Wednesday, March 11, 2020

कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता-






कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या कविता- टीम कोलाज

सावित्रीबाई फुले आपल्याला शिक्षिका, समाजसुधारक म्हणून माहीत आहेत. पण त्या कवयित्रीही होत्या. त्यांच्या वयाच्या २३ व्या वर्षाच त्यांचा ‘काव्यफुले’ कवितासंग्रह प्रसिद्ध झाला होता. यातल्या कवितांचा आशय, विषय यावरून आपल्याला सावित्रीबाईंच्या मनातली घालमेल समजून घ्यायला मदत करतात. सावित्रीबाईंच्या अशाच काही कविता.

सावित्रीबाई फुले आद्य भारतीय शिक्षिका आहेत. जोतिबांच्या खांद्याला खांदा लावून परिवर्तनाची चळवळ त्यांनी चालवली. देशातली मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली. त्यांनीच देशातलं पहिलं साक्षरता अभियान चालवलं. फसवल्या गेलेल्या ब्राह्मण विधवांच्या बाळंतपणासाठी आणि त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढलं. सत्यशोधक समाजाची चळवळ चालवली. स्वतःच्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी खुला करून जातिनिर्मूलनाच्या कार्यक्रमाला सुरवात केली. बालविवाहांना विरोध केला. विधवांचा पुनर्विवाह घडवून आणला. एका ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन त्याला डॉक्टर बनवलं. शिवाय त्याचं आंतरजातीय लग्न करून दिलं.

जोतिबांच्या नंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा सांभाळली. दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली. प्लेगच्या साथीत आजाऱ्यांची सेवा केली. त्यातच त्यांचं निधन झालं. हे सारं आपल्याला माहीत असतं. पण सावित्रीबाई स्वतः उत्तम कवयित्री होत्या. त्यांनी संपादनं करून चांगलं डॉक्युमेंटेशनही करून ठेवलीय. त्यांनी एकूण पाच पुस्तकं लिहिलीत. ती अशी,

‘काव्यफुले’ या १८५४ साली प्रकाशित झालेल्या सावित्रीबाईंच्या पहिल्या काव्यसंग्रहात एकूण ४१ कविता आहेत. सावित्रीबाईंनी त्यात निसर्गविषयक, सामाजिक, बोधपर आणि ऐतिहासिक अशा कविता आहेत.
‘जोतिबांची भाषणे’ हे पुस्तक सावित्रीबाईंनी संपादित केवंय. त्याचं संपादन चार्लस जोशी यांनी केलंय. हे पुस्तक २५ डिसेंबर १८५६ ला प्रसिध्द करण्यात आलं. त्यात जोतीरावांची चार भाषणं आहेत.

‘सावित्रीबाईंनी जोतीरावांना लिहिलेली पत्रे’ नावाचंही पुस्तक सावित्रीबाईंच्या नावाने प्रसिद्ध झालं. यात त्यांनी एकूण तीन पत्रे असून ती नायगाय आणि ओतूरहून लिहिलेली आहेत.

‘मातुश्री सावित्रीबाईंची भाषणे’ हे पुस्तक १९८२ मधे आलं. या पुस्तकात उद्योग, विद्यादान, सदाचरण, व्यसने, कर्ज या विषयांवरील भाषणं आहेत. याचं संपादन शास्त्री नारो बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी केलंय. बडोद्याच्या वत्सल प्रेसने हे पुस्तक प्रकाशित केलंय.

‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या कवितासंग्रहात सावित्रीबाईंनी देशाचा इतिहास काव्यरुपाने सांगितलाय. जोतीरावांच्या कार्याचं चित्रणही त्यात केलंय. यामधे ५२ रचना आहेत. हे काव्य जोतीरावांच्या मृत्यूनंतर १८९१ मधे प्रसिद्ध झालं. १८९२ मधे ते पुस्तकरुपाने आलं.

सावित्रीबाईंचं समग्र साहित्य आज उपलब्ध आहे. त्याची नवी आवृत्ती आजच प्रसिद्ध झालीय. त्यात कवयित्री सावित्रीबाईंची ओळख करून देणाऱ्या या पाच कविता,

पेशवाई

पुढे पेशवाई तिचे राज्य आले
अनाचार देखी अती शूद्र भ्याले
स्वथुंकी थुंकाया गळा गाडगे ते
खुणा नाश या ढुंगणी झाप होते
स्वराज्यी स्वधर्मी परी व्याघ्र दाढी
असंतोष त्यांचा कुणाही न काढी
प्रजेला एकसारखे वागवीती
तरी शूद्र सारे स्वधर्मी रहाती
तुला बोलवी रावबाजी धनी ग
स्वपत्नीस धाडी निर्लाजा पती ग
छळे ब्राम्हणाला अशी स्रैणशाही
मुखा बोलती ही जळो पेशवाई
पहा शंकराचे लुटी पूज्य क्षेत्र
अशी माजली पेशवाई विचित्र
पुढे जाहली मूर्खसत्ता विनाश
नसे दु:ख कोणा नसे सुख आस
छळी स्त्रीस शूद्रा बहू पेशवाई
अशा कारणे इंग्रजी राज्य होई
ध्वजा इंग्रजी लाविता बाळ नातू
तया निंदता रोरवातील जंतू
मिळे इंग्रजी फूस शूद्रादिकांना
लढाई कराया जमे जाति नाना
पराभूत हो पेशवाई करुनी
तिथे आणती शूद्र आंग्लाई शहाणी

इंग्रजी माऊली
पेशवाई गेली

इंग्रजी माऊली आली
निराशेचा गर्द अंधार
नरक स्वर्गाचे भय अनिवार
न्यूनगंडाचे मनी विचार
अशा या काळी, इंग्रजी माऊली आली
दूर फेकुनि रुढी द्यारे
परंपरेची मोडून दारे
लिहीणे वाचणे शिकूण घ्यारे
छान वेळ आली.... इंग्रजी माऊली आली
भटधर्मांच्या क्लृप्त्या नाना
अज्ञानामुळे शूद्रजनांना
पिळती छळती बहु तयांना
पेशवाई मेली.... इंग्रजी माऊली आली
भटशाहीचे राज्य जळाले
शहाणे इंग्रज विजयी झाले
शूद्र जनांना हित हे ठरले
मनूस्मृती मेली.... इंग्रजी माऊली आली
शूद्र जनांना ज्ञान सावली
अतिशूद्रांची पालनवाली
इंग्रज सत्ता सुखकर झाली
भयानकता गेली.... इंग्रजी माऊली आली
देश इंडिया नाही कुणाचा
इराणी बहान यवन हुणांचा
असा खरा तो इंडिया रक्ताचा
ठोक रे आरोळी.... इंग्रजी माऊली आली

शूद्रांचे दुखणे (अनुष्टुभ)

दोन हजार वर्षांचे शूद्रा दुखणे लागले
ब्रम्हविहित सेवेचे भू-देवांनी पछाडले
अवस्था पाहुनि त्यांची होय शब्दी मन उठे
सुलभ मार्ग कोणता काय विचारे बुध्दी अटे
शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व पशूत्व हाटते पहा

मानव आणि सृष्टी

पाऊस पडला शिवारात या निर्मल झाली सृष्टी
फळाफुलांना कडधान्यांना पोषक देई पुष्टी
झिमझिम येई पाऊस पडतो बहरली सृष्टी सारी
फळाफुलांचा वेलबुट्टीचा नेसते शालू भारी
कोकीळ गाते कहुकहुनी मोर डोलुनी नाचे
फुलाभोवती आनंदाने फीरती भुंगे चांचे
सुंदर सृष्टी मानव सुंदर जीवन सारे
सद्भावाच्या पर्जन्याने बहरुनी टाकू 'वा'रे

       मानवी जीवन विकसूया

       भय चिंता सारी सोडुनि या
       इतरा जगवू स्वत: जगूया
मानवप्राणी निसर्गसृष्टी द्वय शिक्क्याचे
एकच असे ते म्हणुनि सृष्टीला शोभवु मानव लेणे

हेही वाचाः

आपण खरंच सावित्रीच्या लेकी आहोत का?
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा

http://kolaj.in/published_article.php?v=Poet-Savitribai-PhuleQV7940538&fbclid=IwAR1b0-W_Mc-zct_aWIJ3x3wQM709Sd_gIs7rgEN0WrFIC7YCXWh07Dstqjo

No comments:

Post a Comment