Monday, March 6, 2017

विंदा करंदीकरांची तत्वनिष्ठा --


भाऊंना भेटणे, त्यांच्यासोबत गप्पा मारणे हा अतिशय बहारदार अनुभव असायचा.
एकदा भाऊंचा फोन आला. म्हणाले, "हरी, एक कार्यक्रम आलाय. त्यांना आपण तिघे हवे आहोत. दयाशी मी बोललो तो येतो म्हणालाय. तुही वेळ काढ. प्रत्येकी एक हजार रूपये मानधन आणि एकेक नारळ असं मानधन देणार आहेत. जाण्यायेण्याचं भाडं आणि चहा देणार आहेत. ठीकाय ना?"
मी होकार दिला.
कार्यक्रम झकास झाला.
भाऊंनी संयोजकांना बोलावले, म्हणाले," चला, व्यवहाराचे उरकून टाका."
संयोजक आत गेले आणि त्यांनी तीन बंद पाकीटे आणून आम्हाला तिघांना दिली.भाऊंनी पाकीट फोडून पैसे मोजले.पाकीटात 700रूपये होते. भाऊंनी संयोजकांना बोलावले,"मालक, अहो, यात तीनशे रूपये कमी आहेत. आपले प्रत्येकी एक हजार ठरले होते."
आम्हाला दोघांना भाऊ म्हणाले, "अरे तुमचीही पाकीटे फोडून बघा."
पण दयाकाका म्हणाले, "भाऊंचं ठिकय. मोठा माणूसय. आपण असं स्टेजवर कसं पाकीट फोडून बघायचं ना?"
संयोजकांनी भाऊंना तीनशे रूपये आणून दिले. म्हणाले,"माफ करा, कार्यालयातील मंडळींनी पाकीटं भरताना चुकून कमी रक्कम भरली."
आम्ही निघालो. टॅक्सीत बसल्यावर आम्ही दोघांनी आमची मानधनाची पाकिटं फोडून बघितली. दयाकाकांच्या पाकीटात 200रूपये होते आणि माझ्या शंभर.
भाऊंनी टॅक्सी थांबवली. संयोजकांना बोलावलं आणि त्यांना झापलं. ठरल्याप्रमाणं मानधन दिलेलं नाही. दिलेला शब्द तुम्ही पाळलेला नाही. तत्व म्हणजे तत्व, काय समजले? तिघांना प्रत्येकी एक हजार ठरले होते. तुम्ही तिघांना मिळून एक हजार दिलेत. आत्ताच्या आत्ता पुर्तता करा आणि हो, टॅक्सीचा खोळंबा झाल्याने तिच्या भाड्यापोटी पंचवीस रूपये अधिकचे द्या टॅक्सीवाल्याला."
भाऊंचा सात्विक संताप उफाळून आला होता. संयोजकांनी उरलेले पैसे आणून दिले, परत ते कार्यालयातील लोकांनी पाकीटं भरताना घोळ केला वगैरे सांगायला लागले. भाऊ म्हणाले, "तसं असेल तर कार्यालयातील लोकं बदला किंवा किमान तीन वेगवेगळ्या नविन सबबी शोधून ठेवा."
......................
दुसर्‍या दिवशी भाऊंचा फोन आला. त्यांना मंत्रालयात यायचे होते. किल्लारीच्या भुकंपग्रस्तांच्या निधीला मुख्यमंत्री फंडाला त्यांना देणगी द्यायची होती. त्यांच्या दोन अटी होत्या. ही देणगी गुप्त राहायला हवी. तिचा गवगवा व्हायला नको. बातमीदारांना कळता कामा नये. त्यांना सी.एम.ना भेटायचे नव्हते, फक्त देणगीचा चेक देऊन ते परत जाणार होते.
मी भाऊंच्या मंत्रालय प्रवेशिकेची व्यवस्था केली. भाऊ बसने आले. आम्ही मुख्यमंत्री कार्यालयात गेलो. भाऊंनी चेक दिला. पावती घेतली. भाऊंचे नाव ऎकून तो अधिकार चमकला. त्याने भाऊंना खुर्ची दिली. चहा मागवतो म्हणाला. भाऊ म्हणाले, " धन्यवाद. पण मला जरा घाई आहे. तुम्ही मुद्दाम बोलावलत तर चहाला मी परत कधी तरी नक्की येईन. आत्ता नको. एकतर ही माझी चहाची वेळ नाही आणि मी असं ऎकलंय की मंत्रालयातला चहा अंत्यंत मचूळ असतो.माझी चव मला बिघडवून घ्यायची नाही. आता मी माझ्या कामासाठी आलोय. चहाला नाही. जत्रेत पाहुणा ओढून काढू नका."
अधिकार्‍याने भाऊंना दिलेली पावती पंख्याच्या वार्‍याने उडाली. मी ती उचलून भाऊंना दिली, तेव्हा माझी नजर रकमेच्या आकड्यावर पडली. भाऊंनी पाच लाख रूपयांची देणगी दिलेली होती.
आम्ही मंत्रालयाबाहेर आलो. भाऊ बसला उभे राहिले. बसला वेळ होता. मी म्हटलं, "भाऊ, इथला चहा फक्कड असतो. घेऊया का एकेक कटींग?"
भाऊ म्हणाले, "असं म्हणतोस. चल घेऊया. मलाही तल्लफ आलीय. पण एका अटीवर, मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा असल्यानं पैसे मात्र मी देणार हो."
............................

No comments:

Post a Comment