Saturday, February 27, 2021

मराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं?

 मराठीच्या अभिजात दर्जाचं काय झालं?

27 फेब्रुवारी : मराठी भाषा दिनानिमित्त...

साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे 1500 ते 2000 वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ रूप व आजचे रूप यांचे नाते असणे हे अभिजात दर्जाचे चारही निकष मराठी सहज पूर्ण करते. आम्ही तसे सिद्धही केलेय. आता गरज आहे ती राजकीय रेट्याची. त्यासाठी मराठीची लॉबी दिल्लीत उभी करावी लागेल. संस्कृतचे ओझे नाकारावे लागेल.

मोदी सरकारच्या मराठीबद्दलच्या अनास्थेमुळे व उदासीनतेमुळे मराठीला मिळू शकणारा अभिजात दर्जा गेली सात वर्षे रखडला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेली चौदा वर्षे आपण अहोरात्र झटतो आहोत. पठारे समितीने लिहिलेला मराठीचा अहवाल केंद्र सरकारने नेमलेल्या भाषातज्ज्ञांनी सर्वानुमते मंजूर केला... त्यालाही सात वर्षे उलटून गेली. केंद्रातील नेत्यांच्या मराठीद्वेषामुळे ही घोषणा रखडलेली आहे. मनमोहन सिंह यांच्या काळात सहा भाषांना हा दर्जा दिला गेला. मोदी सरकार संस्कृतलॉबीच्या दबावाखाली काम करत असल्याने त्यांनी एकाही भारतीय भाषेला हा दर्जा दिलेला नाही. ही नीती लोकभाषाविरोधी आहे.

एक वेळ पैशांचे सोडा... पण मायमराठीचा होणारा सन्मान रोखला गेला याचा खेद प्रत्येक मराठी माणसाला वाटायला हवा. अभिजात मराठी भाषा म्हणजे श्रेष्ठ मराठी भाषा. ज्या भाषेतले साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असते तिला अभिजात दर्जा मिळतो. मराठी अमृतातेही पैजा जिंकणीरी असल्याची ग्वाही 700 वर्षांपूर्वीच ज्ञानेश्वर देऊन गेलेत. जगातील सर्व भाषा मेल्या आणि अवघ्या चार जगल्या तरी मराठी जगणार आहे. स्वतःचे राज्य आणि श्रेष्ठ साहित्य असलेली मराठी ही जगातली चौथ्या क्रमांकाची राज्यभाषा आहे. मराठीतले कोशवाङ्‌मय तर जगातले दुसर्‍या क्रमांकाचे कोशवाङ्‌मय आहे.

कोणताही माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही एक प्रकारे माणसाच्या अस्तित्वाला विचारांचा प्राणवायू पुरवत असते. ते त्याचे ओळखपत्र असते. मातृभाषा ही माणसाची अस्मिता आणि अस्तित्वखूण असते. शहरी, महानगरी मराठी माणूस बहुभाषक आहे. रोजगार, उद्योग, व्यापार, आर्थिक प्रगती यांसाठी त्यानं बहुभाषकतेची कास धरलेली आहे. पोटासाठी त्याने इतर भाषा शिकायला कोणाचाच विरोध नाही... परंतु मराठी ही हलकी भाषा आहे, डाऊन मार्केट आहे म्हणून त्याला तिची लाज वाटत असेल... तर मात्र ती शरमेची बाब आहे. इंग्लीशमधून, हिंदीतून बोलण्याला आज सार्वजनिक जीवनात विशेष प्रतिष्ठा आहे. एखादी भाषा मरते तेव्हा एक संस्कृती संपते. तिच्या निर्मितीसाठी आणि संवर्धनासाठी शेकडो वर्षे लाखो लोक राबलेले असतात. महाराष्ट्रात ज्या दिवशी बुद्धिजीवी मध्यम आणि उच्च मध्यम वर्गाने मराठीचे बोट सोडले... त्या दिवसापासून मराठीचा वनवास सुरू झाला.

साहित्याची श्रेष्ठता, भाषेच्या वयाचे 1500 ते 2000 वर्षांचे लिखित पुरावे, भाषेची स्वतंत्रता आणि भाषेचे मूळ रूप व आजचे रूप यांचे नाते असणे हे अभिजात दर्जाचे चारही निकष मराठी सहज पूर्ण करते. आम्ही तसे सिद्धही केलेय. आता गरज आहे ती राजकीय रेट्याची. त्यासाठी मराठीची लॉबी दिल्लीत उभी करावी लागेल. संस्कृतचे ओझे नाकारावे लागेल.

17 वर्षांपूर्वी तमीळ भाषेला अभिजात दर्जा दिला गेला. त्यानंतर संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि उडिया यांनाही तो मिळाला. मराठीला हा दर्जा द्यावा अशी साहित्य अकादमीने एकमताने केलेली लेखी शिफारस मोदी सरकारने गेली सहा वर्षे दुर्लक्षित केली आहे. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, शिक्षण हे सारेच विषय मागे गेले आहेत. मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ, मराठीचे 25 वर्षांचे धोरण, मराठीसक्तीचा कायदा आणि अभिजात दर्जा यांबाबतीत तडजोड होता कामा नये. 
 
1907मध्ये ग्रियरसनने भारतीय भाषांचे सखोल सर्वेक्षण केले. तो म्हणतो की, जी भाषा रोजगार देते तीच जगते. जी भाषा रोजगारक्षम नसते ती मरते, नष्ट होते. बोलीभाषांची विविधता हे मराठीचे खरे वैभव असून मराठीच्या 52 बोलीभाषा आहेत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, साने गुरूजी, जी.ए. कुलकर्णी, उद्धव शेळके, बा.सी. मर्ढेकर, व्यंकटेश माडगूळकर, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, दुर्गा भागवत, पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, महेश एलकुंचवार, रंगनाथ पठारे अशा अनेकांमुळे मराठी समृद्ध झालेली आहे. दलित साहित्याने मराठीला सामाजिक दस्तऐवज देऊन तिला खूप श्रीमंत केलेले आहे.

‘एक होता कावळा नि एक होती चिमणी...’ ही प्रत्येक मराठी घरात आजही सांगितली जाणारी गोष्ट आहे. ती पहिल्यांदा ग्रंथात लिहिली गेली 800 वर्षांपूर्वी. लीळाचरित्रात धानाई नावाच्या हट्टी मुलीला श्री चक्रधरांनी ती सांगितली असली तरी ती त्याआधी हजारबाराशे वर्षे मराठी लोकजीवनात सांगितली जात होती. ती विलक्षण लोकप्रिय होती.

महाराष्ट्री प्राकृत किंवा महारठ्ठी या नावाने दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी प्रचलित, लोकप्रिय व मान्यताप्राप्त असलेली भाषा ही संस्कृतपेक्षाही जुनी असल्याचे म.म. राजारामशास्त्री भागवत (विदुषी दुर्गा भागवत यांचे आजोबा) यांनी 1885मध्येच दाखवून दिले होते. ‘मराठ्यासंबंधी चार उद्गार’ हा त्यांचा ग्रंथ जिज्ञासूंनी अवश्य वाचावा. त्यांचा ‘मराठीची विचिकित्सा’ हा ग्रंथही महत्त्वाचा आहे. 

राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना दुर्गा भागवतांनी म्हटले आहे की, जुनी महाराष्ट्री संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवंत भाषा आहे हे त्यांनी दाखवले आहे. मराठी संस्कृतोद्भव नाही. ती संस्कृतपेक्षा जुनी भाषा आहे. नात्याने ती संस्कृतची मावशी आहे. 1927मध्ये ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास दोन खंडांत लिहिला. त्यात त्यांनी मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. 1932मध्ये पांगारकरांनी दाखवून दिलेले आहे की, महाराष्ट्री, महारठ्ठी, मर्‍हाठी, मराठी या वेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची प्राचीन, मध्यकालीन व अर्वाचीन रूपं आहेत.

गाथा सप्तशतीतील मराठी, जे महाराष्ट्री प्राकृत या नावाने ओळखले गेले;  हरिभद्र, भद्रबाहू, उद्योतन सुरी आदींचे लेखन आणि चक्रधर, ज्ञानेश्वर, चोखा, चोंभा, सावता महाराज, नामदेव, संत बहिणाबाई, एकनाथ, बखरकार ते फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, लोकहितवादी, आगरकर, रानडे, टिळक, विष्णुभट गोडसे, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, बेडेकर, दिलीप चित्रे यांच्या साहित्याची महत्ता आणि त्यांचे ‘जैविक नाते’ महत्त्वाचे आहे. 

मराठीतला आज उपलब्ध असलेला पहिला ग्रंथ आहे, ‘गाहा सत्तसई’ (गाथा सप्तसती) गाथा म्हणजे कविता. सातशे लोककवितांचा संग्रह म्हणजे हा ग्रंथ होय. पैठणच्या हाल या सातवाहन राजाने सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पन्नास कवींच्या या कविता संकलित केल्या. सातवाहनांची राजभाषा मराठी असल्याने त्यांचे जिथे-जिथे राज्य होते तिथे-तिथे या ग्रंथाची हस्तलिखिते मिळालेली आहेत. सातवाहनांचे संपूर्ण भारतावर तर राज्य होतेच... शिवाय पार अफगाणिस्तानपर्यंत राजभाषा मराठीची पताका फडकत होती.

मूल लहान असताना, रांगत असताना पीएच्‌.डी. करू शकेल का? नाही. मग कोणतीही भाषा बालवयातच ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि विवेकसिंधू  यांसारखे जागतिक दर्जाचे श्रेष्ठ ग्रंथ कसे प्रसवू शकेल? आठशे वर्षांपूर्वी मराठीत हे ग्रंथ लिहिले गेले तेव्हा मराठी बालभाषा नव्हती... तर ती एक परिपक्व झालेली समृद्ध भाषा होती. संत ज्ञानेश्वर मराठीची गोडी अमृताहूनही जास्त असल्याचे प्रतिपादन कोणाला उद्देशून करत होते? संस्कृतलाच ना? ज्ञाननिर्मिती, साहित्य, विचार, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांची त्याआधीची फार मोठी परंपरा मराठीला होती. गाथा सप्तसती, पादलिप्त, हरिभद्राची-समरादित्याची कथा, उद्योतन सुरीची कुवलयमाला, चक्रधरांचे लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, एकनाथांची भारुडे, माझा प्रवास, गावगाडा, धग, कोसला, बनगरवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, गोलपिठा, शांतता कोर्ट चालू आहे हे ग्रंथ इतके चिरेबंदी आहेत की, मराठीची श्रेष्ठता स्वयंस्पष्ट आहे.

मराठीला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे मराठीच्या जागतिक प्रतिष्ठेवर शिक्कामोर्तब होणे... त्यामुळे मराठी माणसाचा न्यूनगंड कमी होईल. मराठी शिकवण्याची सोय देशातील 450 विद्यापीठांमध्ये होईल. मराठीच्या समग्र विकासासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी पाचशे कोटी रुपये मिळतील. मराठी शाळा, शिक्षण, शिक्षक यांची दर्जावाढ; वाचन संस्कृती वाढणे; ग्रंथालये संवर्धित केली जाणे; मराठी पुस्तके स्वस्तात मिळणे; मराठी मुलामुलींना अधिकाधिक रोजगार मिळणे या सगळ्यामुळे मराठीचा दर्जा आणखी सुधारण्यास खूप मदत होईल. विशेषतः बृहन्‌महाराष्ट्रात मराठीच्या संवर्धनाला यातून अर्थबळ पुरवता येईल. मराठीचे गोमटे व्हायला अभिजात दर्जा गती देईल... त्यामुळे मराठीचा हा सन्मान महत्त्वाचा आहे.

- प्रा. हरी नरके
harinarke@gmail.com

(लेखक अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत.)

Tags: भाषा हरी नरके अभिजात भाषा साहित्य Marathi  https://kartavyasadhana.in/view-article/prof-hari-narke-on-classical-language-status-to-marathi?fbclid=IwAR1k7g_BN8vzuEeMYJkVo0mDtc65HT3fMjlOvKm-tB6Vy_LHs9-1Y_-guxY

Thursday, January 28, 2021

महात्मा फुले समग्र वाड्मय हा ग्रंथ लवकरच उपलब्ध करून देणार- प्रा. हरी नरके








वाचकांकडून सर्वाधिक मागणी असलेली "महात्मा फुले समग्र वाड्मय, सावित्रीबाई फुले समग्र वाड्मय, आम्ही पाहिलेले महात्मा फुले, युगपुरूष महात्मा फुले," आदी पुस्तके लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याला मी प्राधान्य देणार आहे. याशिवाय बरीच नविन पुस्तके प्रकाशित करण्याच्या कामालाही गती देण्यात येईल. नुकतीच राज्य शासनाने महात्मा फुले ग्रंथ  समितीवर सचिव म्हणून माझी नियुक्ती केलेली असून मी नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी कामाला ताबडतोब सुरुवातही केलेली आहे. मागच्या सरकारच्या काळात ही समिती संपुर्ण निष्क्रीय होती. त्यामुळे तो बॅकलॉगही भरून काढावा लागणार आहे. तशी आव्हाने तर बरीच आहेत. पण मला तक्रारींचा पाढा वाचत बसणे, रडगाणी गाणे यात बिल्कुल रस नाही. कितीही अडचणी असल्या तरी माझी बांधिलकी कामाशी आहे. आऊटपुट म्हणजेच रिजल्टशी आहे. सगळ्या सोयीसुविधांमध्ये तर कुणीही काम करील. जिथे कमी तिथे आम्ही. प्रतिकूलतेवर मात करून काम करण्यात तर खरी मजा आहे.

१. फुले-शाहू-आंबेडकर अशा शासनाच्या तीन स्वतंत्र ग्रंथ समित्या असून अद्याप उरलेल्या दोन समितीच्या नियुक्त्या व्हायच्या आहेत. या तिन्ही समित्यांचे कार्यालय एकत्र असते. फोर्टमधील एका जुन्या इमारतीत सुमारे तीनेकशे चौ. फूट जागेत तिन्ही सचिव व समितीचे कर्मचारी आणि सगळे मौलिक दस्तऎवज यांची व्यवस्था असते. कार्यालयीन जागा तर अपुरी आहेच पण कर्मचार्‍यांच्या बहुतेक जागाही रिक्तच आहेत. मंजूर पदांमधील फक्त एक लिपिक व एक शिपाई एव्हढेच मनुष्यबळ तिन्ही समित्यांकडे उपलब्ध आहे. 

२. गेले अनेक महिने कार्यालयाचा इंटरनेट आणि फोन बंद आहे. 

३. लॉकडाऊनच्या काळात कार्यालय बंद होते तेव्हा वाळवीने अनेक नवीकोरी पुस्तके खाऊन टाकलीत.

४. लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा असतात. मुबलक गैरसमजही असतात. त्यामुळे तक्रार म्हणून मी हे लिहित नाहीये तर कोणत्या अडचणीत काम करावे लागते ह्याची कल्पना तुम्हाला असावी म्हणूनच केवळ हे नमूद केलेले आहे. त्याच्याकडे अन्यथाबुद्धीने बघू नये.

५. काहीकाही मंडळींचा तर असा गैरसमज असतो की सचिवपदाला, लाल दिव्याची गाडी, बख्खळ मानधन, मुंबईत राहायला बंगला असे कायकाय असते. 

६. तर असले काहीही नसते. 

७. या पदाचे मानधन किती प्रचंड असते याची तुम्हाला साधारण कल्पना यावी म्हणून सांगतो. तिन्ही सचिवांना मिळून दरमहा नेमके किती मानधन मिळते? सध्या सरकारी चतुर्थश्रेणीतील एका कर्मचार्‍याला (एका शिपायाला) जेव्हढा दरमहा पगार मिळतो त्यात या तिघां सचिवांचे महिन्याचे सगळे मानधन निघते. 

८. प्रवास आणि निवासाची व्यवस्था तुमची तुम्हीच करायची असते. शासन ती जबाबदारी घेत नाही.

९. समिती पुस्तके प्रकाशित करते.पण समितीकडे एकही संशोधन सहाय्यक, संपादन सहाय्यक, मुद्रीत शोधक नसल्याने सचिवालाच पुस्तकाचे सगळे काम करावे लागते.

१०. ह्या समित्या उच्च व तंत्र शिक्षण खात्याकडे असल्या तरी पुस्तकांची छपाई व विक्री उद्योग विभागाकडे असते. त्यामुळे त्यावर सचिवाचे कोणतेही नियंत्रण नसते.

अर्थात हे सगळे असे असले तरी हे प्रश्न सुटोत वा ना सुटोत, तुम्हाला पुस्तकं लवकरात देण्याची हमी मात्र मी देतो.

आपल्या शुभेच्छा/ सदिच्छा मात्र सोबत असू द्याव्यात.

प्रा. हरी नरके, 

२८/१/२०२१


Friday, January 15, 2021

भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके





भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके

संजय सोनवणी हे चतुरस्त्र लेखक आहेत. ज्या ताकदीने ते वैचारिक ग्रंथ लिहितात त्याच ताकदीने ते कादंबर्‍याही लिहितात. काही लेखक ललित लेखन उत्तम करतात पण ते वैचारिक साहित्यापासून दूर असतात. तर काही याच्या उलटही असतात. या दोन्हींवर मांड असणं म्हणजे एकाच वेळी दोन्ही हातात तलवारी घेऊन दोन्ही हातांनी लढण्याएव्हढे अवघड काम आहे. त्यांची नवी ऎतिहासिक कादंबरी वाचली. 


ही कादंबरी पानिपताच्या लढाईत गायब झालेल्या भाऊसाहेब पेशव्यांवर आहे. ती एकदा हातात घेतली की पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. गतिमान कथानक, अनेक पातळ्यांवरची गुंफन, कलात्मकता आणि इतिहासावरची पकड यांच्यामुळे ही कादंबरी गारूड करते. यातला काळ १७६१ चा आहे. लेखकाचा इतिहासाचा अभ्यास इतका मजबूत आहे की तो काळ, त्यावेळचे समाजजीवन, पेशवाईतली सत्तेची साठमारी, अनागोंदी, नाना फडणवीसची कुटील राजनिती, निष्ठुरता याचे लेखकाने घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.  


सोनवणी हे चित्रशैलीचे लेखक आहेत. जणू त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे  प्रत्ययकारी, कलात्मक आणि पकड घेणारे रहस्य  ते आपल्याला उलगडवून दाखवतात. पानिपतच्या लढाईत भाऊ मारले गेले असेच मानले जाते. तरिही भाऊसाहेबांचे अनेक तोतये नंतर उपटले होते, त्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्यात आली, हे आपल्याला माहित असते. इथे मात्र वेगळेच घडते. ते विस्मयकारी असूनही विश्वासार्ह आहे. रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकांना गुंतवून ठेवते. वाचनियता, कलात्मकता आणि ऎतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर ही कादंबरी फार उंचीवर जाते. 

कादंबरीत घडोघडी वाटा, वळणे आणि उड्या यांची मजा आहे. तरिही विेषयांतर नाही. अपघात आणि धक्के असले तरी त्यामुळे रसभंग न होता वाचक अधिकच गुंतत जातो.

एक अफलातून कादंबरी असेच " भाऊ परतौनी आला" चे वर्णन करावे लागेल. अवघ्या १२४ पृष्ठांमध्ये जी जादूभरली सफर सोनवणी वाचकांना घडवतात ती बहारदार आहे.

काही जात्यंधांनी कादंबरी न वाचताच सोनवणींना ट्रोलिंग केले होते. सोनवणींची दृष्टी नितळ, निरामय आणि निर्वैर आहे. त्यांच्यावर जातीयतेचा आरोप करणारे विकृतच असले पाहिजेत. सोनवणी माझे इयत्ता आठवीपासूनचे वर्गमित्र आहेत.  गेल्या वीसेक वर्षात मी त्यांची शंभरेक पुस्तकं वाचली. त्यांचे संशोधन, निर्भिडपणा, लढाऊबाणा, शोधाच्या स्वतंत्र वाटा आणि विषयांची विविधता केवळ स्तिमित करणारी आहे. त्यांचा अवाका आणि झपाटा बहुपेडी आहे. त्यांच्या "असूरवेद"  व  "आणि पानिपत" यासारख्या कादंबर्‍या तर मराठीच्या लेण्या आहेत. 

कादंबरीची गुणवत्ता, वाचकावर गारूड करण्याची ताकद, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदरभाऊ चांदगुडे यांची देखणी निर्मितीमुल्ये, संतोश धोंगडे यांचे कमाल मुखपृष्ठ आणि अवघी रुपये १६० इतकी रास्त किंमत यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकांनी अवश्य संग्रही ठेवायला हवे. अवघ्या महिन्यापुर्वी ती प्रकाशित झालीय. सर्व पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

पुस्तकासाठी संपर्क- ९८९०९५६६९५, प्राजक्त प्रकाशन, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे, ४११ ००२,

-प्रा. हरी नरके,

१५/०१/२०२१

Tuesday, January 12, 2021

शहाजी राजे, राजवाडे, अभेद आणि अभ्यंकर- प्रा. हरी नरके

 




शहाजीराजे भोसले हे स्वराज्य संकल्पक होते अशी मांडणी इतिहासाचार्य राजवाड्यांनी १०० वर्षांपुर्वी केली. जयराम पिंडे या समकालीन कवीने शहाजीमहाराजांचे चरित्र लिहिलेले होते. त्याला राजवाड्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहिली. राजवाड्यांशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्या अभ्यासापुढे नतमस्तक व्हावे लागते. सारे आयुष्य त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात घालवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील किती लोक इतिहास संशोधनाला वाहून घेणार आहेत? जयरामच्या पुस्तकाचे नाव आहे, "राधामाधवविलासचंपू" पुस्तक अवघे ७६ पृष्ठांचे आहे. राजवाड्यांची मौलिक प्रस्तावना मात्र त्याच्या तिप्पट म्हणजे २०१ पृष्ठांची आहे. अफाट आणि दणकट काम. शहाजीराजांच्या पदरी असलेल्या ७० गुणी व प्रतिभावंत सल्लागारांची माहिती राजवाड्यांनी या प्रस्तावनेत दिलेली आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे राजांना ही स्वराज्यसंकल्पना सुचली असावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. 


यातील २७ क्रमांकावर गंगाधर अभेद यांची माहिती देताना राजवाड्यांनी कमाल केलेली आहे. राजवाडे भाषाशास्त्रज्ञ होते तरीही त्यांनी दिलेली ही व्युत्पत्ती विनोदीच म्हटली पाहिजे.

राजवाडे लिहितात, "अभेद गंगाधर- एकोजीरजा संभाजी राजाच्या मरणोत्तर युवराज झाला, त्याचा अमात्य. ह्याचे आडनाव अभेद. अभेद म्हणजे अभयद. अभयद म्हणजे अभयंकर. अभ्यंकर हे आडनाव चित्पावन दिसते." (पृ.२२) अभेद आणि अभ्यंकर यांचा संबंध नाही हे राजवाड्यांना नक्कीच माहित होते. तरिही शहाजींच्या दरबारात चित्पावन सल्लागार होते हे दाखवण्यासाठीचा हा अट्टाहास होता का? स्वराज्यसंकल्पनेच्या श्रेयात वाटेकरी कोणकोण होते हे दाखवण्यासाठी ही मोडतोड होती का? असा बादरायणी अभिनिवेश इतिहासलेखनात असावा काय?

राजवाड्यांची ही प्रस्तावना प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवी.

- प्रा. हरी नरके, १२/०१/२०२१

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा

 












‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील हेमा (प्रमिती नरके) खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; वाचा तिची जीवनकहाणी

मराठी टेलिव्हिजनवर अनेक गुणी कलाकार आहेत. त्यांच्या उत्तम अभिनय कौशल्याने त्यांना मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले आहे. कमी वेळात त्यांनी प्रसिद्धी मिळवली आहे. अशाच एका अभिनेत्रीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

ही मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे नाव प्रमिती नरके आहे. ही सध्या कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत काम करत आहे. मालिकेत ती हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी खुप पसंत केले आहे.

ही प्रमितीची पहीली मालिका नाही. या अगोदरही तिने मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे. ती टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध नाव आहे. प्रमितीने या अगोदर कलर्स मराठीवरील ‘तु माझा सांगाती’ मालिकेत अवलीची भुमिका साकारली होती. तिच्या या भुमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.

प्रमितीचा जन्म पुण्यात झाला होता. तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण पुण्यातच झाले. तिला नेहमीपासूनच अभिनयात रुची होती. त्यामूळे तिने शाळेत आणि कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. तिला या गोष्टीचा तिच्या करिअरमध्ये चांगलाच फायदा झाला.

तिने पुण्यातील ललित कला केंद्रातून अभिनयाचे शिक्षण घेतले. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तिने पुढील करिअरसाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे तिने मालिका आणि चित्रपटांसाठी ऑडीशन द्यायला सुरुवात केली. तिने अनेक दिवस मेहनत केली. या कालावधीमध्ये तिने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली.

तिला कलर्स मराठीच्या तु माझा सांगाती मालिकेत अवलीची भुमिका मिळाली. तिने अतिशय उत्तम पद्धतीने अवलीची भुमिका छोट्या पडद्यावर साकारली. तिच्या या भुमिकेचं आणि अभिनयाचे खुप जास्त कौतूक करण्यात आले. आजही या मालिकेतील तिच्या कामाचे कौतूक केले जाते.

या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती. ती प्रसिद्ध अभिनेत्री झाली होती. आजही लोकं या मालिकेची आठवण काढतात. त्यावेळी अवलीच्या भुमिकेची आठवण काढतात. मालिकेनंतर तिने अनेक नाटकं आणि चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

प्रमितीची अनेक नाटकं हिट झाली आहेत. त्यासोबतच तिने अनेक शॉर्ट फिल्म्स देखील काम केले आहे. ‘डोह ’ या शॉर्टफिल्मसाठी तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तिचं ‘रीड मी इन 5D झोनं’ हे नाटकं विशेष गाजलं.

आज प्रमिती कलर्स मराठीच्या सुंदरा मनामध्ये भरली मालिकेत हेमाची भुमिका साकारत आहे. तिच्या या भुमिकेला देखील लोकांनी खुप पसंत केले आहे. या मालिकेत तिची थोडी नकारात्मक भुमिका आहे. वेगवेगळ्या भुमिका करुन ती तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा प्रेक्षकांना दाखवत आहे.

BY PRAJAKTA PANDILWAD JANUARY 9, 2021 0 https://mulukhmaidan.com/pramiti-narke-marathi-actress-real-life-story/

https://mulukhmaidan.com/?s=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%87


डिजिटल मराठी वाचकांचे दैनंदिन वाचन- किरण लिमये

‘सजग चॅरिटेबल ट्रस्ट’ ह्या संस्थेच्या वतीने मराठीतील वाचनव्यवहाराच्या संशोधक मेघना भुस्कुटे ह्यांच्या मदतीने वाचनसवयींचे एक सर्वेक्षण ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२० मध्ये केले गेले. हे सर्वेक्षण गुगल फॉर्म्सद्वारे केले गेले आणि समाजमाध्यमांतून ते लोकांपर्यंत पोचले. सुमारे ८५०० प्रतिसाद ह्या सर्व्हेला मिळाले. मराठी वाचकांच्या वाचनसवयी – किती वाचतात आणि काय वाचतात – ह्याचा प्राथमिक अभ्यास करणे हा या सर्व्हेचा उद्देश होता.

1.     स्त्री किंवा पुरुष असण्याचा वाचनासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेच्या शक्यतेवर काही प्रभाव नाही. म्हणजे ह्या सर्वेक्षणात सहभागी लोक, ज्यांना आपण थोडक्यात स्मार्टफोन वापरू शकणारे मराठी वाचक म्हणू, ह्यांच्यात ते स्त्री आहेत का पुरुष ह्याचा वाचनाला किती वेळ द्यायचा ह्यावर काही प्रभाव नाही असं दिसतंय. हा एक सकारात्मक निष्कर्ष आहे, पण त्याचवेळी तो न-डिजिटल वाचकांना लागू पडेल का हा कुतूहलाचा विषय आहे. घरकाम, स्वतःच्या वाचनावर पैसा आणि वेळ खर्च करण्याची मुभा ह्याबाबतीत स्त्री-पुरुष ह्यांच्यातील भेद मिटत आले आहेत असा एक गट आहे आणि हे भेद अजून आहेत असा एक गट आहे असं मला वाटतं. ह्यातल्या दुसऱ्या गटाबाबत कदाचित ह्या सर्वेक्षणात फारशी माहिती नसावी. त्यामुळे हा सकारात्मक निष्कर्ष आपण थोड्या साशंकतेने साजरा केला पाहिजे.


2.     वैवाहिक स्थितीचा दैनंदिन वाचनाच्या वेळेच्या संभाव्यतेवर वेगळा परिणाम दिसत नाही. व्यक्तीचे प्राधान्यक्रम हे वैवाहिक स्थितीने बदलतात आणि त्यात वाचनासाठी काढलेला वेळ असू शकतो असं मानलं तर वैवाहिक स्थितीचा परिणाम नसणं ह्याचा अर्थ असा असू शकतो कि मुळात अविवाहित व्यक्तीत वाचनाचे प्रणाम जास्त नसावे. शिक्षण, उपजीविकेवर जाणारा वेळ, अन्य मनोरंजन माध्यमे ह्या सगळ्यांचा हा परिणाम असू शकतो. निष्कर्षांतील ही पहिली धोक्याची घंटा.  


3.     ५१-७५ आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्ती ह्या वाचनासाठी जास्त वेळ देतात. डिजिटल माध्यमे वापरू शकणाऱ्या निवृत्त व्यक्ती वाचनासाठी जास्त वेळ देऊ शकतात ह्यात फारसे नवल नाही. ह्या वयोगटात डिजिटल माध्यमे वापरता येणं हाच मुळात एक सकारात्मक भाग मानला पाहिजे. पण ११-१८, १९-३० ह्या वयोगटातील दैनंदिन वाचनकालावधी  हा ३१-५० वयोगटासारखा असणं हे थोडं विचारात पाडणारं आहे. वर विवाहाच्या मुद्द्यात जी चर्चा झाली, शिक्षण, उपजीविका आणि अन्य मनोरंजन माध्यमे, ती इथेही लागू पडते.


4.     शिक्षणाचा दिसणारा संबंध अपेक्षित असा आहे. जास्त दैनंदिन वाचनवेळ असणाऱ्या गटात (चौथा स्तंभ) पदव्युत्तर किंवा अधिक शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता वाढते आहे आणि केवळ शालेय शिक्षण असेल तर जास्त दैनंदिन वाचनकालावधी असण्याची शक्यता कमी होते. हा निष्कर्ष शिक्षण आणि वाचन ह्यांच्याबद्दल आपल्या मनात जो पूर्वग्रह असतो त्याच्याशी जुळणारी आहे. इथे हे लक्षात घ्यायला हवं कि आपल्याला परस्परसंबंध (correlation) दिसत आहे, कार्यकारणभाव (causation) नव्हे. अधिक वाचनाची आवड हा अधिक शिक्षण असण्यासाठी कारणीभूत घटकांपैकी एक असू शकतो. [i]      


5.     वस्तीस्थानाचा दैनंदिन वाचनकालावधीशी असलेला संबंध हाही अपेक्षित असाच आहे. अधिक धकाधकी असलेल्या शहरांतील वाचकांत फरक नाही असे चित्र आहे. जिथे ही धकाधकी कमी आहे अशा शहरी भागांत आणि ग्रामीण भागात दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त आहे. ग्रामीण भागाच्या संबंधाबाबत असं म्हणता येईल कि जर पुस्तकांची उपलब्धता आणि क्रयशक्ती हे घटक अनुकूल असतील (जे सर्वेक्षणात विचारात घेतलेले नाहीत[ii]) तर वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता जास्त होते असे असू शकेल.


6.     उपजीविकांच्या बाबतीतही नोकरी करणारी व्यक्ती ही अधिक व्यस्त असते ह्या पूर्वग्रहाशी जुळणारे निकाल आहेत. निवृत्त व्यक्ती, विद्यार्थी, अध्यापन-संशोधन-लिखाण करणाऱ्या व्यक्ती ह्यांचा दैनंदिन वाचनकालावधी जास्त असण्याची शक्यता नोकरदार व्यक्तीहून (जी अध्यापन-संशोधन-शिक्षण ह्यातील नोकरी करत नाही)  जास्त आहे. इथे विद्यार्थी ह्या गटाच्या संबंधाचा विचार ‘वय’ ह्या घटकासोबत केला तर असं दिसतं कि १९-३० वयोगटातील व्यक्ती विद्यार्थी अवस्थेतून अध्यापन-संशोधन-लिखाण ह्यांच्याशी संबंध नसलेल्या नोकरीत जाते तसा तिचा दैनंदिन वाचनकालावधी घटण्याची शक्यता वाढते.


7.     सांख्यिकीय मॉडेलची स्पष्टीकरण क्षमता मर्यादित आहे. क्रयशक्ती, दैनंदिन जीवनातील वेळेचा वापर, वाचनवारसा अशा अनेक महत्वाच्या  घटकांवर सर्वेक्षणात माहिती विचारली गेली नाही. [iii]


ह्या सगळ्या निष्कर्षांचा एकत्र विचार आणि सर्वेक्षणाच्या मर्यादा (एका ठराविक प्रकारचे वाचक आणि वरील मुद्दा 7) लक्षात घेता असं दिसतं कि डिजिटल समाजमाध्यमांवर असणाऱ्या मराठी वाचकांच्या वाचनकालावधीत स्त्री-पुरुष असा भेद दिसत नाही, विद्यार्थी अधिक वाचणारे आहेत ह्या आश्वस्त करणाऱ्या बाबी आहेत, पण महानगरांची आणि अध्यापन-संशोधन-लिखाण ह्या व्यतिरिक्त नोकऱ्यांची वाढलेली धकाधकी वाचनकालावधी कमी करते ही चिंतेत टाकणारी बाब आहे. ह्या दोन घटकांचा संबंध भौतिक समृद्धीशी आहे. येत्या काही वर्षांत अधिकाधिक तरुण व्यक्ती ह्या अशाच धकाधकीचा भाग होणार आहेत आणि ह्या अभ्यासात दिसणारे निष्कर्ष बरोबर असतील तर अशा व्यक्तींचा दैनदिन वाचनकालावधी घटेल अशी शक्यता आहे. साहजिक साहित्याच्या डिमांडवर ह्याचा परिणाम होणार आहे. अर्थात हा नक्त परिणाम दोन घटक परिणामांचा असणार आहे: विद्यार्थी गटाचे वाचन (जास्त) आणि नोकरदार (कमी). जर विद्यार्थी गटाचे परिणाम हा अधिक प्रभावी असेल तर नक्त परिणाम वाढता असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनसवयी हा महत्वाचा घटक ठरतो. वाचनव्यवहार वाढता राहणे ज्यांना हवे आहे त्यांनी catch them young कडे लक्ष द्यायला हवे. लोकांचा  वाचनकालावधी हा विद्यार्थीदशेतून नोकरी-व्यवसायात जाताना घटतो आणि जसे ते निवृत्तीकडे येतात तसा वाढतो, शेवटी त्यांना मिळू शकणाऱ्या निवांत बौद्धिक स्पेसचा हा मामला असावा. पण शहरांची धकाधकी ही मधल्या टप्प्यातील वाचन फारच घटवू शकते आणि निवृत्त/निवांत जगण्याचे वयही लांबवते. येत्या काळांत, ज्यांत समाजात ३१-५० वयोगटाचे प्रमाण वाढणार आहे आणि शहरीकरणही, त्यांत सुरुवातीला मराठी वाचनाची मागणी घटण्याचा कल दिसू शकतो, जो पुढे जाऊन बदलून वाढीकडे येऊ शकतो, जसे समाजातील ५० च्या पुढच्या वयांचे प्रमाण वाढेल. नवे वाचक बनणं आणि वाचणाऱ्या माणसाची वाचनाची खुमखुमी आयुष्याच्या मधल्या टप्प्यात टिकून राहणं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या ठरतील.   


समारोप


हा सर्वेक्षण मराठी वाचकांतील एका मर्यादित आणि कदाचित भौतिकदृष्ट्या संपन्न किंवा अधिक जागरूक  गटाचा सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणाची डेटा मिळवायची पद्धत ही सर्वोत्तम नाही. ह्या मर्यादा लक्षात घेता सर्व्हेतील निष्कर्ष हे अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित करण्यासाठी आहेत आणि कोणताही अंतिम धोरणात्मक निष्कर्ष ठरवायला नाही. मराठी भाषेबद्दलच्या समाजशास्त्रीय संशोधनात अधिक संख्यात्मक (quantitative) तंत्रांचा वापर करू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी हा सर्वेक्षण डेटा उपलब्ध आहे. मराठीतील लेखन-वाचन व्यवहार समृद्ध होण्याच्या प्रक्रियेत हा अभ्यास कारणी लागावा हीच आमची अपेक्षा आहे.   


अधिक अभ्यासाच्या काही स्वाभाविक दिशा असू शकतात. एखाद्या शहरातील व्यक्तींचा अधिक शास्त्रीय sampling द्वारे त्यांच्या वाचनसवयींबाबत सर्व्हे करणं, अधिक वाचणाऱ्या लोकांच्या वाचनसवयी कशा प्रत्यक्षात आल्या ह्यासाठी काही मुलाखती घेणं, विद्यार्थ्यांच्या वाचनसवयींबाबत होणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेणं अशी काही उदाहरणे देता येतील. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील भाषाविषयक प्रश्नांत रुची असलेल्या संशोधकांनी, त्यांना उपलब्ध संशोधन रिसोर्सेस ह्या प्रश्नाकडे वळवले तर असे अनेक अभ्यास प्रत्यक्षात येऊ शकतात. ह्या संशोधनाला मराठीच्या संदर्भातच मूल्य आहे असे नाही. विश्वरूपाकार इंग्रजीसमोर राजकीय आणि आर्थिक सामर्थ्यात तोकड्या साऱ्याच भाषांसाठी असे प्रश्न महत्वाचे राहणार आहेत.  


https://kiranlimayeecoblog.blogspot.com/2021/01/blog-post_10.html?spref=fb&fbclid=IwAR0IDs1F8BpWACaj7gIDTLqUab1XgxDf2OPbSCJe1v_egP-nPXj6WpU_mGo

Sunday, January 10, 2021

भिडेवाडा- उंटावरून शेळ्या हाकणारे सरकारी अधिकारी - प्रा. हरी नरके

 




अधिकारी- "हॅलो, मी मंत्रालयातून अमूकतमूक अधिकारी बोलतोय. मी काल तुम्हाला फोन केला होता, तुम्ही का उचलला नाही? मला भिडेवाड्यासंबंधात माहिती हवीय. अमूक ढमूक मंत्र्यांना मला त्याबाबतचा रिपोर्ट सादर करायचा आहे. कुठे आहे हा भिडेवाडा?"

मी- "पुण्यात, बुधवार पेठेत."

अधिकारी- "कोणी बांधलाय तो?"

मी- " तात्यासाहेब भिड्यांनी."

अधिकारी- "त्यांना सगळी कागदपत्रे घेऊन मला भेटायला सांगा."

मी- "ते वारले त्याला आता १७० वर्षे झाली."

अधिकारी- "मग आता कोण मालक आहेत?"

मी- "खाजगी मालकी आहे."

अधिकारी- "वाड्याची अवस्था कशीय?"

मी- " अतिशय वाईट. कुठल्याही क्षणी तो पडेल. तिथले मालक, भाडेकरू दुकानदार, निवासी भाडेकरू कोर्टात गेलेत. मुंबई हायकोर्टात ती केस गेली २० वर्षे पेंडींग आहे."

अधिकारी- "तुम्ही पार्टी आहात का?"

मी- "नाही."

अधिकारी- "मला केस नंबर व कोर्टाची सगळी कागदपत्रे पाठवा. तिथे शाळा कशावरून होती? कोणकोण वादी-प्रतिवादी आहेत त्यांचे मला फोन नंबर द्या. त्यांना मला मंत्रालयात येऊन भेटायला सांगा."

मी- " जोतीराव-सावित्रीबाईंच्या तिथल्या शाळेचे सगळे पुरावे मी कोर्टाला सादर केलेले आहेत. तुम्हाला फक्त निकाल लवकर यावा यासाठी उच्च न्यायालयाकडे शासनामार्फत पाठपुरावा करायला हवा."

अधिकारी- " तुम्ही, मला सगळे पेपर्स आणून द्या आणि वाड्याबद्दलचा रिपोर्ट तयार करून मला मंत्रालयात आणून द्या, मी तो मंत्र्यांना सादर करतो. वाड्याची एकुण जागा किती आहे? सर्व्हे नंबर किती आहे? वाड्याचे जुने व ताजे फोटो काढून मला कागदपत्रांसह २ दिवसात आणून द्या."

मी- " तुम्ही उंटावरून शेळ्या हाकण्याऎवजी जरा बूड हलवा आणि रिपोर्ट बनवा. मी तुमचा नोकर नाही. आणि मला कसले आदेश देताय? तुमच्या कर्मचार्‍यांना जरा कामाला लावा. नाहीतरी फुकटचाच पगार खातात ना ते आणि तुम्हीही?"

- प्रा. हरी नरके,

१०/०१/२०२१