Wednesday, March 7, 2018

पुतळ्यांचे शहर-पुणे - प्रा. हरी नरके



पुणे हे पुतळ्यांचे शहर. जितके पुतळे या एका शहरात आहेत तेव्हढे जगातल्या कोणत्याही शहरात असणं शक्य नाही. या पुतळ्यांवर राम नगरकर एक कार्यक्रम करायचे.
पुण्याच्या मंडईला आचार्य अत्र्यांनी महात्मा फुल्यांचे नाव दिले. त्या मंडईत लोकमान्य टिळकांचा पुतळा आहे. धमाल म्हणजे या दोघांनीही 1880 च्या दशकात ही मंडई बांधायला कडाडून विरोध केलेला होता.
मंडईपेक्षा शाळा आणि दवाखाने जास्त गरजेचे आहेत असे फुले म्हणत होते तर सदाशिव- शनवार पेठांच्या जवळ मंडई नको, त्यामुळे शांतताभंग होईल, अस्वच्छता माजेल असे टिळक म्हणत होते.
इंग्रज सरकारने दोघांचेही ऎकले नाही. मंडई बांधली. एकदा आमची सहल या मंडईत गेली होती, तेव्हा आमचे शिक्षक सांगत होते, मुलांनो, ही आहे पुण्याची मंडई. ती जोतीराव फुल्यांनी नी बाळ गंगाधर टिळकांनी बांधली. म्हणून एकाचे नाव दिलेय नी दुसर्‍याचा पुतळा उभारलाय.

पुणे नगरपालिकेचे सदस्य केशवराव जेधे यांनी 1925 साली पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारावा असा ठराव मांडला. रावबहादूर आपटे नगरपालिकेचे अध्यक्ष होते. त्यांनी विरोध केला. सत्ताधारी पक्षाचे आणि हिंदुत्ववादी विचारांचे सदस्य गणपतराव नलावडे, बाबुराव फुले यांनी या ठरावाला विरोध केला. ठराव फेटाळला गेला. महात्मा फुल्यांची बदनामी करणारी 3 पुस्तके प्रकाशित करण्यात आली. त्यावर लेखक म्हणून गणपतराव नलावड्यांचे नाव असले तरी त्याचे घोस्ट रायटर वेगळेच होते.
कोल्हापूरला फुले पुतळा उभारा असे हिनवले गेले.
महात्मा फुले पुतळ्याचा ठराव आणून पुणेकरांची बदनामी केली असा ठपका ठेऊन जेध्यांचा निषेध करणारा ठराव मंजूर करण्यात आला.
हा संदर्भ लक्षात ठेऊन 1969 साली माळीनगर साखर कारखान्याने पुणे मनपा मुख्यालयातला पुतळा भेट दिला.
इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात.
पुणे विद्यापीठात महात्मा फुले यांचा पुतळा बसवायला कुलगुरू नरेंद्र जाधव यांनी विरोध केल्याने तयार असलेला पुतळा चार वर्षे मुर्तीकाराच्या स्टुडीओत पडून होता.

. अलका सिनेमागृहाच्या जवळच्या चौकात पुर्वी राधेचा पुतळा होता. ती खुप ऎटीत उभी असायची. तिच्या मागे सेनापती बापटांचा पुतळा उभा केला गेला. राधेची अशी जिरली की ती म्हणाली, मला इथून हलवा, म्हणून बहुधा तिचा पुतळा तिथून हलवला गेला.

. तिथून जवळ असलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा अर्धपुतळा आहे. शास्त्रीबुवा पट्टीचे लेखक. किती दणकट अहंकार. निबंधमलेत त्यांनी भविष्य वर्तवले होते, मि. जोती फुले यांचा टिचभरसुद्धा पुतळा कोणी उभा करणार नाही. काळाचा महिमा बघा, महात्मा फुल्यांचा पुर्णाकृती पुतळा 31 मे 1969 ला पुणे मनपा मुख्यालयात उभारण्यात आला. नी खुद्द शास्त्रीबुवांचा मात्र टिचभर पुतळा त्यांनी स्थापन केलेल्या शाळेने उभारलेला आहे.
. सारसबागेच्या चौकात सावरकरांचा पुतळा आहे. मूठ आवळलेल्या अवस्थेत. जणू तो सांगतोय, जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडा.

. शिवाजीनगर कोर्टाच्या शेजारी कपाळाला हात लावलेला कामगाराचा पुतळा आहे. जणू तो सांगतोय, वाडवडील म्हणायचे, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. त्यांचं ऎकलं नाही. आणि ही अवस्था आली.
. पुणे रेल्वे स्टेशनसमोर महात्मा गांधींचा पुतळा आहे. तो वेगाने चालताना, बहुधा पळताना दाखवलाय. जणु तो म्हणतोय, नेहमीप्रमाणे रेल्वे लेट आली. आता बस पकडायची तर पळतच जायला हवं.

. अभिनव महाविद्यालयाच्या चौकात वसंत दादांचा पुतळा आहे. हातात काठी आहे. जणू म्हणतोय, मी त्यांनाच पुढचा सीएम करणार होतो. पण पाठीत खंजीर खुपसला ना त्यांनी. आलोच जरा पाठीला बाम लावून.
. त्या मागच्या चौकात बाबुराव सणस उभे आहेत. जुन्या जवाहर हॉटेलकडे लक्ष ठेवून. जणू म्हणताहेत, बारीक लक्ष ठेवावं लागतं पोरांकडं. नेम नाही कायकाय उद्योग करतील.

. स्वारगेटच्या चौकात केशवराव जेधे आणि शनिवार वाड्यापुढे काकासाहेब गाडगीळ उभे आहेत. जणू म्हणताहेत, जेधे -गाडगीळ जोडी फुटली नी पुण्यातून काँग्रेस संपली.
. शनिवारवाड्यापुढे थोरले बाजीराव घोड्यावर उभे आहेत. आता या शनिवारवाड्यात काही दम राहिला नाही. माझ्या मस्तानीला यांनी पाबळला हाकललं. मीही निघालो तिकडे असे म्हणताहेत जणू.

[क्रमश:]
-प्रा.हरी नरके
.......................

No comments:

Post a Comment