Saturday, October 27, 2018

पुरस्कार




[१] १९४० सालची घटना. राज्य पातळीवरची एक कादंबरी लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्याकाळात ५०० रूपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती. अनेक नव्या जुन्या साहित्यिकांनी स्पर्धेत भाग घेतलेला होता.
स्पर्धेचा निकाल घोषित झाला.
आज ज्या कादंबरीला मराठीतील श्रेष्ठ आणि अभिजात कलाकृती मानली जाते त्या रणांगणला हा पुरस्कार विभागून मिळाला होता. कादंबरीकार विश्राम बेडेकर काहीसे खट्टू झाले. त्यांनी परिक्षक कोण होते अशी संयोजकांकडे चौकशी केली.
नाव कळले- साहित्यसम्राट न.चिं.केळकर आणि वि.सी.गुर्जर हे परिक्षक होते.
बेडेकर काय बोलणार?
पुरस्कार जिला विभागून मिळालेला होता ती दुसरी कादंबरी होती, पाणकळा, र.वा. दिघे यांची. हीही आज मराठीतील श्रेष्ठ आणि अभिजात कादंबरी ठरलेली आहे.

र.वा.दिघेंचे नाव तेव्हा अगदीच नवखे होते. त्यांना फारसे कोणी ओळखतही नव्हते. जमखिंडीच्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार होते. रेल्वेत आणि बसमध्ये काही नामवंत साहित्यिक मंडळी दिघे आणि पाणकळा यांची यथेच्छ टिंगलटवाळी करीत होते. दिघे मात्र शांतपणे ही निंदानालस्ती ऎकत होते.
या टिंगलखोरांचे नेतृत्व करीत होते, वि.स.खांडेकर.
त्यावेळी आपण पाणकळाला कमी लेखले हे आपले चुकलेच असे खांडेकरांनी पुढे जाहीरपणे कबूलही केले.

२. अनंत काणेकर हे नामवंत आणि पट्टीचे व्याख्याते होते.
ते झेवियर्स कॉलेजात शिकत असताना महाविद्यालयाने वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. रू.२५ चा पहिला आणि रू.२० चा दुसरा पुरस्कार देण्यात येणार होता.
तथापि या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
तेव्हा काणेकर आणि त्यांचे मित्र मोतिराम कर्णिक अशा दोघांनीच आपली नावे स्पर्धेत दाखल केली.

त्यांनी आपापसात ठरवून घेतले होते की पहिला आणि दुसरा क्रमांक कोणालाही मिळो पुरस्काराची रक्कम मात्र रूपये २२.५०/- अशी आपण समसमान वाटून घ्यायची.
आणि तसेच झाले.
-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment