Sunday, July 5, 2020

अमेरिका, दिल्ली, मुंबईहून आंबेडकरी विचारवंत, स्कॉलर्स, अधिकारी, नेते लिहितात-








सर , जयभीम !

आपली चूक नसतानाही चळवळीच्या भल्याचा विचार करुन आपण समंजसपणाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही आणखी मोठे व्हाल व तुमची विश्वासार्हतादेखील वाढेल.
तथाकथित आपल्या जातीची माणसे ब्राह्मण्यग्रस्त संघटना तसेच गैर फुले - आंबेडकरवादी संघटनांसोबत असताना त्यांबाबत सोईस्कर मौन बाळगणारे तुम्हाला प्रमाणपत्र द्यायला उत्साहाने पुढाकार घेतात तेव्हा त्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते.


आमच्या नात्यांत तसेच परिचितांमध्ये व्यसनाधीन पती व त्यांचा कौटुंबिक हिंसाचार सहन करणाऱ्या महिलांची संख्या फार मोठी आहे. मुंबईत आम्ही आदर्श जयंती अभियान चालवताना प्रत्येक वस्तीत व्यसनाचा मुद्दा हमखास चर्चेला येतो. काही मंडळांना तर ‘दारु पिणाऱ्यांना जयंती मिरवणुकीत स्थान नाही ‘ असे जाहिर करावे लागते ! यांवरुन हा दारुचा रोग व त्याचे दुष्परिणाम यांची तीव्रता समजून येते.  रोगाचे अस्तित्व नाकारणे वेगळे व रोगावर उपाय करणे वेगळे ! जे रोगाचे अस्तित्वच नाकारतात त्यांच्याकडून उपायांची अपेक्षा ती काय करणार ? असो.


शेवटी प्रामाणिक प्रश्नांना सहज उत्तरे देता येतात. परंतु हितसंबंधी व्यक्तींचे प्रश्न वेगळे असतात व कितीही तर्कशुद्ध उत्तर दिले तरी त्यांचे समाधान होत नसते !

भविष्यात अशा व्यक्तींकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे उचित राहिल, असे वाटते.

एकाच वेळेस आपण सर्वांचे समाधान करु शकत नाही.

शेवटी तथागत सम्यक संबुद्ध यांची अनित्यता आपणांस देखील लागू आहेच !

आम्ही आपल्या सोबत आहोत.

आपले,

१- शुद्धोदन आहेर.

२- संजय गायधनी.

३ - वैशाली गेडाम (पीएच.डी. स्कॉलर, अमेरिका)

४ - अशोक अंकुश.

५ - डॉ. हेमलता माहिश्वर, नवी दिल्ली.

६- उपाली जी उर्फ एस एस धवराळ.

७- संदीप हिरे.

८- दिपक गांगुर्डे.


Friday, July 3, 2020

मुंबई, ठाणे, कल्याण व नाशिकमध्ये गरिब वस्त्यांमध्ये कार्यरत बौद्ध भगिनींचे इमेलद्वारे आलेले पत्र-










आचरणशील " आदर्श बौध्द " म्हणजे आमचे आदरणीय नरके सर !


जयभीम, नरके सर!
              चळवळीच्या अनुषंगाने आपली भाषणे ऐकण्याचा, ग्रंथसंपदा वाचण्याचा व काही प्रसंगी भेट घेण्याचाही योग आला. पुराव्यानिशी मांडलेले तुमचे तर्कशुद्ध युक्तीवाद व प्रत्यक्ष भेटीतील पारदर्शक वागणे या गोष्टी मनाला स्पर्शून गेल्या. खरे तर तुमचे युक्तीवाद ऐकून आम्ही अनेकांना बदलवण्याचा प्रयत्न केला. त्यात कधी यश आले तर कधी अपयश, हा भाग वेगळा.

               बौद्ध समाजातील दारु पिऊन महिलांना मारहाण करणाऱ्या पुरूषांविषयी तुम्ही २६ जून २०२० च्या फेसबुक पोस्टमध्ये योग्य तेच म्हटले आहे. महिला म्हणून हे दु:ख आम्ही वर्षानुवर्षे सहन करीत आहोत. आमच्या या दु:खाची जाणीव स्वत:ला बौद्ध म्हणविणाऱ्या काही व्यक्तींना होऊ नये, याचे खूप वाईट वाटले. जे आपल्या समाजातील महिलांच्या दु:ख- वेदनांबाबत योग्य भूमिका घेऊ शकत नाहीत त्यांच्यावर आमचा विश्वास नाही.

भले त्यांनी कितीही मोठ्याने गौतम बुद्ध, महात्मा फुले, डाॅ आंबेडकर यांच्या नावाचा गजर केला तरीही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. ज्यांना दारु पिऊन पत्नीला मारहाण करणाऱ्यांचे अप्रत्यक्ष समर्थन करावेसे वाटते त्यांना स्त्रियांना भिक्खूसंघाचे दार सताड उघडे करणाऱ्या गौतम बुद्धांचे, क्रांतीज्योती सावित्रीमाईंना घडविणाऱ्या महात्मा फुलेंचे व हिंदू कोड बिलासाठी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या डाॅ आंबेडकरांचे अंत:करण कधीच समजू शकणार नाही.
       

नरके सर, दिलगिरी व्यक्त करुन आपण आमच्या दृष्टीने आणखी मोठे झाला आहात.                     
     

शेवटी एकच सांगावेसे वाटते. जगाला व हरी नरकेंनाही फसवणे सोपे आहे. परंतु स्वत:ला फसवणे कठीण व अयोग्यदेखील असते. ही जाणीव सर्वांना होवो, अशी मंगल कामना !

    १) रजनी कांबळे.
    २) अश्विनी मून.
    ३) शीला भगत.
    ४) शर्मिला होवाळ.
   ५) शालिनी वज्रचित्त.
    ६) राजश्री कांबळे.
    ७) निवेदिता बच्छर.

Thursday, July 2, 2020

प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी, उभारला भव्य बुद्धविहार









हिंगोलीच्या पिंपळदरीत उभारला भव्य बुद्धविहार, प्रा. हरी नरके यांच्या भाषणाने जमली वर्गणी

मराठवाड्यातील हिंगोलीच्या बर्‍याच गावांना विद्यापीठाच्या नामांतरविरोधी दंगलीची झळ बसलेली होती. त्यातून सावरण्यासाठी कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी संघटना उभारण्यासाठी विविध उपक्रम सुरू केले.


यावेळी २००३ साली सर्व तरूणांना प्रा. हरी नरके यांचे व्याख्यान ऎकवण्यात आले. त्यांच्या व्याख्यानाने तरूण इतके भारावुन गेले की विहारासाठी उत्स्फुर्तपणे वर्गणी जमू लागली. तरूणांनी केलेल्या श्रमदानातून व स्वत:च्या वर्गणीतून अतिशय भव्य बुद्धविहार उभा राहिला. असा बुद्धविहार की ज्याची किर्ती जगातल्या १६ देशात पोचलेली आहे.

या उपक्रमाला सर्व स्थानिक नागरिक व जयाजीराव पाईकराव, साहेबराव कांबळे, न्या.एम.एल.भगत व इतरांचा हातभार लागला. गावातील गरिब महिला शांताबाई महादू खिल्लारे यांनी आपले मंगळसुत्र विकुन विहाराच्या बांधकामाला देणगी दिली.

Wednesday, July 1, 2020

मी कृतज्ञ आहे--दिलगिरी

सप्रेम जयभीम. नमो बुद्धाय.
गेल्या ४० वर्षात आंबेडकरी बौद्ध चळवळीतील भावांनी व बहिनींनी मला अमाप प्रेम, आपुलकी, मानसन्मान दिला. त्यांनीच मला मोठे केले.
या प्रबोधनाच्या चळवळीतून मला खूप काही शिकता आले. मी नामांतर आंदोलनात तुरूंगवास भोगला होता याला आता ३८ वर्षे झाली. मी या माझ्या भावंडांचा तसेच वडीलधार्‍यांचा कृतज्ञ आहे.
माझ्या २६ जून २०२० च्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांवरील लेखातील दहाव्या मुद्द्यात मी व्यसनाधिनता, घरेलू महिला कामगारांच्या हिंसाचाराचे दु:ख आणि इतर मुद्दे उपस्थित केले होते.
मी ते सर्व मुद्दे मागे घेत असून माझ्या सर्व प्रिय बौद्ध बांधवांची दिलगिरी व्यक्त करीत आहे.
भवतु सब्ब मंगलम!
- प्रा. हरी नरके

Monday, June 29, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके



" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) ...............................

शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,

Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )

Thursday, June 25, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके




" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) .............................................




शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,
२५/६/२०२०