Saturday, March 14, 2020

गौरवगाथा २५० नाबाद- मालिका निरोपाच्या जवळ आलीय


























डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मालिकेचे काल २५० भाग पूर्ण झाले. रसिक प्रेक्षक, जाहीरातदार, स्टार प्रवाह वाहिनी आणि दशमी क्रिएशन यांचे हार्दीक आभार.

सर्व थरातील प्रेक्षकांनी ही मालिका उचलून धरली. सर्वच जात- धर्म- पंथ- प्रदेश- वयोगट यातल्या प्रेक्षकांचा दणकट प्रतिसाद मिळाला नसता तर ही मालिका फार पुर्वीच गुंडाळली गेली असती.

गेल्या अनेक वर्षात कोणत्याही खाजगी वाहिनीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर मालिका करण्याची हिम्मत दाखवली नव्हती. दशमीचे नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर यांनी हे धाडस केले. स्टार प्रवाहचे सतिश राजवाडे, अभिजीत खाडे आणि सर्व टीम यांनी ही कल्पना उचलून धरली. सुरुवातीला २०० भागांना मान्यता देण्यात आलेली होती. मध्यंतरी त्यात थोडी वाढ करण्यात आली. १८ मे २०१९ पासून गेली दहा महिने स्टार प्रवाह वर रात्री ९ वाजता ही मालिका प्रक्षेपित होते.

मात्र आता मालिका शेवटाच्या जवळ पोचलेली आहे. तुमचं सर्वांचं प्रेम शेवटपर्यंत कायम राहिल असा विश्वास वाटतो.

हा अनुभव व्यक्तीश: मला खूप काही शिकवून समृद्ध करणारा होता. धन्यवाद नितीनसर. कोट्यावधी प्रेक्षकांच्या या ताकदीकडे सामाजिक चळवळीने संपुर्ण दुर्लक्ष करून हे कुरण सनातनी विचारांच्या कंपूला बहाल केलेले आहे.

आपले बहुतेक विचारवंत आणि साहित्यिक यांना निष्क्रीयता व आत्मकेंद्रीतता यामुळे मालिकाविश्व, त्याची परिणामकारकता, कोट्यावधींपर्यंत पोचण्याची क्षमता याची जाणीव झालेली नाही. ते सामान्य माणसाच्या जगण्याशी, त्याच्या आवडीनिवडीशी नाळ जोडू शकलेले नाहीत. ते बहुधा कालबाह्य झालेले आहेत. जे सामान्य जनतेपासून फटकून राहतात ते फुले-शाहू-आंबेडकरवादी कसे काय असू शकतात? आणि म्हणे हे परिवर्तनवादी. नेमकं कसलं परिवर्तन करणारेत हे? कशाच्या आणि कुणाच्या जोरावर? हे क्रांती करणार पण तिही स्वत:पुरती. मनातल्या मनात. त्यांच्या या तुसड्या आणि आत्मसंतुष्ट मानसिकतेमुळेच बहुधा प्रतिगामी शक्ती वेगाने वाढत आहेत. प्रबोधन चळवळी माना टाकीत आहेत. मला याची जाणीव आहे की मालिकांना अनेक मर्यादा असतात. बर्‍याच तडजोडी कराव्या लागतात. मालिकांमुळे क्रांती होणार नाही. मात्र अनुकूल मानसिकता नक्कीच घडवता येईल.

या यशाचे शिल्पकार असलेल्या खालील मान्यवरांचे मी कृतज्ञतापुर्वक आभार मानतो. ही नामावली प्रातिनिधिक आहे. प्रत्यक्षात या यशात आणखी खूप मान्यवरांचा सहभाग आहे.

नितीन वैद्य, निनाद वैद्य, अपर्णा पाडगावकर, सागर देशमुख, सतिश राजवाडे, शिल्पा कांबळे, अभिजीत खाडे, चिन्मय केळकर, शिवानी रांगोळे, वैभव छाया, अक्षय पाटील, अजय मयेकर, गणेश रासने, दीपक प्रभाकर  नलावडे, अमृत गायकवाड, चिन्मयी सुमीत, पूजा नायक, मिलिंद अधिकारी, संकेत कोर्लेकर, पुष्कर सरद, मृण्मयी सुपल, आदर्श शिंदे, सोहम देवधर, किरण शिंगाडे, अमित ढेकळे,निनाद लिमये, दादा गोडकर, पवन झा,पद्मनाभ बिंड, अजित दांडेकर, नरेंद्र मुधोळकर

-प्रा.हरी नरके, १३ मार्च २०२०

No comments:

Post a Comment