Thursday, February 16, 2017

वाचक, लेखक, गुणवत्ता आणि लोकप्रियता

जे केवळ रंजक, लोकप्रिय, वाचनीय, सोपे ते सगळे टाकाऊ असते किंवा उलटे तेच थोर असते असे नव्हे
तसेच जे केवळ दुर्बोध असते जड असते म्हणूनच ते श्रेष्ठ वगैरे असते हेही खरे नव्हे. मात्र साहित्य अगर समीक्षा उत्तम किंवा श्रेष्ठ तीच असू शकेल जी निदान वाचनीय, प्रवाही, नेमकी आणि वाचकांना समजेल अशी असेल. ह्या किमान अपेक्शाही जे लेखन पुर्ण करीत नाही ते लेखन थोर वगैरे असेल असे मला वाटत नाही. गुंतागुंतीचा जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी क्लिष्टच लिहावे लागते हे खरे नाही. उलट सोपे लिहिणेच अधिक अवघड असते. तुकाराम हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण होय. ..................... प्रवेश पहिला:- पुण्यात पुर्वी मॅजेस्टीक गप्पा होत असत. कोठावळे मोठमोठ्या साहित्यिक,विचारवंत, संपादकांना बोलवित. पंधरा दिवस धमाल असे. एकदा म.टा.चे संपादक गोविंदराव तळवळकर यांची मुलाखत झाली. गोविंदरावांचा व्यासंग दांडगा होता. त्यांचा चक्क दरारा किंवा वचक असे. त्यांना मुलाखतकार प्रा. ग.प्र.प्रधान सरांनी नवाकाळचे संपादक निळकंठ खाडीलकर यांच्या प्रॅक्टिकल समाजवाद या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया विचारली. गोविंदरावांनी मोठा विराम घेतला आणि मग म्हणाले, "माफ करा, मी बालवाड्मय वाचत नाही." प्रवेश दुसरा:- आपले माजी राष्ट्रपती डा. के.आर.नारायणन हे 1950 च्या दशकातले इंग्रजी साहित्याचे केरळ विद्यापिठाचे सुवर्णपदक विजेते.त्यांचे पुढील शिक्षण लंडन स्कूल of Economics या जगप्रसिद्ध विद्यापिठात झालेले होते आणि ते तिथले गुणवत्ताधारक होते. एकदा आम्ही काही मित्र, अरूण खोरे, रामनाथ चव्हाण आदी त्यांना दिल्लीला भेटायला गेलो होतो. तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते. त्यांनी आम्हाला मराठीतील बेस्टसेलर असलेल्या मृत्यूंजयवर 45 मिनिटे व्याख्यान दिले. शिवाजी सावंत यांचे हे पुस्तक माझेही बालपणातले आवडते पुस्तक असल्याने आम्ही सारे ऎकताना अतिशय आनंदात होतो. त्यांनी बाबूराव बागूल यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. मी जेव्हापण मराठीतील नामवंत समिक्षकांना हे सांगतो, तेव्हा ते नाकं मुरडतात. मुदलात ते शिवाजी सावंतांना चांगला लेखकच मानायला तयार नसतात. प्रवेश तिसरा:- समजा अमूकतमूकराव हे मराठीतील अव्वल दर्जाचे लेखक/समीक्षक आहेत. मी त्यांना म्हणालो की, सर, तुमचे अमूकतमूक पुस्तक वाचले. फारच आवडले. तर ते हसतात, माझ्याकडे आस्थेवाईकपणे बघतात. बरं वाटलं तुमचं मत ऎकून असं म्हणतात किंवा निदान सुचवतात.[ अर्थात हे माधुरी पुरंदरे यांना लागू नाही. आपण त्यांना तुमचं पुस्तक आवडलं अस म्हटलं, की त्या आंत्यतिक तुच्छतेने आपल्याकडे बघतात आणि मग कटा आता असं डायरेक्ट सांगतात किमान सुचवतात. तर त्यांचा अपवाद वगळून] प्रवेश चौथा :- समजा अमूकतमूकराव हे मराठीतील अव्वल दर्जाचे लेखक/समीक्षक आहेत. मी त्यांना म्हणालो की, सर, तुमचे अमूकतमूक पुस्तक वाचले. फारसे नाही आवडले. तर ते माझ्याकडे संतप्त होऊन बघतात. 1. तुमचा वकुब काय? 2. तुम्ही माझं सगळं वाचलय का? 3. तुमचं शिक्षण काय? 4. तुमची यत्ता काय?तुमची अभिरूची मुळात थर्डरेट कशावरून नाही? 5. तुम्हाला साहित्यातला काही कळतं का अशी माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात. मानवी मन मोठं गमतीदार आहे. तुमचं पुस्तक आवडलं म्हटलं की मग कुणालाही हे सांगणाराची पात्रता काय असा प्रश्न पडतच नाही. यांचं शिक्षण काय? अभिरूचीचा दर्जा काय ? हे विचारलं जात नाही पण पुस्तक आवडलं नाही म्हटलं की माणसं एव्हढं का चिडतात? थेट अंगावरच येतात. याला भल्याभल्यांचाही अपवाद का असू नये? प्रवेश पाचवा:- डा.य.दि.फडके भारतीय ज्ञानपिठावर मराठीचे निमंत्रक असतानाची गोष्ट. प्रत्येक भाषेचा प्रतिनिधी आपल्याच भाषेतील साहित्यिकाची सोदाहरण शिफारस करीत असतो. आधीच्या नऊ भाषांच्या निमंत्रकांनी आपापल्या जोरदार शिफारशी केल्यानंतर दहाव्या क्रमांकावर फडके सर उभे राहिले. ते म्हणाले, मी मराठीतील लेखक वि.स. खांडेकर यांचे नाव या पुरस्कारासाठी सुचवतो. अचानक आधीचे नऊजण उभे राहिले आणि म्हणाले, आमची नावे आम्ही मागे घेतो आणि वि.स.खांडेकर यांच्या नावाला पाठींबा देतो. सर पुढे बोलणार तोच उरलेले लोक उभे राहिले आणि म्हणाले आम्हीही याच नावाला पाठींबा देतो. असेच काहीसे डा.भालचंद्र नेमाडे यांच्या बाबतीतही झाले. लेखकांचे नाना प्रकार तसे वाचकांचेही नाना प्रकार. 1. साधारणपणे बाबूराव अर्नाळकर, बाबा कदम, सुहास शिरवळकर, व.पु.काळे, वसंत कानेटकर, आदी असे आवडते लेखक असलेला एक मोठा वर्ग असतो. 2. वि.द.घाटे, विनोबा, र.वा.दिघे, पु.शि.रेगे, दि.बा.मोकाशी, अरविंद गोखले, अत्रे, खांडेकर, गंगाधर गाडगीळ, गो.पु. देशपांडे, शिवाजी सावंत, पु.ल., अण्णाभाऊ साठे, रणजित देसाई, जयवंत दळवी, श्रीं. ना. पेंडसे, बाबासाहेब पुरंदरे, गौरी देशपांडे, पंकज कुरूलकर, कविता महाजन, सानिया, मेघना पेठे, विश्वास पाटील, सुरेश भट, वीणा गवाणकर, आशा बगे, राजन गवस, आनंद यादव, अनिल अवचट, रत्नाकर मतकरी, गो.नि.दांडेकर, ह.मो.मराठे, राजन खान, संजय सोनवणी, सतिष तांबे आदींचा चाहता असलेला एक वर्ग असतो. 3. जयंत पवार, आसाराम लोमटे, मिलिंद बोकील, भारत सासणे, अरूण साधू, संजय भास्कर जोशी, रंगनाथ पठारे, भालचंद्र नेमाडे, विजय तेंडूलकर, महेश एलकुंचवार, केशवसुत, ग्रेस, चित्रे, कोलटकर, भाऊ पाध्ये, सुर्वे, मर्ढेकर, साने गुरूजी, नरहर कुरूंदकर, दुर्गाबाई, कसबे, ढसाळ, कोलटकर, शहाणे, बागूल, दया पवार, उद्धव शेळके, मालतीबाई व विश्राम बेडेकर, त्रिं.ना.अत्रे, वरसईकर गोडसे भटजी, य.दि.फडके, रेगे, तर्कतीर्थ, भा. ल. भोळे, व्यंकटेश माडगूळकर, विंदा, कुसुमाग्रज, इंदिरा संत, शाम मनोहर आदींना मानणारा एक वर्ग असतो. आता वाचकांचे असेच वर्ग असतात असे नाही. 1 ते 3 यातले काहीजण घेऊन केलेले वेगळे मिश्रण आवडणारेही असतातच. [वि.सु. ही यादी केवळ नमुन्यादाखल आहे. अशी किमान आणखी 500 नावे यात घ्यायला हवीत, याची नम्र जाणीव प्रस्तुत लेखकाला आहे.] तर मुद्दा असा की थेट हाल, हरीभद्र, प्रवरसेन, उद्योतन सुरी, चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, ते विंदा, नेमाडे, चित्रे, कोलटकर, लक्ष्मीबाई टिळक, भाऊ पाध्ये, जी.ए. यांचे साहित्य आपल्याला सहज समजते आणि आवडतेही असे म्हणणारे असंख्य असतात. अच्युत गोडबोले, नरहर कुरूंदकर, रावसाहेब कसबे, आ.ह.साळुंखे, वसंत पळशीकर, गो.पु. देशपांडे,म वा धोंड  आपल्याला समजतात पण हरिश्चंद्र थोरात, ग्रेस, चिं.त्र्यं. खानोलकर, शरद पाटील असे लोक फार जड वाटतात, दुर्बोध वाटतात असे म्हणणाराही वर्ग आहे.
याचा अर्थ जे केवळ रंजक, लोकप्रिय, वाचनीय, सोपे ते सारेच टाकाऊ असते किंवा उलटे तेच थोर असते असे नव्हे तसेच जे केवळ दुर्बोध असते जड असते म्हणूनच ते श्रेष्ठ वगैरे असते हेही खरे नाही. मात्र साहित्य अगर समीक्षा उत्तम किंवा श्रेष्ठ तीच असू शकेल जी निदान वाचनीय, प्रवाही, सोपी, नेमकी आणि वाचकांना समजेल अशी असेल. ह्या किमान अपेक्शाही जे लेखन पुर्ण करीत नाही ते लेखन थोर वगैरे असेल असे मला वाटत नाही. गुंतागुंतीचा जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी क्लिष्टच लिहावे लागते असे नाही. किंबहुना सोपे लिहिणेच अधिक अवघड असते. तुकाराम हे श्रेष्ठ तरिही सुबोध लेखनाचे सर्वोत्तम उदाहरण होय. आताशा एक नवीन वर्ग तयार होतोय. काहीसे भाषक दहशतवादी असे या विद्वानांचे वर्तन असते. चारदोन परदेशी विचारवंत तोंडी लावायला घ्यायचे, जाणीवपुर्वक दुर्बोध पारिभाषिक शब्द वापरायचे, व्यामिश्र अनुभव देण्याच्या नावाखाली कमालीचे रटाळ, पल्लेदार, निरर्थक आणि गुंतागुंतीचे असे अजब मिश्रण करून लिहायचे, ते ज्यांना समजते, आवडते तेव्हढाच श्रेष्ठ अभिरूचीचा वर्ग. बाकी सगळे अडाणी, गावठी, देशीवादी, तिसर्‍या दर्जाचे वगैरे, विशेष म्हणजे वकुब नसलेले! असे ते मानतात. बरे असे मानणारे हे भले लोक कंपूनिशी सगळी विद्यापीठीय अभ्यास मंडळे, पाठयपुस्तक निर्मिती मंडळं, सर्व पुरस्कार समित्या अशा पदांवर प्रमुख ठिकाणी असल्याने त्यांची टेरिफिक दहशत असते. त्यांच्याविरूद्ध "ब्र" उच्चाराल तर साहित्य विश्वातून बहिष्कृत केले जाल. त्यामुळे या दुर्बोध आणि पोझ घेऊन लिहिणारांना दुखवायला सहसा कोणीही तयार नसते. ती साहित्यिक आत्महत्त्याच व्हायची ना! प्रवेश शेवटचा :- मराठीला चार ज्ञानपिठ पुरस्कार आणि एक मुर्तीदेवी पुरस्कार मिळाला. दिवंगतांपैकी किमान जी.ए., दुर्गाबाई, तर्कतीर्थ, भाऊ पाध्ये, व्यंकटेश माडगूळकर, तेंडूलकर, चित्रे, ढसाळ, रा.चिं.ढेरे, इंदिराबाई, य.दि.फडके, गंगाधर गाडगीळ, गो.पु. देशपांडे यांना ज्ञानपिठ पुरस्कार मिळायला हवे होते. पण नाही मिळाले. का? तेंडूलकरांच्या नावाचा ज्ञानपिठ पुरस्कारासाठी विचार चालू असताना, त्यावेळचे मराठीचे जे निमंत्रक होते त्यांनीच या नावाला तीव्र विरोध केल्याचे समजते. त्या निमंत्रकांची एकदा भेट झाल्यावर मी त्यांना म्हटलं, काहो तुम्ही तेंडूलकरांच्या नावाला विरोध केला हे खरे आहे का? ते हसले. म्हटलं मग तुमचं स्वत:चं तरी नाव सुचवायचं होतं तुम्ही. ते म्हणाले, स्वत:चं नाव सुचवायची नियमात तरतूद नाही. मी म्हटलं, मग तुम्ही तुमचं नाव सुचविल अशा तुमच्या चेल्याला तिथे नेमायचं. परत ते हसले आणि म्हणाले, काय सांगावं, इथे हो म्हणाला बेटा आणि नाहीच सुचवलं माझं नाव तर काय घ्या? मी म्हटलं, म्हणजे जोवर तुम्ही तिथे आहात तोवर इतर मराठी माणसाला तो पुरस्कार तुम्ही मिळू देणार नाही आणि दुसरी व्यक्ती तिथे निमंत्रक झाल्याशिवाय मराठीला तो मिळणार नाही. सबब तुम्ही ** गेल्याशिवाय मराठीला हा पुरस्कार मिळणार नाही. ...........................

No comments:

Post a Comment