Wednesday, March 29, 2017

एस.टी.स्टॅंडसारखा एअरपोर्ट

तुम्ही कधी नेपाळमधील जनकपुरला गेलायत?
मस्त गाव आहे. रामायणातला राजा जनक याचं हे गाव असं तिथले लोक मानतात. तर तिथल्या गावाबाहेरच्या विमानतळावर आम्ही तिघे उभे होतो.
आम्हाला जायचं होतं काठमांडूला, नेपाळमध्ये. महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या शहराच्या एस.टी.स्टॅंडच्या बाहेर जसे खाजगी ट्रॅव्हल कंपन्यांचे एजंट अमूक रूपयात अमूक गावी जाणारी बस लगेच सुटणार आहे असं ओरडत उभे असतात अगदी तसंच चित्र होतं त्या विमानतळाबाहेरचं. चलो,चलो, हिमालया एअरलाईन्स, बुद्धा एअरलाईन्स, काठमांडू एअरलाईन्स, अवघ्या बाराशे रूपयात काठमांडूला नेणार म्हणून तिकडचे एजंट ओरडत होते. आम्ही तिघं आहोत म्हटल्यावर त्यानं प्रत्येकी दोनशे रूपये कन्सेशन दिलं.
आम्ही त्याच्यासोबत आत गेलो, त्यानं स्वत:च्या हातानं लिहून आम्हाला बोर्डींग पास दिले. तिथलं सिक्युरिटी चेक म्हणजे नेपाळी पोलीसवाला आपल्याला बॅगा उघडायला सांगतो. स्वत:च्या डोळ्यांनी बघतो आणि पुढे जा म्हणुन सांगतो. तो एजंट आमचं सामान घेऊन आम्हाला आत विमानजवळ घेऊन गेला. आमचं सामान त्यानं आत टाकलं. छोटं विमान होतं. जेमतेम 16 सीटर. त्यानं आम्हाला आत बसवलं आणि नविन पॅसेंजर आणायला गेला. अशाप्रकारे अर्ध्या तासात विमान फुल झालं.
त्यानं आत येऊन आम्हाला सर्वांना ज्युस दिला. सुचना दिल्या आणि तो उतरून गेला. दुसरा एक कर्मचारी आला आणि तो आत जाऊन पायलटच्या सीटवर बसला. तोच आता आमचा "कॅप्टनवा" किंवा "पायलटवा" होता.
हिमालयातला तो हवाई प्रवास मात्र अविस्मरणीय होता. अगदी हाताच्या अंतरावर एव्हरेस्ट दिसत असतो. भन्नाट.
काठमांडूला राजधानी असल्यानं जरा बरा विमानतळ आहे. बाहेर आलं की चौकाचौकात राजघराण्यातील कोणाचे तरी पुतळे असतात. पण त्यांची कोणाचीही उंची अवघी फुट दीडफुट असते.
काठमांडूमध्ये एका चौकाला संत ज्ञानेश्वरांचे नाव दिलेले दिसले. तिथल्या भाषेत, चहा,भात,चेहरा असे मराठी शब्द  ऎकताना छान वाटत होतं.
तिथले पशुपतीनाथाचे मंदिर फार फेमस. तिकडे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले, तुम्ही दुसर्‍या देशातून आलात म्हणून तुम्हाला तिकीट काढावे लागेल. दरडोई सत्तर रूपये तिकीट. मंदिरात जायला तिकीट ही कल्पनाच भारी वाटली.
तिकीट घेऊन आत गेलो तर पंडे लोकांनी चक्क घेराव घातला. अमूक रूपयात अभिषेक, अमूक रूपयात तमुक पुजा वगैरे.
आम्ही नाही म्हटलं तरी जाम सोडायला तयार नाहीत. वैताग.
मला एक आयडीयाची कल्पना सुचली. एक पंड्या फारच गळ्यात पडत होता. मी त्याच्याशी थोडं बोललो. त्याला वाटलं गिर्‍हाईक पटलं. गडी खुष.
मला म्हणाला, "साब तुम्हारा गोत्र कौनसा हैं?"
मी म्हटलं, " फुले-आंबेडकर."
तो म्हणला, "यह क्या होता हैं? तुम्हारी जाती कौनसी हैं?"
मी म्हटलं, "महादलित." तो जो 120 च्या स्पीडनं पळाला. तो परत काही फिरकला नाही. त्यानं बाकीच्यांना काय सांगितलं, माहित नाही पण त्यानंतर एकही पंडया आमच्या आसपासही फिरकला नाही. तिकडची नदी म्हणजे पुण्याचा आंबीलओढा मोठा म्हणावी अशी मरतुकडी. मुंबईच्या समुद्रात असतं तसं किंवा पुण्याच्या मुळामुठेत असतं तसं गटाराचं पाणी वाहून नेणारा ओढा जेमतेम. सगळीकडे अतिशय घाण. अस्वच्छ वातावरण. आम्ही आणखी थांबलो तर उलटी व्हायची म्हणुन तिकडनं पळालो.
बाकीचा नेपाळ दौरा मात्र एकदम झकास. हिमालयाचा काय वरदहस्त. निसर्गाची मनमुराद सोयरिक. वा.
आम्ही परत जनकपुरला आल्यावर सीतामढीला जिल्ह्याच्या ठिकाणी माझं व्याख्यान होतं. सीतामढी म्हणजे जनक राजाला शेतात जिथं सीता सापडली ते ठिकाण अशी श्रद्धा.
मैदानात खुर्च्या मांडलेल्या. सारे वयस्कर लोक खुर्चीवर मांडी घालून बसलेले. स्टेज सुमारे 20 फूट उंचीचे. त्यावर चढायला चक्क एक शिडी लावलेली. कार्यक्रम चांगला झाला.
हाटेलवर आलो तर रात्रभर एक लाऊडस्पीकर कसली कसली देवीची गाणी किंचाळत होता. मी चौकशी केली की बुवा इकडं रात्री 10 च्या पुढं लाऊडस्पीकरला बंदी नसते का? पोलीस काही कारवाई का करीत नाहीत वगैरे.
हाटेलवाला माझ्याकडं तुम्ही "येडे का खुळे" अशा नजरेनं बघायला लागला. त्यानं दिलेल्या माहितीतून समजलं ते इतकंच की आज डीवायएसपी साहेबांच्या बंगल्यावर पुजा होती आणि म्हणून तो लाऊडस्पीकर रात्रभर बोंबलत राहणार होता. तिकडे बहुतेक वेगळंच सुप्रीम कोर्ट असणार.
सीतामढी ते पाटणा कारचा प्रवास अवघा तीनचार तासांचा. पण येतानाचा अनुभव जमेला धरता आम्ही आपलं 12 तास आधीच निघालो होतो.
मुंबई ते पाटणा फ्लाईटने आलो होतो. प्रमितीचा हा पहिलाच बिहार प्रवास होता. संगिता व प्रमितीची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी माझ्या नेहमीच्या सवयींना काट देऊन चारचार वेळा पाटण्याला आम्हाला न्यायला संयोजक वेळेवर पोचतील याची खात्री करून घेतलेली होती.
संयोजक सकाळीच पाटण्याला रवाना झाल्याची मुंबईतून फोन करून पुन्हापुन्हा खातरजमा करून घेतलेली होती.
आम्ही ऎतिहासिक पाटलीपुत्र उर्फ पाटणा विमानतळावर पोचलो तर कार अद्याप आलेली नव्हती. मोबाईलवर फोन केला तर संयोजक म्हणाले, "साबजी, बस पहुंचही रहे हैं.
क्या करे जॅम लगा हुवा हैं. उसने फंसे हैं."
किती वेळ लागेल या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, जॅम निघाला तर फक्त अर्धा तास. आणि नाही सुटला तर मग मात्र कितीही तास."
मी म्हटलं, "म्हणजे किती?"
ते म्हणाले, "काहीच सांगता येणार नाही. कदाचित सहा तास, कदाचित बारा तास. कितीही."
बापरे. मी टरकलो. आता काय करायचं? ते म्हणाले, पहिलं म्हणजे शेजारच्या हाटेलात जाऊन जेवून घ्या. फेरफटका मारा. शहरातील म्युझियम बघा आणि तरिही टाईम उरला तर एखादा सिनेमा बघा.
तर अशाप्रकारे संध्याकाळी म्हणजे आम्ही एयरपोर्टवर पोचून अवघे आठ तास झालेले असताना ते आम्हाला घ्यायला पोचले.
आम्ही सीतामढीला निघालो. गंगा ओलांडली आणि संयोजक म्हणाले, "आगे खतरा है. हमारे साथ बिटीया और भाभीजी है इसलिए इतनी देर रात आगे जाना ठीक नही होगा."
आम्ही हाजीपुरला मुक्काम करायचे ठरवले. रेल्वे स्टॆशनच्या समोर असलेल्या सबसे बढीयां हाटेलात त्यांनी आम्हाला नेले. ते तिथले कायम खासदार आणि कायम केंद्रीय मंत्री असलेल्या रामविलास पासवान यांचे होते. अत्यंत भिकार आणि गलिच्छ. पासवान महोदय गेली 30 वर्षे कोणत्याही पक्षाचे सरकार केंद्रात असले तरी हे मंत्री असतातच.
त्यांचे हे हाटेल म्हणजे आपल्याकडे एखाद्या किरकोळ गावात असणार्‍या चाळीपेक्षाही भिकार होते.
आमच्या खोलीत सगळी मिळून साधारणपणे आठ बाय आठ फूट जागा. स्वच्छतागृह आपल्या एस.टी.स्टॅंडवर असते त्याच्याहीपेक्षा घाण.
संगिता आणि प्रमिती जाम वैतागल्या. पण रात्र झालेली होती. कशीबशी रात्र काढली आणि पहाटेच मार्गस्थ झालो.
सीतामढी...
एक थोर शहर.
तर आता आम्ही सीतामढीहून पाटणा आणि तिकडून रेल्वेने पुणे असा परतीचा प्रवास करीत होतो. गंगेच्या पुलावर आम्ही पोचलो तेव्हाच आम्ही सुमारे सहा तास आधीच पाटण्यात पोचू असे आमच्या लक्षात आले. हरकत नाही. पाटण्यात फिरता येईल. रात्री दहाची ट्रेन होती. कोणतीही धावपळ न करता आरामात ती पकडता येईल.

गंगासागरवर पुलाच्या दुरूस्तीचे काम चालू होते. पुलावरचा रस्ता गर्दीने फुललेला होता. पण काळजीचं कारण नव्हतं कारण आमच्या हातात सहा तास होते. थोडं पुढे काय गेलो तर वाहतुक ठप्प झालेली. जॅम लगा हैं. कधी मुंगीच्या स्पीडनं तर कधी एकाच जागेवर तासतासभर प्रतिक्षा करीत आम्ही तिकडे अडकलो होतो.
वाट बघुनबघुन आम्ही थकलो. जॅम खुलनेकी कोई गुंजाइश नही थी. आम्हाला सांगण्यात आलं की अजून साडेतीन किलोमीटर पुल बाकी आहे. हा पुलच मुळी साडेपाच किलोमीटर लांबीचा आहे. एकदा पुल ओलांडला की मग काय दहा मिनिटात रेल्वे स्टेशनवर.
शेवटी रात्रीच्या नऊ वाजता आम्ही तिघे कारमधून खाली उतरलो. आमच्या बॅगा घेतल्या आणि पायी चालत अंधारात ठेचकाळत एकदाचा साडेतीन किलोमीटरचा पुल ओलांडला. पुढे मात्र रस्ता एकदम मोकळा होता.
एका रिक्षावालाल्या विचारलं. तो प्रामाणिक होता. आपणहून म्हणाला, गेले सहा तास तो बसून होता. त्यामुळे एरवी तो या अंतराला पन्नास रूपये घ्यायचा पण आज तो अडीचशे रूपये घेणार होता.
आम्ही घासाघीस करत बसलो असतो तर ट्रेन चुकली असती. मे महिना असल्यानं सार्‍या रेल्वेगाड्या फुल होत्या. कसंबसं आमचं रिझर्वेशन कन्फर्म झालेलं होतं. ट्रेन आम्हाला चुकवायची नव्हती.
आमच्या हातात फक्त 5 मिनिटं होती. त्यानं रिक्षा फुलस्पीडनं मारली. रस्ता पुर्ण मोकळा होता. आम्ही रेल्वेस्टेशनला पोचलो तेव्हा गाडी सुटत होती. रिक्षावाला स्वत: आमच्या दोन बॅगा घेऊन धावला. माझ्याकडे दोन बॅगा होत्या. आम्ही धावत सुटलो.
शेवटच्या डब्यात त्यानं संगिता अन प्रमितीला चढवलं. मीही आत घुसलो. त्यात पायातली एक चप्पल खाली पडली. रिक्षावाल्याला तीनशे रूपये दिले. त्याला काय वाटलं माहित नाही. तो म्हणाला, " बाबुजी, ऎसा करते हैं, मैनें आपको ढांईसौ रूपया बोला था. मगर ये गलत हैं. मैं सौ रूपये रखुंगा. बाकी यह आप ले लो. बिटीयाको मिठाई खिला देना."
...................
टीप : गेल्या सातआठ वर्षात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये रस्त्यांचं जाळं इतकं उत्तम उभारलंय की आमचा हा 2008 सालचा हा अनुभव आज काल्पनिक वाटावा. आता बिहार ओळखू येऊ नये इतका बदललाय. रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्रासारखाच चकाचक झालाय.

No comments:

Post a Comment