Tuesday, August 14, 2018

कारगिल हिरो जाकीर हुसेन नाईक-

" अल्ला हो अकबर " या मेजर अजितसिंगच्या पहिल्या आरोळीला सर्व भारतीय सैनिकांनी प्रतिसाद दिला. "अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर," च्या निनादाने कारगिलचा सारा परिसर दणाणून गेला होता. ग्रेनेडिअरचे जवान आपल्या संगिनी काढून पाकीस्तानी सैनिकांवर तुटून पडले होते. शत्रूवर प्राणघाती वार करून त्यांचा खातमा करण्यात ते गढले असतानाच 1/11 जी. आर. ची गुरखा कंपनीही या मोर्चाजवळ पोहोचली होती.

"आयो गुरखाली," चे पडसाद "अल्ला हो अकबर" मध्ये मिसळून गेले.

भारताचा जो टायगर हिल पाकच्या ताब्यात गेलेला होता तो पॉइंट 5250 कब्ज्यात घेऊन पहाट फुटायच्या आत भारतीय सैन्याने कारगीलची हरलेली लढाई जिंकलेली होती.

पराभवाचे यशात रूपांतर घडवून आणण्यात येथे मुख्यत्वेकरून दोन घटक कारणीभूत झाले. पहिला दुर्दम्य आशावाद. भारतीय जवान जाकीर हुसेन नाईक हे त्याचे प्रातिनिधिक रूप. दुसरा म्हणजे युद्धशास्त्रातला पहिल्या दहा मुलतत्वांपैकी एक असलेला नियम "विस्मय" ["सरप्राईज"] चा परिणामकारक वापर.

प्रतिकूल परिस्थितीत बुद्धीच्या जोरावर पाक सैनिकांना आचंबित करणारा हा देशभक्त भारतीय जवान होता जाकीर हुसेन नाईक.

22 ग्रेनेडिअरची भारतीय कंपनी संपूर्णपणे मुसलमान जवानांची होती. त्यांचे नेते होते मेजर अजितसिंग. किर्र अंधारात रात्री नऊ वाजता भारताने पाकवर चढाई केली. प्राण पणाला लावून शत्रूशी लढणारे दहा भारतीय जवान दोन तासात शहीद झाले होते. अठरा गंभीररित्या जखमी झालेले होते. काहीतर जबर जखमी झालेले होते. भारताचा संपुर्ण पराभव झालेला होता.

तथापि या पराभवाने न खचता मेजर अजितसिंगांनी टॅक्टीकल माघार घेतली होती. डोंगराच्या एका कड्याखाली त्यांनी आसरा घेतला. जखमी सैनिकांवर औषधोपचार चालू होते. 27 वर्षे वयाचा एक तरणाबांड जखमी जवान सरपटत त्यांच्याजवळ आला.
" साब, आपकी अनुमती हो तो और एक कोशीश करते हैं. खुदा रहमतगार हैं. आलातालाकी दुवा होगी तो हमारी जरूर फतेह होगी."

मेजर अजितसिंग यांच्या गंभीर जखमा ठणकत होत्या. ते थकलेले होते. पुन्हा हल्ला करण्याच्या मनस्थितीत ते अजिबात नव्हते.

पण जाकीरची आयडिया डोकेबाज होती. गनिमी कावा.
रिस्क घ्यायला हरकत नव्हती. बिनबोभाट, गनिमी काव्याने पाकवर अचानक हल्ला करायचा. शत्रूला चकित करून सोडायचे. त्याला काही कळायच्या आत शत्रू खतम करायचा.

"साब, मै ऎसे वापस इंडीया नही जाऊंगा. करेंगे या मरेंगे. जितकरही अपने मुल्कमें जायेंगे साब. नही तो यही मर मिटॆंगे मेजरसाब."

जाकीर हुसेन निर्वाणीचं बोलत - सांगत होता.

रात्रीचे दोन वाजलेले होते. फार विचार करायला वेळ नव्हता. पहाट झाली असती, झुंजूमुंजू झालं असतं नी पाक सैनिकांना अजितसिंगची कंपनी दिसली असती. गोळीबारात, तोफगोळ्यांच्या मार्‍यात सगळेच ठार झले असते.

रेडीओ सेटवरून त्यांनी 1/11 जी. आर. कंपनीच्या कमांडरला आपली योजना सांकेतिक भाषेत सांगितली. "आम्ही पुढे जातोय, मागे या."
यापेक्षा जास्त बोलण्यात धोका होता. गौप्यस्फोट झाला असता. शत्रू जागा झाला असता. पुन्हा पराभव पदरी पडला असता. भारत पुन्हा हरला असता.
भरभर हुकुम सुटू लागले. आदेशाबरहुकुम जवानांनी कुच केली. सर्वात पुढे होता जाकीर हुसेन नाईक.

पाक सैनिक गाफिल होते. विजयाची पार्टी करीत होते. त्यांची जित झालेली होती.
इतक्यात कुणीतरी येत असल्याची त्यांना चाहूल लागली.
पाकीस्तानी कमांडरने अंदाज बांधला आपलीच कुमत येत असणार! रसद रात्रीच येत असे. भारतीय जवानांना आपलेच समजून पाक जवानांनी चक्क त्यांचा हात धरून वर उचलून घेतले होते.

"अल्ला हो अकबर, अल्ला हो अकबर," च्या निनादाने पाक छावणीचा परिसर दणाणून गेलेला होता. संपुर्ण छावणी आता भारताच्या ताब्यात आलेली होती.

आणि भारताने कारगिल
युद्ध जिंकलेले होते. या विजयाच्या शिलेदाराला, ह्या सच्चा मुसलमान असलेल्या जवान जाकीर हुसेन नाईकला देशभक्त म्हणायचे की नाही?
तुम्हाला काय वाटतं?

[ पाहा- डोमेल ते कारगिल, लेखक मेजर जनरल [नि.] शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन, पुणे, चौथी आवृत्ती, 2013, पृ. 244/45 ]

-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment