता असलेली व्यक्ती असल्याने त्यांचं म्हणणं पटलं नाही तरी मी गप्प बसलो.
पण मुद्दा मनात ठसठसत राहिला.
त्यांच्या महाविद्यालयाला स्वातंत्र्य चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या, एका महान राष्ट्रीय नेत्याचे नाव देण्यात आलेले होते. त्या नेत्यांच्या जयंतीनिमित्त एकदा आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. राजकीय स्वातंत्र्यासाठी मोठं योगदान दिलेले हे नेते सामाजिक बाबतीत सनातनी असल्याचा माझा आक्षेप ऎकून त्या खवळल्या. "हरी, अरे तू काय बोलतोयस ते तुला कळतंय तरी का? ते झाले नसते तर आपला देश स्वतंत्र झालाच नसता. एव्हढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल बोलताना माणसांनं आपलं वय, पात्रता आणि अक्कल यांचा विचार करावा" असंही त्या मला म्हणाल्या.
मीही हट्टाला पेटलो आणि म्हणलो, " त्यांनी स्वातंत्र्य चळवळीसाठी काम केलं ते मोठंच होतं. पण समजा त्यांनी ते केलं नसतं तरी स्वातंत्र्य मिळालंच असतं. कामं कुणासाठी अडून राहात नसतात, असं तुम्हीच म्हणता ना?"
त्या अतिशय संतापल्या आणि मला " मुर्ख आहेस. चालता हो," म्हणाल्या.
मी म्हटलं, " मी काय वावगं बोललो? जो न्याय सावित्रीबाईंना तोच लोकमान्यांना का नाही?"
त्यांना ते पटलं नाही. त्या म्हणाल्या, " ते वेगळं, हे वेगळं."
माणसं असा दुटप्पीपणा का करतात? जात माणसाच्या अबोध मनात [नेणीवेत] दडलेली असते नी ती नकळत काम करत असते हेच खरं काय?
एरवी अतिशय समतोल वागणारी ही माझ्या मित्राची आईसुद्धा नकळत असं वागून गेली असावी काय? मी त्यांना जातीयवादी म्हणणार नाही.
एरवी उत्तम युक्तीवाद करणार्‍या बुद्धीजिवी माणसांचाही जातजाणिवेचा ब्लाईंड स्पाॅट असतो काय?
-प्रा.हरी नरके, १० मार्च, २०२०


No comments:

Post a Comment