Sunday, September 16, 2018

जयवंत दळवी यांचा २५ वा स्मृतीदिन




निमित्त- जयवंत दळवी यांचा २५ वा स्मृतीदिन -प्रा.हरी नरके

स्मृतीशेष जयवंत दळवी, (१४ ऑगष्ट १९२५  – १६ सप्टेंबर १९९४ ) माझे आवडते लेखक. माझं पहिलं पुस्तक त्यांना भेट द्यायला त्यांच्या भवानीशंकर रोडवरील [ दादर, मुंबई ] घरी गेलो.
घराला कुलूप होतं. दरवाजाच्या फटीतून पुस्तक आत सरकवलं नी पुण्याला परत आलो.
आठवड्याभरात त्यांचं पत्र आलं. "तुझं पुस्तक मी विकत घेऊन वाचलेलं आहे. पहिलंच पुस्तक असूनही नवखेपणाच्या खुणा अजिबात नाहीत. तू सप्रमाण नी समतोल लेखण केलेलं आहेस. सतत लिहिता राहा. मोठा होशील."

त्यांनी त्या पत्रासोबत एक धनादेश पाठवलेला होता.
त्यासोबत २ ओळींची चिठ्ठी होती. "तू मला भेट दिलेली ही प्रत मी माझ्याकडे ठेवतोय. मी विकत घेतलेली प्रत माझ्या कोकणातल्या गावी, अरवलीच्या वाचनालयाला देतोय. माझ्यातर्फे तुला खाऊला हे पैसे पाठवित आहे."

मी त्यांचे आभार मानणारे पत्र पाठवले व तुमचा चेक मी तुमची आठवण म्हणून कायम जपून ठेवतोय असं लिहिलं.

त्यांचं लगेच उत्तर आलं, "असं करू नकोस. चेकची झेरॉक्स काढून ठेव व चेक बॅंकेत भर. त्या रकमेचा आवडता खाऊ घे."

मी तो चेक आजही तसाच जपून ठेवलाय.

त्यानंतर त्यांच्या अनेक भेटी झाल्या. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता येत असत. माझी मैत्रिण सविता कुडतरकर त्यांच्या केशवराव कोठावळ्यांची [ मॅजेस्टीकवाले ] नात असल्याने त्या दोघांची गट्टी होती. माझीही त्यांच्याशी मस्त दोस्ती जुळली. नंतर ते बोरिवलीला राहायला गेले. किडनीच्या आजारपणाने ते अकाली गेले.

दळवी गोष्टीवेल्हाळ होते. त्यांच्याशी मतभेद झाले तरी ते नाराज होत नसत. म्हणायचे, "तुझा मुद्दा मला पटत नसला तरी तू बोल. माझ्या वयाचा होशील तेव्हा हाच मुद्दा पुन्हा आठव. मला खात्री आहे तुझे मत बदललेले असेल."

ते राष्ट्र सेवा दलातून आलेले होते.
त्यांचा ठणठणपाळ अफलातून होता.
दळवींच्या कादंबर्‍या, कथा, नाटकं, संपादनं, विनोद, आत्मचरित्राऎवजी हे आत्मकथन यातनं ते मराठीचे अव्वल मानकरी ठरलेत. अनेक आठवणी दाटून येतात.
-प्रा.हरी नरके, १६ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment