Sunday, March 11, 2018

कुमार केतकर- हाडाचे पत्रकार


कुमार केतकर- हाडाचे  पत्रकार, आक्रमक पण व्यासंगी संपादक व मैदानी वक्ता-

35 वर्षांपुर्वीची गोष्ट. रूईया महाविद्यालयाने आयोजित केलेल्या नियोजित वक्तृत्व आणि उत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेत कुमार केतकरांची प्रथम भेट झाली. ते स्पर्धेचे परीक्षक होते नी मी स्पर्धक.
मला प्रथम क्रमांकाचा करंडक मिळाला होता.

पुरस्कार वितरण समारंभानंतर दादर रेल्वे स्टेशनपर्यंत आम्ही दोघेही पायी चालत बोलत, गप्पा मारत गेलो होतो. त्यावेळचा त्यांचा आपुलकीचा, सहजपणाचा आत्मिय स्वर आज 35 वर्षांनी सुद्धा तसाच ओला आणि आत्मिय आहे.

त्यांना म.टा., लोकसत्ता अशा अनेक मोठ्या वर्तमानपत्रांच्या संपादकाच्या खुर्चीत बसलेले असतानाही अतिशय साधेपणानं वागताना बघितलंय.
झरा आहे मुळचाच खरा.

अफाट व्यासंग, आक्रमक वक्तृत्व, व्यापक आणि विशाल सहिष्णु वृत्ती, सर्वांशीच वागताना असलेला ओलावा हे त्यांचे दुर्मिळ गुण. पक्की वैचारिक निष्ठा असलेला आणि भुमिका घेणारा विचारवंत.
आपल्या मतांशी मात्र कायम ठाम. वैचारिक आवडी-निवडी टोकदार.

एकदा आम्ही एका हॉटेलमध्ये बसून गप्पा मारत होतो. वादाचा मुद्दा निघाला नी आमचे दोघांचे आवाज तापले. आणिबाणी, मंडल आयोग, ओबीसी राजकारण हे आमच्यातले मतभेदाचे मुद्दे.  एकमताच्या, सहमतीच्या जागा मात्र शेकडो. दोघांचाही चढा सूर लागला. दोघेही अतिशय तावातावने बोलत होतो. आपापले मुद्दे घट्ट धरून होतो.
मॅनेजरला वाटले आमचे कडाक्याचे भांडण चाललेय. तो आम्हाला समजवायला लागला. जाऊ द्या सर. भांडण नका करू.

आम्ही दोघेही हसू लागलो. नी एकाच आवाजात म्हणालो, तुम्ही चिंता करू नका. आम्ही एकत्र जेवन करून मग एकत्रच बाहेर जाणार आहोत.
त्याला समजेनाच की आमचे काय चाललेय ते. आम्ही आपापल्या मुद्द्यांवर ठाम होतो पण आमच्यातली दोस्ती पण घट्ट होती.

नागपूरला एका शिबिरात मी त्यांच्यावर कडक टिका केली. तर संयोजकांनी मला चिठ्ठी दिली, ते आपले पाहुणे आहेत, जास्त टिका करू नका. मी ती चिठ्ठी जाहीरपणे वाचून दाखवली तर केतकर उभे राहिले नी म्हणाले, आयोजकांनी काळजी करू नये, त्यांना खर्पूस टिका करू द्या, मी त्यांना तेव्हढेच तिखट उत्तर देईन. तुम्ही आमच्यात पडू नका. आम्ही जिवलग मित्र आहोत. पण भरपूर भांडत असतो. असे शेकडो अनुभव.

प्रमिती "तू माझा सांगाती" मध्ये काम करीत होती तेव्हा ते आवर्जून आणि नियमितपणे ती मालिका बघायचे आणि तिचे काम का आवडते यावर तिला सविस्तर सांगायचे.

देश वैचारिक असहिष्णुतेच्या अंधारातून जात असताना  संसदेच्या वरिष्ठ सभागृहात केतकर नक्कीच त्याविरुद्ध जोरदार आवाज उठवतील. हा बुलंद आणि समाजशील आवाज संसदेत घुमेल याचा मनस्वी आनंद वाटतो.

-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment