Wednesday, June 26, 2019

शाहुजयंतीचे जनक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



माणगाव, जि.कोल्हापुर येथील परिषदेनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी "मुकनायक"चा राजर्षी शाहु महाराज विशेषांक काढायचे ठरवुन महाराजांना पत्र लिहिले. हेच पत्र हा अभ्यासकांसाठी पुरावा म्हणुन पुढे महत्वाचा दस्तावेज ठरले. माणगाव परिषदेत डॉ. बाबासाहेबांनी शाहुराजांचा वाढदिवस सण उत्सव म्हणुन साजरा करण्याचा ठराव केला होता. शिवजयंती सुरु करणारे महात्मा फुले आणि शाहुजयंती सुरु करणारे डॉ. बाबासाहेब ही वैचारिक विण समजुन घेतली पाहीजे.
कोल्हापुर सोडुन अन्यत्र शाहुजयंती होत नसे. मी स्वत: राज्यात सर्वत्र शाहुजयंती करण्याची मागणी करणारे पत्र तत्कालीन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांना समक्ष भेटुन १९ वर्षांपुर्वी दिले. त्याचा जी. आर. काढावा यासाठी मी पाठपुरावा केला. मला त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. भुषण गगराणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तेव्हा शाहुमराजांची जन्मतारिख २६ जुलै मानली जात असे. त्याप्रमाणे पहिला जी. आर. निघाला. शाहुजयंती शासनातर्फ़े सुरु झाली.
आम्हाला खुप आनंद झाला.
श्री. सुशिलकुमार शिंदे, मुख्यमंत्री व श्री. छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री असताना मी मागणी करुन शासनाला हा दिवस "सामाजिक न्यायदिवस" म्हणुन घोषित करायला लावला. त्याकामी ज्येष्ठ आय.ए.एस.अधिकारी डॉ. संजय चहांदे जे तेव्हा मुख्यमंत्री सचिवालयाचे उपसचिव होते, त्यांची फ़ार मदत झाली.
पुढे डॉ. बाबासाहेबांचे हे पत्र वाचताना लक्षात आले की, डॉ. बाबासाहेबांनी शाहुमहाराजांची जन्मतारिख २६ जुन नोंदवली आहे. डॉ. बाबासाहेब लिहिताना फार काटेकोर असत. महाराजांचे अधिकृत चरित्रकार आण्णासाहेब लठ्ठे, धनंजय कीर,रमेश जाधव,जयसिंगराव पवार, य.दि.फडके, कृ.गो.सूर्यवंशी, आदींनी नोंदवलेली २६ जुलै ही जन्मतारिख चक्क चुकली होती. एकटे डॉ. बाबासाहेब तेव्हढे बरोबर होते, हे संशोधनातुन सिद्ध झाले. माझे मित्र श्री. खांडेकर यांनी त्यासाठी अपार परिश्रम घेतले. आम्ही त्यांचा त्यासाठी कोल्हापुरात भव्य सत्कार केला होता. माझ्याच हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता.
पुन्हा शासनदरबारी हेलपाटे मारुन त्यानुसार आम्ही जी. आर. बदलुन घेतला व शाहुराजांची जयंती २६ जुनला करु लागलो.
या सर्व कामात कोल्हापुरचे श्री. बाबुराव धारवाडे यांचा उल्लेख केला पाहीजे. तसेच आमचे मित्र भिकशेट पाटील, डॉ. रमेश जाधव, डॉ. जयसिंगराव पवार, खराडे, कणबरकरसर, विजय चोरमारे, श्रीराम पचिंद्रे, यांचा व सध्याचे श्री. शाहुमहराज यांचाही ॠणनिर्देश केला पाहिजे.
-प्रा.हरी नरके, २६ जून २०१९

No comments:

Post a Comment