Tuesday, September 18, 2018

मराठी साहित्य संस्कृती- दर्जा-निकोपपणा

मराठी साहित्य संस्कृतीच्या दर्जाबद्दल,  निकोपपणाबद्दल सध्या फेसबुकवर चर्चा चालू आहे. त्यातनं सहज आठवलं. १९९० च्या दशकात मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा सदस्य असताना महामंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ व व्यासंगी समीक्षक आणि मृदूभाषी असलेले प्रा. सुधीर रसाळसर होते. ते सभेचे कामकाज अतिशय उत्तम चालवायचे. बैठकीतले वातावरण कायम खेळीमेळीचे राहिल असे बघायचे.

दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी आदी साहित्य प्रवाहांचे नेतृत्व करणार्‍यां आणि महामंडळाबाहेर असलेल्यांना महामंडळात सामावून घेण्यासाठी महामंडळाच्या घटनेत दुरूस्ती करावी असा विषय मी आणला. त्याला काही प्रस्थापित दुढ्ढाचार्यांनी कडाडून विरोध केला.

रसाळसरांनी सर्वांना बोलू दिले. ते नि:पक्षपाती आणि तटस्थ होते. अतिशय मुत्सद्दीपणानं त्यांनी त्यातनं मार्ग काढला आणि घटनादुरूस्तीसाठी एक उपसमिती नेमली.
या घटनादुरूस्ती उपसमितीत ज्यांनी घटनादुरूस्तीला स्पष्ट विरोध केलेला होता त्यांनाच स्थान मिळाले हा निव्वळ योगायोग असणार.
त्या समितीत मला स्थान देण्याचा प्रश्नच त्यांच्यापुढे आला नसणार.
मला त्यांचा हा नि:पक्षपातीपणा आणि मुत्सद्दीपणा फार म्हणजे फारच आवडला.
-प्रा. हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

No comments:

Post a Comment