Thursday, August 23, 2018

महाकवी आणि माणूस विंदा करंदीकर






ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित कवी विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दीची आज सांगता होत आहे.
भाऊंना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे हा अतिशय बहारदार अनुभव असायचा. श्रेष्ठ कवी आणि कोकणी माणूस म्हणून ते भारीच होते.

एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, "हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी मी बोललोय तो येतो म्हणालाय. तुही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना?"
मी होकार दिला.
कार्यक्रम झकास झाला.

भाऊंनी संयोजकांना स्टेजवर बोलावले, म्हणाले," चला, व्यवहाराचे उरकून टाका."

संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हाला तिघांना दिली. भाऊंनी पाकीट उघडून तिथेच पैसे मोजले. पाकीटात 700 रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले, "मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते."

आम्हाला दोघांना भाऊ म्हणाले, "अरे तुमचीही पाकीटे उघडून बघा."

पण दयाकाका म्हणाले, "भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट उघडून बघायचं ना?"

संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले,"माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली."

आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं उघडून बघितली. दयाकाकांच्या पाकीटात 200 रूपये होते आणि माझ्या शंभर.

भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. आत्ताच्या आत्ता पुर्तता करा आणि हो, टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला."

भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, "तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा."


दुसर्‍या दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भुकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये. त्यांना सी.एम.ना भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.

मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बसने आले. आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकार चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, " धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलंत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अंत्यंत मचूळ असतो. माझी चव मला बिघडवून घ्यायची नाही. आता मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका."

अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती.

आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, "भाऊ, इथला चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?"

भाऊ म्हणाले, "असं म्हणतोस. चल घेऊया. मलाही तल्लफ आलीय. पण एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो."

भाऊंकडे किश्यांचा अफलातून खजिना असायचा. ते आपल्या तिरकस शैलीत तो सांगताना अगदी हरवून जायचे. अनेकांची फिरकी घेण्यात ते पटाईत होते. त्यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत. मजा म्हणजे ते आपले किस्से सांगताना आपण कसे गंडलो, आपली कशी फजिती झाली किंवा आपल्याला शेरास सव्वाशेर कसे भेटले हेही सांगायचे. ते त्यात आरपार हरवून जायचे. त्यांनी सांगितलेला हा त्यांच्याच फजितीचा एक प्रसंग.

त्या तिघा कवींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम त्याकाळात फार गाजत होता.
कार्यक्रमाची व्यवस्था बघण्याची जबाबदारी फिरती असायची. एकदा एका साखर कारखान्याचे निमंत्रण आले.
स्वत: एम.डी. आले होते निमंत्रण घेऊन.

त्यांना दारातच थांबवून व्यवस्थापक कविवर्यांनी त्यांच्या हातात 27 अटींचा कागद सोपवला. पुढच्या वेळी येताना फोन करून वेळ घेऊनच यायला बजावले.
लेखी नियमांप्रमाणे अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला फोन करून, वेळ घेऊन एम.डी. आले.
परत कविवर्यांनी त्यांना दारातूनच कटवले.

एम.डीं.नी हा अनुभव चेअरमनना सांगितला. चेअरमन नामांकित तथा बेरकी राजकारणी होते. त्यांनी 27 नियमांचा कसून अभ्यास केला. नियमाप्रमाणे कवींना रेल्वेची फर्स्ट क्लासची तिकीटं पाठविण्यात आली. स्टेशनवर घ्यायला ए.सी. मर्सिडीज गाडी पाठविण्यात आली. राहण्या-जेवणाची व्यवस्था ठरल्याप्रमाणे उत्तम करण्यात आली.
कार्यक्रमाला तिन्ही कविवर्य सभागृहात पोचले तर तिकडे सभागृह संपुर्ण मोकळे. स्टेजवर फक्त एम.डी. आणि चेयरमन दोघेच.
कवीवर्यांनी श्रोत्यांची चौकशी केली. तेव्हा चेअरमन  म्हणाले, "तुमच्या 27 अटींमध्ये कार्यक्रमाला श्रोते हवेत अशी अटच नाही. आता तुम्हाला या रिकाम्या सभागृहापुढेच कविता वाचाव्या लागतील."

स्वत:ची चूक व्यवस्थापक कविवर्यांच्या लक्षात आली. पण ती कबूल करायला ते तयार नव्हते.

भाऊ चेअरमनना म्हणाले, "मुदलात आमच्या माणसाकडून काहीतरी आगळीक झाली असणार. आम्ही कवी जरा विक्षिप्त असतो. मी स्वत: तुमची क्षमा मागतो."
चेअरमन म्हणाले, "अहो, आमचा माणूस 400 किलोमीटरवरून तुम्हाला फोन करून तुमची वेळ घेऊन अ‍ॅडव्हान्सची रक्कम द्यायला येतो. तुम्ही त्याला साधं घरातही घेत नाही. पाणीही विचारीत नाही. एव्हढा माणुसघाणेपणा?"

व्यवस्थापकांच्या वतीने भाऊंनी चुक झाल्याचे मान्य केले. सपशेल माफी मागितली.

चेअरमननी एमडींना शेजारच्या सभागृहात पिटाळले. तिकडे लावण्यांचा फड रंगलेला होता. एमडींनी स्टेजवर जाऊन घोषणा केली, "मंडळी, शेजारच्या सभागृहात एक सांस्कृतिक प्रोग्रॅम होणार आहे. आपण सर्वांनी तिकडे जायचेय. चेअरमनसाहेबांचा तसा निरोप आहे. तो कार्यक्रम झाला की हा कार्यक्रम पुन्हा पुढे सुरू होईल. तर आता जरा सांस्कृतिक चेंज."

5 मिनिटात सभागृह खचाखच भरले. तीन कवींचा काव्यवाचनाचा कार्यक्रम इतका रंगला की लोक लावण्यांचा कार्यक्रम विसरले.
त्यानंतर कार्यक्रमाच्या व्यवस्थापणाची जबाबदारी मात्र भाऊंनी स्वत:कडे घेतली.
Reposted
-प्रा.हरी नरके

No comments:

Post a Comment