Saturday, September 13, 2014

देशीवादावर बेफाम आरोप, शेरे आणि ताशेरे

.सतिश वाघमारे यांनी देशीवादाबद्दल काही प्रश्न उपस्थित करून चर्चा सुरू केलेली आहे. त्यांच्या भिंतीवर ही चर्चा जोरदार रंगलेली आहे.
हरी नरके: प्रा.सतिश वाघमारेजी : चर्चा वाचली. धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे प्रा. भालचंद्र नेमाडे आणि प्रा. राजन गवस फेसबुकवर नाहीत. त्यामुळे ते फरार झाले म्हणजे कुठून फरार झाले? पुस्तकांमधून ते गेले अनेक वर्षे मांडणी करीत आहेत. त्यांच्या भुमिकेची झाडाझडती जरूर घ्यावी, त्यातल्या विसंगती, उणीवा किंवा फोलपणा जरूर मांडावा. हेत्वारोप करू नयेत. नेमाडेंची कौटुंबिक पार्श्वभुमी शोधून चर्चा करायची असेल तर चर्चेचा स्तर घसरेल. मला वाटते, इकडे त्यांच्या भुमिकांचेही फार मोठ्या प्रमाणात सुलभीकरण केले जात आहे. { तुम्ही नाही } हे लोक { देशीवादी } संपूर्ण फुली मारून बाद करावेत असे लोक आहेत काय? त्यांच्या विचारांवर आक्षेप घेणारे तसे करू इच्छितात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. फुले-शाहू-आंबेडकर वादावरील चर्चेत मी आता जात नाही. तिचा जो धागा देशीवादाशी संबंधित असेल किंवा विरोधी असेल तेव्हढे जरूर बोलू या. नेमाडॆंनी ज्या जातीव्यवस्थेचे आणि सामंतशाहीचे कायम वाभाडे काढले त्यांनाच आम्ही जातीव्यवस्थेचे समर्थक ठरवणार असू तर मग ही चर्चा खूपच सवंग आणि सरधोपट होईल. नेमाडे, गवस यांच्यावर ज्यांचा व्यक्तीगत राग असेल { तुम्ही नाही } त्यांनी आपली खाजगी धुणी या घाटावर कृपया धुवू नयेत. {वि.सु. एखाद्या लेखकाला ज्ञानपिठ मिळायला हवे असे म्हणणे आणि त्याच्या लेखनावर टिका करणे यात काहीही विसंगती नाही. एकतर ही मते कोणत्या काळातील आहेत ते पाहिले पाहिजे. ती वेगवेगळ्या काळातील असू शकतात. भुमिकांचा विकास होऊ शकतो.एकाच काळातील असतील तरी उणीवा असूनही ज्ञानपिठ द्यावे असे म्हणणे चुक ठरत नाही.निर्दोष लेखन आनि लेखक कुठून आणायचे सतिषराव?}

हरी नरके: जातीव्यवस्थेचे चटके ज्यांना बसलेत त्यांच्या भावना स्वाभाविकच त्याबाबतीत कठोर असतात. असणार. ते योग्यच आहे. तथापि जातीव्यस्थेवर हल्ला करताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की, ’भारतात प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र आह” असे बाबासाहेब म्हणाले होते. जाती-वर्ण व्यवस्थेचे लाभार्थी ज्या पद्धतीने तिचे समर्थनपर तत्वज्ञान मांडतात त्या प्रकारचे नेमाडे तिचे समर्थक नाहीत. त्यांची भुमिका वेगळी आहे. त्या दोन्हींची सरमिसळ किंवा गल्लत करणे म्हणजे या गोष्टीतली गुंतागुंत विसरून सब घोडे बारा टक्के अशी भुमिका घेणे होय.
भारतीय संस्कृती असे काही म्हटले की काही लोक थेट अंगावरच येतात.त्यांनी कृपया ताज्या साधनाच्या अंकातील दिवंगत यु.आर. अनंतमुर्ती यांची प्रदीर्घ मुलाखत वाचावी. नेमाडॆंनी फुल्यांवर जे लिहिलेय ते वाचले की त्यांची भुमिका फुलेवादाची समर्थक असल्याचे स्पष्ट व्हावे. वेगवेगळ्या स्कूलची दृष्टी वेगवेगळी असली तरी देशीवाद्यांना थेट संघवाले ठरवणे म्हणजे फारच झाले. टिका करा. वाभाडेही काढा. मात्र थेट शत्रूच्या छावणीत ढकलू नका. बाबासाहेब म्हणाले होते, {पाहा: रानडे ,गांधी आनि जिना } "जे चुका करतात पण चुकीच्या बाजूला {तत्वज्ञान म्हणुन}उभे नसतात ते मला माझे वाटतात. मात्र जे चुकीच्या बाजूलाच उभे असतात त्यांनी मी आपले म्हणणार नाही." नेमाडेंना {पठारे, आदींना} आपण कोठे बसवणार आहोत?
September 13 at 7:59pm · Like · 8.....


हरी नरके: आरोप झाले. शेरे आणि ताशेरे झाले. तुमची मते मांडून झाली. आता जरा सज्जड पुरावेही देऊ या.१..२..३..४.. चला सुरू करा.
मी देशीवादाचा प्रवक्ता नाही. मी या विचारसरणीचा कट्टर समर्थकही नाही. मात्र मला त्या विचारातली काही सामर्थ्यस्थळे मोलाची वाटतात. ती एक भोंगळ आणि जातीय विचारधारा आहे अशी तोफ सर्वसाधारणपणे सर्व बड्या मंडळींनी डागलेली आहे. मला त्यांचा प्रतिवाद करायचा नाही.
सहजपणे नजर टाकली तर आरोपपत्रातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे दिसतात.
१.देशीवाद एक बेगडी आणि निव्वळ तकलादू संकल्पना आहे. देशीवादाची नेमकी आणि सुस्पष्ट अशी कुठलीही व्याख्या नाही. कोणत्या परंपरा , मूल्ये देशीवादाच्या मुळाशी आहेत ? २.वैचारिक सामाजिक दृष्टीकोनातून पाहताना ती मुल्ये चिरंतन शाश्वत म्हणून कितपत टिकणारी आहेत ? भारतीय ग्रामीण समाजव्यवस्थेतील लाभार्थी घटक विशेषतः सरंजामदार या देशीवादी भोंगळ कल्पनेचा जोरकस पुरस्कार करताना दिसतात. ही सरंजामी मानसिकता आहे.
३.फुले शाहू आंबेडकर परंपरेची विचारधारा न झेपणारे न मानणारे या देशीवादी गोलमोल कल्पनेच्या भोवती पिंगा घालतात.
४.देशीवाद संस्कृती आणि परंपरा यांना केंद्रबिंदू मानतो. प्रचलित व्यवस्था प्रमाण मानूनच जगणारा माणूस देशीवाद विचारात घेतो. या पलीकडच्या माणसाला देशीवाद मान्यता देत नाही . कारण सनातनी परंपरा. वैदिक परंपरा, सनातन धर्म, वर्णाश्रम धर्म या परिप्रेक्षात देशीवाद विसावला आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड देशीवादी मुल्ये येतात. देशीवादी लेखकांच्या कादंबऱ्यातला दलित वर्गविषयक तुच्छ दृष्टीकोन त्या अंगाने पाहता येईल.
५.जात-धर्म आणि लिंगभेदाची विचारधारा देशीवाद स्वीकारतो. तिचे समर्थन करतो.
६.वस्तुतः आज महार मांगांचीच भाषा खर्‍या अर्थाने सतेज आहे. (पृ. ३४४) असा निर्वाळा देणारे नेमाडे चांगल्या भाषेची उदाहरणे देताना मात्र गोडसे भटजी, लोकहितवादी, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, चिं. वि. जोशी, माडगुळकर, भाऊ पाध्ये इत्यादी बहुतांशी ब्राह्मण लेखकांच्या भाषेचाच दाखला देतात यावरून ते ब्राह्मणीविचारसरणीचे समर्थक ठरतात?
७. देशीवाद हा सौम्य अर्थाने हिंदुत्ववाद आहे...क्रमश: {पाहा भाग २..}
८.देशीवादी झूल ही प्रतिगामी, स्थानिक परंपराप्रधान सांस्कृतिक मूल्यं जपण्याच्या ओढीतुन निपजलेली निरर्थक संकल्पना आहे.ती बदलविरोधी नि न्यूनगंडग्रस्त मानसिकता आहे.
९.थोडक्यात संरजामी जातीवर्चस्वाचे तथाकथित राष्ट्रवादी सांस्कृतीक तत्वज्ञान परिभाषित करणारे ही विचारधारा आहे.ती या देशातील मूल आणि मूलतत्ववादी प्रवृती आहे.या देशीवादाची भूमिका संरजामी आणि ब्राह्मणी दोन्ही व्यवस्थेला पोषकच आहे.
या आरोपपत्राचे सार एका अभ्यासकाने पुढीलप्रमाणे दिलेले दिसते."देशीवाद हा लोकार्थाने जातीयव्यवस्थाच आहे.
बलूतेदारी आणि सरंजमशाहीची यांचे नेमाडे समर्थक आहेत. ते सधन कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांना देशीवादाचे चटके आणि त्याचे उपद्रवमुल्ये याच्याशी देणे-घेणे नाही
उलट हा वाद आजही टिकला जावा आणि आपली सुभेदारी पुर्वीसारखीच अबाधित रहावी हाच या मंडळींचा खरा अट्टाहास आहे."
या सगळ्यांना उत्तरे देणे हे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे. मी ते करू शकणार नाही.
"देशीवाद हा लिंगभाव आणि जातीव्यवस्थेचा समर्थक आहे. तो सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड येतो. तो दलित वर्गविषयक तुच्छतेचा दृष्टीकोन मांडतो." हा करण्यात आलेला आरोप जर खरा असेल तर देशीवाद सर्वथा टाकाऊ मानायला हवा.
मात्र याबद्दलचे पुरावे देऊन ही चर्चा सप्रमाण आणि टोकदारपणे करावी अशी आक्षेपकांना नम्र विनंती आहे........

Wednesday, September 10, 2014

मराठी भाषा धोरणाला मुहुर्त केव्हा मिळणार?



निवडणूक आचारसंहिता लागण्यापुर्वी शासनाने निर्णय घेण्याचा धडाका लावलेला आहे.गेल्या महिन्याभरात हजारो नवे निर्णय घेण्यात आले.मतब्यांका विचारात घेऊन झालेल्या या निर्णयांमध्ये मंत्रालयाच्या दारात फाटकी वस्त्रे घालून उभी असलेली मराठी आपला नंबर लागणार का? असल्यास कधी याची प्रतिक्षा करीत आहे.
मराठी भाषेच्या पुढील पंचवीस वर्षाचे धोरण तयार झाले आहे. हे धोरण राज्य सरकारकडे महिन्यापुर्वीच पाठवण्यात आले असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्याधामधुमीत त्याला आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजुरी मिळणार का हाच प्रश्न आहे.
मराठी भाषेचे संवर्धन, प्रसार आणि प्रचारासाठी पुढील पंचवीस वर्षांत सरकारने काय करायला हवे, हे ठरवण्यासाठी मराठी भाषा सल्लागार समिती २०१० मध्ये स्थापन करण्यात आली. या समितीने गेल्या वर्षभरात राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन अभ्यास केला. भाषातज्ज्ञ, लेखक, पत्रकार, अभ्यासकांबरोबर सामान्य नागरिकांच्याही सूचना समितीने विचारात घेतल्या. त्यावर चर्चा करून धोरणाचा अभ्यासपूर्ण मसुदा लिहिण्यात आला.धोरणाच्या या मसुद्याचे लेखन डा. नागनाथ कोत्तापल्ले, {अध्यक्ष}, प्रा.हरी नरके, प्रा.माधवी वैद्य,प्रा.विलास खोले, प्रा.दत्ता भगत, प्रा. विश्वनाथ शिंदे यांच्या मसुदा उपसमितीने केले आहे.
हा मसुदा राज्यसरकारकडे महिन्यापुर्वीच सादर केला आहे.
मराठी भाषेच्या धोरणाविषयी विशेषत्वाने सांगायची गोष्ट म्हणजे, जीवनाच्या सर्व क्षेत्रात मराठीचा विचार कसा वाढेल याचा विचार या धोरणात केलेला आहे. खरेतर हे धोरण तयार करायला साधकबाधक चर्चेचा अवलंब केल्याने थोडा जास्त वेळ लागला. राज्यातील व बाहेरील मराठीप्रेमी अशा पाचशेहून अधिक लोकांच्या सूचनांचा विचार त्यात करण्यात आला आहे. दीड वर्षांत मसुदा लेखन पूर्ण करून ते धोरण सरकारला सादर केलेले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या धोरणाला लवकरात लवकर मान्यता मिळाल्यास चांगली गोष्ट आहे.
धोरणातील महत्त्वाच्या सूचना---
राज्यात मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे.
तरुणांना मराठी भाषेतून रोजगार निर्मिती व्हावी.
बॉम्बे हायकोर्टाचे नामकरण 'महाराष्ट्र व गोवा न्यायालय करावे'.
न्यायालय, बँका, सरकारी कार्यालयांमधील व्यवहार मराठीतूनच व्हावेत.
सरकारी, खासगी औद्योगिक संस्थेत पन्नास टक्के मराठी भाषक नेमण्यात यावेत.
परकीय भाषा मराठीतून शिकण्याची केंद्रे राज्यात ठिकठिकाणी उभारली जावीत.
विमानतळ आणि विमानांमध्येही मराठी बोलले जावे. तेथे सर्व मराठी वृत्तपत्रे मिळावीत.
तुम्हाला या धोरणाबद्दल काय वाटते?आणि शासनाच्या मराठी धोरणाला विलंब लावण्याच्या धोरणाबद्दल काय वाटते?
...........................................................................................

Tuesday, September 9, 2014

महातीर्थ के अंतिम यात्री - एका भिक्षुकाची दैनंदिनी




बिमल डे या जगप्रसिद्ध साहसी प्रवाशाचे "महातीर्थाचा अखेरचा यात्रिक" हे भन्नाट प्रवासवर्णन वाचतोय. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी ते घर सोडून पळाले. बौद्ध भिक्षूंच्या एका गटाबरोबर मौनी बाबा बनून त्यांनी तिबेटचा पायी प्रवास केला. १९५६ साली जेव्हा परदेशी लोकांसाठी तिबेटचे दरवाजे बंद होते, ह्याच काळात तिबेटने भारताबरोबरचे आपले राजकीय संबंध पूर्णपणे तोडलेले होते, अशाकाळात हा बंगाली मुलगा तिबेटला गेला. ल्हासापर्यंत आपल्या बौद्ध गुरूजी "गेशे रेपतेन" यांच्यासोबत त्याने हा कष्टाचा सहप्रवास केला. नंतर तो एकटाच कैलास पर्वताकडे निघाला. अनंत अडचणींना सामोरे जात, मानवी जगाची आणि निसर्गाची, मनोहारी हिमालयाची  नानाविध रुपे न्याहाळीत त्यांनी केलेला हा प्रवास अतिशय गूढ , अद्भुत व रोमांचकारी आहे.चित्रशैलीतील हे कथन प्रवाही,पारदर्शक आणि मनाची पकड घेणारे आहे. या "एका भिक्षुकाची दैनंदिनी " चे उत्तम मराठी भाषांतर केलेय, विजय हरिपंत शिंदे यांनी. या पुस्तकाचे दर्जेदार प्रकाशन केलेय, अरूण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाने. ४००पृष्ठांच्या या पुस्तकाची किंमत आहे, रुपये ४००/- { पद्मगंधा प्रकाशन, १९६६, सदाशिव पेठ, माडीवाले को‘लनी, पुणे, ३०, प्रथमावृत्ती, १९ मार्च, २०१४,  दूरध्वनी: २४४५०२६०}

Sunday, September 7, 2014

भलेपणाचा उत्सव : फॅमिली डॉक्‍टर‘ निरगुडकरांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त सत्कार सोहळा


आमचे फॅमिली डॉक्‍टर‘ हिरेन निरगुडकर यांच्या वयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज त्यांचा टिळक स्मारक मंदीरात सत्कार सोहळा संपन्न झाला.डो‘.निरगुडकर म्हणजे आरपार भला माणूस. एक समर्पित वैद्य. पुण्याच्या कसबा पेठेत जन्मलेला एका शिक्षकाचा हा मुलगा. त्यांनी १९७५ साली वैद्यकीय सेवा सुरू केली ती पुणे शहराऎवजी वडगाव आणि पुण्याच्या ग्रामीण भागात.सायकलवरून जायचे. गोसावी, लमाण अशा भटक्यांना उपचार द्यायचे. फी १ रुपया. आजही त्यांची फी अवघी ५० रूपये.हमखास गुण येणारच.  गेले ३९ वर्षे डो‘क्टर समर्पित वृत्तीने अहोरात्र कार्यरत आहेत. अचुक रोगनिदान, नेमके औषधोपचार आणि रुग्णांप्रति अपार स्नेहभावना. आजही त्यांची आर्थिक प्राप्ती फारशी नसली तरी हजारो माणसं रक्ताच्या नात्या इतक्याच आत्मियतेने त्यांनी जोडलेली.

टिळक स्मारक मंदीर खचाखच भरलेले. अनेक लोक उभे. सकाळी ९.३० वाजताच लोक आलेले.कार्यक्रम सुमारे सव्वातीन तास चालला. एकही माणुस उठून गेला नाही. डो‘क्टरांची हीच खरी कमाई. डो‘क्टर खूप भावपूर्ण बोलले.

"ऎशी कळवळ्याची जाती! करी लाभाविना प्रिती!" याचे चालताबोलते उदाहरण म्हणजे डो‘.निरगुडकर. कार्यक्रमाची सुरूवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली.

सर्वपक्षीय मान्यवर मंचावर होते. खासदार रजनी पाटील, आमदार गिरिष बापट, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, अंकुश काकडे, माजी आमदार कुमार गोसावी, माजी खासदार अशोक मोहोळ, माजी खासदार प्रदीप रावत, माजी उपमहापौर दिलीप बराटे, डो‘.कैलास कमोद आणि इतर अनेक आवर्जून उपस्थित राहिलेले.

सत्कार सोहळा उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते पार पडला. मुख्य अतिथी डो‘.रामचंद्र देखणे होते.
"धन मान गती, कधी न येवो मज चित्ती, दूर होवो मज हातूनी दु:खितांची पिडा!" हा त्यांचा ध्येयवाद. गरीब झोपडपट्टीवासियांचा आधार असलेल्या डो‘क्टरांच्या या सत्काराने चांगल्या प्रति    समाज आजही कृतज्ञ असतो असा फार सुंदर संदेश गेला.त्यांनी चालवलेल्या शाळेतील मंडळी या सोहळ्यात मन:पुर्वक सहभागी झालेली होती. अंधश्रद्धा निर्मुलन, शिक्षण, आरोग्यसेवा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे आहे.

सगळीच भाषणे काळजाला भिडणारी होती. विशेषत: त्यांची मुलगी सौ.मालविका करकरे खुपच उत्कठ बोलली. माझे बाबा हे माझ्यासाठी आरसाही आहेत नी प्रकाशज्योतही! असं ती म्हणाली. त्यांच्या पत्नी सौ.सुरेख यांची साथ फार मोलाची.
आज वैद्यकीय व्यवसायात अनेक गैरप्रकार शिरलेले आहेत. अशावेळी डो‘.निरगुडकर यांच्यासारखा भला माणूस तिथं पाय रोवून उभा असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. सलाम डो‘. सलाम!
.....................................
सकाळ, पुणे, सोमवार, दि.८ ओ‘गष्ट, २०१४, पृ.४,
छायाचित्र: डॉ.निरगुडकर यांचा मानपत्र देऊन सत्कार करताना उत्तम कांबळे व डॉ.रामचंद्र देखणे, शेजारी सौ.सुरेख निरगुडकर मागे प्रा.हरी नरके व डो‘.कैलास कमोद 
................................................................................................................
ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- कांबळे
- - सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 सप्टेंबर 2014 - 01:45 AM IST
Tags: pune, uttam kamble, senior citizen
षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त डॉ. हिरेन निरगुडकरांचा सत्कार
पुणे- "कॅलेंडरची पाने उलटतात तसा माणूस अधिकाधिक परिपक्व होत जातो. मात्र तेव्हाच समाज त्याला रिटायर करतो. सध्याच्या समाजव्यवस्थेत ज्येष्ठांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही प्रदूषित आहे. आता हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे,‘‘ असे मत "सकाळ माध्यम समूहा‘चे संचालक-
संपादक उत्तम कांबळे यांनी व्यक्त केले.
तब्बल चार दशके वैद्यकीय सेवा करणाऱ्या डॉ. हिरेन निरगुडकरांचा षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. निरगुडकर मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, सुरेख निरगुडकर, माजी खासदार प्रदीप रावत, रजनी पाटील, अशोक मोहोळ, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, माजी आमदार कुमार गोसावी या वेळी उपस्थित होते. वैद्यकीय सेवेचा व्यवसाय होत असल्याची खंत कांबळे यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ""जीव वाचविणे ही सर्वश्रेष्ठ मानवसेवा आहे. परंतु सध्या जागतिकीकरणात सगळ्याच गोष्टींचे मार्केटिंग होत असल्याने वैद्यकीय सेवेचाही व्यवसाय झाला आहे. सेवेचा व्यवसाय होतो तेव्हा डॉ. निरगुडकर यांच्यासारख्या माणसांचे दुर्भिक्ष्य जाणवते. डॉ. निरगुडकरांसारख्या व्यक्तींमुळे वैद्यकीय क्षेत्रावरील विश्‍वास वाढण्यास मदत होत आहे. समाजात चांगली माणसे असून ती सर्वांसमोर आणण्याची जबाबदारी समाजाचीच आहे.‘‘
डॉ. देखणे म्हणाले, ""डॉक्‍टर आणि रुग्ण यांमध्ये अद्वैत नाते असते. परंतु सध्या रुग्णांचा विश्‍वास संपादन करणारे डॉक्‍टर नाहीत. वैद्यकीय सेवेचे मोल जाणणाऱ्या डॉक्‍टरांची समाजाला गरज आहे.‘‘

आई आणि गुरुजनांच्या संस्कारांमुळे इथपर्यंत पोचल्याचे समाधान डॉ. निरगुडकर यांनी व्यक्त केले. "फॅमिली डॉक्‍टर‘ ही संकल्पना सध्या दुरावत असल्याची खंत रावत यांनी व्यक्त केली. या वेळी मालविका करकरे, हरी नरके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. कैलास कमोद यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

http://epaper.esakal.com/sakal/8Sep2014/Enlarge/PuneCity/page4.htmhttp://online4.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5398766878818571509&SectionId=10&SectionName=पुणे&NewsDate=20140907&Provider=-+सकाळ+वृत्तसेवा&NewsTitle=ज्येष्ठांकडे+पाहण्याचा+दृष्टिकोन+बदलण्याची+गरज-+कांबळे

Saturday, September 6, 2014

मी क्रिटीकल इनसायडर असेन









साप्ताहिक साधनाचा शनिवार दि.१३ सप्टेंबर, २०१४ चा अनंतमुर्ती विशेषांक सर्वांनी वाचायलाच हवा. या अंकात ज्ञानपिठ विजेते दि. यु.आर. अनंतमुर्ती यांच्यावरचा विनय हर्डीकर यांचा "आहे मूळचाचि खरा..." हा अभिवादनपर लेख अफलातून जमलेले रसायन आहे. विनयने अनंतमुर्ती हुबेहुब आणि तंतोतंत उभे केलेले आहे. विलक्षण अनुभुती देणारा हा  श्रेष्ठ  लेख आहे. या अंकात विनयने त्यांची घेतलेली एक प्रदीर्घ मुलाखत देण्यात आलेली आहे. अनंतमुर्तींच्या प्रतिभेचे आणि व्यासंगाचे  स्तिमित करणारे अवकाश या मुलाखतीतून उलगडत जाते. त्यांची जागतिक उंची, दूरदृष्टी आणि  भारतीय लोकशाही जीवनाचे भाष्यकार म्हणून असलेले अजोड स्थान ही मुलाखत अधोरेखित करून जाते. ...ही मुलाखत २००३ मधली असली तरी आजही ताजी टवटवीत आहे.
"नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर मी हा देश सोडून जाईन  हे आपलं म्हणणं त्यांनी भारतच नव्हे तर हे जगच सोडून खरं करून दाखवलं.." असं विनय हर्डीकर म्हणतात.
अनंतमुर्ती या मुलाखतीत म्हणतात, "सर्वसामान्य भारतीय कुंभमेळ्याच्या काळातच { सध्या २१ वे शतक चालू असले तरी}जगत असतो...एकेकाळी मी आधुनिकतेचा पुरस्कर्ता होतो.पारंपरिक ते सगळं वाईटच समजत होतो.आता मला तितकी खात्री वाटत नाही.......
"आधुनिकतेविषयी मी पुर्वीइतका आता नि:शंक नाही, कारण युरोप सुखात आहे, अशी मला खात्री वाटत नाही.युरोपमध्ये आता महान कलाकृती निर्माण करण्याची क्षमता उरली आहे, असं वाटत नाही.....
"मी क्रिटीकल इनसायडर असेन.मी परंपरा टाकाऊ ठरवणार नाहीच,पण तिची समिक्षाही करतच राहीन...
"देशी असतं तेच वैश्विक असतं...
"माझ्या लिखाणात काव्यमयतेचा एक सशक्त धागा आहे, तसाच बुद्धीवादाचाही सशक्त प्रवाह आहे.....
" आता निवडणुका हे प्रकरण महागाईचं झालं आहे.निवडणुकीसाठी भरपूर पैसा लागतो आणि बराचसा भ्रष्टाचार या निवडणुकीसाठी लागणार्‍या बेसुमार पैशासाठीच केला जातो.....
" लोकशाही रचनेमध्ये आत्मटिकेला भरपूर वाव असला पाहिजे.आज तसा वाव फारसा उरलेला नाही...प्रसारमाध्यमांनी वाईट राजकारणाला उचलून धरलं आहे...
"श्रमिकांच्या शरिरात भिनलेल्या बुद्धीमत्तेचा - स्वत: हातांनी वस्तूंची निर्मिती करणार्‍या लोहार-सोनार यासारख्या कारागिरांच्या बुद्धीमत्तेचा सन्मान होईल. विणकर - नावाडी, मासे मारणारे - या सार्‍या श्रमिक वर्गाकडे प्रचंड ज्ञानाचा साठा असतो.. त्यांच्या कष्टांमध्ये खूप सौंदर्यही असते... इतर मागास जातींचं ऎक्य कधीच होणार नाही...
" भारतीय लोक सो‘फ्टवेअरमध्ये पुढे जातात पण त्या मानाने हार्डवेअरमध्ये मागे राहतात. याचं कारण जातीव्यवस्थेत आहे. ...हातात कौशल्यं असणारांची बौद्धिक क्षमता मोजण्याच्या कसोट्याच आपण तयार केलेल्या नाहीत.जातीनिर्मुलनाच्या क्रांतीच्या विचारातच बुध्दी व कौशल्ये यांच्या आंतरिक संबंधाचाही पुनर्विचार झाला पाहिजे...."

Wednesday, September 3, 2014

सद्य:स्थिती आणि उदारमतवादासमोरील आव्हाने

 सौजन्य: मिळून सार्‍याजणी, सप्टेंबर २०१४ , पृ.१६ ते १८











डो‘.नरेंद्र दाभोलकर हे विवेकवाद आणि उदारमतवादाचे चालतेबोलते प्रतिक होते. हा लेख लिहित असेपर्यंत पोलिसांना डो‘. दाभोलकर यांचे खुनी सापडलेले नाहीत.हा अंक आपल्या हातात पडेल तेव्हा त्यांच्या हत्येला एक वर्ष उलटून गेलेले असेल. ते अत्यंत आर्जवी आणि संयत भाषेत, समर्पक युक्तीवाद करून आपले मतप्रतिपादन करीत असत. कमालीची सहिष्णू वृत्ती आणि जन्मजात तळमळ हा त्यांचा पिंड होता. त्यांची हत्त्या होणं आणि वर्षं उलटून गेले तरीही मारेकरी न सापडणं हे फारच चिंताजनक आहे.
महान तत्वज्ञ बर्ट्रांड रसेल यांच्या १९५० साली प्रकाशित झालेल्या "अनपो‘प्युलर एसेज" या गाजलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद डो‘.करुणा गोखले यांनी केला आहे. "नाही लोकप्रिय तरी उदारमतवादाची कास धरी" या अत्यंत समर्पक शिर्षकाच्या ग्रंथाची दर्जेदार निर्मिती मेनका प्रकाशनाने केलेल्या आहे. सुमारे ७०-८० वर्षांपुर्वी त्यांनी याविषयीचे केलेलं चिंतन आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारं आहे.व्यक्ती, व्यक्तीसमुह[समाज] आणि राष्ट्र म्हणून आपली आजची वाटचाल तपासायला या ग्रंथाची खूप मदत होते.डो‘.गोखले यांनी केलेला अनुवाद अतिशय प्रवाही, टोकदार आणि श्रेष्ठ गुणवत्तेचा आहे.माणसाच्या जगण्यातली समजूत समृद्ध करणारा हा महत्वाचा ग्रंथ आहे.रसेल यांच्या मते, लोकमत तयार होण्याच्या प्रक्रियेस ज्ञान आणि विवेकाचा आधार देणे हेच शिक्षकाचे काम असते. {पृ.११९} नरूभाऊ हे काम आयुष्यभर समर्पित वृत्तीने करीत आले. "माणूस पटकन कशावरही विश्वास ठेवायला तयार असतो, त्यामुळे सहजी फसतो.एखाद्या समजुतीच्या पुष्ट्यर्थ योग्य कारणे सापडली नाहीत , तर तो अयोग्य कारणांवर विश्वास ठेवतो."{पा.९२} बुवाबाजी करून समाजाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटणारी मंडळी नेमकी याचाच फायदा घेतात हे नेमके हेरून डो‘.दाभोलकरांनी त्याला अटकाव करण्यासाठी जादूटोणाविरोधी कायदा मंजूर केला जावा यासाठी सातत्त्याने प्रयत्न केले.आपल्या समाजात आज, " एकांताचा अभाव, लोकानुनयाची सक्ती, लोकप्रियतेचा हव्यास, यापायी सर्वत्र सुमारांची सद्दी बोकाळलेली आहे"{पृ.११२} यात सत्त्यासत्त्याशी मन केले ग्वाही, मानियेले नाही बहुमता, यानुसार "विचारस्वातंत्र्य,सत्यशोधनाचा हक्क,चर्चा करण्याचे स्वातंत्र्य आणि कनवाळू वृत्ती या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात."{पृ.१५१} अशा बाण्याने दाभोलकर काम करीत राहिले.त्यांचे मारेकरी हे मुळात विवेकवाद आणि उदारमतवाद यांचेच मारेकरी आहेत. अशा इसमांची खानेसुमारी वाढते आहे काय?
रसेल म्हणतात, " ज्या समाजांनी किंवा राष्ट्रांनी धार्मिक कट्टरता, वैचारिक असहिष्णुता यांची कास धरली ते रसातळाला गेले." [पृ.१७७]  "अच्छे दिन आनेवालें हैं" अशी स्वप्नं दाखवित तीन महिन्यांपुर्वी भारतात नवे सरकार आले. पंतप्रधानपदाची शपथ घेताना श्री.मोदी म्हणाले, " मैं नरेंद्र दामोदरदास मोदी, संघके प्रधानमंत्री के रूपमे शपथ लेता हुं...." तर काही मंडळींना वाटलं की त्यांनी रा.स्वं. संघाच्या नावानेच शपथ घेतली. वास्तविक पाहता  इथे संविधानाला भारत हे संघराज्य अभिप्रेत आहे, हे सर्वांना माहित आहे. भाजपाने "भ्रष्टाचार निर्मुलन, महागाई, सुशासन आणि विकास " या चार मुद्द्यांवर मतं मागितली होती. त्यांना मिळालेला हा जनादेश या चार मुद्द्यांवरचा जनादेश आहे. पण पहिल्याच दिवशी सरकारने जम्मु- काश्मीर आणि ३७० कलम यावर चर्चा छेडली. या सरकारचे गुणवत्ता प्रेम एव्हढे अफलातून आहे की, सर्व विद्यापिठांचे कुलगुरू ज्यांच्याकडून सुचना, आदेश आणि मार्गदर्शन घेतात अशा मानव संसाधन खात्याच्या मंत्रीपदी बारावी शिकलेली व्यक्ती नियुक्त करण्यात आली. दहा वर्षांपुर्वी म्हणे मंत्रीमहोदया पदवीधर होत्या. आता मात्र नव्याने त्या फक्त बारावी असल्याचे प्रतिज्ञापत्र करण्यात आलेय. यामुळे "सांस भी कभी बहुं थी" च्या चालीवर  "स्मृती भी कभी ग्राज्युएट थी" अशी नवी मालिका येणार असल्याचे ऎकतो. त्यांनी भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या {आय.सी.एच.आर } अध्यक्षपदावर रा.स्व.संघाशी जवळीक असलेले वाय.सुदर्शन राव यांची नियुक्ती केली आहे. आजवर एकही महत्वाचा ग्रंथ नावावर नसलेल्या रावसाहेबांचे मोठे कर्तृत्व म्हणजे ते जातिव्यवस्थेचे कट्टर समर्थक असून ते रामायण - महाभारताला महाकाव्यांऎवजी इतिहासग्रंथ मानतात.त्यांचा प्रभाव म्हणून की काय पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही आता हुकुमशहा होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. एक मा. न्यायमुर्ती  म्हणाले, " मी हुकुमशहा असतो, तर इयत्ता पहिलीपासून महाभारत आणि गीता हे ग्रंथ अभ्यासक्रमाला लावले असते." त्यांचे हे व्यक्तीगत मत होते, सुचना होती की धमकी? याची चर्चा व्हायला हवी. या ग्रंथांना सरसकट विरोध असण्याचे काहीच कारण नाही.पण आपल्या देशात अनेक धर्म आहेत. लिंगभाव, जात, वर्ग, भाषा, प्रांत अशा अनेक भेदांनी ग्रस्त असलेल्या आपल्या देशाला बहुविविधतेचा सन्मान आणि वैश्विक मुल्यांवर आधारलेली समावेशकता हवीय की बहिष्कृततेच्या तत्वज्ञानाला कवटाळणारी मानसिकता ते आधी ठरवावे लागेल. खरं तर आजच्या सगळ्या भारतीय अभ्यासक्रमांवर या ग्रंथांची गडद सावली असतानाही आता थेट तेच ग्रंथ अभ्यासक्रमाला लावण्याची गरज का निर्माण झालीय? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या वतीने तिन पिढ्यांनी सुमारे ५५ वर्षे संशोधन करून महाभारताची चिकित्सक आवृत्ती प्रकाशित केलेली आहे. गुरू द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितल्याची  कथा आम्हाला सांगण्यात/शिकवण्यात आलीय. मुळात गुरूजींनी तर चक्क "वेतन " मागितल्याची नोंद महाभारतात आहे. न केलेल्या कामाचे वेतन मागणारे गुरूजी "आदर्श" मानलेच जायले हवेत नाही का? मूळ शब्द वेतन असताना तो का बदलून सांगण्यात आला? येतो? चिकित्सा व्हायला हवी.
सरकार म्हणून यापुढे आपली शैक्षणिक वाटचाल नेमकी कशी राहील? जातीनिर्मुलनाऎवजी जातीसमर्थनाचा " विशिष्ट अजेंडा" जर राबवण्यासाठी शासन कामाला लागले तर भारताचे नेमके काय होईल?  डो‘.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, "जातीव्यवस्था हे कामाचे वाटप नसून कामकर्‍यांचे त्यांची गुणवत्ता, आवड, क्षमता आणि पात्रता न पाहता जन्मावर आधारित केलेले वाटप होते. त्यातून श्रेणीबद्ध विषमता निर्माण झाली. तीन वर्ण या व्यवस्थेचे लाभार्थी होते. सर्व स्त्रिया आणि शूद्र { दलित-बहुजन } हे या व्यवस्थेत शोषित-वंचित होते.त्यांना "ज्ञानसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता" यांच्यापासून दूर ठेवले गेले होते. आज देशात किमान ४६३५ जाती-जमाती असल्याची "पिपल ओ‘फ इंडीया" ची पाहणी सांगते.
सामाजिक न्यायासाठी आणण्यात आलेल्या घटनात्मक आरक्षणाला सरकारने "गरिबी हटाव"चा कार्यक्रम बनवलेय. त्यामुळे बहुतेक सर्व जातींना आज आरक्षणासाठी  मागासवर्गीय व्हायचेय.त्या अर्थाने आज आपल्या देशाला मागासपणाचे डोहाळे लागलेले असताना जातीसमर्थनाची ही लाट खैरलांजी ते खर्डा, व्हाया सातारा आणि नाशिक नेमकी आपल्याला कुठे घेऊन जाईल? आजही आपल्या देशात लग्नं ही प्रामुख्याने जातीतल्या जातीत होतात. लोकशाहीने आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी दिल्या. परंतु  निवडणूकीच्या राजकारणाने जातीच्या मतब्यांका सांभाळ्ण्यासाठी जातपंचायती, जात संघटना आणि जातनेते यांना रसद पुरवायला सुरूवात केलीय. भांडारकरसारख्या ज्ञानभांडारावर अज्ञानातून किंवा आकसातून हल्ला करणारांना हे माहितच नसतं की छ. संभाजी राजांच्या ’बुधभुषण’ या ग्रंथाचे बोरीने १९२६ साली प्रकाशन केलेले आहे. देशात सुनियोजित जातीय आणि धार्मिक दंगली घडवून एका विशिष्ट समाजातील सर्व पुरूष जाळून मारण्याची युवकांना चिथावणी देणे हे ज्यांना शिवकार्य वाटते, ते आणि अशा लिखाणाविरूद्ध कायदेशीर कारवाई करायला जे सरकार अनेक वर्षे साधी परवानगीही देत नाही ते यांची हातमिळवणी झाल्यानेच उदारमतवादाचा संकोच होतो आहे. भले ही मंडळी तोंडाने कितीही फुले-आंबेडकरांचा जप करीत असूद्या ती त्यांचे विचार पायदळीच तुडवित असतात. सत्ताधार्‍यांनी सत्यशोधक चळवळ कब्ज्यात घेतली. आता त्यांनी लोकशाहीचेही अपहरण केल्यात जमा आहे. बहुजनवादाची परिभाषा आणि एकजातीय वर्तन असा प्रवास  चालूय.विश्वस्त म्हणून आले आणि घाऊक मालक झाले. या शक्तींचे खरे स्वरूप उघड करावेच लागेल.
मी गेली ३५ वर्षे फुले -आंबेडकरी चळवळीत क्रियाशील आहे. चळवळीत दिवसेंदिवस शिरणार्‍या दुश्प्रवृतीनी मी अत्यंत चिंतीत आहे. अनेकदा ही निराशा, विषन्नता कार्यहानीही करते. रसेल म्हणतात,"शोषितांकडे सत्ता नसल्याने स्वार्थपुर्तीचे मार्ग त्यांना उपलब्ध नसतात, आणि म्हणून जुलूम, अन्याय, अत्याचार,भ्रष्टाचार,हिंसाचार यांचे प्रदर्शन करण्याची संधीही त्यांना मिळत नाही.पर्यायाने नीतिमानतेबाबत त्यांची मूठ झाकली राहते. याच शोषित  घटकांना जेव्हा स्वातंत्र्य आणि सत्ता मिळते,तेव्हा यथावकाश त्यांच्यामधील दुर्गुण वर उफाळून येतातच.सचोटी,नीति,लोभ,मत्सर,सहृदयता हे गुणविशेष व्यक्तीनिष्ठ असतात, त्यांचा लिंग,वंश,वर्ग यांच्याशी फारसा संबंध नसतो, हे लक्शात घेतले, की माणूस भाबडेपणाने निराधार समजुतींना कवटाळून बसत नाही."{पृ.१०४}आज दलित, बहुजन, कष्टकरी, स्त्री चळवळीला रोजगार हमी समजणारे लोक पाहिले, मोठ्या कष्टाने मिळालेल्या हक्कसंरक्षक कायद्याचा दुरूपयोग करणारे लोक पाहिले की, वेदना होतात. बहुजन समाज ज्ञानापासून वंचित असला तरी हातात कौशल्यांची जादू असणारा समाज आहे. कोणताही देश मुळात ज्ञान आनि कौशल्ये यांच्या जोरावरच प्रगती करीत असतो. पण काही आळशी आणि परपोशी लोकांनी चोरी, भिक आणि दरोडीखोरी यांच्या समर्थनाचच तत्वज्ञान विकसित केलंय. डो‘. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३०नोव्हेंबर १९४८ रोजी घटना परिषदेत बोलताना आरक्षण कोणत्याही स्थितीत पन्नास टक्क्यांच्यावर जाता कामा नये असे बजावले होते. असे झाले तर घटनेच्या समतेच्या मुल्यांचा तो भंग ठरेल असे त्यांनी ठणकावले होते. या विषयावर लिहीणार्‍या सर्व विद्वानांनी यावर सार्वत्रिक मौन पाळलेले आहे. सर्वच छावण्यांना पोपटपंची करणारे वक्ते, अभ्यासक हवे आहेत. सत्य प्रांजळपणे सांगणारे कोणालाच नको आहेत? सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी एका प्रकरणात ४९८ अ कलमाचा {हुंड्यावरून छळ} गैरवापर वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.त्याच्या चर्चेच्या निमित्ताने असे लक्षात आले की आमच्या चळवळीतले सहकारी याला कबुलच नाहीत. मला दोन मोठे मराठी लेखक {साहित्य अकादमी पुरस्कार विजेते} माहित आहेत ज्यांची भुमिका आयुष्यभर स्त्रीवादी राहिलीय, त्यांचा तिळमात्रही संबंध नसताना त्यांच्या सुनांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांना अतोनात छळ सोसावा लागला.आज जरी गैरवापराचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी त्याला पाठीशी घालण्याची किंवा त्याकडे कानाडोळा करण्याची गरज नाही. आजच भ्रष्टाचार, आट्रोसिटी, स्त्रीविशयक कायद्यांचा गैरवापर याकडे आम्ही गंभीरपणे आणि कठोरपणे पाहिले नाही तर आमची विश्वासार्हताच धोक्यात येईल. याचा दुष्परिणाम खर्‍या शोषितांना आणि गरजूंना भोगावा लागेल. यासाठी सवंग आणि सरधोपट भुमिका घेण्याऎवजी कटूता पत्करून पण प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेवरच त्याचा निर्णय करावा लागेल असे मला वाटते.चळवळींनीही  आत्मपरिक्षण करायला हवे. नाहीतर  सामाजिक दबाव, भिडस्तपणा आणि हितसंबंध यांच्यामुळे समता,स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मुल्यांसाठीच्या या लढयात गतीरोधक तयार होतील.मला आवडो न आवडो दुसर्‍यालाही बोलण्याचा अधिकार आहे आणि मी कोणतीही गोष्ट लादणार नाही, खुल्या मनाने दुसरी बाजू ऎकून घेईन अशीच आपली प्रतिज्ञा हवी. अन्यथा विवेकवाद आणि उदारमतवाद यांना भवितव्य राहणार नाही.
-प्रा. हरी नरके, {प्रमुख, महात्मा फुले अध्यासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ, पुणे ७}

Tuesday, September 2, 2014

राखीगढी सिंधू संस्कृतीच्या शोधाची नवी दिशा...


 डॉ. वसंत शिंदे
रविवार, 31 ऑगस्ट 2014 - 01:45 AM ISTसिंधू संस्कृतीमधल्या ‘मोहेंजोदडो-हडप्पा’ या स्थळांवरून सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवीसनपूर्व ३५०० धरला जातो. डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागानं हरियानामधल्या हिस्सार जिह्यातल्या ‘घगर’ खोऱ्यात नव्यानं केलेल्या उत्खननात ‘राखीगढी’ हे स्थळ अलीकडंच आढळून आलं आहे. राखीगढीचा कालखंड इसवीसनपूर्व सुमारे ४५०० ते १५०० अर्थात साडेसहा हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा अर्थ ‘घगर’ ही संस्कृती विकसित होत ती सिंधू संस्कृतीचा भाग झाल्याचं संशोधनातून पुढं येऊ शकेल. या उत्खननाविषयी...

सिंधू संस्कृतीचा उगम सिंधू नदीच्या खोऱ्यात झाल्याचं सांगितलं जातं.  भिराणा, गिरावड, फर्माना, मिठाथल आणि राखीगढी अशा पाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या. यातला सिंधू संस्कृतीचा कालखंड इसवीसनपूर्व ३५०० धरला जातो. मात्र, डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागानं हरियानामधल्या  हिस्सार जिह्यातल्या ‘घगर’ खोऱ्यात केलेल्या उत्खननात ‘राखीगडी’ हे स्थळ सापडलं आहे. याचा कालखंड ५५०० वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळं सिंधू संस्कृतीच्याही आधी दीड हजार वर्षांपूर्वी राखीगढी इथं या संस्कृतीची सुरवात झाली असावी, असा अंदाज आहे. 

सिंधू संस्कृतीच्या विकासाचे तीन टप्पे :
१) हडप्पन संस्कृतीची सुरवात साधारणत: इसवीसनपूर्व ५५०० ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडात हा हडप्पा संस्कृतीला सुरवात झाली होती. या कालखंडात ग्रामीण संस्कृतीचे टप्पे दिसून येतात. मोहेंजोदडो-हडप्पा उत्खननात ग्रामीण संस्कृतीचे पुरावे दिसून येतात.

२) दुसऱ्या टप्प्यात शहरीकरण दिसून येतं. हा कालखंड इसवीसनपूर्व ३००० ते २००० अर्थात एक हजार वर्षांचा. हा सिंधू संस्कृतीच्या भरभराटीचा काळ दिसून येतो. याच वेळी या संस्कृतीचा इजिप्त, इराण, मध्य आशिया अशा विदेशी, तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, तमिळनाडू असा देशांतर्गत व्यापारीसंबंध दिसून येतो. 

३) तिसऱ्या टप्प्याचा कालखंड हा इसवीसनपूर्व २००० ते १५०० पर्यंतचा आहे. या काळात सिंधू संस्कृतीला उतरती कळा लागल्याचं दिसून येतं. इसवीसनपूर्व २००० ते १९०० या १०० वर्षांच्या काळात या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळं सिंधू खोरं निकामी झालं. शेतीवर विपरीत परिणाम झाल्यामुळं मोठ दुष्काळ पडला. याच काळात सरस्वती नदी लुप्त झाली. त्यामुळं तिथल्या लोकांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात राजस्थान, गुजरात, हरियाना, पाकिस्तान, अफगाणिस्तान या ठिकाणी झालं. 
याच कालखंडात समुद्राची पातळी दोन ते तीन मीटरनं खाली गेली; त्यामुळं सिंधू संस्कृतीमधली जवळपास ३० बंदरं निकामी झाली. या बंदरामुळं या ठिकाणी परदेशी संपत्ती मोठ्या प्रमाणात येत होती. ३० बंदरांमुळं सौराष्ट्र, अफगाणिस्तान, बलुचिस्तान या संपूर्ण भागात आर्थिक व्यवस्था भक्कम झाली होती. मात्र, समुद्राची पातळी कमी झाल्यानं बंदरंही कामाची राहिली नाहीत. त्यामुळं तिथल्या आर्थिक ऱ्हासाला दुष्काळ कारणीभूत ठरला. 

राखीगढी इथं सर्वांत मोठं उत्खनन
राखीगडी इथल्या उत्खननात सापडलेली धान्याची कोठारं
आता पाकिस्तानात असलेल्या ‘मोहेंजोदडो व हडप्पा’पेक्षा मोठं उत्खनन राखीगडी  ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी राखीखास व राखी शहापूर अशी दोन गावे वसलेली आहेत. दोन गावांना मिळून राखीगढी अर्थात राखेची उंच टेकडी आहे. राखीगढीचं एकूण क्षेत्रफळ ३५० हेक्‍टर असून इथं सिंधू संस्कृतीचं मूळ सापडण्याची दाट शक्‍यता आहे. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सिंधू संस्कृतीप्रमाणेच विकासाचे टप्पे दिसून येतात. इथल्या दोन थरांचे अवशेष मिळतात; त्यामुळं या ठिकाणी प्रगती व ऱ्हास ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

उत्खननात मिळाली धान्याची कोठारं
राखीगढी इथल्या उत्खननात पाच पिढ्यांची घरं आढळून आली आहेत. त्यात धान्याची मोठी कोठारं आढळून आली असून, संपूर्ण गावाचं हे कोठार असल्याचं दिसून येतं. धान्याची कोठारं मातीने सारवलेली असून, धान्याला कीड लागू नये, यासाठीचीसुद्धा व्यवस्था केलेली दिसून येते. कोठारात तांदूळही मिळाले आहेत. उत्खननात सात खोल्या आढळून आल्या असून उत्कृष्ट रंगकाम केलेली मातीची भांडी, लाल दगडापासून बनवण्यात आलेले मणी, त्रिकोणी आकाराच्या सजावट केलेल्या, नक्षीकाम केलेल्या टेराकोटाच्या बांगड्या, कुंभाराचा आवा (भट्टी), मऊ दगडापासून तयार केलेला एकशिंगी प्राणी, पाच अक्षरं (अद्याप ही अक्षरं ओळखता आलेली नाहीत) असे पुरावं मिळाले आहेत. 

सुरवातीला गावकऱ्यांचा विरोध 
भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागानं (एएसआय)  राखीगढी इथं यापूर्वी १९९९ मध्ये उत्खनन केलं होतं.  मात्र, ‘भारतीय पुरातत्त्व सर्व्हेक्षण विभागानं आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक देत नाही,’ असं सांगत गावकऱ्यांनी उत्खनन बंद पाडलं होतं. माजी केंद्रीय मंत्री एस. के. मिश्रा यांची ‘इंडियन टूरिस्ट फॉर रूरल हेरिटेज अँड डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून राखीगढीमध्ये विकासकामं सुरू आहेत. मिश्रा यांनी ‘राखीगढी इथल्या उत्खननातल्या वस्तू गावातच राहतील, इथले रस्ते, तटबंदी, स्नानगृह यांचं जतन व संरक्षण केलं जाईल, त्याचं संग्रहालय तिथली पंचायतच चालवेल आणि गावाचा विकास करेल,’ अशी ग्वाही दिल्यानंतर गावकऱ्यांनी  २०१३ पासून उत्खननाला परवानगी दिली.

हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाचे ‘डीएनए’ शोधणार !
उत्खननातल्या सुबक नक्षीकाम केलेल्या टेराकोटा

दक्षिण कोरियातल्या ‘सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन’नं हजारो वर्षांपूर्वीच्या मानवाचे ‘डीएनए’ शोधण्याचं तंत्र अवगत केलं आहे. मानवी आतड्यांमध्ये प्रदूषित पाणी किंवा अन्नातल्या सूक्ष्म जंतूंची अंडी असतात. दफनानंतरही मानवी शरीराचं व सांगाड्यांचं विघटन झालं, तरी ही अंडी मातीत हजारो वर्षं राहू शकतात. या अंड्यातले ‘डीएनए’ वरून मानवाच्या मृत्यूचे कारण, त्याचा आहार, रक्तगट, वंशज, पेहराव समजू शकतो. या आधारेच येथील मानवाचा निश्‍चित कालखंड समजू शकतो.

राखीगडी जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ :
 प्राथमिक अहवालानुसार राखीगडीचा कालखंड सुमारे इस.पूर्व ४५०० ते १५०० अर्थात साडेसहाशे हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा अर्थ ‘घगर खोऱ्यातून’ ही संस्कृती विकसित होत ती सिंधू संस्कृतीचा भाग झाला असल्याची शक्‍यता आहे. जगातील सर्वांत मोठे उत्खनन असल्यामुळे ‘राखीगडी’ला ‘जागतिक वारसा’ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हरियाना राज्य  व केंद्र सरकार हे ठिकाण जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणार आहे. 
राखीगडी येथील उत्खनन पुढील दहा वर्षे सुरू राहणार आहे. उत्खननामध्ये नीलेश जाधव, प्रा. पी. डी. साबळे, सतीश नाईक, कांती पवार, सुतप्पा लाहिरी, अवरादीप मुन्शी आदींच्या पथक संशोधन व अभ्यास करत आहे.

(शब्दांकन : दिलीप कुऱ्हाडे )
(लेखक डेक्कन कॉलेजचे कुलगुरू आहेत)
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4990853815328714002&SectionId=3&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97&NewsDate=20140831&Provider=%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&NewsTitle=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A2%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE