Wednesday, September 27, 2017

भात खाबो-






J1 झालं का? हा अनेक प्रतिभावंत फेबुकरांचा लाडका प्रश्न असतो.
ईशान्य भारतातील अनेक राज्यात त्यांच्या भाषेत "जेवन आहे का? जेवन काय आहे? जेवन झालं का?" असं विचारायचं असलं तर म्हणतात भात खाबो. भन्नाटच कल्पना. महत्वाचच विषय. जे मांसाहारी असतील त्यांची तिकडे चंगळ असते. तिन्ही वेळेला मंडळी मांसाहारावर ताव मारतात. माश्यांचे नानाप्रकार, पोर्क, बीफ, कोंबडी, बदक, बेडूक, कुत्रा, साप ही तुफान आवडीची पक्वान्नं असतात. अंड्यांचे शेकडो पदार्थ.  उर्वरित देशभर उच्छाद मांडलेल्या तथाकथित गोरक्षकांचं नामोनिशानही या सात राज्यांमध्ये आढळत नाही. मांसाहाराला विरोध करणारांना ही मंडळी थेटच सरळ ताटात शिजवून खाऊन टाकतील. शाकाहार्‍यांना मात्र एकमेव मेनू. भात आणि फक्त भात. रानातली कोणतीही वनस्पती ओरबाडून आणतात आणि चिमुटभर मीठ टाकून उकळुन देतात. बांबू शूट्स म्हणजे बांबूच्या आतला गर अतिशय चविष्ट लागतो. भोपळ्यासारखं चिवचिवटं म्हणजे इस्कोट डोंगर उतारावर लावलेलं दिसतं. सर्वत्र मिळतं. खिरा [काकडी] मुबलक असते.
तिथली मिरची मात्र कोल्हापुरी मिरचीच्या सुमारे एक हजारपट तिखटजाळ असते. त्यामुळे तिथला ठेचा हा केवळ पदार्थ न राहता ती समोरच्याला हमखास रडवणारी प्रवृत्ती बनते.
सोनकेळी आणि पेरू मुबलक.
भाताची हजारो एकर शेती. जिकडं बघावं तिकडं भातशेती.
आपल्याकडं खेड्यात घरोघरी कोंबड्या पाळलेल्या असतात तशी तिथं घरटी डुकरं पाळलेली असतात. रस्त्यांवर भटकी कुत्री नावालाही आढळत नाहीत. कारण त्यांचं मांस हे सगळ्यात महाग असतं.
अमाप गरिबी आणि उद्योगधंदे शून्य त्यामुळं क्रयशक्ती नाही. किरकोळ टपरीवजा रेस्टॉरंटं, हॉटेलं, फारच कमी.
नागालॅंडमध्ये बोलली जाणारी नागा भाषा शांतपणे ऎकली तर मराठीच्या जवळ जाणारी ती भाषा असल्यानं नक्की समजते.
निसर्गाचं मुबलक वरदान पण अशांत प्रदेश, असुरक्षित प्रवास, आदिवासी जमाती व टोळ्यांमधली रक्तरंजित भांडणं आणि सरकार नावालाच यामुळं ही सुवर्णभुमी शापित आहे.
काश्मीरला स्वर्ग म्हणत असतीलही पण भारताच्या श्रीमंत निसर्गाची सर्वाधिक लोभस रूपं बघायची, अनुभवायची असतील तर एकदा तरी या सप्तभगिनींना भेट द्यायलाच हवी.
आसामातले चहामळे, सगळीकडची भातशेती आणि लाखो प्रकारची जैवविविधता तोडच नाही. इथं आलात की रमून जाल. स्वर्गाचा, जन्नतीचा विषयच संपला.
- प्रा.हरी नरके

ईशान्य भारतात फिरताना-




इम्फाळहून नागालॅंडची राजधानी कोहिमाला जात असताना एका खेड्यात चहाला थांबलो होतो. धोधो पाऊस पडत होता. चुलीवरचा मस्त स्पेशल चहा अवघ्या पाच रूपयाला मिळाला.
इम्फाळच्या क्लासिक हॉटेलात मचूळ चहा 59 रुपयांना मिळाला होता. [चहा 50 रुपयांचा आणि जीएसटी 9 रुपये] चुलीवरच्या चहाची चव काही औरच होती.
शेजारच्या टपरीवर रासायनिक खते न वापरता पिकवलेला लसूण विकायला ठेवलेला होता. 100 रुपये किलो. आ.ह. साळुंखेसरांनी एक कांडी घेतली. त्याचे किती पैसे द्यायचे असे विक्रेत्याला विचारले.
तो म्हणाला, "एकाचे कुठे पैसे घेत असतात काय? अहो, आमची आठवण म्हणून आणखी एक कांडी ठेवा." असं म्हणत त्यानं दुसरी कांडी सरांच्या हातात दिली. त्यानं पैसे घ्यावेत म्हणून सरांनी खूप आग्रह केला पण त्यानं पैसे घेतले नाहीत. पुढं कोहिमाच्या बाजारात आम्ही एक किलो लसूण घेतला. पण तो लसूण नसून बारका पांढरा चिंगळी कांदा असल्याचं भाषेच्या अडचणीमुळे कळलंच नाही.

मिझोरामची राजधानी ऎजवालच्या फ्लोरिया ग्लॅमर हॉटेलमधला बेचव चहा 71 रुपयांना मिळाला. [ चहाचे रुपये साठ आणि जीएसटीचे अकरा रूपये ]
आगरताळाला जाताना संध्याकाळी एका चहाच्या टपरीवर थांबलो. बाईंनी झकास ताजा स्पेशल चहा बनवून दिला. पाच रूपयाला ग्लासभरून कडक चहा.
संभाजी भगतांना तिकडची सोनकेळी आवडली म्हणुन त्यांनी खायला घेतली. चहाचे पैसे देताना केळीचेही पैसे घ्या असा आग्रह केल्यावर बाई म्हणाल्या, " एका फळाचे पैसे घेणं मला पटत नाही."

रस्त्यांवर गस्त घालणारे सीमा सुरक्षा दलाचे जवान सतत भेटत. चौकशी केली की एखादा तरी मराठी जवान भेटायचाच. आम्हाला भेटून त्याला इतका आनंद व्हायचा की भान हरपून तो जवान आमच्याशी किती बोलू नी किती नको असं करायचा. मराठी बोलायला आणि ऎकायला कान आणि जीभ आतुर असल्याचं प्रत्येकजण सांगायचा.
भारत बांगलादेश सीमेवर आसामच्या भांगाजवळ होशियारा नदी आहे. नदीच्या एका बाजूला भारत आणि दुसर्‍या बाजूला बांगला देश.
बांगला देशाची सीमा अगदी जवळून पाहता यावी म्हणून आम्ही बीएसएफचे अधिकारी आर.के.यादव यांची रितसर परवानगी घेतली. त्यांनी आपुलकीनं आमची विचारपूस केली, चहा दिला आणि होशियारा नदीतून भारतीय हद्दीतून बोटीची सफरही घडवली. नदीच्या दुसर्‍या बाजूला बांगला देशचे कोळी मासे पकडत होते. लहान मुलं शेतात काम करीत होती. त्यातले कित्येक अंगावर सदराही नसलेले गरिब होते, ते अतिशय प्रेमाने आम्हाला हात हलवून टाटा करीत होते.
प्रा.हरी नरके

आणि गायब सरकारचं अस्तित्व ठळकपणे जाणवू लागलं-





2 तास उशीराला ते उशीर मानत नसणार! "समयपर रहना हमारी प्रतिबद्धता है. आमची विमानं कायम वेळेवरच सुटतात." विमानातील हवाईसुंदरी पाठ केलेली वाक्यं कृत्रिमपणे म्हणत होती. तरी बरं विमानाला 2 तास उशीर झालेला होता.
इम्फाळला पोचलो तेव्हा जोरदार पाऊस पडत होता. आता भिजावं लागणार असं वाटत होतं. मात्र चक्क विमान कंपनीचे कर्मचारी प्रत्येक प्रवाशाला छत्री देत होते. इतकं मस्त वाटलं.
आम्ही इम्फाळचा कांगला किल्ला बघायला गेलो होतो. किल्ल्यासमोर ग्रुप फोटो काढावा म्हणून एका युवकाला आमचा फोटो काढतोस का? अशी विनंती केली. तो चक्क लाजला आणि दूर पळाला. मुलींच्या घोळक्यातली एक युवती धीटपणे पुढे आली आणि म्हणाली मी काढते. तिने वेगवेगळ्या अ‍ॅंगलमधून आमचे फोटो काढून दिले. इकडच्या बाजारात विक्रेत्या बहुधा महिलाच असतात. दुकानं, हॉटेल्सही महिलाच चालवतात. महिला निर्भय आणि कष्टाळू आहेत.

ईशान्य भारतात पहाटे 5 वाजताच सुर्य उगवतो. मात्र संध्याकाळी 5 वाजता अंधार पडतो. 6 वाजता सर्व दुकाने, हॉटेल्स अगदी ए.टी.एम.सुद्धा बंद होतात.
मनीपूर, नागालॅंड, मिझोराम ही राज्यं अशांत राज्यं मानली जातात. पावलापावलांवर सीमा सुरक्षा दलाचे जवान हातात मशिनगन्स घेऊन पहारा देताना दिसतात.
हायवेवर तर फारच कडक सुरक्षा असते. हायवे लॅंडस्लाईडिंग, पावसाळ्यामुळं पडलेले दहाबारा फूट आकाराचे प्रचंड खड्डे आणि कापले गेलेले रस्ते यामुळे केवळ पायवाटा बनलेले.
निसर्ग हिरवाकंच आणि शेकडो किलोमीटर सलग साथीला.
सरकार तुमच्या साथीला, अशा पदोपदी केवळ जाहीराती दिसतात. अर्थात सरकारचं अस्तित्व खड्ड्यांमधून जाणवत राहतं. विकासाचे वादे कापले गेलेले रस्ते बोंबलून सांगत असतात.
दर पंचवीस किलोमीटरला हायवेवरील सीमा सुरक्षा दलाच्या चेकपोस्टवर वाहनांची व प्रवाश्यांची नोंदणी करावी लागते. एक मराठी जवान भेटला. म्हणाला, वाहतुक बहुधा बंद आहे. तिकडून गेले तीन दिवस एकही वाहन आलेले नाही. काहीतरी गडबड असावी. आम्हाला परत जाणेही शक्य नव्हते. आमच्या विनंतीवरून त्यानं दहावीस ठिकाणी फोन करून चौकशी केली. कुठे फोन उचलला जात नव्हता तर कुठे माहित नसल्याचं सांगितलं जात होतं.
आम्ही पुढे जायचं ठरवलं. जसं गाव जवळ आलं तसं सीमा सुरक्षा दल, स्थानिक पोलीस सगळे गायब झालेले. प्रशासन, पोलीस, तमाम सरकार गायब. पाचसहा किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या.
चौकशी केली तर गडबड आहे, रस्ता अडवलेला आहे, एव्हढंच उत्तर मिळे. प्रत्येक वाहनचालकाच्या चेहर्‍यावर मुर्तीमंत भिती.
आमचा ड्रायव्हर आसामी होता. गोड आणि कर्तव्यदक्ष युवक. तो म्हणाला, तुम्ही टुरिस्ट असल्यानं तुम्हाला सोडतील.
त्यानं आमची गाडी पुढं काढली आणि गावकर्‍यांनी जिथे रस्ता रोको केलेला होता तिथवर नेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या झाडांना एक दोरखंड बांधून रस्ता अडवलेला होता. पलिकडं खाटा टाकून महिला बसलेल्या होत्या. " आम्हांला शांतता हवी, निष्पाप महिलांच्या हत्त्या थांबवा" असे फलक त्यांच्या हातात होते. बहुतेक सगळ्या मनीपूरी भाषेत बोलत होत्या. एकदोघांना इंग्रजी, हिंदी येत होतं.
आम्ही त्यांच्याशी बोललो. सीमा सुरक्षा दलानं चकमकीत 3 गावकर्‍यांच्या हत्त्या केल्याचा त्यांचा आरोप होता. त्यात एक गरोदर महिलाही मारली गेलेली असल्यानं गावकरी चिडले होते. त्यांच्याशी बोलणी करायला कोणीही सरकारी अधिकारी 3 दिवस झाले तरी फिरकलेला नव्हता. सरकार नावाची गोष्टच तिथं शिल्लक नव्हती.
"अब तुम्हारे हवाले वतन साथियों," असं सरकार रस्ता बंद करणारांना म्हणत असणार. परिसरातले सरकारी अधिकारी, पोलीस आणि सीमा सुरक्षा दलाचे जवान पळून गेलेले. कोणीही वाली नाही अशी अवस्था. अगतिक रस्ता. असहाय्य प्रवाशी.
आम्ही महाराष्ट्रातून आलोय असं सांगून आम्हाला सोडावं अशी विनंती केली. ते म्हणाले, जोवर पोलीस मारले गेलेल्यांची प्रेतं आमच्या ताब्यात देत नाहीत तोवर आम्ही कोणालाही सोडणार नाही. विशेषत: महिला अत्यंत संतप्त होत्या. किती वेळ लागेल काहीच सांगता येत नव्हतं.
मागं जाणं शक्यच नव्हतं.
आम्ही त्यांच्याशी बोलत राहिलो. त्यांना प्रेतावर अंथरायला दुरवरच्या बाजारातून शाली आणायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी आमची गाडी मागितली. गाडी द्यावी तरी धोका आणि नाही द्यावी तरी संकट होतं.
आम्ही गाडी दिली. ड्रायव्हर आणि संभाजीदादा त्यांच्या सोबत गेले.
आम्हाला बसायला युवकांनी खुर्च्या आणून दिल्या. महिला तावातावानं बोलत होत्या. पोलीस प्रशासनाला बहुधा शिव्या घालत असाव्यात. हजारो ट्रक डायव्हर्स चिडीचूप बसलेले होते. वातावरण अत्यंत तणावग्रस्त आणि स्फोटक वाटत होतं.
संभाजीदादानं त्या तरूणांना चहा, तंबाखू दिला. गप्पा मारतामारता आमची सगळी माहिती सांगितली. आम्ही केवळ गरिब मराठी लेखक आहोत याची त्यांना खात्री पटवून दिली. त्यांनी शाली घेतल्या. तासाभरात आमची गाडी परत आली. त्या गावकर्‍यांनी आमची गाडी पलीकडेच दूर थांबवली. आम्हाला चालतचालत नेऊन गाडीत बसवले आणि तुमच्याशी आमचं भांडण नाही, तुम्ही सुखरूप जा असा आम्हाला निरोप दिला.
आणि आमची सुखरूप सुटका झाली.
मिजोराम, नागालॅंड, अरूणाचल प्रदेशला जाण्यासाठी रितसर इनर लाईन परमिटस काढावी लागतात. आम्ही ती काढून ठेवलेली होती. पोलीसांनी आमची सगळी कागदपत्रे तपासली. परमिट तपासले. सगळे ठीक आहे, मात्र पैसे [लाच] घेतल्याशिवाय आम्ही कोणालाही राज्यात प्रवेश देत नाही असं आम्हाला दरडावलं.
आणि सरकारचं अस्तित्व आम्हाला ठळकपणे जाणवू लागले. याला म्हणतात 66 इंची सरकार.
-प्रा.हरी नरके

Saturday, September 16, 2017

सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -


सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची शताब्दी सुरू झाली -
कोल्हापूर संस्थानात शाहू महाराजांनी 11 सप्टेंबर 1917 रोजी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. [क्र.343/123]
तो 29 सप्टें. 1917 रोजी कोल्हापूर राजपत्रात प्रकाशित करण्यात आला.
गाव तिथे शाळा, आईवडीलांनी मुलामुलींना शाळेत न पाठवल्यास दरमहा रू. 1 चा दंड. तो न भरल्यास घरादारावर व जमीनीवर जप्तीची व्यवस्था अशी या कायद्यात तरतूद होती.
ज्याकाळात प्रचंड मोठ्या मुंबई प्रांताचा ब्रिटीश सरकारचा प्राथमिक शिक्षणाचा वार्षिक खर्च रू. 70 हजार होता, त्याकाळात महाराज चिमुकल्या कोल्हापुर संस्थानात प्रा.शिक्षणावर 3 लक्ष रूपये खर्च करीत होते. म्हणजे इंग्रजांपेक्षा 430 टक्के जास्त. प्रा. शिक्षणावर एव्हढा प्रचंड खर्च करणारा जगातला हा एकमेव राज्यकर्ता.
आज महाराष्ट्रात 90 % पेक्षा जास्त साक्षरता आहे त्याचे प्रमुख श्रेय फुले- सावित्रीबाई- गोपाळ कृ.गोखले- सयाजीराव गायकवाड- शाहू महाराज- डॉ.बाबासाहेब आंबेडकर -कर्मवीर भाऊराव पाटील-पंजाबराव देशमुख- स्वामी रामानंद तीर्थ- यशवंतराव चव्हाण आदींना जाते.
वाळूमाफिया, दुधमाफिया, रॉकेलमाफिया, तसे आज जे शिक्षणाचे मॉल उघडून शिक्षण माफियांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे त्याच्यामुळे महाराजांचा हा प्रखर शैक्षणिक ध्येयवाद  बहुजनांकडूनच पराभूत केला जात आहे. शिक्षण हाच एक विनोद आहे असं ज्यांना वाटतं त्यांना या घटनेची आठवणही दिसत नाही.
- प्रा.हरी नरके

Tuesday, September 12, 2017

आरक्षण का?

जातीव्यवस्था ही एखाद्या जिन्यासारखी असते. काही पायर्‍या वर असतात तर काही खाली. तशी तर प्रत्येकच जातीत काही चांगली माणसं असतात आणि काही वाईट. संस्कृतीकरणाच्या सिद्धांतानुसार खालच्या जाती वरच्यांचे अनुकरण करीत असतात. वरच्या जातींकडून जास्त समंजसपणाची, उदारपणाची अपेक्षा असते. महाराष्ट्राला फुले, लोकहितवादी, रानडे, आगरकर, कर्वे, शाहू, शिंदे, बाबासाहेब, सानेगुरूजी यांचा वारसा लाभलेला असल्यानं महाराष्ट्रात जास्त व्यापक सामाजिक भुमिका आढळते. मात्र अलिकडे उलटे अनुभव येऊ लागलेत.
त्याच त्या प्रश्नांची 10 हजार वेळा उत्तरं देऊनसुद्धा पुन्हापुन्हा बालीश प्रश्न विचारले जातात. हे अज्ञानप्रदर्शन खुलेआम चालू असते. त्यामागे बुद्धीभेद करणं, समोरच्याला संभ्रमित करणं आणि पुन्हा आम्हीच किती ज्ञानी असा आभास निर्माण करणं हेही हेतू असतात. खरंतर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या वर्णातील जातींना शिक्षणाचा, संस्कृतीचा प्रदीर्घ वारसा असल्यानं त्यांनी जास्त जबाबदारीनं वागायला हवं. खालच्या जातींमध्ये जास्त जातीयता असते, मग आम्ही ती पाळली तर काय हरकत आहे असा युक्तीवाद करणं हे त्यांना शोभत नाही. व्यवस्था म्हणून नेतृत्वाची जबाबदारी जास्त असते.

खोलेबाईंनी जात विचारली तर चुक मग सरकार कसं विचारतं? खोलेबाई जातीवरून भेदभाव करू शकत नाहीत मग राखीव जागा देऊन सरकार कसं भेदभाव करतं?
असे वरवर निरूपद्रवी दिसणारे पण खोच असलेले प्रश्न छद्मीपणानं विचारून समोरच्याला डिवचलं जातं.
आरक्षणविरोधकांची भारतीय संविधान, आरक्षण नीती, कल्याणकारी राज्य, सामाजिक न्याय याबाबतची समज अतिशय बालीश असते, आकसपुर्ण असते.

प्रश्न- सरकारला जात विचारण्याचा अधिकार आहे तर मग खोलेबाईंना का नाही?
उत्तर- सरकार जर नागरिकांकडून आयकर आणि इतर कर घेतं तर मग अंडरवर्ल्डचे [ उदा. डी गॅंग ] लोक प्रोटेक्षण मनी किंवा खंडणी वसूल का करू शकत नाहीत? सरकार जर कायदे आणि नियम करतं तर मग गुंडानी आपले स्वतंत्र कायदे का करू नयेत? न्यायालयं जर निवाडा करतात तर मग अधोविश्वानं न्यायनिवाडा का करू नये? न्यायालय जर गुन्हेगाराला फाशी देऊ शकते तर मग मी एखाद्याला का ठार मारू शकत नाही? रस्त्यावरून जाताना वाहतुकीचे नियम पाळले नाहीत तर सरकार जर दंड करते तर मग एखाद्या ट्रॅफिक पोलीसाने पैसे खाल्ले तर काय बिघडले? हे प्रश्न जितके बालीश आहेत तितकाच सरकार आणि खोलेबाईबाबतचा वरील मुद्दा पोरकट आहे.
कल्याणकारी, लोकशाही राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सरकार, न्यायव्यवस्था आणि पोलीस प्रशासन निर्माण केलेलं असतं. त्यांना कर घेण्याचा, कायदे बनवण्याचा घटनात्मक हक्क दिलेला असतो. न्यायनिवाडा करण्याचा अधिकार सोपवलेला असतो. सरकार कायदा बनवतं. हा कायदा कोणाही व्यक्तीला हातात घेता येत नाही. अन्यथा अराजक माजेल. जे अधिकार सरकारला असतात ते एखाद्या नागरिकाला नसतात हे साधे तत्वसुद्धा ज्यांना समजत नाही  ते म्हणे बुद्धीमान वगैरे असतात.

आपल्या देशात 4635 जाती आहेत. इमारतीतल्या जिन्यासारखी त्यांची रचना आहे. वरच्या जातींना मानसन्मान, प्रतिष्ठा, शिक्षण, संपत्तीचे विशेषाधिकार दिलेले होते. सर्व स्त्रिया, शूद्र,  ओबीसी, बलुतेदार-अलुतेदार,कारू नारू,  दलित, भटके, आदीवासी यांना आपल्या व्यवस्थेनं शेकडो वर्षे ज्ञानबंदी केलेली होती. त्यांना संपत्ती जमवण्याचा अधिकार नव्हता.[ पाहा-मनुस्मृती, अध्याय 1 श्लोक क्र. 88 ते 91 आणि अध्याय 10 श्लोक क्र. 129 ] परिणामी शेकडो वर्षे त्यांना मानवी अधिकारांपासून वंचित ठेवले गेले. अपमानित केले गेले. या भेदभावामुळे, पक्षपात आणि शोषणामुळे त्यांच्या अनेक पिढ्या बरबाद झाल्या. जो काही अन्याय झाला, त्याची अंशत: भरपाई म्हणुन सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी काही काळासाठी आरक्षण दिले गेले. राजकीय आरक्षणाला कलम 334 नुसार दहा वर्षांची मुदत होती, ती 70 वर्षांपर्यंत वाढवावी लागली. [ इ.स. 2020 पर्यंत ]
शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणाला घटनेनं 10 वर्षांची किंवा अन्य मुदत घातलेली नव्हती. मात्र हेही आरक्षण कायम नाही. पुरेसं प्रतिनिधित्व मिळालं की तेही आरक्षण संपेल. थोडी कळ काढा. ज्यांच्या घामावर, कष्टावर देश उभा राहतो त्यांच्याप्रती थोडी तरी कृतज्ञता ठेवा.
संविधान सभेत, महिला, दलित, आदिवासी आणि ओबीसी यांचे प्रतिनिधी अवघे 10% होते. संविधानात आरक्षणाची ही तरतूद करताना घटना सभेत सवर्ण आणि उच्च जातींचे लोक 90% होते. ते पक्षपाती नव्हते. सुज्ञ होते. त्यांना देशाची काळजी होती. ते सवर्णविरोधी तर नक्कीच नव्हते, हे आजची आरक्षणविरोधी मंडळी समजून घेणार आहेत की नाहीत?
सरकारने जातीपाती नष्ट झाल्याची फक्त घोषणा करून त्या आपोआप जातील काय? नाही.
जातीयतेचा जुनाट रोग अशाप्रकारे झाकून ठेवून नष्ट करता येणार नाही.
तो रोग कायमचा घालवायचा असेल तर शेकडो वर्षे ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना डावलले गेले, आता त्यांना विशेष संधी द्यावी लागेल म्हणून आरक्षण आले.
लगेच गुणवत्तेचे काय? आमच्या मेरीटचे काय? असे प्रश्न विचारले जाऊ लागले.
सगळे शंकराचार्य आणि धर्माधिकारी खुल्या स्पर्धेतून, मेरीटवर निवडले जातात काय? हे धार्मिक आरक्षण नाही? आजही सोवळं पाळणं हा जातीवर्चस्वाचा अवशेष नाही? आजही 99% लग्नं जातीतल्या जातीत होतात, निवडणुका जिंकण्यासाठी जातीच्या मतबॅंका सांभाळल्या जातात.
सर्व जमिनीची मालकी, संसाधनांची मालकी पाणी, उर्जा, संपत्ती उच्च जातीयांच्या पुर्वजांनी फक्त मेरीटवर मिळवलेली आहे काय?
वेरूळ अजिंठा यासारखा जागतिक वारसा खोदणारे, ताजमहाल बांधणारे, उत्तम शेती पिकवणारे, कारखान्यात उत्तमोत्तम उत्पादने करणारे हे दुर्बल समाज घटक गुणवत्ताविहीन आहेत काय? त्यांच्या हातात जादू आहे. शिक्षणाची जोड मिळताच ते उंच झेप घेत आहेत.
भारतरत्न सचिन तेंडूलकर, लताबाई, जे.आर.डी.टाटा यांच्याकडे शैक्षणिक गुणवत्ता नसली तरी ते त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या कौशल्याच्या जोरावर प्रचंड भरारी घेऊ शकले.
परममहा संगणक बनवणारे विजय भटकर आणि मोबाईल संपर्क क्रांतीचे जनक सत्यनारायण पित्रोदा हे ओबीसी समाजातून आलेले आहेत. काय त्यांच्याकडे गुणवत्ता नाहीये? प्रश्न संधी मिळण्याचा असतो. आरक्षण म्हणजे एक संधी असते. आरक्षण फक्त प्रवेशाला असते. पास होताना सर्वांना एकच निकष असतो.
मनुस्मृतीने निर्माण केलेला उच्च वर्णांसाठीच्या पक्षपाती आरक्षणाचा इतिहासातला पायंडा बदलून सामाजिक न्यायासाठी काहीकाळ दुर्बलांना आरक्षण काय दिले तर किती आदळआपट करायची? समर्थ भारतदेश आणि एकात्म समाज उभा करण्यासाठी ह्या उपाययोजनेकडे समंजसपणे बघा. देश म्हणजे फक्त दगडधोंडे नसतात. ज्यांना देशातल्या आपल्याच भावंडांबद्दल कणव नसते, संवेदना नसते ते कसले देशभक्त?
सरकारला जात विचारावी लागते ती केवळ जाती चोरून बोगस लोकांनी हे सामाजिक प्रतिनिधित्वासाठी दिलेले आरक्षण पळवू नये यासाठी.
क्रमश:--
प्रा. हरी नरके

Friday, September 8, 2017

वाद धर्मश्रद्धेचा की खुळचटपणाला धार्मिक मुलामा देण्याचा?


स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी प्रथमच पुण्यात हवामान शास्त्रज्ञ डॉ.मेधा खोले या धर्ममार्तंड बाईंच्या म्हणे तथाकथित धार्मिक भावना एका स्वयंपाकीणीने दुखावल्या. डॉ. मेधाबाईंनी थेट पोलीसात तशी तक्रारच दाखल केली. केटरर मराठा बाईंनी स्वत:चे आडनाव यादवऎवजी कुलकर्णी सांगून मेधाबाईंचा धार्मिक कार्याचा 6 वेळा स्वयंपाक केला. त्यांना मेधाबाईंनी त्याचे 15 हजार रुपये दिले. त्यामुळे पितरांचा अपमान झाला. कारण मेधाबाईंच्या घरात विधवा चालत नाहीत, स्वयंपाक ब्राह्मण बाईनेच सोवळे नेसून करायचा असतो. इ.इ. म्हणे हा त्यांचा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यांची फसवणूक आहे.
खोलेबाई जेव्हा स्वत:च्या घरी कामासाठी दुसरी व्यक्ती नेमतात तेव्हा ती केवळ त्यांची खाजगी जागा राहत नाही. ती कायद्यानुसार घरेलू कामगाराची कामाची जागा म्हणजेच सार्वजनिक जागा बनते. त्यामुळे अशा जागेत केलेला जातीय भेदभाव हा भारतीय राज्यघटनेचा भंग ठरतो. खोलेबाईंचा गुन्हा तिहेरी आहे. त्या लिंगभाव, जात आणि वर्गीय भावनेने ग्रस्त असल्यानं त्यांनी हा फसवणूकीचा गुन्हा दाखल केलेला आहे. खरंतर पोलीस यंत्रणाही पक्षपातीपणाने वागलेली आहे. मालकाने दिलेली तक्रार दखलपात्र मात्र त्याचवेळी नोकरानं दिलेली तक्रार अदखलपात्र हा विधवेला आणि गरीबांना कमी लेखणारा भेदभाव का? करार कायद्यात कुठेच सोवळ्याओवळ्याला मान्यता नसल्यामुळे पोलिसांनी मेधाताईंची ही तक्रार दाखल करण्यापुर्वी सोवळ्याच्या कायदेशीरपणाविषयी शहानिशा करुन घेतली काय?
पोलीसांना दिलेल्या स्वत:च्या जबानीत डॉ.मेधा खोले या निर्मला यादव यांचा उल्लेख अनेकदा एकेरी करतात. वारंवार त्या निर्मलाबाईंच्या जातीचा आणि स्वयंपाकी ब्राह्मणच हवा असा जातीचा मुद्दा काढतात.
धर्मशास्त्राप्रमाणे दोघीहीजणी स्त्रिया असल्यानं शूद्र आहेत हो मेधाताई!

खरंतर हा खुळचटपणा विरूद्ध आधुनिकता असा वाद आहे. एक क्लास वन शास्त्रज्ञ बाईच आपल्याला विधवा चालत नाही असं म्हणुन दुसर्‍या बाईचा अपमान करीत असेल तर कर्वे -आगरकर-रानडे सारेच कपाळाला हात लावून बसले असतील.

सोवळ्यामागे स्वच्छतेचा मुद्दा असेल तर यादव बाईंनी स्वच्छता पाळलेली आहे.  स्वयंपाक वाईट केला किंवा कामात हलगर्जीपणा केला अशी मेधाबाईंची तक्रारच नाहीये. तक्रार आहे जात, सोवळं आणि विधवा असण्याची!

एरवी सोवळ्यामागे स्वच्छता हा एक मुद्दा असेलही. पण प्रमुख मुद्दा जाती वर्चस्वाचा आणि जातीय अहंकाराचा असतो.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 13,14,15,16 अन्वये मेधाबाईंनी जात आणि विधवापण यावरून केलेली निषिद्धता हा गंभीर दंडनीय गुन्हा आहे. या केसमध्ये निर्मलाबाईंनी खोटी जात सांगून फसवणुक केली हा भारतीय कायद्यात सोवळ्याओवळ्याला मान्यता नसल्यानं मुळात गुन्हाच होत नाही. अशा ठिकाणी जात विचारणं हाच गुन्हा आहे. यात कसलीही फसवणूक झालेली नाही.

मेधाबाईंना घटनेच्या कलम 25 अन्वये विवेकाचा आणि धर्मस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्यांनी स्वत: सोवळं नेसावं, पुजा कशी करावी, याचा तो अधिकार आहे. निर्मलाबाईं त्यांचा स्वयंपाक करीत होत्या. तो चांगला असल्यानंच त्यांना पुन्हापुन्हा काम देण्यात आलं. निर्मलाबाई त्यांच्या देवघरात घुसलेल्या नाहीत. त्यांनी मेधाबाईंच्या सोवळ्याला हात घातलेला नाही. आक्षेप घेतलेला नाही. निर्मलाबाईंनी सोवळं नेसणं हा जर धार्मिक गुन्हा असेल तर मग मेधाबाईंनी उच्चशिक्षण घेणं हा अधिकार कोणतं धर्मशास्त्र देतं? त्यामुळे धर्मस्वातंत्र्याचा भंग झाल्याचा मेधाबाईंचा हा चक्क कांगावा आहे. त्या उच्चपदस्थ बाई असल्यानं पोलीस त्यांच्या दबावाला बळी पडलेले आहेत. निर्मलाबाईंनी कायद्यानुसार कसलाही गुन्हा केलेला नाही. आपला देश संविधानानुसार चालतो, धार्मिक कायद्यानुसार नाही.

आपला हा समाज आधुनिक व्हावा यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, शिंदे, सानेगुरूजी, आगरकर आदींनी अपार खस्ता खाल्लेल्या आहेत. मेधाबाई त्या विसरलेल्या दिसतात.

मेधाबाईंनी सोवळं नेसावं की नाही, त्यांनी देवघरात पुजा कशी करावी, त्यांनी स्वत: धार्मिक स्वयंपाक कसा करावा हा विषय असता तर धार्मिक भावनांचा मुद्दा ठीक होता. आईवडीलांबद्दल तुम्हाला आदर आहे ना मग स्वत: स्वयंपाक करा ना! मृत व्यक्तींसाठी जिवंत माणसांच्या प्रतिष्ठेला बाधा कशी आणता येईल? दुसर्‍यांची जात काढण्याचा अधिकार कोणता कायदा मेधाबाईंना देतो?
आधी यादवबाईंच्या घरी जाऊन नीट पाहणी करून मगच त्यांना मेधाबाईंनी हे काम दिले. यादवबाईंच्या कामाच्या दर्ज्याबद्दल आजही मेधाबाईंची कोणतीही तक्रार नाहीये.

मुद्दा आहे कंत्राटी काम देण्याचा आणि काम चोख बजाऊन घेण्याचा. का विशय करार कायद्यात येतो. मात्र काम देताना अशा सोवळ्याओवळ्याच्या / जातीपातीच्या अटी घालणे हाच मुळात गुन्हा आहे. तेव्हा गुन्हा यादवबाईंनी केलाय की मेधाबाईंनी?
यादवबाईंच्या घरी जाऊन त्यांना मारहाण करणे, धमक्या देणे, कामाचे ठरलेले पैसे न देणे, शिवीगाळ करणे हे गुन्हे मेधाबाईंनी केलेयत अशी तक्रार यादवबाईंनीही पोलीसात दाखल केलेलीय. या दोन्ही तक्रारीतलं खरंखोटं आता कोर्टात ठरेल.

मेधाबाई उद्या खुळचटपणानं म्हणतील, स्वयंपाकाला वापरलेले धान्य, भाजीपाला हे पिकवणारा शेतकरीही सोवळं घातलेला असावा, त्यात विधवा नकोते. उद्या त्या असंही म्हणतील की पुजेला वापरलं जाणारं पुणे मनपाचं पाणी सोडणाराही त्यांना सोवळंवाला हवाय. मग फुलं आणून देणारा माळीही सोवळंवाला का नको? त्यातही सुवासिनीच हव्यात.
पुजेचं दुध ते सोवळ्यातल्याच आणि सुवासिनी गाईचंच हवं.

जे लोक अंधश्रद्धेतून किंवा जातीप्रेमातून मेधाबाईंचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करतात तेही इतर जातीयवादी संघटनांच्या हातात कोलीतच देत आहेत. मेधाबाईंच्या समर्थनात उतरलेले हे उच्चशिक्षित खुळचट लोक बघून आपण आजही किती मागासलेले आहोत हेच सिद्ध होते. विवेक हरवून जातींच्या लढाया करायच्या की विवेक आणि आधुनिकतेच्या आधारे जातीनिर्मुलन करायचे हे ठरवायला हवं. मेधाबाई तुमच्या अशा खुळचट वागण्यामुळे तुम्ही आधुनिक आणि प्रागतिक लोकांना लाज आणता आहात.
सगळ्याच जातीत चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. म्हणून एका बाईच्या वागण्यासाठी सगळ्या जातीलाच टार्गेट करणं हाही जातीयवादच झाला.

मेधाबाई, तुम्ही काय पंचांगांच्या आधारे पावसाचा अंदाज सांगत होतात काय? तुमचे शेकडो अंदाज चुकले म्हणून आम्ही तुमच्यावर फसवणूक केल्याचे खटले भरावेत काय?

कृपाकरून तुमच्या खुळचटपणाला धार्मिक भावनांचा मुलामा देऊ नका. हा वाद मुळात जात-धर्म यांचा नसून आधुनिकता आणि सनातनीपणा यांच्यातला आहे.

-प्रा.हरी नरके

Wednesday, August 2, 2017

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली-- डॉ. रखमाबाई जनार्दन सावे


नाही चिरा नाही पणती....
ब्रिटीश काळात भारतीय महिलांच्या आरोग्याचं चित्र काय होतं?

एका बकरीचं बाळंतपण हॉस्पीटलमध्ये करण्यात आलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आणल्या गेल्या.  का?

एकदा देवीची महाभयंकर साथ आल्यानं हजारो महिला आजारी पडल्या. त्यांना औषधं कोण आणि कशी द्यायचं माहित आहे?

आजारी महिलेला पडद्याआड बसवलं जायचं. पुरूष डॉक्टर दुसर्‍या पडद्यामागे असायचा. त्याच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधलेली असायची. आजारी बाई पडद्याआडून आपला एक हात बाहेर काढायची. पडद्याआडून पुरूष डॉक्टर तो हात तपासायचा आणि इंजेक्शन द्यायचा. या कामावर देखरेख करायला चार हिजडे नेमलेले असायचे.

बाळंतपणात लाखो महिला मरायच्या. डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी महिलांनी दवाखाण्यात येऊन बाळंत व्हावे म्हणून परोपरीनं  लोकांना विनवलं. पण हॉस्पीटलमध्ये  भुतबाधा होईल अशा अंधश्रद्धेमुळे एकही गरोदर महिला बाळंतपण करायला तयार नसायची.
त्या काळात बाळंत झालेल्या महिलेला 40 दिवस हॉस्पीटलमध्ये  देखरेख आणि औषधोपचार यांच्यासाठी ठेवलं जायचं.

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी हॉस्पीटलमध्ये पहिलं बाळंतपण कसं केलं असेल?

तर त्यांनी एका बकरीचं बाळंतपण या हॉस्पीटलमध्ये केलं आणि त्याच्या ठळक बातम्या सर्व वर्तमानपत्रांमध्ये छापून आणल्यावर महिलांची भीती कमी झाली. काही पारशी बायकांची अतिशय निगुतीनं बाळंतपणं त्यांनी केल्यावर मग हळूहळू हिंदू, मुस्लीम आणि इतर समाजातल्या गरोदर महिला या हॉस्पीटलमध्ये येऊ लागल्या.

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे   [ जन्म 22 नोव्हेंबर 1864, मृत्यू 25 डिसेंबर 1955]
पहिल्या भारतीय महिला डॉक्टर ज्यांनी आयुष्यभर रूग्णसेवा केली--

पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई गोपाळ जोशी यांचं नाव घेतलं जातं. त्यांचं धैर्य, त्यांचा त्याग आणि त्यांचं वैद्यकिय शिक्षण मोलाचंच. दु:खाची गोष्ट अशी की डॉक्टर होऊन परदेशातून भारतात परत येतानाच डॉ. आनंदीबाई आजारी पडल्या. भारतात येऊन एकही पेशंट त्या तपासू शकल्या नाहीत. 3 महिन्यातच वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांचं दु:खद निधन झालं. [डॉ. आनंदीबाई जोशी, जन्म 31 मार्च 1865- निधन 27 फेब्रुवारी 1887]

1889 मध्ये इंग्लंडला जाऊन वैद्यक शास्त्रातील एम.डी. ही पदवी घेऊन 1894 मध्ये भारतात आलेल्या मुळच्या मुंबईच्या असलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांनी मुंबईच्या कामा हॉस्पीटलमध्ये आणि सुरत व काठेवाडमध्ये आयुष्यभर रूग्णसेवा केली. असंख्य अडचणींना तोंड देत वैद्यकिय शिक्षण घेऊन  त्या ज्ञानाचा उपयोग भारतीयांना आयुष्यभर करून देणार्‍या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना आपण सारे का बरं विसरलो?

त्या आयुष्यभर प्रॅक्टीस करणार्‍या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर असूनही सरकार आणि समाज यांच्यालेखी नाही चिरा नाही पणती....

अगदी महिला चळवळीलासुद्धा त्यांचा विसर का पडावा ?

"डा.रखमाबाई :एक आर्त" नावाचं एक मौलिक पुस्तक त्यांच्यावर निघालं आणि त्याचीही फक्त पहिली आवृत्ती 1982 साली प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्या पुढच्या आवृत्त्या निघाल्या नाहीत. असं का?
डा. रखमाबाईंच्या एक नातेवाईक प्रा. मोहिनी वर्दे यांनी खुप मेहनत घेऊन हे संदर्भ पुस्तक लिहिलं. 222+16+[10 आर्टप्लेटसचं] पृष्ठांचं हे पुस्तक. किंमत रूपये 24 मात्र. पॉप्युलर प्रकाशन, मुंबई.
प्रकाशकांना, वैद्यक विश्वाला किंवा स्त्रीमुक्ती चळवळीला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती काढावी असं का वाटलं नाही? आजच्या स्त्रीमुक्ती चळवळीतल्या किती महिलांनी आणि पुरूषांनी हे पुस्तक वाचलंय? हे पुस्तक आज फारसं कु्ठंच का मिळत नाही?

सुमारे दिडशे वर्षांपुर्वी मुंबईत जन्माला आलेल्या आणि 91 वर्षांचं दिर्घायुष्य लाभलेल्या डॉ. रखमाबाई जनार्दन सावे यांना सरकार आणि समाज म्हणून आपण चक्क विसरून गेलो.

रखमाबाईंचा बालविवाह झालेला होता. वयात आल्यावर त्यांनी मला उच्च शिक्षण घ्यायचंय म्हणून मी नांदायला जाणार नाही अशी भुमिका घेतली.
नवरा दादाजी न्यायालयात गेला. रखमाबाई केस हरल्या.

उच्च न्यायालयात अपिल करण्यात  आल्यावरही त्या परत हरल्या.
न्यायालयाने त्यांना नांदायला जा नाहीतर न्यायालयाची बेआदबी केली म्हणून तुरूंगात जा असा कडक पवित्रा घेतला. त्या तुरूंगात जायला तयार झाल्या.

पुढे न्यायालयाबाहेर तडजोड झाली.

त्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेल्या.

स्त्रीहक्कांच्या इतिहासात हा खटला जगभर गाजला. आणि तरिही आजची स्त्री चळवळ  आणि वैद्यकविश्व  डॉ. रखमाबाई जनार्दन सावेंना विसरून गेले.....

भारतात ज्यांच्यामागे त्यांची जात उभी नसते त्यांना कोणीच वाली नसतं का?

पाचकळशी [माळी] समाजानं डॉ. रखमाबाई नवर्‍याकडं नांदायला गेल्या नाहीत म्हणून त्यांना माळी जातीतून बहिष्कृत केलं.

डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे डॉ. रखमाबाईचे सावत्र पिता. त्यांचे जन्मदाते वडील जनार्दन सावे हे डॉ. रखमाबाई लहान असतानाच वारल्यानं त्यांच्या आईनं डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी पुनर्विवाह केला. डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांनी वैद्यक शास्त्रावर 6 मौलिक ग्रंथ लिहिलेले आहेत.
- प्रा.हरी नरके
................................