Showing posts with label नोटाबाणी. Show all posts
Showing posts with label नोटाबाणी. Show all posts

Thursday, May 28, 2020

काळीज पिळवटून टाकणारे मजूरांचे लोंढे - प्रा. हरी नरके












गेला महिनाभर प्रवासी मजूरांचे होत असलेले हाल बघताना काळीज पिळवटून जाते. किती भयंकर यातनांमधून जाताहेत हे बांधव. खरं तर ज्यांना ज्यांना काळीज आणि मेंदू आहेत त्या सर्वांनी अस्वस्थ व्हावं असं हे भयकारी वास्तव आहे. पण एन.डी.टि.व्ही.चा अपवाद वगळता इतर वाहिन्यांना हे हाल, हे जगणं का दिसत नाहीत? का भिडत नाही? तो बातम्यांचा ठळक आणि मुख्य विषय का होत नाही? भारतीय माध्यमांचा हा बधीरपणा संतापजनक आहे. लाजिरवाणा आहे. माध्यमांचा इतका सरकारधार्जिणेपणा तर १९७५ च्या आणीबाणीतही नव्हता.


दुसरीकडे सामान्य माणसाला दहशत बसावी, रोज धडकीच भरावी अशा बेजबाबदार पद्धतीनं याच वाहिन्या कोरोनाच्या बातम्या दाखवत आहेत. बातम्या देणारांचे किंचाळणारे आवाज जणू काही तरी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा भास निर्माण करताहेत. इतका बथ्थडपणा का? यांना कुणालाच संवेदना नाहीत? हे अपार हाल सोसणारे, तडफडून मरणारे लोक यांचे कुणीच नाहीत? यात ह्युमन व्हॅल्यू असलेले बातमीमूल्य नाही? सरकारचे व भारतीय माध्यमांचे हे संवेदनाशून्य वर्तन बघताना शरम वाटते. त्यांना असे वाटते की हे मजूरलोक भारतीय नाहीतच. कुठून आणत असतील हे सरकारी दलाल एव्हढे बधीरपण?

हे सरकार गरिबांचे कधीच नव्हते. ज्या तुघलखी बाण्याने नोटाबंदी, जीएसटी आणि कोणतेही नियोजन न करता अचानक केलेला लॉकडाऊन हे गरिबविरोधी निर्णय घेतले गेले त्यावरून सरकारचे वर्तन माणूसघाणे आणि निर्दयपणाचेच ठरते. सरकारला आणि त्यांच्या मातृसंघटनेला फक्त उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अब्जाधीश यांचेच हित बघायचे आहे. कारण तेच त्यांचे लोक आहेत. गरिबांचे कर्दनकाळ म्हणूनच या तथाकथित ५६ इंचाची नोंद इतिहासाला करावी लागेल.

एकाचढ एक माथेफिरू भरलेत युपी, एम.पी. बिहार राज्यात आणि पीएमओ, रेल्वे आणि अर्थखात्यात. इतके लोभस आणि खोटे चित्र रंगवतात हे नीच ट्विटरवर! कुठे फेडाल ही पापं? गरिबांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही मुर्दाडांनो.

रस्त्यावरील भिकार्‍यांचे पुनर्वसन करणार्‍या डॉ. सोनावणे यांची मुलाखत बघत होतो. ते म्हणाले, भिकार्‍यांमध्ये दोन प्रकारचे गट कार्यरत आहेत. एक ज्यांना कामधंदा न करता आयते खायची सवय लागलेली आहे, असे सराईत, धंदेवाईक, जातीगत भिकारी आणि दुसरा ज्यांना वृद्धत्व, अपंगत्व किंवा गंभीरस्वरूपाचे आजारपण यांच्यामुळे काम करणे शक्य होत नाही असे मजबूर लोक.

मला यातली पहिल्या प्रकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची वाटते. दुसर्‍या प्रकारातील लोकांसाठी कल्याणकारी भुमिकेतून समाज आणि सरकारने काम करायला हवेच. मात्र पहिल्या प्रकारच्या लोकांना ठोकून काढून सक्तीने कामाला जुंपले पाहिजे.

आपल्या देशात भिक मागण्याचेही धार्मिक उदात्तीकरण केले गेलेले आहे. कधी ते भिक्षुकीच्या तर कधी दक्षिणेच्या नावावर. लक्षावधी साधू, संन्याशी, मठपती यांचे त्यामुळेच तर फावले असून भिकारचाळे करणारे हे लोक ही त्यांचीच निर्मिती आहे. शारिरिक वा बौद्धिक श्रम न करता निव्वळ आयते खाणारे लोक हे देशावरचा बोजा आहेत. असे समुहच्या समुह असणे हे देशावरचे संकट मानायला हवे. का पोसायचे या बाजारबुणग्यांना? असे कोट्यावधी वळू पोसणारा देश कसा प्रगती करणार?

मी स्वत: झोपडपट्टीतून आलोय. बालमजुरी करीत शिकलोय. टोकाची गरिबी मी अनुभवलीय. कोणतीही शासकीय सवलत न घेता मी इथवर आलोय. मला गरिबांविषयी, श्रमिकांविषयी कळवळा वाटतो. पण तो आंधळा नाही.

त्यामुळे काही गरिबांची खटकणारी एक गोष्ट नोंदवायलाच हवी. शंभर वर्षे झाली, र.धों.कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व सांगून. भयावह गरिबी असताना २०२० मध्येही जेव्हा पोराबाळांचे लेंढार वाढवणारे काही लोक मला दिसतात तेव्हा डोक्यात तिडीक उठते. आणीबाणीत कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम बूमरॅंग झाला आणि १९७७ पासून लहान कुटुंबाचा बोजवारा उडाला.


झोपडपट्टीत राहणारी, फूटपाथवर राहणारी ही कोट्यावधी गरिब जनता कधीतरी स्वत:च्या उत्कर्षासाठी कुटुंबनियोजनाकडे वळणार की नाही? छोटे कुटुंब हा पॅटर्न आजही का आपलासा होत नाही? जन्माला येणारे प्रत्येक गरिब मूल बाळूत्यावरून ( पाळण्यातून ) उठते आणि थेट बालकामगार बनते. कमावता हात बनते. हे कधीतरी थांबल्याशिवाय ही उपासमार, हे हालाखीचे दिवस, कसे टळणार?

सावित्रीबाईंनी - जोतीरावांनी मुलींच्या, मागासवर्गियांच्या, बहुजनांच्या शिक्षणाचे काम सुरू केले त्याला पाऊणेदोन शतके उलटली. छ. शाहू, सयाजीराव, कर्मवीर भाऊराव, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व आमच्या कानीकपाळी ओरडून सांगितले. तरिही अद्याप आमच्यात ज्ञानाची आच निर्माण होत नसेल तर कसे थांबणार आमचे हे नष्टचर्य?

राज्यकर्त्यांच्या नियोजनशून्यतेवर जरूर बोललेच पाहिजे.आसूडा मारलेच पाहिजेत. पण आमच्या गरिबांच्या चुकांचेही आत्मपरीक्षण केले तरच या आपत्तीमधून आम्ही काही तरी शिकलो असे म्हणता येईल. येरे माझ्या मागल्या आणि पुढले पाढे पंचावन्न!

- प्रा. हरी नरके, २८/५/२०२०

Wednesday, August 29, 2018

नोटाबंदी २००% यशस्वी -




रू.५०० नी १०००च्या सर्व नोटा परत आल्याने नोटाबंदी फसली असे आरोप केले जातायत.
एक अर्थतज्ज्ञ तर म्हणाले, डोंगर पोखरून उंदीरही निघाला नाही, निघाले निव्वळ एक मेलेले झुरळ. नोटाबंदीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची पार वाट लागली. रोजगार कमी झाले. उद्योग, व्यापाराचे तीनतेरा वाजले, इ. इ. मला हे आरोप मान्य नाहीत.

नोटाबंदीचे अनंत लाभ झालेले आहेत.

१. नोटा बंदीमुळे बॅंक कर्मचार्‍यांची कार्यक्षमता वाढली. पुर्वी ते कामच करीत नव्हते. नोटाबंदीच्या काळात २४-२४ तास काम करू लागले. आरबीआयवाल्यांना दोन वर्षे नोटा मोजायचे काम मिळाले.एरवी बेकार बसून पगार खातात. त्यांना हाताने नोटा मोजाव्या लागल्याने त्यांचे बेरीज-वजाबाकीचे गणिताचे ज्ञान वाढले.

२. नोटाबंदीमुळे जनतेला आनंद मिळाला.
जुन्या नोटा जमा झाल्या. नव्याकोर्‍या नोटा जनतेला मिळाल्या. किती स्तुत्य उपक्रम. नव्याकोर्‍या नोटांचा आनंद बघा ना! त्याही कोणताही ज्यादा चार्ज न घेता.

३. नोटाबंदीमुळे बेरोजगारांविषयीची संवेदनशीलता वाढली.
नोटाबंदीमुळे १५ लाख लोकांच्या म्हणे नोकर्‍या गेल्या. बरेच झाले ना. नोकरीच्या सुरक्षिततेमुळे ते बेपर्वाईने वागत होते. बेकारांचे, बेरोजगारांचे दु:ख काय असते ते यामुळे त्यांना कळले तरी.
नोकर्‍या गेल्यावर त्यांना नोकरीचे महत्वही कळले. मी तर म्हणतो, सध्या जेव्हढे लोक सरकारी/खाजगी नोकरीत आहेत त्यांनाही धक्का द्याच. देशात संवेदनशीलता वाढणे गर्जेचे आहे.

४. नोटाबंदीमुळे देशाची लोकसंख्या कमी झाली.
नोटा बदलीसाठी ग्रामीण - शहरी दोन्ही भागातल्या जनतेला बॅंकांच्या दारात रांगा लावायला लागल्या. त्यात काहीशे लोक मृत्यूमुखी पडले. बरेय ना! तेव्हढीच देशाची लोकसंख्या कमी झाली. मी तर म्हणतो, दरवर्षी असे ड्रील घेत जा. शिवाय लोक कामचुकार झाले होते. त्यांना असे कामाला लावणे गरजेचे होतेच.

५. नोटाबंदीमुळे पं. प्र. यांच्याविषयीची आत्मियता वाढली.लोकांची निर्णयशक्ती वाढली.
आपले पंप्र. दररोज २२ तास काम करतात. राहिले तुम्ही दोनचार महिने रांगेत उभे तर असे काय बिघडले? नोटाबंदीमुळे सलग चार महिने त्यांना भारतातच रहावे लागले. किती हा त्याग. त्यामुळे भारतीय जनतेला त्यांचा सहवास मिळाला.
लोक काय दोन्ही बाजूंनी बोलतात. एकदा म्हणतात, नोटाबंदीमुळे काम गेले, एकदा म्हणतात कामाला लावले. एक काय ते नक्की करा.

६. नोटाबंदीमुळे गरीबी दूर झाली.
ज्यांनी ४०% कमिशनवर जुन्या नोटा बदलून द्यायचा "शाही उद्योग" केला त्यांची गरीबी हटली की नाय?

७. नोटाबंदीमुळे केरळच्या पूरग्रस्तांना  रू. दहा हजारची घसघसीत मदत मिळाली.
नोटाबंदी झाली नसती तर ८५० कोटी रूपयांची उलाढाल असणारी पेटीएम कंपनी तयार झाली असती? तिच्या मालकाने केरळ पूरग्रस्तांना रू. दहा हजारची घसघसीत मदत केली असती?

८. नोटाबंदीमुळे राष्ट्रीय एकात्मता वाढली.
लोक एका रांगेत महिना महिना उभे होते. त्यांच्यात भाईचारा वाढला. एकमेकांना इतक्या जवळून समजून घेता आले.

९. नोटाबंदीमुळे संगणक-मोबाईल साक्षरता आणि श्रीमंती वाढली.
नोटाबंदी ना होती तर इ. व्यवहार न वाढते. ते वाढल्याने काही श्रीमंत कंपन्यांना चार्जेस मिळू लागले. त्यांची श्रीमंती आणखी वाढली.

१०. नोटाबंदीमुळे सिक्युरिटी प्रेसला छपाईचे काम मिळाले.
एरवी नुस्ते बसून पगार खायचे लेकाचे. नोटांचा आकार लहान झाल्याने एटीएम मशिन्स दुरूस्त करावी लागली. तंत्रज्ञांना काम मिळाले.

११. नोटाबंदीमुळे वाहिन्यांना खाद्य मिळाले. अर्थक्रांती झाली.
वाहिन्यांना चर्चा करायला विषय मिळाले. बोकील अनिलाण्णा नावाचे जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ यामुळेच जगाला मिळू शकले.

१२. नोटाबंदीमुळे रोजगारात भरीव वाढ झाली.
नोटाबंदीविरूद्ध लोकमत तयार होऊ नये यासाठी सरकारी पातळीवर प्रचारक नेमले गेले. त्यांना रोजगार मिळाला. सरकारने जाहीराती दिल्या. प्रिंट आणि इ.मिडीयाला रेव्हेन्यू मिळाला.
लेखकांना मसाला मिळाला. फेबुविरांना काम मिळाले.

१३. नोटाबंदीमुळे आतंकवाद खतम झाला.
जुन्या नोटा वापरून आतंकी कारवाया व्हायच्या. नव्या नोटा आल्यापासून काश्मीर किती शांतय!
मुख्य म्हणजे पाकने छापलेल्या सगळ्या जुन्या नोटा वाया गेल्या. आपल्या शत्रूचे नुकसान म्हणजे आपला फायदा.
हुआ की नयी?


नोटाबंदीचे असे २०१ फायदे आहेत. तुर्तास एव्हढेच.
तर बोला नोटाबंदी २००% यशस्वी झालेली आहे....नव्हे मान्य करा. तशा पोस्टी टाका.

-प्रा. हरी नरके, २९ ऑगष्ट, २०१८

https://www.thehindu.com/business/Economy/993-of-demonetised-currency-returned-to-banks-rbi/article24808160.ece

Tuesday, November 7, 2017

नोटाबाणी








इंदोर, दि. 8 नोव्हेंबर 2016 -
सायंकाळी बातम्या बघण्या-ऎकण्यासाठी हॉटेलच्या रूममधला टिव्ही लावला तर सुतकी चेहर्‍याने घातलेली मित्रो, अशी हाक ऎकू आली. आता भारत-पाक युद्ध घोषित होणार म्हणून काळजी वाटायला लागली. पोटात धडकीच भरली ना!
बघतो तर काय? झाली ना नोटाबंदीची घोषणा.
प्रवासात मोजकेच पैसे बरोबर आणलेले. तेही ठेवायला सोयीचं व्हावं म्हणून 500 आणि 1000 च्या नोटांमध्ये. आता काय करायचं?
आधल्याच दिवशी इंदोरच्या पुस्तक दुकानात जाऊन बरीच हिंदी पुस्तकं घेण्यासाठी ऑर्डर दिलेली. उद्या दुकानाला सुट्टीय. परवा या. आणून ठेवतो असं दुकानदार म्हणालेला. मनासारखी पुस्तक मिळणार म्हणून आनंद झालेला.
दुसर्‍या दिवशी गेलो तर दुकानदारानं सगळी पुस्तकं आणलेली होती. पण तो म्हणाला, 1000, 500 च्या नोटा "महज एक कागज का टुकडा" असल्यानं चालणार नाहीत.
त्यामुळे हातातोंडाशी असलेली पुस्तकं न घेताच परत फिरावं लागलं.
संगिताला इंदोरमध्ये महेश्वरी साड्या, कपडे, नमकीन, मिठाई अशी कायकाय खरेदी करायची होती, कागज का तुकडा काय कामाचा? सबब खरेदी कॅन्सल.
इंदोरला जाऊनसुद्धा काहीही न घेता आम्ही हात हलवत परत आलो.
मेहरबानी परतीच्या तिकीटांचं रिझर्वेशन आधीच झालं होतं म्हणून परत तरी येता आलं. नाही तर राहावं लागलं असतं इंदोरातच.
एकच आनंद होता की आता भारतात सुवर्णयुग येणार. अमीर लोकांची चैन की निंद हराम की होणार. गरीबाची मात्र चांदी होणार.
आणि तसंच झालं. सगळ्यांचे अच्छे दिन सुरू झाले.
बघता बघता गरीब मालामाल झाले.
श्रीमंत पार भिकारी झाले.
लाखो - करोडोंचा काळा पैसा बाहेर आला.
भारताचा जीडीपी दोन हजार वर्षात प्रथमच 25% वर गेला.
नवे रोजगार इतके जास्त निर्माण झाले की स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी संपुर्ण बेरोजगारी प्रथमच दूर झाली.
100 टक्के भारतीय श्रीमंत झाले.सारा भारत एका रात्रीत डिजीटल झाल्यानं कार्ड पेमेंटवर कमिशन कमावता येऊ लागले. कामधंदा न करता पैसे कमावण्याचा घरबसल्या नवा मार्ग उपलब्ध झाला. अगदी सरकारी कंपन्याही [महा.विद्युत निर्मिती आणि पारेशन] कार्ड पेमेंट केले तर आजही त्या रकमेवर कमिशन घेतात. धन्य धन्य सरकार.
दुसर्‍या दिवसापासून ए.टी.एम. वर हवे तेव्हढे पैसे सहज उपलब्ध होऊ लागले.
देशात रांगा म्हणून कुठेच नाहीत.
बॅंक कर्मचार्‍यांना तर कामच शिल्लक राहिलं नाही.
सगळा काळा पैसा संपल्यानं देशभर आनंदी आनंद पसरलेला.
असा महान राज्यकर्ता या आधीच आम्हाला का मिळाला नाही असं जो तो एक दुसर्‍यांना विचारू लागला.
पाडवा, दिवाळी, दसरा, आणखी कायकाय एकदमच साजरं करू लागला.120 जणांना रांगेतून मोक्ष मिळाला. आणीबाणीमुळे इंदिराबाईंना जावे लागले होते तसे या नोटाबाणीसाठी कोणाला घालवणार?
तर मित्रो, आजच्या दिवशी वर्षश्राद्ध घालायचं तर काय करता येईल?
आपण तमाम भारतीय आजच्या आपल्या राष्ट्रीय पुण्यतिथीदिनी
सामुदायिक आत्महत्त्या केल्याची आठवण म्हणून
सर्व मिळून दोन मिनिटं उभं राहून स्वत:लाच श्रद्धांजली वाहू या का?
-प्रा. हरी नरके
...........................