Sunday, October 18, 2020

आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका


Arun B.khore - महामानवाची गौरव गाथा : आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला न्याय देणारी महामालिका-

विसाव्या शतकातील मानवी हक्कांचे अग्रणी नेते आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील 'महामानवाची गौरव गाथा ',ही स्टार प्रवाह वाहिनीवरील टीव्ही मालिका शनिवार १७ ऑक्टो. २०२०रोजी  ३४३व्या भागाबरोबर संपणार आहे. मे २०१९ मध्ये ही मालिका सुरू झाली. यावर्षी लॉकडाऊनचा काही काळ वगळता ती नियमितपणे सुरू होती.

बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणातील आणि विद्यार्थी दशेतील त्यांना बसलेल्या अस्पृश्यतेच्या जातीय चटक्यांची तपशीलवार कहाणी या मालिकेतून महाराष्ट्राला आणि मराठी भाषिक असलेल्या जगातील सर्वच लोकांना ज्ञात झाली असेल यात शंका नाही.

आंबेडकरांची शिक्षणातील ओढ,  ज्ञानार्जनाचे त्यांचे विलक्षण भान आणि त्यानंतर या देशातील अस्पृश्य समाजाला सामाजिक न्याय देण्याची  त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यांचा एक अतिशय सुंदर असा पट या मालिकेच्या निमित्ताने आपल्या समोर आला.

ही मालिका निर्माण करणारे दशमी क्रिएशनचे सर्व निर्माते-दिग्दर्शक, ही मालिका लिहिणारा लेखक वर्ग, यातील सर्व कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आपण केले पाहिजे.

टीव्ही वाहिन्यांच्या अलीकडच्या काळात एखाद्या महापुरुषाची इतकी तपशीलवार चित्रण करणारी मालिका ह्या निमित्ताने पहिल्यांदाच बघायला मिळाली आहे, यासाठी देखील निर्माता-दिग्दर्शक लेखकांचे मी अभिनंदन करेन.

आपल्याकडे प्राचीन  इतिहासातील आणि मध्ययुगीन इतिहासातील अनेक महान व्यक्तींवर मालिका निर्माण झाल्या  आहेत. काही महिन्यांपूर्वी संपलेली  संभाजी महाराजांवरील मालिका ही  यातील एक अशीच विशेष महत्त्वाची होती, असे मला वाटते. त्यापूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांवर देखील अशीच एक  महान मालिका निर्माण केली होती.

या दरम्यानच्या काळात संत तुकाराम चरित्रावरही एक मालिका आपण पाहिली आहे. अर्वाचीन काळातील महान व्यक्तिमत्वावर चित्रपट किंवा अशा दीर्घ टीव्ही मालिका निर्माण करणे तसे सोपे नाही. तरीही आपल्याकडे काही चित्रपट निर्माण झाले आहेत.

महात्मा गांधी यांच्यावर निर्माण केलेला रिचर्ड अटनबरो यांचा 'गांधी',हा  साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा ठरला.

यानंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधीही असा एखादा पूर्ण लांबीचा चित्रपट निर्माण झाला पाहिजे, अशी मागणी केली  गेली. यातूनच डॉ. जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केलेला हिंदी आणि इंग्रजीमध्ये असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपट निर्माण झाला. यात बाबासाहेबांची भूमिका करणाऱ्या मामुटी या दाक्षिणात्य अभिनेत्याचे विशेष कौतुक झाले आणि ते यथायोग्य होते.

बाबासाहेबांच्या भूमिकेचे आव्हान स्वीकारणे आणि त्या भूमिकेत शिरून ही व्यक्तिरेखा साकारणे हे खरोखर अवघड काम आहे. मामुटी या अभिनेत्याने तो ठसा निश्चित उमटवला.

काही वर्षांपूर्वी राज्यसभा टीव्हीने  विख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्याकडून 'संविधान',ही मालिका तयार करून घेतली होती. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीची एकूण प्रक्रिया याचा लेखाजोखा मांडणारी ही एकूण दहा भागातील मालिका राज्यसभा टीव्हीवर  प्रसारित झाली  होती. या मालिकेत बेनेगल यांचे दिग्दर्शकीय कौशल्य अतिशय वेगळेपणाने आपल्यासमोर येते. ही मालिका हिंदी आणि इंग्रजीमध्ये होती. आंबेडकरांची भूमिका सचिन खेडेकर यांनी केली होती. माझ्या दृष्टीने एखाद्या सक्षम अभिनेत्याने बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला इतका सुंदर न्याय त्यापूर्वी कधी दिला, असे म्हणता येत नाही. या मालिकेतील सगळीच व्यक्तिमत्वे ही  भारताचा इतिहास घडवणारी होती. त्यात राजेंद्रप्रसाद होते, नेहरू होते, पटेल होते आणि  गांधीजी तर होतेच होते! शिवाय के एम मुनशी होते,राजकुमारी अमृत कौर होत्या, दुर्गाबाई देशमुख होत्या. अशा अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या प्रभावाने  ही संविधान सभा भरलेली होती. या संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष असलेले आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जो ठसा ही मालिका पाहताना आपल्या मनावर उमटतो, तो केवळ अपूर्व आणि असाधारण असाच होता! सचिन खेडेकरने अप्रतिम अशी भूमिका साकार करून आंबेडकरांच्या बौद्धिक कौशल्याचे सगळे तेज या व्यक्तिरेखेत ओतले होते.

या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे  चरित्रकार असलेले चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या बारा खंडीय अशा आंबेडकर चरित्राच्या आधारे साकार होणारी ही मालिका पाहण्याची उत्सुकता होती. 

फुले-आंबेडकर चरित्राचे संशोधक अभ्यासक हरी नरके यांच्या संशोधनाच्या आधारे या मालिकेला आणखी एक परिमाण लाभले होते. आंबेडकरांच्या लेखन आणि भाषणांच्या विविध खंडातील अनेक संदर्भ त्यांच्यामुळे या मालिकेच्या तपशिलात जोडता आले.

अपर्णा पाडगावकर, शिल्पा कांबळे यांचे लेखन, आनंद शिंदे यांचा बाबासाहेबांचा गौरव करणारा पहाडी स्वर, अतिशय सुंदर अशी नेपथ्य रचना, वेशभूषा आणि या सर्वांना उत्कृष्ट न्याय देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारणारे सर्व कलावंत यामुळे  अतिशय सुंदर अशी ही मालिका निर्माण निर्माण होऊ शकली.

चांगदेव खैरमोडे यांनी बाबासाहेबांच्या चरित्राचे काही खंड बाबासाहेब आहे तसाच गेले होते हयात असतानाच केले होते लिहिले होते त्यासंबंधी ते बाबासाहेबांची बोलले होते या बारा खंडातून बाबासाहेबांच्या स्वभावांची वेगळे वैशिष्ट्ये आपल्या लक्षात येतात त्याचे अनेक पैलू या मालिकेतील त्यामुळे आपल्याला दिसू शकतात खैरमोडे यांनी लिहून ठेवले आहे थंड लिहून ठेवले होते ते पण त्यांच्या हयातीत आरंभीचे दोन खंड प्रकाशित झाले त्यानंतरच्या काळात त्यांच्या पत्नी द्वारकाबाई यांनी उर्वरित खंड प्रकाशित केले बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी त्यांच्या ज्ञानू साधनेचा बैल समजण्यासाठी पहिले समजण्यासाठी खैरमोडे यांचे हे चरित्र खंड वाचायलाच पाहिजेत असे आहेत आंबेडकर महामालिका निर्माण करताना निर्माता-दिग्दर्शकांनी या खंडांचा आधार घेऊन, आंबेडकरांच्या जीवनसंघर्षाला अतिशय सुयोग्य असा न्याय दिला आहे असे मी म्हणेन.

या मालिकेच्या निमित्ताने काही ठळक गोष्टी सांगायला पाहिजेत. एक म्हणजे, बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांचे बाबासाहेबांच्या जडण-घडण यातील योगदान. त्याबरोबरच रामजीच्या भगिनी मीराताई यांनी छोट्या भिवाला वाढवण्यासाठी घेतलेले कष्ट आणि त्याच्या शिक्षणासाठी असलेली त्यांची ओढ या गोष्टी हे पैलू प्रकर्षाने अधोरेखित झाले आहेत. रामजी सुभेदाराची भूमिका करणारे मिलिंद अधिकारी आणि मीरा आत्याची भूमिका करणाऱ्या पूजा नायक या दोन्ही कलावंतांनी अनेक प्रसंगात आपले डोळे ओले  केले आहेत. अतिशय समर्थपणे या भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या अंतकरणातही घर केले.

बाबासाहेबांचे लग्न रमाबाईंशी झाले. या रमाबाईंची भूमिका शिवानी रांगोळ  या अभिनेत्रीने अतिशय सक्षमपणे साकार  केली. बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेच्या काळात, ते अमेरिकेला शिक्षणासाठी तीन वर्षे वास्तव्याला असताना रमाबाईंनी जे सोसले त्याची  किंचितही तमा न बाळगता आपल्या बाबासाहेबांसाठी त्या काम  करत राहिल्या, त्याचे मोल हे खूप मोठे आहे आणि आणि शब्दांच्या पलीकडचे! रमाबाईंच्या जीवनातील ताणतणाव आणि कुचंबणा याचे याचे अतिशय संयमित आणि बोलके असे भावदर्शन शिवानीने ही व्यक्तिरेखा साकारताना घडवले, त्याबाबतीत तिचे विशेष कौतुक केले पाहिजे.

या मालिकेला " माझा भीमराया", हे शीर्षक गीत देणारे आनंद शिंदे,उत्कर्ष शिंदे या दोन्ही प्रतिभावान बंधूंचे मुद्दाम अभिनंदन करायला हवे.आनंद  शिंद्यांचा पहाडी सुर बाबासाहेबांच्या व्यक्तित्वाची उंची आपल्यासमोर जणू उभी करतो. या मालिकेतील संवाद लेखक हे अनेक जरी असले तरी एकूण लेखन आणि संवाद यांचे धागेदोरे जोडलेले राहतील, याची दक्षता घेतली गेली आहे. 

बाबासाहेबांचे जीवन हे  कोलंबिया विद्यापीठातून भारतात परतल्यावर सार्वजनिक स्वरूपाचे झालेले होते. त्यामुळे त्यांच्या भाषणातील विविध संदर्भ, विविध समित्यासमोर त्यांनी मांडलेले मुद्दे, गांधीजी आणि नेहरू यांच्याशी त्यांची होणारी चर्चा आणि वादविवाद या सर्व गोष्टी कंटाळवाण्या न होता त्याला संवादी सूर असला पाहिजे, ही  काळजी या मालिकेच्या लेखकांनी खूप चांगली घेतली आहे. भारताच्या विसाव्या शतकातील सामाजिक क्रांती घडवणारा एक महापुरुष म्हणजे डॉ.आंबेडकर आणि त्यामुळे या मालिकेलाही एका  सामाजिक संदर्भाचे मोल आपोआप प्राप्त झाले आहे. त्याचे खरे बळ या संवादलेखन आणि मालिकेच्या एकूण सादरीकरणातही आपल्याला जाणवते.

बाबासाहेब आंबेडकर यांची व्यक्तिरेखा साकारणारे तरुण अभिनेते सागर देशमुख यांनी मात्र या मालिकेतील भावपूर्ण अभिनयाचा उत्तुंग बिंदू गाठून साऱ्या प्रेक्षकांच्या मनात बाबासाहेबांची एक प्रतिमा निर्माण केली आहे. सर्वांना ठाऊकच आहे की, या सागर देशमुखने दोन वर्षापूर्वी पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा भाई या  चरित्रपटात साकार केली होती. तोच का हा सागर देशमुख; इतके भूमिकेचे परकाया प्रवेशाचे रूप या मालिकेत सागरने  साकारलेल्या आंबेडकर यांच्या भूमिकेत दिसते. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठात अखंड अभ्यास करणारे बाबासाहेब, त्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्याबरोबर संस्थानात अपमान सोसून आपले जीवन जगणारे आंबेडकर आणि नंतर शोषित वंचितांच्या लढाईत मूकनायक ,माणगाव परिषद या माध्यमातून आपले जीवितकार्य शेवटपर्यंत पुढे नेणारे बाबासाहेब असेच सगळे टप्पे आपल्या भूमिकेतून आणि विशेषत: मुद्रभिनयाच्या समर्थ आविष्कारातून सागर देशमुख यांनी सादर केले. खरोखर काळजाला पीळ पडावा असेच त्यांचे या मालिकेतील अखेरच्या काही भागातील व्यक्तित्वदर्शन घडत होते.

अलीकडच्या काही वर्षात आपल्या अंत:करणात ठसा उमटेल अशी बाबासाहेब आंबेडकर यांची ही भूमिका सागर देशमुखने सादर करून मोठे योगदान दिले आहे. ही मालिका संपत असताना आपल्या अंतःकरणाला स्पर्श करणाऱ्या या  मालिकेतील विविध अभिनेत्यांच्या, विविध प्रसंगातील भूमिका आपल्याला आंबेडकरांच्या प्रेरणादायी गौरवगाथेची नेहमीच आठवण करून देत राहतील. 

या मालिकेची निर्मिती करणे हे खरोखर अवघड आणि आव्हानात्मक असेच काम होते. दशमी क्रिएशन्सचे  नितीन वैद्य आणि त्यांचे सहकारी, विविध भागांचे दिग्दर्शक, लेखक, संगीतकार आणि अर्थातच कलावंत या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

सागर देशमुख याला आंबेडकरांच्या भूमिकेसाठी नजीकच्या काळात विविध पुरस्कारांनी गौरवले गेले तर आश्चर्य वाटणार नाही. आंबेडकरांचे या मालिकेतील संदर्भ आता डिजिटल स्वरूपात आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी कायम राहतील, हा याचा फार मोठा सामाजिक असा लाभ आहे हेही यानिमित्ताने नमूद करू इच्छितो.

अरुण खोरे (दलित चळवळींचे अभ्यासक आणि लेखक),पुणे. संपादक : लोकशाहीसाठी समंजस संवाद,पुणे.

(शनिवार, दि.१७ ऑक्टोबर २०२०)

मित्रांनो, डॉ. आंबेडकर यांच्यावरील महामालिका काल संपली,३४३ व्या भागाबरोबरच.या निमित्ताने एक लेख लिहिला होता, तो अक्षरनामा या पोर्टलवर  प्रसारित झाला. तो येथे पोस्ट करत आहे.

(रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२०)


No comments:

Post a Comment