Monday, March 16, 2020

मालिका पुढे चालू ठेवायची असेल तर -- प्रा.हरी नरके





डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही स्टार प्रवाहवरील मालिका बंद करू नका, तिचे भाग वाढवा, आम्हाला मालिका बघायची आहे, अशी एकमुखी मागणी माझ्या परवाच्या पोस्टवर करण्यात आली. धन्यवाद.ही मालिका वाढवावी अशी तुमची खरीच इच्छा असेल तर तुम्हाला विश्वासात घेऊन काही गोपनीय गोष्टी उघड करतो.
१. मालिकेला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद असला तरी आणखी खूप जास्त प्रतिसाद मिळाला तरच यापुढे ही मालिका चालू ठेवणे व्यवहार्य ठरेल.
२. शेवटी सगळी सोंगं करता येतात, पैशाचे सोंग आणता येत नाही. ही मालिका बायोपिक असल्याने, तो काळ उभा करण्यासाठी, नेहमीच्या मालिकांपेक्षा जास्त पैसा खर्चावा लागतो.
३. तितका रिटर्न जर होत नसेल तर मग वाहिनीने काय करावे असे तुम्हाला वाटते? कुठलीही वाहिनी आतबट्ट्याचा व्यवहार करू शकत नाही.
४. ही मालिका सुरू झाली तेव्हापासून तिचा प्रेक्षकवर्ग टिकून राहिलेला आहे, एपिसोडपरत्वे छोटीमोठी वाढ / घट होत राहिली, मात्र मुख्य लोकप्रियता कायम राहिली. म्हणुन ठरलेले २०० एपिसोड संपल्यावरही मालिकेला ४०% मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळेच मालिका पुढे चालु राहिली.
५. अर्थात आता पुन्हा मुदतवाढ मागायची/ द्यायची असेल तर खूप जास्त प्रतिसाद वाढेल याची हमी कोण देणार? तुम्हाला खालील गोष्टी अग्रक्रमाने कराव्या लागतील.
६. रात्री ह्याच वेळी दुसर्‍या एका वाहिनीवर एक ऎतिहासिक विषयावरील चरित्र मालिका चालू होती. ती बघायची असल्याने आमची इच्छा असूनही आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका बघू शकत नसल्याचे अनेक लोक आम्हाला सांगत असत. ती मालिका बंद होऊनही या मालिकेच्या प्रेक्षकसंख्येत भरिव वाढ का झाली नाही?
७. आज दहा महिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही मालिका चालूय. मालिका उत्तम आहे, आम्ही एकही भाग चुकवत नाही असे लक्षावधी लोकांचे अभिप्राय आम्हाला मिळतात मात्र हे लोक वाचकांच्या पत्रव्यवहारात या मालिकेबद्दल का लिहित नाहीत?
८. अपवाद वगळता समाज माध्यमांवरही [ फेसबुक/ ट्विटर/ व्हॉटसप] तुम्ही का लिहित नाही?
९. तुम्ही रोज बघता तर मग इतरांना बघायला का प्रवृत्त करीत नाही?
१०. एका अतिरेकी मानसिकतेच्या छोट्या वर्गाने या मालिकेवर सतत दुषित पुर्वग्रहातून हल्ले केले, त्याला उत्तर द्यावे असे तुम्हाला का वाटले नाही?
११. आंबेडकरी समाजातला एक छोटा आत्मकेंद्रीत वर्ग ह्या मालिकेवर पहिल्या दिवसापासून बहिष्कार घालून बसलेला आहे. त्याला फक्त नाकं मुरडण्याचा कार्यक्रम माहित आहे. आम्ही काही विधायक करणार नाही, इतरांनाही करू देणार नाही, अशी ही आडमुठी भुमिका तुम्हाला पटते का?
१२. समाजात असा एक सनातनी वर्ग आहे की ज्याच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जन्मजात अढी आहे. त्यांची संख्या मूठभरच आहे.
प्रागतिक विचाराचे सर्व जाती-धर्मातील लोक ही मालिका बघतात. आंबेडकरी समाजापेक्षाही ही प्रेक्षकसंख्या अधिक आहे. आंबेडकरी समाजातील मूठभरांनी आत्मघातकी वृत्ती सोडून ही मालिक यापुढे बघावी, इतर समाजातील प्रेक्षकांनाही इकडं वळवावं असं तुम्हाला वाटत नाही काय?
१३. आम्ही कायम समतोल मांडणी करीत आलोय. आंबेडकरी समाजातल्या उच्च बुद्धीजिवींनाही माहित नसलेल्या असंख्य गोष्टी या मालिकेने प्रथमच उजेडात आणल्या. तरिही जे फक्त टिकाच करतात, त्यांच्यामागे उभं राहायचं की मालिकेच्या मागे याचा निर्णय तुम्ही सुबुद्ध प्रेक्षकांनी घ्यायचाय.
१४. तुमचे वाढीव सहकार्य मिळणार नसेल तर ही मालिका फार लवकरच आपला निरोप घेईल.
१५. जगातले नंबर एक विद्वान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावरील गुणवत्तासंपन्न मालिका मराठी वाहिन्यांवरील नंबर एकची मालिका व्हावी असं तुम्हाला वाटत नाही काय? किमान पहिल्या दहामध्ये ती यावी यासाठी तुम्ही काहीच करणार नसाल तर मग आमचाही नाईलाज होईल.
१६. आम्ही आमचे प्रयत्न शेवटपर्यंत सोडणार नाही. पण उगीच मालिका अर्ध्यावर आलीय असा खोटाखोटा दिलासाही देणार नाही. तुमच्या वाढीव सहकार्याशिवाय ह्या मालिकेला यापुढे पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणं खरंच कठीण वाटतंय.
निर्णय आता तुमच्या हातात आहे.
-प्रा.हरी नरके, १६ मार्च २०२०
https://www.facebook.com/Mahamanvachi.Gauravgatha.FC/videos/841247446347731/

* अधिकारों सें इन्सान ग्यानी नही बनता. आप के पास सिर्फ अधिकार होना काफी नही हैं. क्यों की ग्यान अधिकारो से नही पढने से मिलता हैं. ग्यान से व्यक्ती दूरदर्शिता और मुत्सद्दीपण पा सकता हैं, जो व्यक्ती, समाज और देशके विकास के लिए आवश्यक होता हैं.   
* देशके भविष्य के निर्माण में नेता, पार्टी और उनकी प्रतिष्ठा का कोई स्थान नही होता हैं. देश का भविष्य इनके सर्वोपरी होता हैं. बल प्रयोग के आधारपर राष्ट्र की एकता या विकास का माहौल नही बनाया जा सकता हैं. उसके लिए दूरदर्शिता और भाईचाराही जरूरी हैं.

No comments:

Post a Comment