Showing posts with label अण्णाभाऊ साठे. Show all posts
Showing posts with label अण्णाभाऊ साठे. Show all posts

Wednesday, August 7, 2019

कॉम्रेड सुबोध मोरे साहबकोही गुस्सा क्यों आया?







कॉम्रेड सुबोध मोरे साहबकोही गुस्सा क्यों आया? - प्रा.हरी नरके

१. माझे परममित्र श्रीयुत सुबोध मोरेसाहेब यांनी माझ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्यावरील फेबु पोस्टचे खंडन करणारा प्रदीर्घ लेख लिहीलेला आहे. त्यात त्यांनी माझ्यावर भरमसाठ आरोप केलेले आहेत. व्यक्तीगत पातळीवरची टिका केलेली आहे. मलाही त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देता येईल. मात्र मी तसे करणार नाही. श्री मोरे हे कम्युनिस्ट चळवळीतले पिढीजात कार्यकर्ते आहेत. त्यांच्याविषयी मला नितांत आदर आहे.

२. कॉ. मोरे, मला एक कळले नाही की माझ्या लेखावर तुम्ही का भडकलाय? मी माझ्या लेखात अण्णा भाऊंच्या उपेक्षेला तुम्हाला जबाबदार धरलेले नव्हते. माझ्यासकट आपण सारेच समाज म्हणून त्यासाठी जबाबदार आहोत हा माझा मुद्दा असताना तुम्हालाच मिरची का झोंबली? आमची तुमच्यापेक्षा वेगळी मतं असू शकतात मालक.

कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, कॉ. अमर शेख, कॉ. गव्हाणकर, कॉ. गोविंद पानसरे, कॉ. बाबूराव बागूल, कॉ. एस. के. लिमये, कॉ. भास्करराव जाधव, कॉ. भाऊ फाटक, कॉ. तुळपुळे, कॉ. ज्योती बसू, कॉ. मोहित सेन, कॉ. सोमनाथ चटर्जी, कॉ. भालचंद्र कांगो, कॉ. अजित अभ्यंकर, कॉ. मिलिंद रानडे, कॉ. मुक्ता मनोहर यांच्यासारख्या त्यागी, तपस्वी आणि राष्ट्रनिष्ठ डाव्यांबद्दल मला खूप आदर आणि जिव्हाळा वाटतो.  श्रमिक, कामगार, कष्टकर्‍यांच्या चळवळीला प्रागतिक डाव्यांचे मौलिक योगदान आहे.

३. कॉ. मोरे, उजव्यांना मनुची तर सनातनी डाव्यांना दाखवायला मार्क्सची नी मनातून मनूची पोथी हवी असते. पोथी महत्वाची. फुले-आंबेडकरी चळवळीच्या द्वेशावर जगणारे हे वतनदार.  हे चमको आणि सनातनी डावे म्हणजे निव्वळ अहंकारी, माणूसघाणे आणि पोथीनिष्ठ असतात असा माझा अनुभव आहे. केवळ वर्गिय पोपटपंची करणार्‍या या महाभागांना लिंगभाव आणि जातीच्या प्रश्नाबद्दल आकस असतो.

४. कॉ. मोरे, चर्चा, वादविवाद, असहमती, वादग्रस्त मुद्दे यावर तुमचा विश्वास नाही काय? तुमच्या एकेरी दृष्टीला सत्य हे एकांगीच दिसते काय? तुम्ही म्हणाल तेव्हढेच सत्य आणि सत्याचा कॉपीराईट फक्त तुमच्याकडे आहे काय? कॉ. मोरेसाहेब, एखाद्या गोष्टीला दोन किंवा अधिक बाजू असू शकतात यावर तुमचा नसला तरी माझा विश्वास आहे.

५. कॉ. मोरे, एकदा राशोमन [अकिरा कुरोसावा] हा चित्रपट बघा.

६. कॉ. मोरे, अण्णा भाऊंचा जेव्हढा सन्मान व्हायला हवा होता, तेव्हढा तो झाला नाही ही माझी खंत आहे. ती आजवर अनेक मान्यवरांनी मांडलेली आहे. अगदी कम्युनिस्ट पक्षाचे हायकमांड असलेल्या कॉ. श्रीपाद अमृत डांग्यांनीही ती मांडलेली आहे. तेव्हा मी तसं म्हटलं की लगेच मी अण्णा भाऊंचा अपमान करतोय, त्यांची बदनामी करतोय हा कांगावा कशाला करताय तुम्ही?

७. कॉ. मोरे, दुसर्‍यांच्या प्रसिद्धी, लोकप्रियता आणि विश्वसनियतेवर आयुष्यभर जळणारे तुमच्यासारखे चमको आणि निव्वळ पढीक बरनॉलमॅन लोकांच्या मनातून का उतरले?
रशियात किंवा चीनमध्ये पाऊस पडला की मुंबईत छत्री उघडून चालणारे तुम्ही लाल छत्रीवाले.
प्रश्न विचारणारांना तुम्ही चळवळीचे थेट शत्रू ठरवून मोकळे होता. जे तुमच्यासोबत नाहीत ते तुमचे शत्रू इतके सोपे गणित असते तुमचे.

आमच्या मुद्द्यांची आणि अडचणीच्या प्रश्नांची सप्रमाण उत्तरं देता येत नाहीत म्हणून थयथयाट करणारे तुमच्यासारखे चमको कॉम्रेड आणि उजवे एकाच माळेचे मणी होत.

८. कॉम्रेडसाहेब, अण्णा भाऊ साठे यांची उपेक्षा झाली असे मी म्हटले तर मी अण्णा भाऊंची बदनामी करतोय असा तुम्ही माझ्यावर पुन्हापुन्हा आरोप केलेला आहे. पण तुम्हीही तेच म्हणताय. फरक एव्हढाच आहे की कम्युनिस्ट सोडून उरलेल्या भारतीयांनी अण्णा भाऊंची उपेक्षा केली असे तुम्हाला वाटतेय. याचा अर्थ तुम्हाला अण्णा भाऊंशी देणंघेणं नाही. तुम्हाला फक्त कम्युनिस्टांच्या आरत्या गाण्यात आणि त्यांचं मार्केटिंग करण्यात रस आहे. शहीद कॉ. गोविंद पानसरे अण्णांनी अण्णा भाऊंच्या नावे साहित्य संमेलनं घेतली. कारण त्यांना ते स्वत:चं कर्तव्य वाटत होतं आणि पक्षाने अण्णा भाऊंची उपेक्षा केल्याचं त्यांना दु:ख होतं.

९. कॉ. मोरे, आधल्या दिवशी टॅक्सीत बेशुद्ध अवस्थेत तुम्ही अण्णा भाऊंना पाहिलेत व टॅक्सीवाल्याच्या मदतीने त्यांना तुम्हीच त्यांच्या घरी सोडलेत असा दावा तुम्ही केलाय. म्हणे टॅक्शीवाला मला विचारत आला. अख्ख्या मुंबईत टॅक्शीवाल्याला तुम्हीच सापडला असणार! दुसर्‍या दिवशी सकाळी अण्णा भाऊ वारले. बेशुद्ध माणसाला दवाखान्यात नेण्याऎवजी तुम्ही घरी सोडून पळून गेलात? निदान पक्ष नेत्यांच्या/कार्यकर्त्यांच्या कानावर ही बाब घालून त्यांच्याकरवी अण्णा भाऊंना दवाखान्यात नेण्याची व्यवस्था करायला हरकत नव्हती. साडेदहा वर्षाच्या लहान वयात आजारी माणसाला दवाखान्यात न्यायचे असते हे तुम्हाला नक्कीच समजत असणार! तुम्ही त्यांना घरी सोडल्यानंतर १५ ते १६ तासांनी ते वारले. मग याकाळात तुमच्या पार्टीच्या एकालाही त्यांना दवाखान्यात न्यावे असे का वाटले नाही?

१०. कॉ. मोरे, अण्णा भाऊंना ४९ व्या वर्षी प्रदीर्घ आजारपणाने अकाली मृत्य़ू आला. त्यांना जर चांगल्या दवाखान्यात उपचार मिळते तर ते वाचले असते. कर्तव्यदक्ष कम्युनिस्ट पक्षाने त्यांना उपचारांसाठी, औषदपाण्यासाठी पैसे का दिले नाहीत? त्यांना उपचारासाठी रशियाला का पाठवले नाही?

११. कॉ. सुबोध, अण्णा भाऊंचे [यकृत] लिव्हर खराब झाल्याने ते वारले असा दावा तुम्ही केलाय. म्हणजे अण्णा भाऊ दारूडे होते म्हणून त्यांचे लिव्हर खराब झाले असे सांगून तुम्हीच त्यांची बदनामी करताय.

१२ कॉ. मोरे, अण्णा भाऊंना सरकारच्या वृद्ध कलावंत सहाय्यता निधीवर जगावे लागत होते. [ जे मंत्रालयातून घेऊन ते आधल्याच दिवशी आले होते असे तुम्हीच सांगताय] त्यांना सरकारी कोट्यातून घर मिळेपर्यंत झोपडपड्डीत राहावे लागले होते. त्यांच्या पत्नीला व मुलीला मजूरी करावी लागत होती. आणि तरिही अण्णा भाऊ हलाखीत जगत नव्हते तर त्यांचे जगणे अगदी चैनीत चालू होते असे तुम्ही सांगताय. तुमचा पक्ष त्यांच्यासाठी जर जागृत होता तर पक्षाने त्यांना सरकारच्या मदतीवर जगण्याची पाळी का येऊ दिली होती? पक्षाने अण्णा भाऊंच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था का केली नाही? तुमच्या पक्षाचे श्रेष्ठी [हायकमांड] असलेले उच्चभ्रू नेते काय अण्णा भाऊंसारखे झोपडपट्टीत राहात होते? त्यांनाही सरकारकडून  घर घ्यावे लागले होते काय? मग पक्षाच्या या श्रीमंत नेत्यांनी अण्णा भाऊंना राहायला घर का दिले नाही?

१३. कॉ. मोरे, ज्या अण्णा भाऊंच्या कार्यक्रमांना लाखो लोक जमत असत, त्यांच्या अंत्ययात्रेला अवघे २५० ते ३०० लोक होते असे तुम्ही सांगताय आणि पक्षाने त्यांचा महान सन्मान केल्याचा दावाही करताय, हा प्रकार संतापजनक नाही?

अहो कॉम्रेड, एखाद्या सामान्य माणसाच्याही मैतीला एक -दोन हजार लोक सहज जमतात. तिथे अण्णा भाऊंसारख्या जगप्रसिद्ध कलावंत, लोकशाहीर, साहित्यरत्न असलेल्या महान लेखकाच्या अंत्ययात्रेला लाखो लोक का नव्हते हा माझा प्रश्न आहे.

१४. कॉ. मोरे, सामान्य लोक अण्णा भाऊंना प्रेमाने खाऊ घालत होते अशी माहिती तुम्ही देताय. अण्णा भाऊंसारख्या बुद्धीवंताला लोकांच्या घरी जाऊन जेवावे लागणे यात त्यांचा आत्मसन्मान दुखावला जातोय हे तुमच्या आजही लक्षात येत नाही कारण तुमचा अण्णा भाऊंच्या सुखदु:खाशी काडीमात्र संबंध नव्हता.

१५. कॉ. मोरे, अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला हजर असलेल्या ज्या पंचवीस लोकांची तुम्ही नावे दिलीत त्यातल्याच तिघांनी मला सांगितले की खूप कमी लोक अंत्ययात्रेला होते.
परवा पुण्यात बाल गंधर्व नाटयमंदिरात बोलताना प्रसिद्ध विचारवंत आणि अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयाचे संपादक अर्जून डांगळे जाहीरपणे म्हणाले, "अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. त्याठिकाणी ५० ते ६० लोक होते." या भाषणाचे व्हिडीओ रेकॉर्डींग माझ्याकडे आहे. तुम्ही तोच आकडा सराईतपणे पाचपट वाढवून २५० ते ३०० करताय. तुम्ही अर्जून डांगळे यांच्यासह अन्य उपस्थित मान्यवरांना खोटे का ठरवताय?

१६. कॉ. मोरे, कम्युनिस्ट पक्षाने, ज्येष्ठ नेते कॉम्रेड डांगे यांनी अण्णा भाऊंच्या 'शाहीर' पुस्तकाला प्रस्तावना लिहून त्यांचा गौरव केला असे तुम्ही म्हणताय. ती प्रस्तावना अण्णा भाऊ साठे निवडक वाड्मयात छापलेली आहे. [पृ.११३९ ते ११४६] त्यात कॉ. डांगे यांनी अण्णा भाऊंचा अगदी हात राखून गौरव केलाय. अण्णा भाऊंच्या लेखनावर त्यांनी प्रस्तावनेत टिका करून औचित्यभंगही केलेला आहे.

कॉ. डांगे म्हणतात, "अण्णा भाऊंचे लेखन प्रचारकी आहे." "अण्णा भाऊंच्या काव्यात न्यूनता दिसते." "अण्णा भाऊंना इतिहासाची माहिती असल्याचे दिसत नाही." हा गौरव आहे की नालस्ती?

१७. अण्णा भाऊंसाठी पक्षाने यांव केले नी त्यांव केले याची भली मोठी यादी कॉ. मोरे यांनी दिलेली आहे. पक्षाने त्यांच्यावर औषदोपचार का केले नाहीत हा अण्णा भाऊ प्रेमींचा सवाल आहे? एव्हढ्या मोठ्या प्रतिभावंताची कदर करण्याची दानत डाव्या, उजव्यात, बुद्धीवंतात आणि बहुजनात कोणातच नव्हती हेच माझे दु:ख आहे.

१८. त्यांच्या कथेवर चित्रपट तयार झाला आणि तो बघायला मात्र अण्णा भाऊंना आपल्या बायकोला स्वत: तिकीट काढून पाठवावे लागले असे कॉ. मोरे लिहितात. खुद्द लेखकाला थिएटरचा पास [सन्मानिका ] का मिळाला नाही? लेखकाला तिकीट काढावे लागणे हा त्यांचा गौरव आहे की अपमान?

१९ . अण्णा भाऊ साठे यांचे नाव कॉ. मोरे अनेकदा "अण्णाभाऊ" साठे असे एकत्र लिहितात. त्यांचे नाव तुकाराम उर्फ अण्णा असे होते. भाऊ हे त्यांच्या वडीलांचे नाव होते. तेव्हा अण्णा भाऊंचे नाव नीट लिहिता यावे यासाठी कॉ. मोरे यांनी त्यांचे चरित्र वाचावे. अण्णा भाऊंची पुस्तके चाळावीत ही विनंती.

२०. असे मुद्दे तर अनेक आहेत. तुर्तास एव्हढेच.

-प्रा.हरी नरके, ७ ऑगष्ट २०१९

Sunday, August 4, 2019

अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन लाखो घरात पोचवले











"संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसागर उतरला होता. स्वातंत्र्याच्या आंदोलनानंतरचं सर्वात मोठं असं हे आंदोलन होतं. या आंदोलनाचे नेते एसेम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, एस.  ए. डांगे हे बहुतेक जण शहरी नेते होते. या आंदोलनात शहरातील कामगार, श्रमिक, कष्टकरी, निम्न मध्यमवर्गीय यांना आणण्याचे तसेच ग्रामीण महाराष्ट्राच्या काळजात हे आंदोलन पोचवण्याचे काम शाहीरांनी केले. त्यात अण्णा भाऊ साठे अग्रणी होते. त्यावेळच्या त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला एक लाखापेक्षा जास्त जनसमुदाय उपस्थित असे. म्हणूनच गृहमंत्री मोरोबा देसाई यांनी त्यांच्या तमाशांवर बंदी घातली. अण्णा भाऊंनी शक्कल लढवली आणि तमाशाचे नाव बदलून पोलिसांना चकमा दिला. आपण आता तमाशा करणार नाही, तर लोकनाट्य सादर करणार आहोत असं म्हणून त्यांनी कार्यक्रम चालू ठेवले.

तमाशात उन्मादकता असे. अण्णा भाऊंनी लोकनाट्यात राष्ट्र भक्त, हुतात्मे, स्वातंत्र्य चळवळीतील नेते यांना अभिवादन करण्याची प्रथा सुरू करून तमाशाला लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागरण आणि रंजनातून, करमणुकीतून प्रबोधन यांची जोड दिली. माझी मैना गावावर राहिली माझ्या जिवाची होतेय काहिली... ही अण्णा भाऊंची रचना ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून जन्माला आलेले महान काव्य आहे. हे रुपक म्हणजे कलात्मकता आणि जनभावनेची नाडी पकडणारी अजरामर कलाकृती होय. मराठी भाषेच्या सन्मानार्थ अण्णा भाऊंनी केलेले लेखन मराठीत तरी अजोड आहे. त्यांच्या लेखनाची दखल पांढरपेशा समिक्षकांनी घेतली नाही. अण्णा भाऊंना आयुष्यभर लेबर कॅंप, चिरानगर आणि सिद्धार्थनगर [गोरेगाव] येथील झोपडपट्टीत राहावे लागले. ते हयात असताना आपल्या समाजाने त्यांची कदर केली नाही. गोरेगावला त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला अण्णा भाऊंचे जेव्हढे वय होते [४९ वर्षे] धड तेव्हढेही लोक उपस्थित नव्हते. अशी उपेक्षा कोणाही प्रतिभावंताच्या वाट्याला येऊ नये."

अशा आशयाचे भाषण मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ परिसंवादात केले.
परिसंवादाचा विषय संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि अण्णा भाऊ, असा होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. कौतिकराव ठालेपाटील, होते. या प्रसंगी विचारवंत अर्जुन डांगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वि.दा.पिंगळे यांनी केले. या कार्यक्रामाचे  आयोजन, सुनिल महाजन, संवाद व सुनिल कांबळे, अध्यक्ष स्थायी समिती,पुणे मनपा यांनी केले होते.

यावेळी बोलताना डांगळे म्हणाले, "मी स्वत: अण्णा भाऊंच्या अंत्ययात्रेला हजर होतो. त्यावेळी प्रचंड गर्दी झालेली होती. निदान पन्नास-साठ तरी लोक नक्कीच उपस्थित होते. त्यामुळे अण्णा भाऊंची उपेक्षा झाली ही टिका खरी नाही." ते पुढे म्हणाले, "कुसुमावती देशपांडे यांनी आपल्या कादंबरी शतक या पुस्तकात अण्णा भाऊंची दखल घेतली नाही. मराठीतील बहुतेक सर्व समीक्षकांनी अण्णा भाऊंची उपेक्षा केली."

-प्रा.हरी नरके, ३ ऑगष्ट २०१९

Thursday, August 1, 2019

अण्णा भाऊ आम्ही आपले गुन्हेगार आहोत












आज अण्णा भाऊंच्या पुतळयांवर लक्षावधींचा खर्च करणारा आपला समाज ते जिवंत असताना, हालाखीत असताना अण्णा भाऊंना आधार, सन्मान द्यायला पुढे आला नाही. भारतीय समाज हा निव्वळ कृतघ्न आहे याची प्रचिती वारंवार आलेली आहे. कमालीचे ढोंगी आहोत आपण.

ते गेल्यावर त्यांची किंमत समाजाला कळली. ते जिवंत असताना त्यांची योग्यता  देशाला कळली नव्हती.

अण्णा भाऊ आम्ही आपले गुन्हेगार आहोत.

आज त्यांची जन्मशताब्धी सुरू होतेय.

अण्णा भाऊ दारिद्र्यात जगले आणि त्यातच गेले.

ते अल्पायुषी होते. १९२० ते १९६९ असे अवघे ४९ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले.

त्यांना अनेकदा अर्धपोटी राहावे लागे.

राज्य शासनाकडून त्यांना लेखक-कलावंताचे मानधन मिळे. ते दर आठवड्याला मिळावे असे सांगत ते मंत्रालयातील अधिकार्‍यांना भेटले होते..

ते गेले तेव्हा मुंबईत खूप पाऊस पडत होता. त्यावेळी आजच्यासारखे मोबाईल नव्हते. टेलिफोनसुद्धा फार कमी लोकांकडे होते. परिणामी ते गेल्याचे निरोप लवकर मिळाले नाहीत.

त्यावेळचे समाजकल्याण मंत्री बाबूराव भारस्कर यांना ही बातमी कळताच ते अण्णा भाऊंच्या अंत्यदर्शनाला गोरेगावच्या सिद्धार्थनगरला गेले. अंत्यविधीचे सामान आणायला घरात पैसे नव्हते म्हणून  घरवाले काळजीत होते. भारस्करांनी खिश्यातून ५०० रूपये काढले आणि जवळच्या कार्यकर्त्यांना दिले. ते कार्यकर्ते अंत्यविधीचे सामान आणायला गेले ते परतलेच नाहीत.

वाट बघून भारस्करांनी स्वत: जाऊन अंत्यविधीचे सामान आणले. ज्या अण्णा भाऊंच्या कार्यक्रमांना लाखोंची गर्दी असे त्यांच्या अंत्यविधीला  कमी लोक उपस्थित होते. ही माहिती मला या अंत्यविधीला उपस्थित असलेल्या तिघा मान्यवरांकडून मिळालेली आहे. मी तिची खात्री करून घेतलेली आहे. अर्जून डांगळे बालगंधर्वमधील सभेत जाहीरपणे असे म्हणाले की, ते स्वत: तिथे हजर होते आणि त्यांच्यासोबत पन्नास साठ लोक होते.

सुबोध मोरे यांच्यामते मात्र २५० ते ३०० लोक उपस्थित होते.

जिथे सामान्य माणसाच्या मैतीलाही हजार - दोन हजार लोक सहज उपस्थित असतात तिथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊंच्या अत्यंयात्रेला एव्हढेच लोक असणे पुरेसे आहे असा  दावा जे सुबोध मोरे करतात ते धन्य होत.

पहिल्या दलित साहित्य संमेलनाचे [१९५८] उद्घाटक म्हणून त्यांनी केलेले भाषण अजरामर झाले. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांचे उद्गार अभ्यासकांच्या काळजावर कोरले गेले. अण्णा भाऊ हे प्रामुख्याने शाहीर असल्याने त्यांनी शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर यांच्या सोबत गिरणी कामगार, कष्टकरी वर्ग आणि शेतकरी यांच्यात जागृतीचे काम हिरीरिने केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात ते बिनीचे शाहीर राहिले. देशाच्या डाव्या चळवळीच्या जागरणात त्यांनी आपली ठसठशीत नाममुद्रा उमटवली.

उच्चभ्रू  नेते व समिक्षकांनी त्यांची उपेक्षा केली. माटुंगा लेबर कॅंप, चिरानगरच्या झोपडपट्टीत आणि गोरेगावच्या सिद्धार्थनगरला त्यांना आयुष्य कंठावे लागले.

उदरनिर्वाहासाठी लेखण करणे आणि कार्यक्रम सादर करणे एव्हढाच मार्ग त्यांच्याकडे उपलब्ध होता. त्यांची एकेक कादंबरी त्यांनी प्रकाशकांना अवघ्या दहाविस रूपयांना विकलेली आहे. किरकोळ पैशांसठी तिचे कॉपीराईट त्यांना देऊन टाकलेले आहेत. ते जिवंत असताना त्यांची योग्यता  देशाला कळली नव्हती.

तुकाराम उर्फ अण्णा साठे हे प्रतिभावंत साहित्यिक होते. त्यांची फकीरा ही कादंबरी समीक्षक आणि वाचक दोघानांही आवडली. ते अल्पशिक्षित होते. मात्र त्यांनी भरपूर लेखन केले. त्यांच्या चित्रा, माकडीचा माळ, संघर्ष, वैजयंता, वारणेचा वाघ या कादंबर्‍या आणि शेकडो कथा लोकप्रिय झाल्या. विशेषत: बरबाद्या कंजारी, स्मशानतील सोनं, सापळा, निळू मांग, मरिआईचा गाडा, रक्ताचा टिळा, इरेनं गाढव खाल्लं, बिलवरी, रानगा, मकुल मुलाणी, भुताचा मळा, जोगीण, लाडी, तमासगीर, काडीमोड आदी कथांनी जाणकारांचे लक्ष वेधून घेतले. माझा रशियाचा प्रवास हे त्यांनी लिहिलेले प्रवासवर्णन आणि त्यांची अकलेची गोष्ट, मुंबई कोणाची, दुष्काळात तेरावा, पुढारी मिळाला, बिलंदर बुडवे ही लोकनाट्यं वेधक आहेत. रवि आला लावुनि तुरा, शिवारी चला, माझी मैना गावावर राहिली, जग बदल घालुनि घाव, मुंबईची लावणी हे पोवाडे आणि लावण्या अफाट लोकप्रिय झाल्या.

जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मला भीमराव ।
गुलामगिरीच्या या चिखलात
रुतून बसला का ऐरावत ।
अंग झाडुनी निघ बाहेरी
घे बिनीवरती धाव ।
धनवंतांनी अखंड पिळले
धर्मांधानी तसेच छळले ।
मगराने जणु माणिक गिळिले
चोर जाहले साव ।
जग बदल घालुनी घाव
सांगून गेले मला भीमराव ।।
अण्णा भाऊंच्या ३५ कादंबर्‍या, ३०० कथा, ८ पोवाडे, ८ पटकथा, १ प्रवासवर्णन, १ नाटक, ९ लोकनाट्ये, १५ वगनाट्यं, १२ गाणी प्रकाशित झालीत. त्यांचे ९० हून अधिक ग्रंथ उपलब्ध आहेत.
-प्रा. हरी नरके, १ ऑगष्ट २०१९ 

Wednesday, August 1, 2018

निमित्त - लो. टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती -


पुर्वार्ध

लोकमान्य टिळक अखिल भारताचे पहिले नेते. झुंजार पत्रकार. साक्षेपी संपादक. अनेकदा तुरूंगवास भोगलेले स्वातंत्र्य सैनिक. गीतारहस्य या मौलिक ग्रंथाचे लेखक. महात्मा फुल्यांनी सुरू केलेला शिवजयंतीचा सोहळा देशभर पोचवणारे. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक. विचारवंत. खर्‍या अर्थाने लोकमान्य!
त्यांना जाऊन आज 98 वर्षे झाली.
आजही आपण टिळक पगडी की फुले पगडी यावरून एकमेकांची डोकी फोडलीच पाहिजेत का? कोण चुकले नी कोण बरोबर होते याच्या किर्द वह्या-चोपड्या आणखी किती काळ आपण डोक्यावर मिरवायच्या? ही जुनी वैरं आणखी किती काळ आजच्या पिढ्यांनी वागवायची?
प्रतिकात अडकायचं की विचारांचा वारसा घ्यायचा?

1.
कोल्हापूरच्या छत्रपतींच्या वंशजांचा छळ केल्याबद्दल दिवाण बर्वे यांच्यावर केसरी-मराठा मध्ये  टिळक आगरकरांनी टिकेचे आसूड ओढले. बर्व्यांनी त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा खटला भरला. या दोघांना अटक झाली. त्यांना मुंबईत डोंगरीच्या तुरूंगात ठेवले होते. ब्रिटीश कोर्टाने त्यांच्याकडे दहा हजार रूपयांचा जामीन मागितला. [ज्या काळात सोन्याचा तोळ्याचा भाव पंधरा रूपये होता तेव्हाचे दहा हजार रूपये म्हणजे आजचे किती झाले? सुमारे दहा कोटी रूपये? ]

महात्मा फुले आणि टिळक-आगरकरांचे वैचारिक मतभेद होते. तरिही टिळकांची तार मिळताच
रातोरात जोतीराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेट बापूशेट उरवणे यांना दहा हजार सुरती रूपये घेऊन मुंबईला पाठवले. टिळक-आगरकरांच्या जामीनाची सोय केली. पुढे टिळक-आगरकर तुरूंगातून सुटल्यावर त्यांची मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. स्वत: टिळकांनी त्याबद्दल आपल्या वर्तमानपत्रातून फुल्यांना जाहीरपणे धन्यवाद दिले. [केसरी, दि. 3 आक्टोबर 1882]

पुढे फुले वारल्यावर टिळक-आगरकरांनी त्यांच्या निधनाची एका ओळीचीसुद्धा बातमी दिली नाही.


2.
1 ऑगष्ट 1920 ला टिळक गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूकनायकचे संपादक होते. त्यांनी बातमी दिली. पण एका ओळीची. "कळवण्यास दु:ख वाटते की काल पुण्याचे बा.गं. टिळक यांचे सरदार गृहात निधन झाले."
टिळक अनुयायी संतापले. त्यांनी बाबासाहेबांना घेरले. बाबासाहेब म्हणाले, "त्यांनी फुल्यांची बातमीसुद्धा दिली नव्हती. आम्ही दिली.
आम्ही मूकनायक काढला तेव्हा केसरीला विनंती केली की हा पेपर सुरू झाल्याची बातमी तुम्ही छापल्यास लोकांना या पेपरची माहिती होईल. पण त्यांनी बातमी दिली नाही.
आमच्या पेपरची जाहीरात छापा, आम्ही त्याचे पैसे देतो असे आम्ही सांगितले तर केसरीने कळवले, "जागा नाही."
त्याचकाळात केसरीतल्या जाहीराती कोणत्या होत्या? तर "लोकमान्य जोडा" चपलेच्या दुकानाच्या जाहीराती."

3.
महात्मा गांधीजी लोकमान्यांना आणि गोखल्यांना गुरूस्थानी मानायचे. लोकमान्य गेले तेव्हा गांधीजींना अंत्ययात्रेत त्यांच्या तिरडीला खांदा द्यायचा होता.
गांधीजी हलक्या जातीचे आहेत असे सांगून टिळक अनुयायांनी त्यांना नकार दिला. टिळक अनुयायी कमालीचे सनातनी. संकुचित. आजही त्यांच्यात फारसा फरक पडायला तयार नाही.

4.
टिळकांनी छत्रपती शाहूंच्या वेदोक्त प्रकरणात सनातन्यांची बाजू घेतली. शाहूराजे दुखावले गेले.
ताईमहाराज प्रकरणात टिळकांवर बलात्काराचा खटला भरला गेला. टिळक न्यायालयात निर्दोष ठरले.
शाहूंनी ताईमहाराजांची बाजू घेतली होती हे टिळक कधीही विसरले नाहीत. या दोघांच्या चुकांची किंमत महाराष्ट्राला चुकवावी लागली. लागतेय.

5.
अण्णाभाऊ कम्युनिस्ट. अण्णाभाऊ, अमर शेख, गव्हाणकर हे तिघे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार-शाहीर. श्रीपाद अमृत डांगे त्यांचे नेते. डांगे कट्टर टिळकभक्त. त्यांना फुले शाहूंची अ‍ॅलर्जी. त्यांच्या पक्षाच्या मुखपत्राचा महात्मा फुले विशेषांक काढावा यासाठी त्यांच्या संपादकांनी हट्ट धरला. डांगे तयार नव्हते. शेवटी त्यांनी राजीनाम दिला तेव्हा डांगे तयार झाले. अण्णाभाऊंनी आपली "फकीरा" कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केली.
"जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव," हे त्यांनी लिहिलं हे पक्षातल्या अनेकांना खटकलं.
अण्णाभाऊंनी आपला पोवाडा मायभू, शिवराय नी लोकमान्य टिळक यांच्या चरणी अर्पण केलेला.
अण्णाभाऊंची अपार उपेक्षा झाली. एक महान कादंबरीकार, जागतिक किर्तीचा साहित्यसम्राट, लोकशाहीर, लोकनाट्यकार, पण दलित.
ते गेले तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला खुप कमी लोक हजर होते. आज त्यांचे कोट्यावधी रूपयांचे पुतळे राहाताहेत पण अण्णाभाऊ गेले तेव्हा उपाशीपोटी गेले होते.

6.
गुरूवर्य य.दि,फडकेसरांनी त्यांचा पहिला वैचारिक ग्रंथ टिळक-आगरकरांवर लिहिला. सर मूळचे रहस्यकथा लेखक. त्यांनी पुस्तकाला नाव दिलं "शोध बाळगोपाळांचा."
तर एका संस्थेने या पुस्तकाला बाल वाड्मयाचा पुरस्कार दिलेला.
त्यांनी वाचायचे सोडा पुस्तक चाळलेही नसणार!

7.
मी संपादित केलेला "आम्ही पाहिलेले फुले" हा ग्रंथ एका बहुजन महाविद्यालयातील बहुजन ग्रंथपालांनी बॉटनी विभागात ठेवलेला आढळला. आम्ही "पाहिलेली" फुले=फ्लाॅवर्स, असे समजून.

8.
पुण्यात ब्रिटीशांनी भाजी मंडई बांधायला काढली. त्याला दोघांनी कसून विरोध केला. एक फुले नी दुसरे टिळक. कारणं वेगळी पण विरोध पक्का.
पण मंडई उभी राहिलीच. पुढे आचार्य अत्र्यांनी त्या मंडईला महात्मा फुल्यांचे नाव दिले आणि पुणेकरांनी त्या मंडईत लोकमान्य टिळकांचा पुतळा उभा केला.
.........................

उत्तरार्ध

टिळक सनातनी नव्हते, प्रागतिक होते अशी मांडणी करणारांसाठी काही प्रश्न आहेत-
"ईश्वर जर अस्पृश्यता मानत असेल तर मी असला ईश्वर मानत नाही. त्याला मी अरबी समुद्रात बुडवीन" असं टिळक म्हणाले हे खरंच आहे. ते विधान धाडसाचेच होते.
पण त्याबद्दल 2 प्रश्न आहेत.

1. त्याच परिषदेत महर्षि वि.रा.शिंदे यांनी "आजपासून मे माझ्या खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही," अशा प्रतिज्ञावर टिळकांना सही करायची विनंती केली. टिळकांनी सही केली नाही. टिळक त्यांना म्हणाले, "सही करण्यापुर्वी मला माझ्या अनुयायांशी सल्लामसलत करायला लागेल." खाजगी जीवनाशी अनुयायांचा काय संबंध?

2. हे स्वत:चे भाषण टिळकांनी लंडनच्या टाइम्समध्ये छापून आणले. परंतु टिळक संपादक असलेल्या केसरीत मात्र त्याची एकही ओळ छापली जाणार नाही याची दक्षता घेतली असे का? म्हणजे हे भाषण राणा भीमदेवी, लंडनमध्ये आपली प्रागतिक प्रतिमा निर्माण करण्यासाठी केलेले होते हे खरे नाही काय?

3. महर्षि कर्वेंच्या महिलांना विद्यापिठीय शिक्षण देण्याच्या उपक्रमाला टिळकांनी जाहीरपणे विरोध केला, असे का?

4. स्वत:च्या मुलीला त्यांनी शिकवलं, हे खरंय. ही मोठीच गोष्टाय. पण त्याच मुलीने मुलींना शिक्षण मिळालेच पाहिजे असा आग्रह धरणार्‍या मोर्च्यात भाग घेतला आणि आपल्या वडीलांची याबाबतची सनातनी मतं आपल्याला मान्य नाहीत असं भाषण केलं ते का?

5. त्यांच्या मुलाने श्रीधरने महाड सत्याग्रहाला जाहीरपणे पाठींबा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना टिळक वाड्यात बोलावून त्यांचा सत्कार केला. पण याच मुलाला केसरी ट्रस्टच्या सदस्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली.  त्यानं शेवटचं पत्र बाबासाहेबांना लिहिलं.
पण टिळकांनी तर बाबासाहेबांच्या मूकनायकची जाहीरातही छापली नाही. महात्मा फुले गेल्याची साधी बातमीही दिली नाही. हे पत्रकारिता धर्मात बसते?

6.छत्रपती शाहूंना वेदोक्त अधिकार नाकारणार्‍या राजोपाध्यांची बाजू टिळकांनी घेतली हा त्यांचा सनातनीपणा नव्हता?

7. गीतारहस्यात ज्यांनी शूद्रांना पापयोनी ठरवले ते टिळक सनातनी नव्हते काय?

1 ऑगष्ट 1920- लोकमान्य गेले. अण्णाभाऊ जन्मले.
दोघांना विनम्र आदरांजली.
-प्रा. हरी नरके

Wednesday, July 18, 2018

निमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे-


निमित्त- 49 वा स्मृतीदिन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हा मराठीचा मौलिक ठेवा-प्रा.हरी नरके

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 49 वी पुण्यतिथी. आपल्या सकस लेखणीद्वारे व शाहीरीद्वारे ज्यांनी उच्च दर्जाचे प्रबोधन केले असा हा महान कलावंत-साहित्यिक.
अण्णाभाऊंचे मूळ नाव तुकाराम. अण्णा हे त्यांचे टोपण नाव.

१ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे जन्म झाला. १८ जुलै १९६९ रोजी वयाच्या अवघ्या 49 व्या वर्षी ते गेले. त्यांचे वडील भाऊराव साठे यांची घरची अतिशय गरिबी होती. अण्णाभाऊंचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नव्हते. प्रतिभेचा झरा होता मूळचाच खरा. त्यांनी ३५ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांचे १५ कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी 11 नाटकं व लोकनाट्यं लिहिली. त्यांचे प्रवास वर्णन, रशियातील भ्रमंती, खूप गाजले. त्यांच्या १२ चित्रपटांच्या पटकथा पडद्यावर आल्या. त्यांनी शेकडो पोवाडे व गाणी लिहिली. त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य पुरस्कार मिळालेला होता. तिला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि.स.खांडेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे.
त्यांच्या साहित्याचा अनुवाद तीसेक भाषांमध्ये झालेला आहे.

"जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव!
गुलामगिरीच्या या चिखलात रूतून बसला का ऎरावत,
अंग झाडूनी निघ बाहेरी, घे बिनीवरती धाव,
धनवंतांनी अखंड पिळले, धर्मांधांनी तसेच छळले,
मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव,
ठरवून आम्हा हीन कलंकित, जन्मोजन्मी करुनी अंकित,
जिणे लादूनी वर अवमानित, निर्मुन हा भेदभाव,
एकजुटीच्या या रथावरती, आरूढ होऊनी चल बा पुढती,
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,करी प्रगट निज नांव!"

हे एकच गीत जरी त्यांनी लिहिले असते तरी त्यांचे नाव अजरामर झाले असते. त्यांनी तर शेकडो गितं लिहिली.
रवि आला लावुनि तुरा, माझी मैना गावावर राहिली, मुंबईची लावणी यांनी महाराष्ट्राला वेड लावले.

"पानापानात नाचे हा वारा, भूप रागाच्या छेडीत तारा, हासे कोकीळ मनी, मोर नाचे वणी, सप्तरंगाचा फुलवून पिसारा!" अशी देखणी शब्दशिल्पं त्यांनी कोरली.
वैचारिक आणि सामाजिक बांधिलकी हा त्यांच्या लेखणाचा गाभा होता. त्यांनी कम्युनिष्ट पार्टीसाठी अनेक वर्षे काम केले.
गिरणी कामगार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यासाठी ते लढले.

तिकीटाला पैसे नाहीत म्हणून लहाणपणी ते कासेगाव ते मुंबई हे अंतर पायी चालत गेले. त्यांची ही वणवण मात्र आयुष्यभर चालूच राहिली.
" दलित कंगाल दिसला, एका झाडाखाली तीन दगडाच्या चुलीवर त्याचा संसार असला तरी संसार करण्याची त्याची इच्छा पवित्र आहे. काव्यमय शब्दात सांगायचे तर, हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलिताच्या तळहातावर तरलेली आहे," हे त्यांचे उद्गार कसे विसरता येतील?
अण्णाभाऊ मुंबईच्या झोपडपट्टीत राहत.

ते 18 जुलैला गेले तेव्हा तीनचार दिवसांचे कुपोषण त्यांना झालेले होते. त्या अठवड्यात ते मंत्रालयातल्या एका उपसचिवाला जाऊन भेटले. म्हणाले, तुम्ही मला लेखक-कलावंत म्हणून मानधन देता पण ते महिना अखेरीला मिळते. तुम्ही ते मला दर आठवड्याला देऊ शकणार नाही का? माझी चूल गेले चार दिवस पेटलेली नाही." उपसचिवने त्यांच्याकडून तसा अर्ज घेतला, पुढे पाठवला. पण सरकारी निर्णय व्हायच्या आत कुपोषणाने अण्णाभाऊंचा बळी घेतलेला होता.

ते गेल्याची बातमी तत्कालीन समाज कल्याण मंत्री बाबूराव भारस्करांना कळताच ते अण्णाभाऊंच्या झोपडीकडे धावले. अंत्यविधीचे सामान आणायला पैसे नव्हते.
भारस्करांनी दोघा कार्यकर्त्यांना बोलावले, पाचशे रूपये दिले. सामान लवकर घेऊन या असे त्यांना सांगितले.
ते कार्यकर्ते पैसे घेऊन जे गेले ते परत आलेच नाहीत!

अण्णाभाऊंच्या अंत्ययात्रेची परवड झाली. या अंत्ययात्रेला फार कमी लोक उपस्थित होते. आज त्यांचे असंख्य पुतळे उभे राहात आहेत, पण त्यांच्या विचारांचे काय? ते कोण पेरणार? जपणार? संवर्धित करणार? आपण ते काम करूयात.

प्रेमचंदांची कफन ही कथा तुम्हाला आठवतेय का?

अण्णाभाऊंसारख्या प्रतिभावंताला कुपोषणात जगवणारी, पोसणारी यंत्रणा चळवळीकडे ४९ वर्षांपुर्वी नव्हती. आज तरी आहे का?
- प्रा. हरी नरके