Showing posts with label कोरोना. Show all posts
Showing posts with label कोरोना. Show all posts

Tuesday, July 21, 2020

कोरोना लस निर्मितीचा प्रवास- Saniya Bhalerao


ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि फेज २ क्लिनिकल ट्रायल्स संदर्भातला एक १३ पानाचा रिसर्च पेपर वाचला जो ‘द लॅन्सेट’ या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. “द लॅन्सेट” हे जगातील मेडिकल सायन्सच्या सर्वोत्तम जर्नल्सपैकी एक. या जर्नलमध्ये नुकताच ऑक्सफर्ड विद्यापीठाने एस्ट्राझिनका या फार्मास्युटिकल कंपीनीसोबत काम करत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायल्स संदर्भात आणि परिणामकारकतेबाबत एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. कोरोना व्हॅक्सिनच्या फेज १ आणि दोन या क्लिनिकल ट्रायल्सचे डिडेल्ड रिपोर्ट्स त्यांनी या रिसर्च पेपरमध्ये दिले आहेत. मागच्या लेखात मी सांगितलं होतं की व्हॅक्सिन तयार होणं आणि त्यासाठी कराव्या लागणाऱ्या क्लिनिकल ट्रायल्स याची प्रोसेस काय असते ते. उगाच इथे तिथे छापून येणाऱ्या बातम्या, व्हॅक्सिन कधी येणार या बाबत उलट सुलट चर्चा आणि त्यातून पसरणारा गैरसमज कमी व्हावा त्याकरिता हा लेख. (लॅन्सेट मध्ये चायना मधल्या एका कंपनीच्या व्हॅक्सीनच्या फेज २ ट्रायल्सच्या प्रॉमिसिंग रिझल्ट्सबद्दल सुद्धा छापून आलं आहे.)

सगळ्यात आधी तर मी सांगू इच्छिते की हे व्हॅक्सिन विकसित करणाऱ्या शास्त्रज्ञांची नावं. ही नावं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या रिसर्च फिल्डमध्ये काम करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहेत. कारण हे लोक आमचे हिरो आहेत. यातल्या काही शात्रज्ञांचे रिसर्च पेपर्स कितीदा तरी वाचले आहेत. यांच्या रिसर्च पेपर्सना करोडो सायटेशन्स असतात आणि कित्येक वर्षांपासून हे लोक शांतपणे पडद्यामागे बसून आपलं काम करत आले आहेत आणि म्हणून यांचं नाव घेणं अत्यंत गरजेचं. ऑक्सफर्ड विद्यापिठामधील प्रोफेसर सारा गिलबर्ट, प्रोफेसर अँड्रयू पोलार्ड, जेन्नर इन्टिट्यूटचे डायरेक्टर प्रोफेसर एड्रियन हिल, जेन्नर इन्टिट्यूटमधील असोसिएट प्रोफेसर डॉक्टर टेरेसा लॅम्बे हे या संशोधनाच्या मुख्य टीमला लीड करता आहेत. यांच्या व्यतिरिक्त अजून कित्येक नावाजलेले शास्त्रज्ञ या टीमचा भाग आहेत.

आता आपण ऑक्सफर्डच्या कोरोना व्हॅक्सिनच्या सुरु असलेल्या क्लिनिकल ट्रायल्सच्या रिझल्ट बद्दल बघूया. तेवीस एप्रिल ते एकवीस मे या काळात फेज १ आणि फेज दोन या क्लिनिकल ट्रायल्स साधारण १०७७ पेशंट्सवर केल्या गेल्या. रिसर्च पेपर मधल्या मेथेडॉलॉजीमध्ये न पडता आपण त्यांना मिळालेल्या फाईंडिंग्ज बघूया. मी मागच्या लेखात सांगितलं होतं त्याप्रमाणे व्हॅक्सिनचा डोस दिल्यावर कोरोना व्हायरसला व्हॅक्सिन किती प्रमाणात न्यूट्रलाइज करू शकतं यावरून ते व्हॅक्सिन कोरोना व्हायरसला रोखण्यात किती प्रमाणात प्रभावी ठरतं हे आपल्याला कळतं. यासाठी 'न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स' बघितला जातो. हे व्हॅक्सिन दिल्यानंतर नुसतेच अँन्टीबॉडीज नाही तर टी सेल रिस्पॉन्स देखील मोजल्या जातो. एलायझासारखे ऐसे (चाचणी) या करिता वापरले जातात. कोरोना झाल्यावर त्याविरुद्ध लढण्यासाठी अँटीबॉडीजची गरज असते आणि जर कधी आपल्याला परत कोरोना झाला तर हे 'टी सेल्स' लक्षात ठेवून परत त्याच अँटीबॉडीज बनवायची ऑर्डर देतात. म्हणून ह्युमोरल इम्युनिटी जी हे अँटीबॉडीज तयार करते आणि सेलूयलर इम्युनिटी जी 'टी सेल्स' तयार करते या दोन्हीही अत्यंत गरजेच्या आणि व्हॅक्सिन दिल्यावर हे दोनीही रिस्पॉन्स मेजर करणं आणि त्यांचा अभ्यास करणं महत्वाचं ठरतं.ऑक्सफर्ड विद्यापीठाने हे दोनीही फॅक्टर लक्षात घेऊन सर्व चाचण्या केल्या आहेत. तर सार्स कोव्ह २ (कोरोना व्हायरस) च्या विरुद्ध मिळालेला न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडी रीस्पॉन्स हा सिंगल डोस करिता ९१ टक्के ( ३५ पैकी ३१ सब्जेक्टस्) होता आणि डबल डोस करिता १०० टक्के ( ३५ पैकी ३५ सब्जेक्टस्) होता. बूस्टर डोस दिल्यानंतर सर्व या ट्रायलमध्ये सहभागी असलेल्या सर्व माणसांमध्ये १०० टक्के न्यूट्रलाइजिंग रिस्पॉन्स आढळून आला.

हा रिसर्च पेपर पूर्ण वाचल्यावर थोडक्यात इंटरप्रिटेशन असं आहे की ChAdOx1 nCoV-19 हे जे ऑक्सफर्ड विद्यापीठाचं कोरोना व्हॅक्सिन आहे, ते स्वीकारार्ह सेफ्टी प्रोफाइल दाखवते आहे. तसंच या व्हॅक्सिनचे होमोलॉगस बुस्टिंग ( म्हणजे व्हॅक्सिनचे एका पाठोपाठ काही काळाने दिले जाणारे डोसेस) अँटीबॉडी रिस्पॉन्स वाढवतो आहे म्हणजे व्हॅक्सिनची परिणामकारकता वाढवतं आहे. हे व्हॅक्सिन ह्युमोरल आणि सेलूयलर असे दोनीही इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्स दाखवतं आहे आणि त्यामुळे सध्या सुरु असणाऱ्या फेज ३ ट्रायलसाठी हे एक पोटेन्शियल कँडिडेट ठरलं आहे.

सगळ्यात आधी हाय रिस्कमधल्या लोकांना जे समाजासाठी आपल्या तब्येतीची काळजी न करता काम करत आहेत, तसेच पासष्टवर्षांपेक्षा जास्तं वय असलेले लोक, यांना इम्युनाईज केलं पाहिजे असं इथे म्हटलं आहे. त्यामुळे आता हाय रिस्कमध्ये असणारे लोक म्हणजे हेल्थ केअर प्रोफेशनल्स, वृद्ध लोक, नर्सेस अशा सगळ्यांवर ट्रायल्स घेणं सुद्धा सुरु आहे. एकदा का फेज ३ ट्रायल्सचे सर्व रिझल्ट आले की मग लहान मुलांवर सुद्धा ट्रायल्स घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करणं हे महत्वाचं. द लॅन्सेट या जर्नलच्या एडिटोरियलमध्ये असं स्पष्ट म्हटलं आहे की, "व्हॅक्सिन त्वरित बाहेर यावं या करिता ही जी काही रेस चालू आहे ती दिसते आहे. आपल्या सगळ्यांनाच एक उपाय हवा आहे पण या सगळ्यामध्ये हे विसरून चालणार नाही की उपाया बरोबरच सेफ्टी ही सर्वोच्च महत्वाची बाब आहे"

आता नेहेमीचा प्रश्न : मग हे व्हॅक्सिन आपल्याकडे कधी येईल?

आता पर्यंत आपण पाहिलं की या व्हॅक्सिनचा प्रवास कसा चालू आहे ते. ते परिणामकारक आहे हे आता आपल्याला कळलं आहे. आता त्याचा डोस किती पाहिजे, त्याची इफिकसी लेव्हल किती आहे अशा चाचण्या फेज ३ मध्ये पार पडतील. सेफ्टी स्टडीज होतील. जेव्हा फेज ३ ट्रायल्स पूर्ण होतील आणि सर्व पॅरामीटर्स वर हे व्हॅक्सिन खरं उतरेल तेव्हा या व्हॅक्सिनच्या उत्पादनाला ग्रीन सिग्नल मिळेल. सिरम इंस्टीट्युटने ऑक्सफर्ड बरोबर करार केलेला आहे त्यामुळे फेज ३ ट्रायल्स यशस्वी रित्या पार पडल्या की व्हॅक्सिन निर्मिती सुरु होईल. शास्त्रज्ञ, टेक्निशियन्स, ते सर्व लोक जे स्वतः व्हॉलेंटियर म्हणून क्लिनिकल ट्रायल्स साठी भरती झाले आहेत.. हे सर्व जण आपापल्या भूमिका निभवता आहेत. आपण सुद्धा सुजाण आणि सजग नागरिक म्हणून आपली भूमिका निभावू. कोरोना संदर्भातल्या अर्थहीन बातम्या, फॉवर्ड्स पुढे न पसरवणं, पेशंट्सच्या प्रति अनुकंपा बाळगणं आणि न घाबरता शास्त्रीय दृष्टीकोनातून खबरदारी घेत जगणं.. हे करूया.

क्लिनिकल ट्रायल्स कशा गरीब लोकांवर घेतल्या जातात, कसे अत्याचार होतात असं काही लोकांना वाटतं पण फेअर क्लिनिकल ट्रायल्स सुद्धा होत असतात आणि एथिकल फार्मा प्रॅक्टिसेस कशा पद्धतीने फॉलो केल्या जाव्यात याचा ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या या क्लिनिकल ट्रायल्स हा एक उत्तम नमुना आहे. कोरोना सारखा आजार ज्याने आज सगळ्या जगाला वेठीस धरलं आहे त्यावर व्हॅक्सिन बनतं आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. नागरिक म्हणून यात आपण काहीतरी काँट्रीब्युट करावं अशी भावना ठेवून कित्येक जण ऑक्सफर्डच्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये व्हॉलेंटिअर म्हणून सहभागी झाले आहेत. त्यांना काय वाटलं या प्रोसेसमध्ये या व्हिडीओज च्या लिंक सुद्धा देते आहे. अजून एक गमतीचा भाग हा की यामधला एक व्हॉलेंटिअर भारतीय वंशाचा होता. आपल्याकडच्या एका न्यूज चॅनेलने त्याचा व्हिडीओ घेतला. त्यामध्ये पत्रकाराने त्या माणसाला विचारलं की तुला काय वाटतं मग कधी हे व्हॅक्सिन येईल? मीडिया कन्क्ल्युजनला येण्यासाठी इतकी घाई का करतं आहे या प्रश्नाचं उत्तर सापडत नाहीये. यात जो व्हॉलेंटिअर होता तो अतिशय समजूतदार असल्याने त्याने फेज तीन ट्रायल्स पूर्ण झाल्या की हे सांगता येईल असं म्हटलं ते उत्तम केलं पण कोणाला काय विचारायचं निदान कोरोना सारख्या पँडेमिकबाबत बातमी देताना याचं तारतम्य मीडियाने बाळगलं पाहिजे. त्यामानाने रवीश कुमार यांनी याच माणसाचा घेतलेला इंटरव्ह्यू हा जास्त सेन्सिबल वाटला. या दोनीही व्हिडीओजच्या लिंक सुद्धा शेअर करते आहे. आदर पुनावाला यांच्या इंटरव्ह्यूची लिंक देते आहे. ती पण जरूर बघा. आपल्याला जे ऐकायचं आहे त्यापलीकडे जाऊन ऐका. त्यातला मूळ मुद्दा समजावून घ्या. ऑक्सफर्डने विद्यापीठाने यावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना घेऊन एक छोटा व्हिडीओ काल पब्लिश केला आहे. त्याची लिंक सुद्धा देते आहे. पारदर्शकता काय असते. विज्ञानाला आणि त्यावर काम करणाऱ्या माणसांना किती अनन्य साधारण महत्व असतं ये यानिमित्ताने आपल्याकडच्या लोकांना कळेल आणि कदाचित आपल्याकडे यावर काम करणाऱ्या लोकांना निदान चिमूटभर का होईना पण मान आपल्याला देता येईल. यात व्हिडिओ आहेत जे पाहून गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. पोस्ट पब्लिक आहे. शेअर करण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही, स्वतः वाचा, माहिती पडताळा आणि मगच शेअर करा.

रेफरन्ससाठी लिंक्स देते आहे:

1) https://www.youtube.com/watch?v=HiLdEaSOJN4
2) https://www.youtube.com/watch?v=wPTv11qWuIQ
3) https://www.youtube.com/watch?v=-szt0u2X0WI
4)https://www.youtube.com/watch?v=LwqfZwkJtSg
5)https://www.youtube.com/watch?v=mj3kOL83mvA
6)https://www.youtube.com/watch?v=7MjBuyO_OcA
7)https://youtu.be/AbSSuz-DhFc

©सानिया भालेराव
२१/७/२०२०
#oxfordcovidvaccine
https://www.facebook.com/saniya.bhalerao


Tuesday, June 23, 2020

"बाबासाहेब आणि चीन" या लेखावरची एका चीनप्रेमीची पोटदुखी आणि जळफळाट - प्रा. हरी नरके


१. हरी नरके यांच्या "बाबासाहेब आणि चीन" या लेखाला एव्हढी भरमसाठ प्रसिद्धी कशाला? सध्या त्याचीच सगळीकडे धूम आहे. मोबाइलवर ओव्हरसबस्क्राईड.

२. लेख वाचण्यापुर्वीच मला तो लेख खोटा असणार अशी शंका होती. एका मित्राने मला विचारले, " हे खरे आहे काय?" मी तेव्हाच म्हणालो, "वाटत नाही."

कारण ५४ ला चीन केवळ पाच वर्षाचा होता. १९४९ ला चीनला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यावर कशाला बाबासाहेब बोलतील? हरी नरके खोटे लिहित असणार.

३. हरी नरकेंनी ज्याच्या आधारे लिहिलेय तो "बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचा खंड १५ वा" मी वाचलेला नाही.

४. पण मी एका लेखकाचे दुसरे पुस्तक वाचलेय.

५. त्यानुसार बाबासाहेबांनी त्या भाषणात रशियाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. चीनचा कमी वेळा केलाय. मग हरी नरके रशियावर का लिहित नाहीत?

६. बाबासाहेब चीन, माओ, कम्युनिझमवर बोललेत. पण कमी बोललेत.

७. परिस्थितीजन्य हंगाम येतात, जातात, प्रसिद्धि येते, अन जातेही.

८. हरी नरकेंना एव्हढी जास्त प्रसिद्धी मिळतेच कशी? काहीतरी लबाडी असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? आम्ही इतके दिवस लिहितोय, आमचे लेखन का गाजत नाही? आम्हाला प्रसिद्धी का मिळत नाही? हरी नरकेचे का गाजते? कारण वाचक मुर्ख आहेत आणि हरी नरके खोटे लिहितात म्हणून ते गाजते. जे गाजते ते खोटेच असते.

९. हरी नरकेचा हा लेख वाचू नका. तो चीनवर आहे. त्याला सांगा रशियावर लिही. चीन मला आवडतो.


-प्रा. हरी नरके,
२३/६/२०२०

टीप- बाबासाहेबांचे संसदेतले २६ ऑगस्ट १९५४ चे ते भाषण २ तासांचे प्रदीर्घ, अभ्यासपुर्ण आणि द्रष्टे विचार मांडणारे मौलिक भाषण आहे. त्यात जागतिक प्रश्नांवरचे चिंतन आहे. चीन, रशियापासून अगदी पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोवा, निजामाच्या ताब्यातील विदर्भ  असे अनेक विषय त्यात आहेत. एकुण छापील १३ पानांचा मजकूर आहे. मला एका पानाचा लेख लिहायचा होता. पुस्तक नव्हते लिहायचे.
माझा मुद्दा हा आहे की कोरोना कुठून आला? भारतावर हल्ला कुणी केलाय? चीन. सध्या चर्चेचा मुद्दा कोणता आहे? चीन. म्हणून मी जर चीन, कम्युनिझम आणि बाबासाहेब हा विषय प्रासंगिक विषय निवडलेला आहे. मी त्या लेखात आणखी याच्यावर का लिहिले नाही, त्याच्यावर का लिहिले नाही असले प्रश्न अनावश्यक आहेत - प्रा. हरी नरके

Sunday, June 21, 2020

फेसबुकवरील वाड्मयचौर्य - प्रा. हरी नरके












फेसबुकपोस्टच्या चोर्‍यामार्‍यांचे प्रमाण अलिकडे फारच वाढल्याचे आढळते. मित्रमैत्रिणींच्या चांगल्या पोस्ट ढापायच्या आणि स्वत:च्या नावाने स्वत:च्या भिंतीवर चिकटवायच्या हा प्रकार बेकायदेशीर आणि अनैतिक आहे. याचे काही उपप्रकारही आढळतात.
उदा.

१ ) मूळ लेखकाचे नाव डिलीट करायचे आणि त्यात किरकोळ फेरबदल करून लेख स्वत:च्या नावावर खपवायचा.

२) मूळ लेखकाचे नाव काढून टाकून लेख आपल्या भिंतीवर प्रकाशित करायचा. मूळ लेखकाचे नाव नसल्याने व लेख तुमच्या भिंतीवर प्रकाशित झाल्याने सामान्य वाचकांचा असाच समज होतो की लेख तुमचाच आहे. मग लोक तुमच्या कौतुकाच्या कमेंट करतात, त्यांना लाईक मारायचे. जर कुणी मूळ लेखकाचे नाव कमेंटमध्ये लिहिलेच तर त्या उडवायच्या किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे.


३) यदाकदाचित चोरी पकडली गेलीच, माझा लेख माझे नाव गाळून का प्रकाशित केला अशी मूळ लेखकाकडुन विचारणा झालीच तर मला हा लेख मला बिननावाचाच मिळाला होता अशी सारवासरव करून आपली लबाडी झाकायची. समजा तुम्हाला हा लेख बिननावाचा मिळाला होता तर तुम्ही तो लेख आपल्या भिंतीवर टाकताना "लेखक अज्ञात, किंवा लेखक माहित नाही" असे का लिहिले नाही?

कपिल सरोदे नावाचे एक वकील आहेत. त्यांनी माझा " डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि करोना" हा लेख स्वत:च्या भिंतीवर माझे नाव वगळून टाकला. हा लेख भीमजयंतीच्या निमित्ताने मी १४ एप्रिल २०२० रोजी लिहिलेला होता व तो महाराष्ट्र टाइम्स, सामना, बहुजन शासक या व इतर अनेक दैनिकांनी प्रकाशित केलेला होता. आंबेडकरी डॉट कॉम व इतर काही वेबसाईटवरही तो आलेला होता. शिवाय माझ्या तिन्ही फेबु खात्यांवर, पेजवर व ब्लॉगवर ही तो टाकलेला होता. ही दोनच महिन्यापुर्वीची ताजी घटना आहे. वकील असल्यामुळे सरोदे यांना असे करणे हा बौद्धिक सम्पदा कायद्यानुसार गुन्हा असल्याचे माहित आहे.

माझ्या काही मित्रांनी ही गोष्ट माझ्या निदर्शनाला आणून दिली. मी त्यांच्याकडे विचारणा केल्यावर दिलगिरी राहिली बाजूला त्यांनी माझ्यावरच आरोपांच्या फैरी झाडल्या. कपिल सरोदेंचा अजब खुलासा पुढीलप्रमाणे "किती मरता नावासाठी. मला नावच जर टाकायचे असते तर मि माझे नाव नसते का टाकले, तुमच्या सारखे नावसाठी मारणारे लोकच जेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्वतःच्या नावाने छापतात तेव्हा बरे वाटते का तूम्हाला, माझी प्रतेक पोस्ट चेक करा मि माझे नाव टाकल्याशिवय शेर करत नाही, आणि जी पोस्ट मि शेर केली जी तुमही तुमची आहे असे बोलता, त्यात 90 % विचार बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. मग तुम्हीं इतके विद्वान झाले का बाबसाहेबांचे विचार स्वतःच्या नावाने खपवायला?" ते पुढे असेही म्हणतात, " आपला काही तरि गैरसमज होतोय, पहिला विषय तर तो लेख मला जसा मिळाला तसा मि माझ्या वॉलवर टाकला आहे, त्यात तुमचे नाव नव्हते. मला तो लेख तुमच्या नावाविनाच मिळाला होता, यातील दूसरा विषय, म्हणजे तुमच वाङ्गमय वैगेरे हे तुमच्या ठिकाणी राहुदया मला तो लेख माझ्या नावाने टाकायचा असता तर मि त्यात माझे नाव स्पष्ठ शब्दात टाकले असते. मि तुमच्या सारखा नावसाठी हापापलेला नाही. आणि हो मा. नरके आपन त्या लेखात जे विचार लिहिले आहेत ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर यांची तुमच्याकडे मकतेदारी कुणी दिली?" त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, " अरे रे रे नरके तुमच्या बुद्धिची कीव येते राव! "


त्यांचा खुलासा अजिबात पटण्याजोगा यासाठी नाही की त्यांच्या कमेंटमध्ये त्यांना Sandip Khillare, योगेश वाघमारे, Kunal Gajghate, Sachin Kalambe, Atul Gawali, Mangesh Sasane, Kuldeep Ramteke अशा अनेकांनी लिहिले होते की हा लेख प्रा. हरी नरके यांचा आहे, तुम्ही मान्य करा आणि विषय संपवा, पण तरिही त्यांनी तशी दुरुस्ती केली नाही, की मान्य केले नाही. उलट त्यांनी तिकडे साफ दुर्लक्षच केले. त्यांना तेव्हाच आजचा खुलासा करता आला असता.

माझे नाव वगळुन टाकल्यामुळे लेख त्यांचा स्वत:चा असल्याचा भास निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. हे कायद्यात बसते?


हा लेख चांगला आहे, कुणाचा आहे अशी काहींनी त्यांचाकडे कमेंटमध्ये विचारणा केली तेव्हाही ते गप्प बसले. अनेकांनी त्या लेखाबद्दल सरोदेंचे कौतुक केले त्यांना सरोदेंनी लाइकही केले.


शेवटी मीच त्यांना हा लेख माझा आहे असे लिहिल्यावर मात्र त्यांचे उत्तर आले. दिलगिरी सोडा उलट अरेरावी आणि मूळ लेखकावरच / माझ्यावरच त्यांनी दोषारोप केले. आताही एव्हढे सगळे खुलासे-प्रतिखुलासे झाल्यावर अजूनही त्यांनी लेखावर माझे नाव टाकलेलेच नाही.


असे बेकायदेशीर आणि अनैतिक कृत्य करणार्‍या लोकांना खंतखेद तर वाटतच नाही, ते नैतिकतेवरची प्रवचने चालूच ठेवतात हे जास्त त्रासदायक आहे.


आपले काही मित्रही या कृत्याचा निषेध करण्याऎवजी दुर्लक्ष करा हो, असा आपल्यालाच सल्ला देतात हे तर जखमेवर मिठ चोळण्यासारखे आहे. काय दुर्लक्ष करा? समोर माणूस वाड्मयचौर्य करतोय आणि तुम्ही तिकडे दुर्लक्ष करा असे सांगताय म्हणजे तुम्ही चोरीला मदत करताय, प्रोत्साहन देताय असे वाटत नाही तुम्हाला?


-प्रा. हरी नरके,
२१/६/२०२०


Ref: कपिल सरोदे - https://www.facebook.com/Kapil-Sarode-112733103738395/ 

Friday, June 19, 2020

चीन हा लोकशाही जाळणारा वणवा : भारताला चीनच्या आक्रमणाचा धोका- प्रा. हरी नरके












साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे, असा परखड इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी दिला होता.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. १९६२ साली ज्या गलवान खोर्‍यावरून चीनने आक्रमण केले होते तोच मुद्दा पुढे करून चीनने आपल्या २० बहादूर जवानांचे लाखमोलाचे जीव घेतलेले आहेत. सीमेवर पेट्रोलिंग करताना शस्त्र सोबत असले तरी फायरिंग करायची नाही म्हणुन आपल्या जवानांनी गोळीबार केला नाही असे परराष्ट्रमंत्री म्हणतात. कुणाचा जीव घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर तो क्षम्य असतो, मग चीनचे जवान आपल्या सैनिकांवर दगडगोटे, तीक्ष्ण हत्त्यारे, यांचा मारा करीत असताना त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करता आला असता, मग त्यांना कोणी रोखले याचे उत्तर मिळालेले नाही. राज्यसभेत परराष्ट्रनीतीवर बोलत असताना बाबासाहेबांनी काढलेले उद्गार सुरूवातीला मी दिलेले आहेत. पंतप्रधान नेहरू बाबासाहेबांचे भाषण काळजीपूर्वक ऐकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.


आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर गेला आहे. बाबासाहेबांची भाषा वापरून सांगायचे, तर या वणव्यात सारे जग होरपळत असून, चीनच्या चुकीची शिक्षा भारतासह साऱ्या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला, की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला, यावर आरोपप्रत्यारोप होत आहेत. चीनने लादलेल्या या जैविक महायुद्धामुळे सारे जग पोळून निघाले आहे.


चीनचे लालभाई सत्ताधीश अतिमहत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीश क्रूरकर्मा आणि रानटी आहेत, हे वेगळे सांगायला नको. आज गलवान खोर्‍यावर कब्जा करायला पुढे सरसावलेला चीन अतिदुष्ट साम्राज्यवादी आहे हे अनेकवार सिद्ध झालेले आहे. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार (व्हेटो), हे सारे बघितले की चीन शेजारी देशांवर आक्रमण करू शकतो हे सिद्ध होते. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात.


जगातील सगळी प्रगत राष्ट्रे आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीतीही असू शकते.


डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा, की त्यांनी साडेसहा दशकांपूर्वीच भारताला याबाबत जागे केले. 'साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नीतीमत्ताही नको असते.


माओ हा चीनमध्ये तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, ती पाहता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच दिसते. भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी,' असेही बाबासाहेब म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, 'साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

चिनी राजनीतीची दोन तत्त्वे आहेत. पहिले, त्यांची राजनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे, त्यांच्या जगात कोणत्याही नीतीला मुळी जागाच नसते. आजची नीती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झाला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात, त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे.'

नेहरू सरकारमधील कायदेमंत्रिपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली,

त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले, तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये.

बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते, की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून धोका आहे, असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकर खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च करावा लागतो आहे. याबाबतही बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षण धोरणात भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौद्धबहुल तिबेटची जी ससेहोलपट केली, त्यावरही बाबासाहेब अतिशय नाराज होते. खरे तर चीन व भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे. चीनशी आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध आहेत. रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो, असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले उच्च शिक्षण घेताना, बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले, तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्या करण्यात आली, त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.


१९५४ साली मुंबईत 'आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही,' असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले.

बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची १९३६ साली स्थापना केली. त्यावेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती; मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२च्या लोकसभा निवडणुकीत मते कुजवा; पण बाबासाहेबांना पराभूत करा, हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला.
कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातिप्रश्नावर मात्र मौन बाळगत असे. स्त्रीप्रश्न हाही त्यांना अग्रक्रमाचा नव्हता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी 'बुद्ध की मार्क्स?' या प्रश्नावर जाहीरपणे 'मार्क्स नाही, तर बुद्धच आपला मार्गदाता' असल्याचे घोषित केले.
मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झाली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला, तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने आणि भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे, हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.
बाबासाहेबांच्या दृष्टीने देश सर्वप्रथम होता. या  हिंसक आणि हुकूमशाही वृत्तीच्या चिनीच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)

Tuesday, June 2, 2020

कोरोना काळात केंद्र सरकरचे जातीय अत्याचार-









कोरोना साथीच्या नियंत्रणाच्या नावाखाली मोदी सरकारने ज्या प्रकारचे जातीय अत्त्याचार केलेत त्याला जगात तोड सापडणार नाही. लॉकडाऊनच्या नावाखाली गरिब, दलित कष्टकर्‍यांची ज्याप्रकारे नाकाबंदी करण्यात आली, त्यातून त्यांच्या जगण्याच्या हक्कावरच आघात करण्यात आला. या अभावग्रस्त, वंचित, उपेक्षित समुहांची राजरोसपणे जणू कत्तलच करण्यात आली. हा अत्त्याचार का?


कोणतीही पुर्वतयारी न करता अवघ्या चार तासात करण्यात आलेले लॉकडाऊन हे जातीय अत्त्याचाराचेच एक उदाहरण म्हणायला हवे. का करावा लागला लॉकडाऊन? कारण जे उच्चवर्णिय हवाई श्रीमंत मोदीकृपेने परदेशातून भारतात आले त्यांचे जर वेळीच आयसोलेशन केले असते, सगळे विमानतळ वेळीच सील केले असते तर १३५ कोटी भारतीयांची ही ससेहोलपट टाळता आली असती. गरिबांचे मृत्य़ू रोखता आले असते.


लॉकडाऊनद्वारे स्थानबद्धता लादल्यामुळे जे गरिब उपासमारीने मेले, रेल्वे प्रवासात मेले त्यांच्या सदोष मनुष्य हत्त्येला मोदी सरकारच जबाबदार आहे. एव्हढेच नाही तर जे भारतीय नागरिक कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले त्यांच्याही मृत्यूचे पाप केंद्र सरकारचेच आहे.


आजही भारताच्या धोरणनिर्मितीवर, माध्यमांवर, न्यायव्यवस्थेवर आणि बौद्धिक जगतावर उच्चवर्णियांचेच वर्चस्व आहे. त्यांनी " प्रवासी मजूर," "सोशल डिस्टंसिंग" असले शब्दप्रयोग वापरून जातीय मानसिकतेचाच प्रभाव दाखवलेला आहे.

देशाची शेती, कारखाने, छोटेमोठे उद्योगधंदे, बांधकामं इथं राबणारे कोण आहेत? कोण आहेत मोलकरणी आणि घरगडी? कोण करतं शहरांची सफाई? कोण सांभाळतं श्रीमंतांच्या पोराबाळांना? कोण आहेत चतुर्थश्रेणी कर्मचारी? यातले बहुतेक सगळे हे सर्वधर्मीय दलित, आदीवासी किंवा ओबीसीच आहेत.  यातले २० जण रेल्वेखाली चिरडून मेले औरंगाबदजवळ. ८० जण रेल्वेप्रवासात खपले. त्याच्याबद्दल उच्चवर्णियांच्या केंद्र सरकारला ना खंत ना खेद. खरंतर यासाठी जबाबदार असलेल्यांनी राजीनामे द्यायला हवे होते.

आधीच जागतिकीकरणाच्या नावाखाली या गरिबांचे शिक्षण, आरोग्य, निवारा, रोजगार हिरावले गेलेच होते, बचेकुचे कोरोनातील सरकारी धोरणामुळे सम्पले. भारतातले १०% लोक अधिक श्रीमंत व्हावेत म्हणुन उर्वरित ९०% लोक राबराब राबतात. देशाच्या १% अतिश्रीमंत लोकांकडे ७० टक्के संपत्ती आहे.


भाजपा हा उच्चवर्णियांचा पक्ष आहे. अटलबिहारींचे शायनिंग इंडीया डुबले. मग मोदींना पुढे करण्यात आले. त्यांना लोकांनी दोनवेळा निवडून दिल्याचे दिसते खरे. पण मोदींना पक्षासाठी मुबलक पैसा कोण पुरवते? बडे उद्योगपतीच ना? मोदी त्यांचे मित्र आणि ते मोदींचे! राष्ट्रवादाच्या पोकळ गप्पा मारणार्‍या मोदींनी गरिबांच्या कल्याणकारी योजनांची नरडी पिळलेली आहेत.

रेल्वे स्टेशनवर मृत पावलेल्या आईच्या प्रेतावरील कापडाशी खेळत असलेले निरागस लहान मूल याचे भीषण छायाचित्र ही खरी कमाई आहे मोदी सरकारची!


लॉकडाऊनद्वारे मोदी सरकारने तमाम कष्टकरी, कामगार, गरिब, दलित, आदीवासी, ओबीसी, महिला आणि अल्पसंख्यांकांना रासरोसपणे मृत्यूच्या सापळ्यात ढकलले. कामगार चळवळीने १५० वर्षे लढून जे हक्क, कायदे आणि संरक्षण मिळवले ते सारे कोरोना साथीच्या संकटाचे निमित्त करून मोदी सरकार काढून घेत आहे. कामाचे तास कमी व्हावेत, ते ८ तास व्हावेत ह्यासाठी श्रमिक १०० वर्षे लढले.

त्या ८ चे १२ तास मात्र एका रात्रीत झाले. कुठे आहे ती जगातली सर्वात मोठी लोकशाही? कुठे आहे ते वेलफेयर स्टॆट? हे सरकार गरिबांच्या मुळावर का उठलेय? कोरोना ही सरकारला सुवर्णसंधीच मिळाली म्हणायचे गरिबांच्या कत्तली करण्यासाठी!

( चित्रांगदा चौधरी व अनिकेत आगा यांनी  एनडीटिव्ही.कॉम वर लिहिलेल्या लेखाच्या आशयाचा स्वैर आणि सारांशरूप मराठी अनुवाद- प्रा.हरी नरके )

प्रा.हरी नरके, २/६/२०२०

Thursday, May 28, 2020

काळीज पिळवटून टाकणारे मजूरांचे लोंढे - प्रा. हरी नरके












गेला महिनाभर प्रवासी मजूरांचे होत असलेले हाल बघताना काळीज पिळवटून जाते. किती भयंकर यातनांमधून जाताहेत हे बांधव. खरं तर ज्यांना ज्यांना काळीज आणि मेंदू आहेत त्या सर्वांनी अस्वस्थ व्हावं असं हे भयकारी वास्तव आहे. पण एन.डी.टि.व्ही.चा अपवाद वगळता इतर वाहिन्यांना हे हाल, हे जगणं का दिसत नाहीत? का भिडत नाही? तो बातम्यांचा ठळक आणि मुख्य विषय का होत नाही? भारतीय माध्यमांचा हा बधीरपणा संतापजनक आहे. लाजिरवाणा आहे. माध्यमांचा इतका सरकारधार्जिणेपणा तर १९७५ च्या आणीबाणीतही नव्हता.


दुसरीकडे सामान्य माणसाला दहशत बसावी, रोज धडकीच भरावी अशा बेजबाबदार पद्धतीनं याच वाहिन्या कोरोनाच्या बातम्या दाखवत आहेत. बातम्या देणारांचे किंचाळणारे आवाज जणू काही तरी वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचा भास निर्माण करताहेत. इतका बथ्थडपणा का? यांना कुणालाच संवेदना नाहीत? हे अपार हाल सोसणारे, तडफडून मरणारे लोक यांचे कुणीच नाहीत? यात ह्युमन व्हॅल्यू असलेले बातमीमूल्य नाही? सरकारचे व भारतीय माध्यमांचे हे संवेदनाशून्य वर्तन बघताना शरम वाटते. त्यांना असे वाटते की हे मजूरलोक भारतीय नाहीतच. कुठून आणत असतील हे सरकारी दलाल एव्हढे बधीरपण?

हे सरकार गरिबांचे कधीच नव्हते. ज्या तुघलखी बाण्याने नोटाबंदी, जीएसटी आणि कोणतेही नियोजन न करता अचानक केलेला लॉकडाऊन हे गरिबविरोधी निर्णय घेतले गेले त्यावरून सरकारचे वर्तन माणूसघाणे आणि निर्दयपणाचेच ठरते. सरकारला आणि त्यांच्या मातृसंघटनेला फक्त उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत आणि अब्जाधीश यांचेच हित बघायचे आहे. कारण तेच त्यांचे लोक आहेत. गरिबांचे कर्दनकाळ म्हणूनच या तथाकथित ५६ इंचाची नोंद इतिहासाला करावी लागेल.

एकाचढ एक माथेफिरू भरलेत युपी, एम.पी. बिहार राज्यात आणि पीएमओ, रेल्वे आणि अर्थखात्यात. इतके लोभस आणि खोटे चित्र रंगवतात हे नीच ट्विटरवर! कुठे फेडाल ही पापं? गरिबांची हाय तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही मुर्दाडांनो.

रस्त्यावरील भिकार्‍यांचे पुनर्वसन करणार्‍या डॉ. सोनावणे यांची मुलाखत बघत होतो. ते म्हणाले, भिकार्‍यांमध्ये दोन प्रकारचे गट कार्यरत आहेत. एक ज्यांना कामधंदा न करता आयते खायची सवय लागलेली आहे, असे सराईत, धंदेवाईक, जातीगत भिकारी आणि दुसरा ज्यांना वृद्धत्व, अपंगत्व किंवा गंभीरस्वरूपाचे आजारपण यांच्यामुळे काम करणे शक्य होत नाही असे मजबूर लोक.

मला यातली पहिल्या प्रकारची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची वाटते. दुसर्‍या प्रकारातील लोकांसाठी कल्याणकारी भुमिकेतून समाज आणि सरकारने काम करायला हवेच. मात्र पहिल्या प्रकारच्या लोकांना ठोकून काढून सक्तीने कामाला जुंपले पाहिजे.

आपल्या देशात भिक मागण्याचेही धार्मिक उदात्तीकरण केले गेलेले आहे. कधी ते भिक्षुकीच्या तर कधी दक्षिणेच्या नावावर. लक्षावधी साधू, संन्याशी, मठपती यांचे त्यामुळेच तर फावले असून भिकारचाळे करणारे हे लोक ही त्यांचीच निर्मिती आहे. शारिरिक वा बौद्धिक श्रम न करता निव्वळ आयते खाणारे लोक हे देशावरचा बोजा आहेत. असे समुहच्या समुह असणे हे देशावरचे संकट मानायला हवे. का पोसायचे या बाजारबुणग्यांना? असे कोट्यावधी वळू पोसणारा देश कसा प्रगती करणार?

मी स्वत: झोपडपट्टीतून आलोय. बालमजुरी करीत शिकलोय. टोकाची गरिबी मी अनुभवलीय. कोणतीही शासकीय सवलत न घेता मी इथवर आलोय. मला गरिबांविषयी, श्रमिकांविषयी कळवळा वाटतो. पण तो आंधळा नाही.

त्यामुळे काही गरिबांची खटकणारी एक गोष्ट नोंदवायलाच हवी. शंभर वर्षे झाली, र.धों.कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जे. आर. डी. टाटा यांनी कुटुंब नियोजनाचे महत्व सांगून. भयावह गरिबी असताना २०२० मध्येही जेव्हा पोराबाळांचे लेंढार वाढवणारे काही लोक मला दिसतात तेव्हा डोक्यात तिडीक उठते. आणीबाणीत कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम बूमरॅंग झाला आणि १९७७ पासून लहान कुटुंबाचा बोजवारा उडाला.


झोपडपट्टीत राहणारी, फूटपाथवर राहणारी ही कोट्यावधी गरिब जनता कधीतरी स्वत:च्या उत्कर्षासाठी कुटुंबनियोजनाकडे वळणार की नाही? छोटे कुटुंब हा पॅटर्न आजही का आपलासा होत नाही? जन्माला येणारे प्रत्येक गरिब मूल बाळूत्यावरून ( पाळण्यातून ) उठते आणि थेट बालकामगार बनते. कमावता हात बनते. हे कधीतरी थांबल्याशिवाय ही उपासमार, हे हालाखीचे दिवस, कसे टळणार?

सावित्रीबाईंनी - जोतीरावांनी मुलींच्या, मागासवर्गियांच्या, बहुजनांच्या शिक्षणाचे काम सुरू केले त्याला पाऊणेदोन शतके उलटली. छ. शाहू, सयाजीराव, कर्मवीर भाऊराव, बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्व आमच्या कानीकपाळी ओरडून सांगितले. तरिही अद्याप आमच्यात ज्ञानाची आच निर्माण होत नसेल तर कसे थांबणार आमचे हे नष्टचर्य?

राज्यकर्त्यांच्या नियोजनशून्यतेवर जरूर बोललेच पाहिजे.आसूडा मारलेच पाहिजेत. पण आमच्या गरिबांच्या चुकांचेही आत्मपरीक्षण केले तरच या आपत्तीमधून आम्ही काही तरी शिकलो असे म्हणता येईल. येरे माझ्या मागल्या आणि पुढले पाढे पंचावन्न!

- प्रा. हरी नरके, २८/५/२०२०

Wednesday, May 27, 2020

माझा कोविड-१९ चा अनुभव- By Sayali Rajadhyaksha


लॉकडाऊन काळात खाली व्यायाम करायलाही परवानगी नसल्यानं मी घरात स्टेशनरी सायकलवर व्यायाम करते. १६ मेला सकाळी सायकल करायला घेतली तेव्हाच मनातून कराविशी वाटत नव्हती. मी म्हटलं आपल्याला कंटाळा आलाय दुसरं काही नाही. मी तसंच स्वतःला ढकलत १५ किलोमीटर केले. शेवटचे ५ किलोमीटर अगदी नको वाटत असताना केले. दुपारी झोपले तेव्हा चेहरा आणि मान गरम लागत होतं. संध्याकाळी बाजूच्या बिल्डिंगमध्ये असणा-या सासुबाईंना भेटून येऊ असा विचार केला आणि जागची उठले तेव्हा चक्कर आली. अंगही गरम होतं. थर्मामीटरवर बघितलं तेव्हा १०० ताप होता.

एकतर मला ताप कधीच येत नाही. कसलंही इन्फेक्शन झालं तरीही ताप येत नाही. ताप आला तेव्हाच माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. क्रोसिन घेतलं आणि ताप उतरला. दुस-या दिवशी इतका थकवा होता की संपूर्ण दिवस मी झोपून काढला. तिस-या दिवशी मी बरी होते पण दुपारी निरंजनला ताप आला. तेव्हाच माझ्या मनानं नोंद घेतली की हा कोविडचा ताप आहे. कारण दोघांना पाठोपाठ ताप यायचं काहीच कारण नव्हतं. त्याच दिवशी आमच्या कॉलनीतले एकाच कुटुंबातले ४ जण पॉझिटिव्ह असल्याचं कळालं होतं.

त्या मित्राला फोन केला तेव्हा त्यानं त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या टेस्टसाठी मेट्रोपोलिसवाल्यांना बोलावणार असल्याचं सांगितलं. आम्हाला लक्षणं होतीच, त्यामुळे आमच्या डॉक्टर मित्रानं प्रिस्क्रिप्शन दिलं. संध्याकाळी आम्हा चौघांची टेस्ट झालीही.

त्यानंतरच्या दिवशी मला १०० ताप येतच होता. माझी वास आणि चवीची जाणीव पूर्ण गेली होती. निरंजनला प्रचंड थकवा होता. बुधवारी दुपारी टेस्ट रिझल्ट आले. मुली निगेटिव्ह होत्या आणि आम्ही दोघे पॉझिटिव्ह होतो. लगोलग मुलींची रवानगी आजीकडे केली आणि आम्ही दोघे घरातच आयसोलेट झालो. खरं सांगायचं तर घरातच होतो त्याआधीही कित्येक दिवस. फक्त भाजी आणायला बाहेर पडायचो ते सोडलं तर.

संध्याकाळी बांद्रा इस्टमधल्या कोविड पेशंट बघणा-या एकमेव जीपीकडे गेलो. त्यांनी सगळी हिस्टरी घेतली. दोघांनाही डायबेटिस आणि ब्लडप्रेशर काहीही नाही. ऑक्सिजन सॅच्युरेशन चांगलं होतं. त्यामुळे सरकारी प्रोटोकॉलप्रमाणे त्यांनी औषधं लिहून दिली. आम्ही घरी आलो. त्या दिवसापासून माझ्या तापानं चांगलाच जोर धरला. त्यानंतरचे पाच दिवस रोज १०१-१०२ असा ताप येत राहिला. थकवा प्रचंड होता. पोट खराब झालं. वास आणि चवीची जाणीव आधीच गेलेली होती. निरंजनला ताप नव्हता पण थकवा होता. दोघेही गलितगात्र झालो होतो.

घरात दोघेच. कुणाला प्रत्यक्ष मदत करायची परवानगी नाही त्यामुळे जसं जमेल तसं चहा करणं, पाण्याच्या बाटल्या भरणं हे करत होतो. सुदैवानं आमच्या सोसायटीतले लोक सुबुद्ध आहेत. माझ्या मैत्रिणींनी आपापसात बोलून रोज नाश्ता आणि जेवण पाठवायला सुरूवात केली. त्यातल्या बहुतांश साठीच्या वरच्या आहेत. सध्या घरात कुणालाही मदत नाहीये, पण आमची परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी डबे पाठवणं सुरू केलं ते अजूनही सुरू आहे.

मला दोन दिवसांपासून आता ताप नाही. वास आणि चव परत यायला लागलंय. दोघांनाही थकवा आहे पण बाकी काही नाही. रोज ऑक्सीमीटरवर ऑक्सिजन मोजत असल्यानं बाकी काळजी नव्हती. ऑक्सिजन सॅच्युरेशन नॉर्मल असणं हे कोविडमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते बिघडलं की न्युमोनियासदृश परिस्थिती निर्माण झालीय अशी शक्यता असते. निरंजनला दम्याचा त्रास आहे त्यामुळे ती काळजी आम्ही घेत होतो.

या काळात महानगपालिकेकडून रोज तीनदा फोन येत होता. लक्षणं काय आहेत, ती किती तीव्र आहेत हे विचारण्यासाठी. या टीममधल्या डॉक्टरांनी स्वतःचे वैयक्तिक नंबर दिले होते आणि २४ तासांत कधीही फोन केलात तर चालेल असं सांगितलं होतं. परवा डॉक्टरांची एक टीम घरी येऊन आम्हाला तपासून गेली. झिंकच्या गोळ्या देऊन गेली. महानगरपालिका उत्तम काम करते आहे याबद्दल शंकाच नाही. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

मुळात मला कोविडची साथ सुरू झाली तेव्हापासूनच हे आपल्यालाही कधी ना कधी होणार आहे याची जाणीव होतीच. कारण येत्या काही महिन्यांमध्ये सगळ्यांनाच यातून जावं लागणार आहे. त्यामुळे मला भीती अजिबातच नव्हती. झाल्यावरही मला क्षणभरही काळजी वाटली नाही. डॉक्टर फारोख उदवाडियांचा व्हॉट्सएपवर आलेला मेसेज अनेकांनी वाचला असेल त्यांनी त्यात तपशीलवार कोविड झाल्यावर काय काय होईल हे लिहिलेलं होतं. मला अगदी डे बाय डे तसंच झालं. मी डॉक्टर बडवेंना मेल केली की मी कोविड पॉझिटिव्ह आहे. त्यावर त्यांची – काळजी करू नका, काहीही गंभीर नाही, गरम पाणी प्या, सात दिवस आयसोलेशन करा आणि आराम करा अशी मेल आली. मग तर मी निश्चिंतच झाले.

हा व्हायरस नवीन आहे त्यामुळे तो कसा वागेल याची अजूनही कुणालाच पूर्ण माहिती नाही. मला वाटलं होतं की मला संसर्ग होईल तेव्हा लक्षणं नसतील इतका माझा स्वतःच्या इम्युनिटीवर विश्वास होता. पण तसं झालं नाही मला त्यानं चांगला दणका दिला. उलट निरंजनला नेहमी ताप येतो तर त्याला फक्त दोन दिवस आणि तोही १०० ताप आला. आमच्या कॉलनीत १३ लोक पॉझिटिव्ह आहेत. त्यातल्या फक्त ६ जणांना लक्षणं आहेत बाकीच्यांना लक्षणं नाहीत. आता कॉलनीत कुणीतरी सुपरस्प्रेडर असणार. आम्हाला निरंजनच्या आईकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता, तिथे सोडलं तर बाकी आम्ही कुठेच जात नव्हतो.

माझ्या अनुभवातून एक सांगते, लक्षणांकडे लवकर लक्ष दिलं, योग्य काळजी घेतलीत तर आठ दिवसात बरं होता. नाही नाही मी कोरोनाला हरवण्याचा कानमंत्र देत नाहीये (त्यासाठी उघडा डोळे, बघा नीट!), ना मी कोरोनाबरोबरचं युद्ध जिंकल्याचं ऐलान करतेय. कारण मुळात हे ना युद्ध आहे ना आपल्याला कुणावर मात करायचीय. हे एका नवीन विषाणूनं होणारं इन्फेक्शन आहे. विषाणूचं नाव नॉवेल करोना आहे आणि त्यामुळे होणा-या आजाराचं नाव कोविड-१९ आहे.

हे इन्फेक्शन कुणालाही होऊ शकतं. त्यातून बहुतांश लोकांना बरं वाटतं. काही दुर्दैवी लोकांना कठीण परिस्थितीतून जावं लागतं किंवा जीव गमवावा लागतो. पण ही शक्यता सगळ्याच संसर्गांमध्ये असते. तेव्हा घाबरू नका. परवा एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की भारतात फार कमी लोकांना वेंटिलेटर लागताहेत. ही बातमीही आश्वासकच नाही का?

मराठी वृत्तवाहिन्यांचं वाईट रिपोर्टिंग बघू नका. इथे 12 रूग्ण सापडले अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नका. कारण ते ना दहशतवादी आहेत ना कुणाचा जीव घ्यायला आलेत. ते आजारी पडलेत.

सोशल डिस्टंसिंग पाळाच, सॅनिटायझरचा वापर करा, सतत साबणानं हात धुवत राहा, गरज नसताना गर्दीत जाऊ नका. मास्क वापरा. इतकं करूनही संसर्ग झालाच तर मात्र घाबरू नका. आणि कृपया ज्यांना संसर्ग झालाय त्यांना वाळीत टाकण्याचे फालतू प्रकार करू नका. ही वेळ उद्या आपल्यावरही येणार आहे हे पक्कं ध्यानात असू द्या.

आमच्या इन्फेक्शनचे दहा दिवस उलटून गेलेत आणि आम्ही दोघेही आता दुस-यांना संसर्ग न देण्याच्या स्टेजमध्ये आलो आहोत. आम्ही दोघेही उत्तम आहोत! 😊

#कोरोनाचेदिवस #कोरोनाडायरीज #कोरोनाचेअनुभव #माझाकोविडअनुभव

- सायली राजाध्यक्ष





Friday, May 22, 2020

कोरोना - भीती ते अनुभूती - Dr Sushma Gaikwad-Jadhav







By Dr. Sushma Gaikwad-Jadhav- कोरोना - भीती ते अनुभूती

किट घातल्यानंतर संपूर्ण ड्युटी संपेपर्यंत बाथरूमला जाता येत नाही किंवा साध घोटभर पाणीहि पिता येत नाही. ड्युटी संपल्यावर संपूर्ण किट व्यवस्थीत काढून, नखशिखांत शरीर व सर्व घातलेल्या कपड्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. सरासरी सहा तास ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला डोंनिंग, डोफिगंच्या वेळा पकडून सात ते साडेसात तास खाण्या पिण्याविना व लघुशंकेविना रहावं लागतं. PPE मधे अतिशय उकाडा जाणवतो. घामाच्या धारा सगळी कडून ओघळत रहातात. एकावर एक दोन मास्क असल्यामुळे नीटसा श्वास घेता येत नाही व अधूनमधून तोंडानी श्वासोच्छवास घ्यावा लागतो. जास्त बोलताना व पायऱ्या चढताना थोडी धाप लागते. गॉगल व फेस शिल्डवर धुक्यासारखं सतत जमा होत रहात. दोनएक तासांनी मास्कची कडा, बांधलेल्या मास्कच्या दोऱ्या, गॉगल रुतायला लागतो, काय आणि कुठे दुखतंय तेच कळत नाही आणि हात लावून ते व्यवस्थितही करता येत नाही. नाकातोंडाच्या चित्रविचित्र हालचाली करून रुतणारा मास्क ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओठ सुकले तर त्यांच्यावर जीभ फिरवायलाही भीती वाटते.

...................................

कोरोना व्हायरसचा संसर्ग नक्की कधी सुरु झाला, हे त्या चीनच्या जिवालाच माहित. पण आपल लक्ष साधारण जानेवारी-फेब्रुवारीपासून त्याच्याकडे गेल. बिचारे चीनचे लोक, बिचारे जर्मनीचे लोक म्हणता म्हणता आपणच कधी बिचारे झालो कळलंच नाही आणि रात्रीतून घडाव असं सगळं बदललं. शाळा, थेटर्स, हॉटेल, दुकाने ,रहदारीचे रस्ते सार ओसाड पडल. प्रत्येकाच्या मनात एक अगतिक भीती, मळभ निर्माण झाली. मास्क आणि सॅनिटायजर जीवनाचे अविभाज्य भाग बनले. लोक एकमेकांकडे,प्रत्येक वस्तूकडे संशयित नजरेने बघू लागली, सगळीकडे जाहिरातीमध्ये चित्रविचित्र हावभाव करून नाचणारा हिरव्या रंगांचा कोरोना व्हायरस दिसायला लागला.

क्लिनिक चालू होत पण नेहमीचा उत्साह वाटत नव्हता. पेशंट कमी झाले होते. येणारा दचकत, बिचकत यायचा. क्लिनिकमधून संशयित पेशंट कोरोना तपासणीसाठी पाठवत होतो पण पेशंट तसेच परत यायचे. अगदी सुरवातीला ठराविक देशातून आलेल्या लोकांचीच तपासणी केली जात होती, त्यामुळे संभ्रम निर्माण होत होता.

एके दिवशी curfew आणि लॉकडाऊन जाहीर झाला आणि अवसानच गळाल. आपल्याला होईल का? क्लिनिकमधे पसरेल का ? काळजी वाटत होती. क्लिनिकमधे प्रत्येक वस्तूला हात लावताना एक भीतीशी वाटायला लागली. एके दिवशी क्लिनिक स्टाफ यायचा बंद झाला आणि आठवड्याभरासाठी क्लिनिक बंद केल.

घरी मुलांची दंगामस्ती चालायची, खाणपिण, जास्त झोपणं सार चालू होत पण अस्वस्थ वाटायचं. काय होतंय? का होतंय? तेच कळत नव्हत. उगीचच याला विचार, त्याला विचार, कि त्यांना काय वाटतंय ? अस माझ चालू होत. डॉक्टर असल्यामुळे भीती जास्त वाटते का कमी ते माहित नाही पण भीती वाटतं होती हे खरं. कधीचि TO DO लिस्ट बनवली होती. नवीन अप्लिकेशन डाउनलोड करून रंगबिरंगी अजून एक नवीन लिस्ट बनवली, रोज वाचायचे पण करत काहीच नव्हते. एका आठवड्यात हतबल वाटायला लागल. आठ दिवसांनी एक ऍडमीटेड पेशंट बघायला बाहेर पडले, घरी परत आल्यावर खूप दिवसांनी छान वाटल. तेव्हा लक्षात आल फक्त कामच आपल्या मनाला जिवंत ठेवू शकत आणि नेहमीपेक्षा कमी वेळ पण क्लिनिक सुरु झालं.

टिव्ही, इंटरनेटवर बातम्या दिसायच्या परदेशात डॉक्टर्स, पॅरामेडिक स्टाफ थकलाय, मास्क, PPE किटचा अभाव, विश्रांतीला वाव नाही, आश्चर्यकारक होत सगळं. ज्या देशामध्ये सुख, समृद्धी भरभरून आहे, सगळं काही ओसंडून वाहतंय तिथं हि अवस्था. पण हळूहळू आपल्या देशातील बातम्याही येऊ लागल्या. लोक मदतीसाठी बाहेर होती, त्यांच्या मुळे दैनंदिन थोडफार सुरळीत चालू होत.

पेशंटची संख्या रोज वाढत होती, सरकारी हॉस्पिटलमधे काम करणारी लोक अपुरी पडू लागली आणि खाजगी डॉक्टर्सनां कोरोनाबाधित रुग्णांसाठी असलेल्या हॉस्पिटल्सला येऊन काम कराव लागेल असं बातम्यात सांगीतल. एके दिवशी कलेक्टर ऑफिस मधून तसा फोनही आला " गरज पडल्यास तुम्हाला सेवा द्यायला याव लागेल" आणि आठवड्याभरात परत फोन आला, ससून हॉस्पिलला मिटिंगसाठी बोलावलं होत.

एक दिवस आधी Intensivist ची टीम तिथल्या ICU मध्ये कामासाठी रुजू झाली होती. मिटिंग झाली, फिजिशियनच्या काही टीम बनवल्या गेल्या, माझी ड्युटी एक आठवड्यानंतर होती. सुरुवातीला प्रशांत फार खुश नव्हता, काळजीत होता पण मी जायला तयार हे कळल्यावर तोहि तयार झाला. मुलांना सांगितलं, वेदांगला रडायला येत होत " तुला कशाला जायचंय ? ती लोक बाहेर गेली म्हणून त्यांना आजार झालाय, देव त्यांच्या कडे बघून घेईल, तुला आजार झाला तर? तू मरून गेलीस तर? " असं त्याचं दोनतिन दिवस अधूनमधून चालू होतं. थोड समजून सांगितलं आणि त्याला बहुतेक ते समजलं. विहानलाहि सांगितलं तर तो म्हणाला " मम्मा तू किती वर्षांनी वापस येणारे ? (त्याच्या साठी तास, दिवस सगळ्याचा हिशोब वर्षात असतो) दादा आणि माझ्यासाठी कुल्फी करून जाशील? " हसूच आल मला.

ससून हॉस्पिटल, दीडशे वर्षांपासून महाराष्ट्रातील लाखो लोकांवर उपचार करणार ठिकाण. रोज हजारो रुग्णांची ये जा असते. तितक्याच संख्येने काम करणारी डॉक्टर्स, नर्सेस व इतर लोकं. कोरोना व्हायरस पुण्यात आला आणि नायडू हॉस्पिटलसोबत ससून हॉस्पिटल कोरोना उपचारासाठीच अधिकृत ठिकाण बनवल गेलं. इतर रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हॉस्पिटलच्या आवारातील अकरा मजली इमारत फक्त कोरोना उपचारासाठी राखीव ठेवण्यात आली. पेशंटसाठी खाट, मॉनिटर, टाचणी पासून ते व्हेंटिलेटरपर्यंत लागणाऱ्या सर्व गोष्टी, काम करणारी लोक, त्यांच्या कामाच, राहण्याच नियोजन, हजारो गोष्टी लागतात एक हॉस्पिटल चालवायला. थोड्या अवधीत इतकी मोठी यंत्रणा कार्यरत करण खरंच मोठ्या जोखमीचं काम आहे.

माझी ड्युटी ५ C म्हणजे सस्पेक्टेड वॉर्डमधे लावली होती, रोज सकाळी आठ ते दुपारी दोन, सहा तास. पहिल्या दिवशी सहाच्या सुमारास घरून निघाले. हॉटेलवर सामान ठेवून आठ वाजता ड्युटीला पोचायचं होत. हॉटेल जहांगीर हॉस्पिटलजवळ, ससून हॉस्पिटलपासून दोनेक किलोमीटर असेल. रोजच्याएवढा नाष्टा केला, दुपारपर्यंत भूक लागू नये म्हणून जबरदस्तीने जास्तीची दोन चार बिस्कीट खाल्ली पण पाणी पिताना घोट घोट ठरवून पित होते, बाथरूमला तर किती वेळा गेले माहित नाही, ब्लॅडरमधला प्रत्येक थेंब न थेंब बाहेर काढायचा प्रयत्न चालू होता. पोचले ससूनला, कॉलेजच्या पहिल्या दिवशी असते तशी धाकधुक वाटत होती. पाचव्या मजल्यावर पोचले. तिथे A ,B ,C असे वॉर्ड, सगळीकडे एक चक्कर मारली आणि C वॉर्ड मध्ये घुसले. डोंनिंगसाठी सामान शोधल, आजूबाजूला सगळा पसारा, काहीच सापडेना. ड्रेस होता पण मास्क, गॉगल, ग्लोव्हस काहीच नाही. क्षणभर माझ तर अवसानच गळालं, वाटलं आता आपल काही खरं नाही, पळून जाव परत. दहापंधरा मिनटं लागली सगळ्या गोष्टी गोळा करायला. यायच्याआधी बघितलेला डोंनिंगचा व्हिडीओ आठवून आठवून PPE किट घातली आणि पोचले कर्मभूमीवर.

PPE म्हणजे personal protective equipment ,कोरोनाबाधित पेशंटला तपासताना, त्यांच्यावर उपचार करताना इंन्फेकशनपासून बचाव करण्यासाठी घातला जाणारा ड्रेस. डोक्यापासून पायापर्यंत अखंड ,प्लास्टिकसारख्या कापडापासून बनलेला असतो. त्यासोबत डोक्याला केस बांधण्यासाठी एक वेगळी कॅप, N ९५ व सर्जिकल अशे दोन मास्क, गॉगल, फेस शिल्ड, दोन ग्लोव्हस, चप्पल वा बुटावरून घालण्यासाठी वेगळं कव्हर असं सगळं घालाव लागतं. हे सगळं घालण्याची व काढण्याची विशिष्ट अशी पद्धत असते. किट घातल्यानंतर संपूर्ण ड्युटी संपेपर्यंत बाथरूमला जाता येत नाही किंवा साध घोटभर पाणीहि पिता येत नाही. ड्युटी संपल्यावर संपूर्ण किट व्यवस्थीत काढून, नखशिखांत शरीर व सर्व घातलेल्या कपड्यांना स्वच्छ करणे गरजेचे असते. सरासरी सहा तास ड्युटी करणाऱ्या व्यक्तीला डोंनिंग, डोफिगंच्या वेळा पकडून सात ते साडेसात तास खाण्यापिण्याविना व लघुशंकेविना रहावं लागतं. PPE मधे अतिशय उकाडा जाणवतो.

घामाच्या धारा सगळी कडून ओघळत रहातात. एकावर एक दोन मास्क असल्यामुळे नीटसा श्वास घेता येत नाही व अधूनमधून तोंडानी श्वासोच्छवास घ्यावा लागतो. जास्त बोलताना व पायऱ्या चढताना थोडी धाप लागते. गॉगल व फेस शिल्डवर धुक्यासारखं सतत जमा होत रहात. दोनएक तासांनी मास्कची कडा, बांधलेल्या मास्कच्या दोऱ्या, गॉगल रुतायला लागतो, काय आणि कुठे दुखतंय तेच कळत नाही आणि हात लावून ते व्यवस्थितही करता येत नाही. नाकातोंडाच्या चित्रविचित्र हालचाली करून रुतणारा मास्क ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करावा लागतो. ओठ सुकले तर त्यांच्यावर जीभ फिरवायलाही भीती वाटते.

असो मी, पेशंट विभागात गेले, मोठ्ठा हॉल आणि दोन्ही बाजूला ४ - ५ फिट अंतराने वीस पेशंटचे कॉट. सर्व सिस्टर, डॉक्टर PPE मुळे सारखेच दिसत होते. PPE घालून चाल मंदावते आणि बदलतेहि, अंतराळात काम करणाऱ्या लोकांसारखी. सगळ्यांनी ड्रेसवर पेनाने आपापली नाव लिहिली होती पण प्रत्येक वेळेला त्यांच्याजवळ जाऊन, त्यांचं नाव वाचून बोलावं किंवा काम सांगाव लागायचं. सगळे कॉट भरलेले, जवळजवळ सगळेच रुग्ण गंभीर. एक तास गेला जागेच आणि सर्व गोष्टींचं भान यायला.

अकराच्या सुमारास अचानक थकवा आला, हातापायात अवसानच नव्हतं, तहान लागली होती. मटकन खुर्चीत बसले. थोड्या वेळात बरं वाटलं आणि काम परत सुरु झालं. घड्याळात दोन वाजले, ड्युटी संपली. मन शरीर फार दमलं होतं. रूममध्ये आल्यावरही तोंड सतत कोरड पडायचं, संपूर्ण दिवस कमालीचा थकवा जाणवत होता.

रोज रुग्णांची भर पडत होती. ताप, खोकला, दम लागणे हि लक्षणं व गंभीर स्वरूपाचा आजार असलेले, वेगवेगळ्या व्यधिनीं ग्रासलेले व कोरोना चाचणीच्या रिपोर्टची वाट बघणारे सारे रुग्ण संशयित वॉर्डमधे यायचे. तपासणी पाठवल्यापासून रिपोर्ट यायला साधारण चोवीस तास लागत होते. वार्डमधल्या सरासरी वीस ते तीस टक्के रुग्णांचे रिपोर्ट्स पॉसिटीव्ह यायचे. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोना संक्रमित किंवा साध्या वॉर्ड मध्ये हलवल जायचं पण तोपर्यंत त्यांच्या आजाराच्या सर्व शक्यता लक्षात घेणं आणि आहे त्या सुविधांमधे योग्य उपचार देणं एक मोठं आव्हानं होत. सोबत इतर डॉक्टर्सही होते. पेशंटचं रक्त तपासायला पाठवणं, Xray करून घेणं, रिपोर्टस गोळा करणं, आवश्यकतेनुसार कृत्रिम श्वास देणं, पोटावर झोपवणं, समजून सांगणं यात सतत सगळे व्यस्त असायचे.

जिवन मरणाची रस्सीखेच सतत चालू असायची, कधी आम्ही जिंकायचो तर कधी काळ. यात कित्येक वेळेला हे विसरायला व्हायचं कि यात कोरोना रुग्णही आहेत. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, नातेवाईकांना रुग्णाला भेटू दिल जात नव्हतं पण फोनवरून तब्येतीची माहिती दिली जायची, एखादा गेला तरीही फोनचं.

मी काम करत असलेला ५ c विभाग कोरोना संशयित सिरीयस पेशंट वार्ड पासून संशयित ICU बनला होता. ICU साठी लागणाऱ्या अजून बऱ्याच गोष्टीं गरजेच्या होत्या. मी आणि सोबत काम करणाऱ्या डॉक्टर्सनी, तिथं काम करणाऱ्या स्टाफ व इंचार्जच्या मदतीनं ICU साठी लागणाऱ्या गोष्टींची जमवाजमव केली. करण्यासारखं खूप काही होतं पण तितक्याच अडचणीही होत्या. एका आठवड्यात काही गोष्टी मार्गी लागल्या आणि पुष्कळ राहील्या. रोज वाढणारी संख्या, मरणारे पेशंटस, सगळं भीतीदायक होत तर दुसऱ्या बाजूला आजारतून ठणठणीत बरे होउन घरी जाणाऱ्यांची संख्याहि मोठी होती आणि तेच सगळ्यांना काम करण्यासाठी प्रवृत्त करायला पुरेसं होत.

मला तिथे सगळ्यात जास्त प्रोहत्सानं कोणाकढुन मिळालं माहितेय? तिथे काम करणारे निवासी डॉक्टर्स. हाडाच्या कलाकाराला प्रेक्षक कोण? रंगमंच कुठला याने फरक पडत नाही, नाटक सुरु झालं कि तो आपल्या भूमिकेत हरवतो. अगदी तसंच, अजून कित्येक दिवस कोरोना वार्डमधे काम करावं लागेल हे माहित असतानाही अगदी जिव तोडून ती सारी काम करत होती. कामात, डोळ्यात कुठेही संकोच, भीतीचा लवलेशही नव्हता. त्यांची बरोबरी कदाचित शक्य नाही पण जमेल तितकं करायला मी नक्कीच तयार होते.

दररोज डोंनिंग करून वार्डात आल्यावरही बरीचशी लोक बाहेर आलेले केस, नीट न बसलेला मास्क, कपडे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करायचे. एके दिवशी PPE किट देणाऱ्या मुख्य सिस्टरांना जाऊन भेटले व बोलले " खरं तर डोंनिंग करताना एक मार्गदर्शक हवा पण ते शक्य नसेल तर डोंनिंग रुममधे आरसा लावावा जेणेकरून डोंनिंग नीट केलं जाईल कारण आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमणापासून वाचवण्यासाठी ती महत्वाची गोष्ट आहे".

कामाच्या शेवटच्या दिवशी दहा बाय दहाच्या मोठ्या आरश्यात बघून मी डोंनिंग केलं.माझं बक्षीस होत ते.

संकट मोठंय, अचानक बांध फुटावा आणि काही कळायच्या आत सगळं पाण्याखाली जावं अशी काहीशी परिस्थिती आहे. कुठलीच योजना, नियोजन शंबर टक्के प्रभावी व अचूक ठरेल असं नाही. परंतु वेळेनुसार आणि गरजेनुसार त्यात बदल करून उद्देश साध्य होईल. डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटलमधील मामा, मावशी, फार्मासिस्ट, वैद्यकीय व सरकारी अधिकारी, पोलीस, कचरा उचलणारी माणसं, सिक्युरिटी गार्ड, जेवण पुरवणारी, कधी प्रकाश झोतात न आलेली, हातभार लावूनही आपल्याला कधीच माहित न होणारी असंख्य लोकं आपल्या शाररिक, आर्थिक, मानसिक अडचणींना तोंड देऊन, मजबुतीने पाय रोखून उभी आहेत.

या सर्वांप्रति मी कायम कृतज्ञ राहील.

या सगळ्या प्रवासात मला स्वतःला काय वाटलं ???

सुरुवातील काही लोक स्वइच्छेने, कोरोना बाधितांसाठी काम करण्यासाठी नाव देत होती, तेव्हा नव्हतं झालं धाडस.परंतू कलेक्टर ऑफिसमधून फोन आलेल्या क्षणापासून मी मानसिक द्रुष्ट्या पूर्णपणे तयार होते. एक जबाबदारी आली होती माझ्यावर आणि ती मी अगदी आंनदाने स्वीकारली. लढायला जाणाऱ्या सैनिकासारखं वाटत होतं. शिक्षणाबद्दल अभिमान वाटत होता. त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर वाटत होता ज्यांनी मला इथं पर्यंत यायला हातभार लावला व ज्यांच्यामुळे मी हे काम करू शकणारं होते.

मी एक स्त्री आहे किंवा घरात लहाण मुलं, म्हातारी माणसं आहेत म्हणून हि जबाबदारी मी नाकारणार नव्हते. पाण्यात दगड टाकल्यावर काहीवेळासाठी वलय निर्माण होतात तस माझ्याही मनात काही वेळेला मृत्यूच्या भीतीचे वलय उठले आणि विरले.

इथे शब्दात मांडलाय त्यापेक्षाही कितीतरी मोठा अनुभव, वेगळा दृष्टिकोन मला मिळाला. बांधल्या जात असलेल्या रामसेतूमधला मी फक्त एक वाळूचा कण होते. रुग्णांना बर करणं, माझ्या मागाहून येणाऱ्या सहकाऱ्यांना सोबत देणं, आजूबाजूच्या लोकांची थोडी भीती कमी करणं, आई म्हणून मुलांवर सामाजिक जबाबदारीचे संस्कार घडवणं यापैकी माझ्या कामातून काय साध्य होईल माहित नाही पण मनात एक समाधान असेल, गरजेच्या वेळी मी तिथे होते. - डॉ. सुषमा जाधव/गायकवाड,फिजिशीयन,पुणे.

#Doctorsdiary #Corona



Monday, April 13, 2020

बाबासाहेब आणि चीन - @ प्रा. हरी नरके, भीमजयंती 20/3

आज चीनमुळे जगभर हाहा:कार माजला असताना,या धोकादायक देशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकवार इशारे दिले होते. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या द्रष्टेपणाचे स्मरण...




साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे,   असा परखड इषारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट निती या विषयावर बोलत होते. पंतप्रधान नेहरू हे बाबासाहेबांचे भाषण काळजीपुर्वक ऎकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.

     आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर पसरवला गेलाय. ह्या वणव्यात सारे जग होरपळून निघत असून चीनच्या चुकीची शिक्षा आज भारतासह सार्‍या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोचवला यावर मतभिन्नता आहे. चीनने सार्‍या जगावर लादलेल्या या जैविक महायुद्धाने सारे जग पोळून निघाले आहे. चीनचे लालभाई सत्ताधिश महत्वाकांक्षी, हुकुमशाहीवृत्तीचे आणि आक्रमक आहेत हे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या लाखो तरूणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीस क्रूरकर्मा आणि रानटी आहेत हे वेगळे सांगायला नको. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनिती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार [ व्हेटोचा अधिकार ] हे सारे बघितले की चीन काहीही करू शकतो यावर विश्वास बसतो. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात. जगातील सगळी प्रगत राष्ट्रं आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनितीपण असू शकते.

     बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा की त्यांनी साडेसहा दशकांपुर्वीच भारताला याबाबत जागे केले होते. " साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नितीमत्ताही नको असते. माओ हा चीनमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या बौद्धांना अमाणूष वागणूक देत आहे ते पाहाता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधिश आहे, हे उघड दिसते. भारताने चीनबरोबर मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी," असेही ते म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, " साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजार्‍यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला फार महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण ह्याला मान्यता दिलेली असली तरी माओचा पंचशीलावर विश्वास नाही. चिनी राजनितीची २ तत्वे आहेत. एक- त्यांची राजनिती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे त्यांच्या जगात नितीला मुळी जागाच नसते. आजची निती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झालेला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्विकारतात त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे."

       नेहरू सरकारमधील कायदेमंत्रीपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली होती त्यातले एक नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनिती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये. बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते की चीन आणि पाकीस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून खतरा आहे असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकरच खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च  करावा लागतोय याबाबत बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षणनितीमध्ये भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौध्द तिबेटची जी ससेहोलपट केली त्यावर बाबासाहेब सक्त नाराज होते.

    खरं तर चीन आणि भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभलेला आहे. चीनसोबत आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध राहिलेले आहेत. रशियाने दुसर्‍या महायुद्धांनंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नितीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेताना बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्याकाळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. मात्र पुढीलकाळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्त्या करण्यात आली त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.

१९५४ साली मुंबईत बोलताना आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडीत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची १९३६ साली स्थापना केली, त्यावेळी काही कम्युनिष्ठ मित्रांशी त्यांची जवळीक होती. मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२ च्या लोकसभा निवडणूकीत आपली मतं कुजवा पण बाबासाहेबांना पराभूत करा हा डांग्यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातीप्रश्नावर मात्र मौन बाळगीत असे. स्त्रीप्रश्नही त्यांच्यादृष्टीने अग्रक्रमाचा नव्हताच. या सगळ्या पार्श्वभुमीवर नेपाळच्या काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याबाबत जाहीरपणे मार्क्स नाही तर बुद्धच आपला मार्गदाता असल्याचे घोषित केले. मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी आपल्या लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झालेली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला तरी कम्युनिष्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने व भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.

       बाबासाहेबांच्या दृष्टीने देश प्रथम होता. त्यामुळे आपल्या साम्यवादी मित्रांना काय वाटेल त्याची पर्वा ते करीत बसले नाहीत. चीन किंवा रशियामध्ये पाऊस पडला की इकडे छत्र्या उघडणारांचा अपवाद वगळता या चिनी हिंसक आणि हुकुमशाहीवृत्तीच्या नेत्यांच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)


https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/PrintPages.aspx?doc=MTMUM/2020/04/14&from=6&to=6&ts=20200413211954&uq=20191018031251

Thursday, April 2, 2020

महासत्ता अमेरिकेसाठी मंगलकामना- प्रा.हरी नरके


जगाची महासत्ता अमेरिका आज लोळागोळा झालीय. कोरोनाने पिडीत अमेरिका आणि युरोपमधले प्रगत देश बघितले की कणव दाटून येते. अमेरिकन माणसांनो लवकर बरे व्हा हीच मंगलकामना.
एक जुनी गोष्ट आठवली. एका अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये शोधनिबंध वाचण्यासाठी मला निमंत्रण मिळाले होते. युएस व्हीसासाठी फी भरून अर्जाचे सगळे सोपस्कार केले. खूप कागदपत्रे जमवावी लागली. त्यापुर्वी मी बर्‍याच देशांना जाऊन आलेलो असल्यामुळे, तसेच निमंत्रक संस्था तगडी असल्याने मला व्हीसा मिळणे अवघड जाणार नाही असे मित्रांनी सांगितले होते. मी आशावादी होतो. अमेरिकन एम्बसीमध्ये कागदपत्रे घेऊन भेटायला बोलावण्यात आले. यथावकाश एका खिडकीवर मला बोलावण्यात आले. माझी फाईल बघत अत्यंत मग्रूर चेहर्‍याचा एक अमेरिकन अधिकारी माझ्याशी कमालीच्या उद्धटपणे बोलत होता. 
माझ्या भेटीचा उद्देश, माझ्या दौर्‍याचा तपशील, तिकडे राहण्याची व्यवस्था काय आहे, याची नेमकी उत्तरं मी दिली.
माझ्या फाईलमधल्या माझ्या आर्थिक स्थिती दाखवणार्‍या कागदपत्रांकडे त्या अधिकार्‍याने नजर टाकली आणि त्याच्या डोळ्यात संताप दिसला. तो पुट्पुटत होता. तो मला बेगर म्हणत होता. त्यानं माझी फाईल बाहेर फेकून दिली आणि माझ्या अर्जावर शिक्का मारला रिजेक्टेड.
मला व्हीसा न मिळाल्याचे वाईट नक्कीच वाटले पण तो मला भिकारी म्हणाला याचा अधिक संताप आला.
त्यानंतर विविध नामवंत संस्थांची अनेकदा निमंत्रणे येऊनही मी परत कधीही युएस व्हीसासाठी अर्ज केला नाही. तिकडे माझे अनेक भले मित्र राहतात. ते कष्टाळू आहेत. गुणवंत आणि प्रतिभावंत आहेत. सगळेच अमेरिकन त्या अधिकार्‍यासारखे असतील असेही नाही. तरिही या लोकांच्या देशात जाण्यावाचून आपले भिकार्‍यांचे काय अडलेय? असाच प्रश्न मनात येत गेला.
आज कोरोनापुढे हतबल झालेल्या त्या श्रीमंत देशातील अहंकारी लोकांबद्दल अपार कणव दाटून आली. अमेरिकन माणसांनो लवकर बरे व्हा हीच मंगलकामना.
-प्रा. हरी नरके, ०२/०४/२०२०

Wednesday, April 1, 2020

या सापळ्यात आपण अडकता कामा नये- प्रा. हरी नरके






अ, ब, क, ड या जात-जमातवादी, जात्यंध, धर्मांध संघटना असल्या व त्या एकमेकांवर आग ओकत असल्या तरी त्या मागून हातमिळवणी असलेल्या संघटना आहेत. विरोधीभक्ती हे यांचे जगण्याचे सूत्र असते. या संघटनांचा बरीच वर्षे व सखोल अभ्यास केल्यानंतर माझे झालेले हे मत आहे. आपल्याला एकमेकांच्या अंगावर सोडण्यासाठी, वादात गुंतवून टाकण्यासाठीच हे भांडणाचे नाटक असते. अ, चे चुकले की ब चे या वादात आप का पडायचे? आपण आपसात का झुंजायचे? हे सारे एकाच माळेचे मणी आहेत.
हे सगळे एकत्र बसून स्ट्रॅटेजी ठरवतात आणि त्यावर आपल्यासारख्या सामान्यांना नाचवतात. यांनी एक फुसकी सोडली की लागले सगळे कामाला. आपले डोळे कधी उघडणार? ही सगळीच बांडगुळे आहेत, सामान्य माणसाचे रक्त शोषन करणारी. आपसात लढू देत त्यांना. मरू देत त्यांना. मुळात ती लढाई नसतेच. मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखे कर अशी ही रणनिती असते. या डावपेचांना आपण बळी पडता कामा नये.
प्रा.हरी नरके, १ एप्रिल, २०२०

Monday, March 30, 2020

निरामय सूर जपून ठेवा गलबला फार झाला - प्रा. हरी नरके


भारत नावाच्या आपल्या देशात एकाच काळात अनेक देश राहात असतात. त्यांचं जगणं इतकं परस्परविरोधी असतं की त्याचे पदर समजून घेताना गोंधळून जायला होतं. एका बाजूला कोरोनाचे रूग्ण आणि मृत्यू वाढताहेत ही धडकी भरवणारी बातमी असते तर दुसरीकडे त्याहून जास्त रूग्ण बरे झाल्याची दिलासा देणारीही बातमी असते.

एका शेजारी देशात कोरोनाकाळात तिथल्या अल्पसंख्यकांना अन्नधान्य वाटप केलं जात नसल्याची बातमी असते. तर दुसरीकडे बुलंदशहरमध्ये एक हिंदू कॅन्सरने मृत्यू पावला असता त्याच्या अंत्ययात्रेला एकही हिंदू हजर नव्हता तेव्हा तिथल्या मुस्लीमांनी त्याचा अंत्यविधी केला अशी बातमी पुढे येते.

डॉक्टर, नर्सेस आणि प्रशासकीय यंत्रणेच्या जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करण्यामुळे कोरोनाचे शेकडो रुग्ण बरे झाल्याची दिलासादायक घटना तर जगभरात ३४ हजार बळी गेलेले आहेत नी सात लाखांना कोरोनाची लागण झालेली आहे. अमेरिका तसेच युरोपमधील श्रीमंत देशांचे कंबरडे कोरोनाने मोडले असतानाही आपल्याकडे अनेकांना गांभिर्यच नाहीए. शेकडो लोक झुंडींनी आजही आपली अक्कल पाजळीत गावच्या जत्रा साजर्‍या करताहेत व जमावाला आटोक्यात आणणार्‍या पोलीसांवरच दगडफेक करताहेत.

दवाखाने अपुरे पडत असतानाही काही शहरी वस्त्यांमध्ये जमाव अद्यापही काबूत येत नाहीये, आपापल्या गावाला जाण्यासाठी लोक टॅंकरचा वापर करताहेत, लाखो बेघर उपासीपोटी मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत निघालेत, अशावेळी खूप अपराधी वाटतं.

तर दुसर्‍या बाजूला जनजीवन सुरळीत होईल या आशावादाने काही लोक समाजमाध्यमांवर खाण्यापिण्याचे पदार्थ झळकवतात, वाढदिवसाच्या जाहीराती टाकतात. डॉक्टर आणि नर्सेससाठी सुरक्षासाधनांचा तुटवडा असल्याच्या बातम्या समोर येतात तेव्हा दुसरीकडे काहीजण दारू दुकानं उघडी ठेवा अशी बिनदिक्कत मागणी करतात. सरकार रस्त्यावरच्या लोंढ्यांसाठी निवारा केंद्रे काढीत असताना, जेवणाची व्यवस्था करीत असताना काही जातीयवादी मदतकोशाचे सवते सुभे उभे करतात. या संकटकाळात राजकारण करणारांची तसेच जे आपला छुपा अजेंडा पुढे रेटताहेत अशांची किळस येते. रात्रंदिवस काम करणार्‍या यंत्रणेचे मनोबल वाढवण्याऎवजी त्यांच्यावर टिकेचे कोरडे ओढणारे हे निष्क्रीय टिकोजीराव बघितले की संताप येतो.

मन विषन्न आणि उद्विग्न होऊ न देता तरिही निर्धाराने निकोप,निरामय सूर जपून ठेवायला हवा. गलबला कितीही वाढला तरी काम करायलाच हवे. एक कवी म्हणतो तसे " ज्यांच्यासाठी करिशी यात्रा, तेच परतले भिवून तमाला, नकोस परतू तुही परंतु चाल गड्या तू चाल!"

आशावादी राहणं हा भाबडेपणा वाटावा अशा ह्या संकटकाळात कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता हेही दिवस जातील ही भावना जपायलाच हवी नाही का?

-प्रा.हरी नरके, ३० मार्च २०२० 

Tuesday, March 24, 2020

तर ३० कोटी भारतीयांच्या जिवाला धोका पोचू शकतो? प्रा.हरी नरके


१. रुपये १५ हजार कोटीची कोरोना उपचार व प्रतिबंध यासाठीची तरतूद अपुरी तरिही स्वागतार्ह पाऊल.


२. मार्च २२ ला संध्याकाळी झुंडींनी रस्त्यांवर उतरून जो जल्लोश केला, कोरोनासंसर्गाद्वारे कोरोनाबाधीत वाढवले त्याबद्दल नाराजीही नाही, उलट शाबासकी याचा अर्थ यांनाही तेच हवे होते.

३. २१ दिवस देश दरवाजाच्या आत हे पाऊल उशीरा उचलले असले तरी आवश्यकच.

४. ज्यांचे हातावर पोट आहे अशा कोट्यावधींच्या जगण्याची तरतूद करण्यात सरकार अपयशी. त्यांचा साधा विचारसुद्धा आजच्या भाषणात नव्हता.

५. अन्यथा देश २१ वर्षे मागे जाईल याचा अर्थ कोरोना रोखण्यात अपयशी ठरल्यास आजच्या १३७ कोटीवरून आपली लोकसंख्या थेट २००० सालच्या १०५ कोटीवर जाण्याची भिती. ही धोक्याची घंटा भयंकर आहे. तीस ते ३२ कोटी भारतीयांच्या जिवाला धोका होऊ शकतो ह्या भयावह कल्पनेने जिवाचा थरकाप उडतो.काळजी घ्यायलाच हवी.


६. गेली सहा वर्षे सतत महासत्तेची भाबडी स्वप्नं विकणारांची आज स्पष्ट कबुली, आरोग्यव्यवस्थेत आपण अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, स्वित्झरलंड, इटलीच्या खूप मागे. हे उशीर सुचलेले शहाणपण कायम ठेवा आणि आरोग्यव्यवस्थेच्या सुधारणेवर लक्ष केंद्रीत करा.

- प्रा.हरी नरके, २४ मार्च २०२०