Monday, October 29, 2018

सरदार पटेल, पंडीत नेहरू आणि परस्परपूरकता



१. काँग्रेस पक्षसंघटनेवर सरदार पटेलांची मजबूत पकड होती. पक्षाची बांधणी, शिस्त, पक्षनिधी, दैनंदिन कामकाज यावर पटेलांचे बारीक लक्ष असे.घटना सभेवर निवडून आलेल्यांपैकी ७० ते ७५ टक्के प्रतिनिधी हे पटेलांना मानणारे होते. त्यातल्या बहुतेकांची सरदारांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा होती. त्यांचे म्होरके पटेलांना भेटले व नेहरूंऎवजी तुम्ही पीएम व्हा असा आग्रह करू लागले.
पटेलांनी त्यांची समजूत घातली. "नेहरू प्रचंड लोकप्रिय नेते आहेत. तुम्ही जरी माझ्याशी एकनिष्ठ असलात तरी लोकशाहीत सर्वात महत्वाची असते ती जनता. आणि आपल्या पक्षाला भरभरून मतं देणारी जनता नेहरूंकडे बघून तुम्हाला मला मतं देत असते. तेव्हा नेहरूंनीच पंतप्रधान होणं लोकशाहीसाठी सर्वोत्तम आहे."
२. काँग्रेस पक्षातर्फे संविधान परिषदेवर निवडून आलेल्यांमध्ये १०० जण बॅरिस्टर होते. स्वत: नेहरू, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद आणि पटेल बॅरिस्टर होते. महात्मा गांधी घटना परिषदेचे सदस्य नसले तरी ते पक्षाचे सर्वोच्च नेते होते आणि तेही बॅरिस्टर होते.
एकदा पक्षातले काही बॅरिस्टर्स पटेलांकडे तक्रार घेऊन गेले. आपल्या पक्षात इतके घटनातज्ञ बॅरिस्टर्स असताना त्यांच्यावर अन्याय करून तुम्ही पक्षाबाहेरच्या एका बॅरिस्टरला देशाचे कायदामंत्रीपद, घटना मसुदा समितीचे अध्यक्षपद आणि मसुदा छाननी समितीचे अध्यक्षपद दिले हा निष्ठावंतावार "अन्याव" असल्याचा त्यांचा दावा होता.
पटेलांनी त्यांना सांगितले, "तुम्ही बॅरिस्टर्स आहात, घटनातज्ञ आहात म्हणूनच तुम्हाला आम्ही घटनासभेवर घेतलेले आहे. तुमच्या ज्ञानाचा उपयोग देशाला झाला पाहिजे. आपल्या सरकारचे मंत्रीमंडळ सर्वोत्तम आणि प्रातिनिधिक असायला हवे म्हणूनच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, श्री बॅनर्जी या पक्षाबाहेरच्या मान्यवरांना निमंत्रित केलेले आहे. फाळणीची जीवघेणी जखम आणि राष्ट्रीय एकात्मतेची सध्या देशाला असलेली सर्वोच्च आवश्यकता यासाठी आपल्याला समावेशक आणि समंजस राहायला हवे. आडमुठेपणा आणि हेकेखोर वृत्ती देशाला घातक ठरेल. आपण लोकशाही समाजाची पायाभरणी करतो आहोत. पक्षहितापेक्षा देशहिताला सर्वोपरी महत्व द्यायला शिका. आपल्या पक्षाबाहेरचे हे लोक जागतिक पातळीवरचे एक्सपर्ट आहेत. त्यांची देशाला गरज आहे.म्हणूनच आम्ही सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतलेला आहे."
तरिही बॅरिस्टर्स लोकांची नाराजी काही गेली नाही. काही जण बंडाची भाषा करू लागले.
तेव्हा पटेलांनी त्यांना शांतपणे पण जरबेच्या भाषेत सांगितले, "राजकारणात उतावळेपणाने नुकसान होते. गडबड कराल तर तुम्हाला माहितच आहे की तुमच्या पक्षाचे आम्ही पाचही श्रेष्ठी
बॅरिस्टर्सच आहोत. तुमची वकीली उत्तम चालते म्हणून भविष्यातला मजबूत, एकात्म व समृद्ध भारत घडवण्यासाठी द्रष्टी राज्यघटना लिहिण्याची क्षमता तुमच्याकडे आहे असा भ्रम बाळगू नका. या दोन बाबींची गल्लत करू नका. माझी मू्ठ झाकलेली आहे, ती तशीच राहू द्या."

-प्रा.हरी नरके, २९ ऑक्टोबर २०१८

No comments:

Post a Comment