Friday, September 19, 2014

अवधूत डोंगरे ---बंदेमें दम है.



अवधूत डोंगरे या तरूण लेखकाची साहित्य अकादमी पुरस्कारामुळे सध्या चर्चेत असलेली कादंबरी " स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट " ही वाचली. "अक्षर मानव, पुणे " चे हे प्रकाशन आहे. पुस्तकाला संजय साठे यांचे कलात्मक मुखपृष्ठ असून क्राऊन आठ या आकारातील अवघी ९२ पृष्ठांची ही छोटीशी कादंबरी / कादंबरिका. ज्याक केरूअ‘कला ती अर्पण केलीय.

पुस्तकाची किंमत ८० रुपये असली तरी ती प्रकाशकांकडे अवघ्या ४०रुपयाला मिळते. त्वरा करा.

 "जगाच्या तुलनेत देश लहान. देशाच्या तुलनेत माणसांचा समूह लहान.समुहांच्या तुलनेत एकटा माणूस लहान. या लहान एकटेपणातून आलेल्या फालतूपणाचं काय करायचं?
मुंगी आकारानं छोटी असते पण ती तुमच्या ढुंगणाला चावू शकते. तुम्ही तिच्या ढुंगणाला चावू शकता का?
नाही ना?

म्हणून कोणालाही कमी लेखू नये." असं या पुस्तकाच्या मलपृष्ठावरील मजकूरात सांगितलेलं पुस्तकाच्याबद्दल बरंच काही सांगून जातं.

या विश्वाच्या अफाट पसार्‍याची आणि अनंत काळाची जाणीव झाली की माणुस त्यात किती छोटा आहे याचं भान येतं.

राज्य पातळीवरच्या मुळच्या मुंबईच्या असलेल्या पेपरच्या पुणे आवृत्तीत ट्रेनी रिपोर्टर म्हणुन काम करणारा नायक. त्याच्या भोवतीची समकालीन पत्रकारिता.

आजुबाजूला बरंच काही घडतय. सचिनच्या २०० धावा, ए.आर.रेहमानचं ओ‘स्कर. अभिनव बिंद्राचं ओ‘लिंपिकमधलं सुवर्णपदक, नक्षली नेता कनू संन्याल याची आत्महत्या. त्याच वेळेला बराक ओबामांचा शपथविधी, कोसोवोची निर्मीती, सुदानमध्ये घडलेलं दार्फर प्रकरण असं बरच काही.

याच काळात आपल्याकडं ’पेड न्यूज’ प्रकरण  उजेडात येतं. पी.साईनाथचा ’हिंदू’मध्ये लेख येतो. दोनेक महिने गाजतो. नको तेव्हढ्या चर्चा रंगतात. या चर्चाखोरपणाचं पुढे काय होतं? लेखक म्हणतो, "चर्चेत चर्चा, चर्चेवर चर्चा, चर्चेखाली चर्चा, चर्चाळ सगळं...निवडणुकीत  माध्यमांमध्ये उघडपणे पे‘केजेस चालतात. त्यामुळे जरा पत्रकारितेबद्दल सुद्धा चर्चा होते. पैशांच्या देण्याघेण्याचं जुनंच आहे. अगदीच ओ‘र्गनायझेनल लेव्हलला झालं हे जरा गंभीर..एव्हढंच. "
"चोवीस तास कलकलाट करणारे टिव्ही च्यानेल्स. चिफ रिपोर्टर, चिप रिपोर्टर... एक पुस्तिका वाचून शंभर मतं देणारे, एक पुस्तक वाचून सहा महिने मतं देणारे, काहीच न वाचता प्रामाणिक मतं देणारे, नि अप्रामाणिक मतं देणारे, बरंच वाचून अप्रामाणिक मत देणारे म्हातारे ह्यांच्या चर्चा. अडाणचोट चर्चांचा जुलाब....पोट भरलेल्या रिकाम्या चर्चा. कुजलेल्या वैचारिकपणाचा घाण घाण घाण वास."

फेसबुकवरची आणखी फेसबुक जनरेशनवरची लेखकाची बोचरी टिकाही विचार करायला लावणारीय. "सोशल नेटवर्कींग, त्यात खर्‍या माणसांचे खोटे प्रोफाईल..रोजरोजचा सोशल खोटेपणा. दुनिया एव्हढी चांगली चांगली, रोजचा समारंभ, बजाव ताली. जागा नविन गोष्टी जुन्याच. उद्या आणखी नवीन जागी, गोष्टी आणखी जुन्याच. त्यावर काय फार वेळ घालवण्यात पो‘ईंट नव्हता." माहितीच्या स्फोटात ज्ञान मेलं, तरी पुन्हा कुठं तरी इंटरनेटवर ज्ञानाची माहिती राहणार. ओव्हर सेंटीमेंटल, झिरो सेंटीमेंटल....

तुकड्या तुकड्यात समोर येणारं गरगरवून टाकणारं गुंतागुंतीचं वास्तव, सामान्य माणसाची हतबलता, अगतिकता, असहाय्यता, लेखकानं मजबुतीनं पकडलीय.

लेखकाची कथन शैली कवितेच्या अंगानं जाणारीय. "धूळ होती. मागं पिंपळाचं झाड होतं काळोखं.
तो तथदधनला.
दबला.
उठला.
पुन्हा डावीकडं वळला. पुलाखालून रस्ता गेलेला. काळी नदी केलेली. हिरव्या गवताचा पट्टा गेलेला. वारा आला मध्येच. वर काळं आकाश."
हे सारं मुळातूनच वाचायला हवं.

पत्रकारितेत कुत्रा माणसाला चावला ही बातमी नाही , तर माणूस कुत्र्याला चावला ही बातमी असं शिकवलं जातं. पण खरंतर कुत्रा माणसाला चावला , यालाच बातमी म्हणुन प्रसिद्धी मिळते.आणि अशाच पातळीवरच्या बहुतेक बातम्या होतात, वाचायला सोपी, पचायला सोपी, संडास साफ.

कादंबरी छोटीय पण ऎवज मजबूत आहे. अपेक्षा उंचावणारा हा लेखक आहे.

बंदेमें दम है.



......................................
..पुस्तकासाठी संपर्क: ०२०- ३०४२६६७९

No comments:

Post a Comment