Monday, March 23, 2020

काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा

१. " डागतर, पईले दावलो तवा फकस्त पू येऊलालाता, आता वास घान मारूलालाय." पेशंट तक्रार करीत होता.
कान तपासला. त्यानं कानात ठेवलेला कापसाचा बोळा काढला. बघतो तर आत दुसरा बोळा. तो काढला तर काय आत तिसरा बोळा. एकुण सात बोळे काढले. त्यानं ठोकून ठोकून सातसात बोळे कोंबल्यामुळे दुर्गंधी येत होती. मी चिडलो. हा काय मुर्खपणा आहे? तर तो म्हणाला," सायब, तुमीच मनलो व्हतो की आंगोळीच्या टायमाला कानात कापसाचा बोळा ठिवा मनून, म्हनुन ठिवलो. आंगोळ जाल्यावर काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा. माजी काय चूक?" मी कपाळाला हात लावला. कानात ठेवलेला बोळा आंघोळीनंतर काढा असं मी कुठं सांगितलं होतं हा त्याचा प्रश्न बिनतोड होता.

२. एका पेशंटनं मला बुचकळ्यात टाकलं. " डागतर, तुमी गोळ्या तर दिलाव, पन जिरंना गेल्यात. अप्पूट जाईनाबी गेलीय. आन जिरंनाबी गेलीय. काय उपेग?" सखोल विचारपूस केल्यावर कळलं, तो काय म्हणतोय ते. त्याचं म्हणणं गोळी कानात जात नाहीये. दोन तुकडे करून घातली तरी ती कानात जिरत नाहीये.
तुम्हाला गोळी कानात घालायला कोणी सांगितलं? अहो ती तोंडातून घ्यायची गोळी आहे.
कानात घालायच्या ड्रॉपच्या खाली गोळ्या लिहिल्याने त्यानं गोळी पण कानात घालायचीय असा समज करून घेतलेला.

३. शाखेत जाणारा मित्र सांगत होता, त्याला एक दिवस आदेश मिळाला, "लोहगाव विमानतळावर जायचें. तिथे दिल्लीवरून *** *** **** येतील. त्यांना घेऊन शाखेवर यायचें.
आणि हो, काही कारणानें ते आले नाहीत तर तू मात्र परत यायचें हो, काय समजलें?"
सुचना कशा फुलप्रूफ हव्यात.

फटाके, ढोल, महाआरत्या, वाजतगाजत मिरवणुका, शेकडोंनी एकत्र जमून केलेला जल्लोश, हे बघितलं की हा देश किती महान लोकांचा आहे त्याचे दर्शन होते.
जे सर्वांचे होणार तेच आपल्याही वाट्याला येणार. कारण आपण सारे एकाच हवेत श्वास घेतो. सर्वांची नियती एकच.

वाजवा म्हणताना वाजवून झालं की थांबा असंही सांगायला लागतंय, हे अनुभवी लोक कसे काय विसरले? की त्यांनाही हेच हवं होतं?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च २०२०

१ व २ चा संदर्भ- डॉ. संजय कुलकर्णी, कुलकर्ण्याचा दवाखाना, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१९,

No comments:

Post a Comment