Monday, July 6, 2020

आदर्श शिक्षण पद्धती गुरूकुलाची की नालंदाची? - प्रा.हरी नरके





प्राचीन भारतीय शिक्षण पद्धतीबद्दल, गुरूकुलाबद्दल, नेहमीच गौरवोद्गार काढणारे माझे मित्र खालील गोष्टींबद्दल कधी आत्मपरीक्षण करणार?


१. जी शिक्षण पद्धती आदर्श मानली जात होती, त्या गुरूकुलांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य मुलांनाच प्रवेश होता. तिथे मुलींना व शूद्र-अतिशूद्रांना प्रवेश नव्हता. देशाच्या लोकसंख्येत सुमारे ८५ टक्के असलेल्या वरील समाजघटकांना शिक्षणाच्या बाबतीत बहिष्कृत मानणारी व्यवस्था आदर्श कशी काय असू शकते?


२. गुरूकुल शिक्षणात ज्ञानाच्या संदर्भातील शिक्षण असले तरी तिथे कला-कौशल्ये-शेती-उद्योगाचे शिक्षण दिले जात होते काय? नसल्यास जीवनात यशस्वी होण्यासाठी यांची गरज नसते काय?


३. गार्गी-मैत्रेयी, यादव कुळातील श्रीकृष्ण अशी मोजकी, शेलकी, अपवादात्मक उदाहरणे देऊन समर्थनपर सूर लावू नका. मी धर्मशास्त्राचा अभ्यासक आहे. मला आत्मपरीक्षणात्मक मांडणी अभिप्रेत आहे.


४. रामायण - महाभारतातील द्रोणाचार्य-एकलव्य, शंबूक-राम ही उदाहरणे प्रसिद्ध आहेत. शंबूक प्रकरण प्रक्षिप्त आहे वगैरे सांगून माझी समजूत घालण्याआधी ते प्रक्षिप्त नेमके किती वर्षांपुर्वी रामायणात समाविष्ट झाले याचे नेमके वर्ष सांगता का? ते नंतर आले असले तरी त्यालाही शतके लोटलीत. तेव्हा ते नंतरचेसुद्धा समाजमनावर परिणाम करीत होते हे कसे नाकारता येईल?


५. जुनी मूल्यव्यवस्था आणि आधुनिक मुल्यव्यवस्था यांची मला गल्लत करायची नाही. तथापि ती जुनी मूल्ये आज २०२० मध्ये आदर्श नाहीत एव्हढे तरी मान्य करणार की नाही?


६. द्रोणाचार्यांनी एकलव्याकडे गुरूदक्षिणा मागितलेली नव्हती. पगार मागितलेला होता. त्यांनी जर एकलव्याला शिकवण्याचे कामच केलेले नव्हते तर ते त्याच्याकडे पगार कसा काय मागू शकत होते? " काम नाही तर पगार नाही, "  हे नितीमूल्य त्यांना लागू नव्हते काय?


७. या पार्श्वभुमीवर सर्वसमावेशक, गुणत्तापुर्ण आणि ज्ञानासहीत कौशल्यांचे शिक्षण देणारी नालंदा, तक्षशिला, विक्रमशीला, सोमपुरा विद्यापीठे, किंवा शिक्षणाचा पॅटर्न मला तरी आदर्श वाटतो. तुम्हाला काय वाटते? कमेंटमध्ये अवश्य लिहा. मूल्यमापनात्मकही कमेंट करा.

-प्रा.हरी नरके, ६/७/२०२०


छायाचित्र सौजन्य- सुभाषचंद्र सोनार, शाम कांबळे

No comments:

Post a Comment