Wednesday, June 24, 2020

एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत?

Pi Vitthal यांची खालील पोस्ट पाहावी.
" काही लोकांचे आपल्याविषयीचे पूर्वग्रह इतके पक्के असतात की, आपल्या कोणत्याच दखलपात्र कृतीला, सर्जनशील निर्मितीला प्रतिसाद देण्याची त्यांची इच्छा नसते. म्हणजे फेसबुकच्याच भाषेत सांगायचं तर 'कॉमेंट' वगैरे तर सोडाच ; पण साधं 'लाईक' करण्याचं सौजन्यही ते दाखवत नाहीत. आणि आपण तर त्यांना वर्षानुवर्ष जवळचं समजत राहतो. (इतरांविषयीचा एवढा 'आकस' कसा काय रुजत जातो माणसांत? )
दुर्दैवाने अशी माणसं आपल्या भोवतालात खूप असतात. त्यात आपल्या जवळचे 'मित्र' असतात. काही 'आदरणीय' ज्येष्ठ असतात. काही तथाकथित 'थोर' असतात.
तर असो. सर्वांचं भलं होवो. !
तुमचं मत यापेक्षा वेगळं आहे? 😊 - पी. विठ्ठल "

.......

मी त्यांच्या भिंतीवर दिलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे-
पि.विठ्ठल: तुमची पोस्ट आणि त्यावरच्या बहुतेक सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या.
दोनतीन वर्षांपुर्वी मीही अशीच खंत मांडणारी पोस्ट केली होती, तेव्हा असे लक्षात आले की * एकुणच दाद देण्याच्या बाबतीत पंजाबी लोक, उत्तरेतले लोक आघाडीवर आहेत. मराठी फारच कद्रू आणि कंजूष लेकाचे.


१) काही अभिरूचीसंपन्न मित्रमैत्रिणी जरी लाईक/कमेंट देत नसले तरी ते वाचत असतात. त्यांच्या लक्षातही असते. भेटल्यावर सांगतातही.

२) तुमच्या पोस्टवर व्यक्त झालेले, या भावनेशी सहमत असलेले यांची संख्या कितीतरी मोठी आहे. ( ४९३ लाईक/३१४ कमेंट ) मग त्यांची हीच तक्रार असूनही ते तरी एरवी का बरं इतरांना लाईक/कमेंट देत नसतील?


३) वाचलेले आवडले की उत्स्फुर्तपणे दाद देणे हा माणसाचा सहज भाव आहे. ती दाबणारे मला तरी निरामय/निकोप मनाचे वाटत नाहीत. अशी दाद दाबून ठेवण्यासाठी या मंडळींना फार मोठी मानसिक तयारी करावी लागत असेल. दाद देण्याची कळ दाबून ठेवायचा त्रासही होत असेल. त्यांच्या या त्रासाचा सहानुभुतीपुर्वक विचार व्हावा.

४) माझे पुस्तक प्रकाशित झाल्यावर माझ्या एका मित्राने त्याच्या शंभर प्रती विविध नामवंतांना पाठवल्या होत्या. ज्यांना हे भेट पुस्तक मिळाले त्यातल्या पाचदहा जणांनीही दाद सोडा साधी पोचही दिली नाव्हती. पण पुढे हे पुस्तक गाजले.त्याला अनेक पुरस्कार मिळाले, नामवंतांनी लिहिलेली परीक्षणे आली, त्यानंतर मात्र त्याच्याकडे बघण्याचा याच लोकांचा दृष्टीकोन बदलला.


५) मात्र दुसरीकडे माझा लेख वाचून तू यावर पुस्तक लिही असे कळवणारे पु.ल.होते. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते पुस्तकावर इतकं भरभरून बोलले की त्या कार्यक्रमात पुस्तकाच्या पाचशे प्रती विकल्या गेल्या. पुढे पुरस्कार आणि परीक्षणांमुळे महिनादीड महिन्यात तीन हजारांची आवृत्ती संपली. मी जयवंत दळवींना पुस्तक द्यायला गेलो तर त्यांनी ते आधीच विकत घेऊन वाचलेले होते, असेही सुखद अनुभव आहेतच.


६) विश्राम बेडेकरांची रणांगण प्रकाशित झाल्यानंतर ती बरी आहे असे म्हणणारा कोणीही नव्हता. अशी २०/२५ वर्षे गेली. मग पहिला निघाला. दुसरा..तिसरा.. निघत गेले. आज रणांगण किती उंचीवर आहे बघा.


७)सार्वजनिक जीवनातली बधीरता,संवेदनहिनता खरंच वाढतेय की तशी फक्त तक्रार वाढतेय, शोधावं लागेल.


८) आणखी खूप लिहिता येईल. पण त्यातले बरेच मुद्दे येऊन गेलेत. खरंच चांगलं लिहिलंय अनेकांनी. ते मुद्दे रिपिट न करता त्यांना पाठींबा देतो.


* उलट मी फारच जास्त लोकांना भरभरून दाद देतो अशी तक्रार माझे काही मित्र करत असत. आजही करतात. मी म्हणे सर्वांनाच चांगले म्हणतो, त्यामुळे तुझी दाद सवंग आहे असं एक जवळचा समीक्षक-ग्रंथविक्रेतामित्र मला म्हणतो. असेलही.


मित्रवर्य अशोक नायगावकरांच्या एका किश्याने समारोप करतो. रस्त्यावर एकजण पकडा पकडा असं ओरडत असतो. पळणाराला लोक पकडतात. कायरे काय चोरलंस म्हणुन विचारतात. तो म्हणतो, मी काहीच चोरलं नाहीय, मागचा धापा टाकत पोचतो. लोक म्हणतात, हा तर चोरी केलीच नाही म्हणतोय. धापा टाकणारा म्हणाला खरंय. चोरलं नाही पण त्याची कविता ऎकवली आणि माझी न ऎकताच पळत होता लेकाचा! कविमित्रांनो, किस्सा माझा नाही,कवी अशोक नायगावकरांचा आहे. तेव्हा रागावू नका.

-प्रा. हरी नरके,
२४/६/२०२०

No comments:

Post a Comment