Showing posts with label देशीवाद. Show all posts
Showing posts with label देशीवाद. Show all posts

Saturday, February 3, 2018

मराठी माणूस आणि मुलांसाठी शिक्षणाचे माध्यम--




मराठी माणसांनी आपल्या मुलामुलींना मराठी माध्यमातून शिकवावे की इंग्रजी हा विषय अतिशय ज्वलंत, बहुचर्चित नी वादग्रस्त आहे.
जागतिक किर्तीचे भाषातज्ञ, साहित्यिक, विचारवंत, अनेक पालक आणि सामान्य जनता यांचा कौल मराठी माध्यमाला आहे.
काही बुद्धीजिवी, उच्च मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय तसेच अनुकरणशील गरीब पालक यांना वाटते आपल्या पालकांना इंग्रजी माध्यमातच घालायला हवे.
मराठी माध्यमाच्या बहुसंख्य शाळांचा दर्जा चांगला नाही, मराठी माध्यम चांगला रोजगार देऊ शकत नाही, इंग्रजी जागतिक भाषा असल्यानं मुलांच्या भल्यासाठी इंग्रजीच अत्यावश्यक आहे असे मुद्दे पुढे केले जातात.
याउलट मातृभाषेतूनच शिकवावे, मात्र लहान वयापासून इंग्रजीची गोडी लावावी किंवा उलटे, इंग्रजी माध्यमातच शिकवावे मात्र लहान वयापासून मराठीची गोडी लावावी, पहिलीपासून इंग्रजी आवश्यक अशीही भुमिका असलेले पालक आहेत.
माणूस मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषा ही केवळ भाषा नसते तर ती स्वकीय मुळं असलेली आपली देशी संस्कृती असते. ती भलीबुरी असेल पण आपली असते. तिच्यापासून नाळ तोडून मुलांना आपण अधांतरी लटकणारे, उपरे, उपटसुंभ बनवतो. हे नुकसान कधीही भरून येत नाही.
इंग्रजी ही नुसती भाषा नाही, ती जेत्यांची, वर्चस्ववाद्यांची सबगोलंकारी मानसिकता पेरणारी संस्कृतीही आहे. तिला ग्लोबल वगैरे गोंडस नाव देऊन तिचे आक्रमक मार्केटिंग केले जाते. त्यामुळे जे जे देशी, भारतीय ते ते हिनकस, हलके, टाकाऊ, हास्यास्पद अशी न्यूनगंडाची धारणा मानगुटीवर बसते. त्यातून आलेला अभिजात न्यूनगंड हा मराठीचा खरा शत्रू आहे.
जगातल्या कोणत्याही भाषेबद्दल अनादर, आकस किंवा द्वेष नको. मातृभाषेचा अभिमान, अस्मिता, अहंकार यातून जरा मोकळे होऊन विचार करूया.
1. जी भाषा रोजगार देते तीच जगते, बाकीच्या मरतात असं 1907 साली भारतीय भाषांचा सर्व्हे करून त्याचे 50 खंड प्रसिद्ध करणारे ग्रियरसन म्हणतात.
2. मराठी ही जगातली 10 व्या क्रमांकाची भाषा आहे.
3. जगातल्या सर्व भाषांचा विचार करता सर्वाधिक समृद्ध कोश वाडमय असलेली ती दुसर्‍या क्रमांकाची जागतिक भाषा आहे.
4. ती ज्ञानभाषा, धर्मभाषा, जागतिक भाषा आहेच.
5. ती अभिजात भाषा आहे असं आम्ही आमच्या 436 पृष्ठांच्या इंग्रजी अहवालात सिद्ध केलेलं असून जगभरच्या भाषा शास्त्रज्ञांनी या अहवालाला मान्यता दिलेली आहे.
6. इंग्रजीच्या तुलनेत मराठीची रोजगार देण्याची क्षमता कमी आहे हे मात्र मान्यच करायला हवे.
7. सगळे काही शॉर्टकटने तात्काळ हवे असलेले पालक इंग्रजीकडे वळले तर त्यात त्यांची चुक नाही.
8. मराठीची रोजगार क्षमता वाढवल्याशिवाय पालक मराठीकडे वळणार नाहीत.
9. मराठी शाळा, शिक्षक, अभ्यासक्रम, यांचा दर्जा वाढवलाच पाहिजे. या शाळांचा दर्जा चांगला नाही म्हणून चांगल्या आर्थिक स्तरातली मुलं, जागृत पालकांची मुलं, राज्यकर्त्यांची आणि उद्योगपतींची मुलं या शाळांमध्ये येत नाहीत. ती येत नाहीत म्हणून हा दर्जा सुधारण्याबद्दल संस्थाचालक, शासन आणि समाज उदासीन आहे, हेही तितकंच खरं. हे एक दुष्टचक्र बनलेले आहे. दर्जा अधिक सुधारून आपण पहिलं पाऊल टाकूयात. दर्जा सुधारण्याबाबतचे आपापले संकल्पचित्र मांडूयात. कृतीही करूयात. आपण सुरूवात करू. इतर मागे येतीलही.
10. मात्र अनेक इंग्रजी शाळा सुमार दर्ज्याच्या असतात तरीही चर्चा फक्त मराठी शाळांच्या वाईट दर्जाची होते. यामागचे भाषक राजकारण समजून घेतले पाहिजे.
11. सामान्य माणसाचा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी, नातेवाईकांनी, राजकारण्यांनी, सेलीब्रेटींनी जे केले ते करण्याकडे कल असतो.
12. फारसे खोलात न जाता, चिकित्सा वगैरेच्या भानगडीत न पडता धोपटमार्ग ते निवडत असतात, त्यात त्यांची चूक नाही.
13. मराठी शाळा बंद पाडायच्या, इंग्रजी शाळांचे कारखाने काढून बख्खळ नफा मिळवायचा या विनोद अंबानी, देवेंद्र अदाणी मार्गाने सरकारही चालले आहे.
14. फाडफाड इंग्रजी बोलता आले की जग जिंकता येते असे पालकांना वाटते. त्या बोलण्यात भरीव मुद्दे असतात का? ते बोलणे अस्सल असते का? असला फालतू विचार करण्यासाठीचा वेळ आमच्याकडे नाहीये. याचा अर्थ प्रत्येक मातृभाषावाल्याचे/वालीचे बोलणे थोरच असते असा विपर्यास करून वाद घालू नये.
15. ज्या दिवशी मराठी बुद्धीजिवींनी सागरा प्राण तळमळला, ने मजशी ने अमेरिकेला असा टाहो फोडीत मराठीचा हात सोडला त्या दिवसापासून मराठीचे कुपोषण सुरू झाले.
16. अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठीची रोजगार देण्याची क्षमता वाढेल.
17. आज राज्य सरकार मराठी भाषेच्या सर्व संस्थांसाठी अवघे 10 कोटी रूपये खर्च करते. अभिजातमुळे त्यात केंद्राच्या रुपये 500 कोटी अनुदानाची दरवर्षी भर पडेल.
देशातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय होईल. तेव्हढ्या प्राध्यापक-शिक्षकांच्या जागा तयार होतील.
18. भारताच्या मोबाईल क्रांतीचे जनक सत्यनारायण [सॅम] पित्रोदा, सुपर कंप्युटरचे जनक विजय भटकर, नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, जागतिक किर्तीचे वैज्ञानिक रघूनाथ मासेलकर, जयंत नारळीकर, वसंतराव गोवारीकर आदींचे शिक्षण मातृभाषेतूनच झाले होते.
क्रमश:-
-प्रा.हरी नरके

Sunday, July 16, 2017

"अंगविज्जा" - कुशाणकालीन समाजव्यवस्थेवर लख्ख प्रकाश!

प्राचीन भारतीय समाज जीवन आणि मराठी भाषा यांच्यावर अतिशय मौलिक प्रकाशझोत -- सर्वांनी अवश्य वाचावा असा लेख. धन्यवाद संजय सोनवणीसर- Sanjay Sonawani
आजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी "अंगविज्जा" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. हा ग्रंथ जैन धर्मियांनी लिहिला असल्याने व तो अंगलक्षणांरून भविष्यकथन करणारा ग्रंथ वाटल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनाला वगळत आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.
हा ग्रंथ इसवी सनाच्या पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान लिहिला गेला आहे याचे पुरावे ग्रंथातच आहेत. कुशाणकालीन समाज-संस्कृती, नाणी, नांवे आणि देवता या ग्रंथात ठायीठायी आलेल्या आहेत. दक्षीणेत तेंव्हा सातवाहनांची सत्ता होती. माहाराष्ट्री प्राकृत त्या काळात उत्कृष्ठ ग्रांथिक भाषा मानली जात असल्याने हा ग्रंथ उत्तरेत रचला गेला असला तरी लेखकाने ग्रंथभाषा म्हणून याच भाषेची निवड केली. अर्थात त्यावर स्वाभाविकपणे काही शब्दकळांवर अर्ध-मागधीची पुसटशी छाया आलेली आहे. असे असले तरी या ग्रंथातील असंख्य शब्द मराठीत आजही वापरले जातात. उदाहणार्थ कुद्दली (कुदळ), छुरी (सुरी) थाळा, तट्टक (ताट) इत्यादि आजही वापरात असलेले शब्द तर आहेतच पण "कारूकम्म" (कारुकर्म) हा तेंव्हाचा व्यवसायाधिष्ठित शब्द आजही "कारू" जातसमुहासाठी वापरला जातो.
अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत "गृहपती" या संज्ञेने जैन व बौद्ध हे दोन धर्म निर्दिशित होतात. संन्यास घेतलेल्या बौद्ध व जैनांना श्रमण व मुंडक म्हणत असत असेही दिसते. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्र, यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा गृहपती नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्ध, जैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाही, म्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच प्राचीन नांव होय.
त्या काळात देवतांमध्ये शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. काही लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.
तत्कालीन लोक अनेक उत्सवही साजरे करीत. त्यांची माहिती देत असतांनाच शिवमह व रुद्रमह हे उत्सव इंद्रमहाप्रमानेच स्वतंत्र रित्या साजरे केले जात. याचाच अर्थ असा की रुद्र व शिव ही वेगळी दैवते आहेत याचे तत्कालीन समाजाला भान होते. गुप्तकाळात पुराणांनी रुद्र व शिवाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुता: ही दोन दैवते दोन वेगळ्या धर्माची आहेत. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या, राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती. अंगविज्जा लेखनाचा काळ हा पुराणे लिहायला सुरुवात होण्याआधीचा असल्याने असूर-राक्षसांची प्रतिमा जनमानसात पुर्वी चांगलीच होती हे त्यांना देवतारुपात भजले जात असल्याने सिद्ध होते.
तत्कालीन व्यक्तीनांवेही प्राकृतातच आहेत. नांवांचे संस्कृतकरण झालेले नसल्याने अंगविज्जात आलेली व्यक्तीनामे हीच प्रत्यक्ष व्यवहारातीलही नामे होती असे प्रस्तावनेतच श्री. वासुदेवशरण अग्रवाल म्हणतात आणि ते योग्यही आहे. व्यावहारिक नांव प्राकृतात वा अन्य कोणत्याही भाषेत लिहितांना किमान त्यांचे मूळ रूप कोणी बदलत नाही. त्यामुळेच अग्गीमिताचे संस्कृतकरण अग्नीमित्र असे आपण करतो ते चुकीचे आहे. अग्गीमित हेच नांव व्यवहारातील होते व त्याचा तसाच वापर केला पाहिजे. उलट नंतरच्या काळात प्राकृत मूळ नांवांचे संस्कृतकरण केल्याने खूप घोळ झालेले आहेत. सातवाहन नांवाचे संस्कृतीकरण केल्याने शालिवाहन शकाचा काय गोंधळ झाला आहे हे आपण पहातच आहोत. अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांचे सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे या काळात संस्कृत भाषा प्राकृतातून विकसित होत असली तरी जनमानसात तिला अजून प्रवेश मिळायचा होता. संस्कृतचा परिपोष झाला तो गुप्तकाळात. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व असल्याचे कसलेही पुरावे मिळत नाहीत.
कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला "पुराण" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे. कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दीनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासक, अर्धमासक, ररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्र, अलंकार, मद्याचे अनेक प्रकार, पानगृहे, व्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लसच्या (सन ७८) प्रवासवर्णनातही येतात. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.
अंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.
अंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही अत्यंत आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने अन्य जैन, बौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी "अंगविज्जा"मुळे आले तरी पुरेसे आहे.
-संजय सोनवणी
........................

Saturday, September 13, 2014

देशीवादावर बेफाम आरोप, शेरे आणि ताशेरे

.सतिश वाघमारे यांनी देशीवादाबद्दल काही प्रश्न उपस्थित करून चर्चा सुरू केलेली आहे. त्यांच्या भिंतीवर ही चर्चा जोरदार रंगलेली आहे.
हरी नरके: प्रा.सतिश वाघमारेजी : चर्चा वाचली. धन्यवाद. माझ्या माहितीप्रमाणे प्रा. भालचंद्र नेमाडे आणि प्रा. राजन गवस फेसबुकवर नाहीत. त्यामुळे ते फरार झाले म्हणजे कुठून फरार झाले? पुस्तकांमधून ते गेले अनेक वर्षे मांडणी करीत आहेत. त्यांच्या भुमिकेची झाडाझडती जरूर घ्यावी, त्यातल्या विसंगती, उणीवा किंवा फोलपणा जरूर मांडावा. हेत्वारोप करू नयेत. नेमाडेंची कौटुंबिक पार्श्वभुमी शोधून चर्चा करायची असेल तर चर्चेचा स्तर घसरेल. मला वाटते, इकडे त्यांच्या भुमिकांचेही फार मोठ्या प्रमाणात सुलभीकरण केले जात आहे. { तुम्ही नाही } हे लोक { देशीवादी } संपूर्ण फुली मारून बाद करावेत असे लोक आहेत काय? त्यांच्या विचारांवर आक्षेप घेणारे तसे करू इच्छितात असे प्रथमदर्शनी तरी वाटते. फुले-शाहू-आंबेडकर वादावरील चर्चेत मी आता जात नाही. तिचा जो धागा देशीवादाशी संबंधित असेल किंवा विरोधी असेल तेव्हढे जरूर बोलू या. नेमाडॆंनी ज्या जातीव्यवस्थेचे आणि सामंतशाहीचे कायम वाभाडे काढले त्यांनाच आम्ही जातीव्यवस्थेचे समर्थक ठरवणार असू तर मग ही चर्चा खूपच सवंग आणि सरधोपट होईल. नेमाडे, गवस यांच्यावर ज्यांचा व्यक्तीगत राग असेल { तुम्ही नाही } त्यांनी आपली खाजगी धुणी या घाटावर कृपया धुवू नयेत. {वि.सु. एखाद्या लेखकाला ज्ञानपिठ मिळायला हवे असे म्हणणे आणि त्याच्या लेखनावर टिका करणे यात काहीही विसंगती नाही. एकतर ही मते कोणत्या काळातील आहेत ते पाहिले पाहिजे. ती वेगवेगळ्या काळातील असू शकतात. भुमिकांचा विकास होऊ शकतो.एकाच काळातील असतील तरी उणीवा असूनही ज्ञानपिठ द्यावे असे म्हणणे चुक ठरत नाही.निर्दोष लेखन आनि लेखक कुठून आणायचे सतिषराव?}

हरी नरके: जातीव्यवस्थेचे चटके ज्यांना बसलेत त्यांच्या भावना स्वाभाविकच त्याबाबतीत कठोर असतात. असणार. ते योग्यच आहे. तथापि जातीव्यस्थेवर हल्ला करताना एक गोष्ट विसरून चालणार नाही की, ’भारतात प्रत्येक जात हे एक स्वतंत्र राष्ट्र आह” असे बाबासाहेब म्हणाले होते. जाती-वर्ण व्यवस्थेचे लाभार्थी ज्या पद्धतीने तिचे समर्थनपर तत्वज्ञान मांडतात त्या प्रकारचे नेमाडे तिचे समर्थक नाहीत. त्यांची भुमिका वेगळी आहे. त्या दोन्हींची सरमिसळ किंवा गल्लत करणे म्हणजे या गोष्टीतली गुंतागुंत विसरून सब घोडे बारा टक्के अशी भुमिका घेणे होय.
भारतीय संस्कृती असे काही म्हटले की काही लोक थेट अंगावरच येतात.त्यांनी कृपया ताज्या साधनाच्या अंकातील दिवंगत यु.आर. अनंतमुर्ती यांची प्रदीर्घ मुलाखत वाचावी. नेमाडॆंनी फुल्यांवर जे लिहिलेय ते वाचले की त्यांची भुमिका फुलेवादाची समर्थक असल्याचे स्पष्ट व्हावे. वेगवेगळ्या स्कूलची दृष्टी वेगवेगळी असली तरी देशीवाद्यांना थेट संघवाले ठरवणे म्हणजे फारच झाले. टिका करा. वाभाडेही काढा. मात्र थेट शत्रूच्या छावणीत ढकलू नका. बाबासाहेब म्हणाले होते, {पाहा: रानडे ,गांधी आनि जिना } "जे चुका करतात पण चुकीच्या बाजूला {तत्वज्ञान म्हणुन}उभे नसतात ते मला माझे वाटतात. मात्र जे चुकीच्या बाजूलाच उभे असतात त्यांनी मी आपले म्हणणार नाही." नेमाडेंना {पठारे, आदींना} आपण कोठे बसवणार आहोत?
September 13 at 7:59pm · Like · 8.....


हरी नरके: आरोप झाले. शेरे आणि ताशेरे झाले. तुमची मते मांडून झाली. आता जरा सज्जड पुरावेही देऊ या.१..२..३..४.. चला सुरू करा.
मी देशीवादाचा प्रवक्ता नाही. मी या विचारसरणीचा कट्टर समर्थकही नाही. मात्र मला त्या विचारातली काही सामर्थ्यस्थळे मोलाची वाटतात. ती एक भोंगळ आणि जातीय विचारधारा आहे अशी तोफ सर्वसाधारणपणे सर्व बड्या मंडळींनी डागलेली आहे. मला त्यांचा प्रतिवाद करायचा नाही.
सहजपणे नजर टाकली तर आरोपपत्रातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे दिसतात.
१.देशीवाद एक बेगडी आणि निव्वळ तकलादू संकल्पना आहे. देशीवादाची नेमकी आणि सुस्पष्ट अशी कुठलीही व्याख्या नाही. कोणत्या परंपरा , मूल्ये देशीवादाच्या मुळाशी आहेत ? २.वैचारिक सामाजिक दृष्टीकोनातून पाहताना ती मुल्ये चिरंतन शाश्वत म्हणून कितपत टिकणारी आहेत ? भारतीय ग्रामीण समाजव्यवस्थेतील लाभार्थी घटक विशेषतः सरंजामदार या देशीवादी भोंगळ कल्पनेचा जोरकस पुरस्कार करताना दिसतात. ही सरंजामी मानसिकता आहे.
३.फुले शाहू आंबेडकर परंपरेची विचारधारा न झेपणारे न मानणारे या देशीवादी गोलमोल कल्पनेच्या भोवती पिंगा घालतात.
४.देशीवाद संस्कृती आणि परंपरा यांना केंद्रबिंदू मानतो. प्रचलित व्यवस्था प्रमाण मानूनच जगणारा माणूस देशीवाद विचारात घेतो. या पलीकडच्या माणसाला देशीवाद मान्यता देत नाही . कारण सनातनी परंपरा. वैदिक परंपरा, सनातन धर्म, वर्णाश्रम धर्म या परिप्रेक्षात देशीवाद विसावला आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड देशीवादी मुल्ये येतात. देशीवादी लेखकांच्या कादंबऱ्यातला दलित वर्गविषयक तुच्छ दृष्टीकोन त्या अंगाने पाहता येईल.
५.जात-धर्म आणि लिंगभेदाची विचारधारा देशीवाद स्वीकारतो. तिचे समर्थन करतो.
६.वस्तुतः आज महार मांगांचीच भाषा खर्‍या अर्थाने सतेज आहे. (पृ. ३४४) असा निर्वाळा देणारे नेमाडे चांगल्या भाषेची उदाहरणे देताना मात्र गोडसे भटजी, लोकहितवादी, लक्ष्मीबाई टिळक, साने गुरुजी, चिं. वि. जोशी, माडगुळकर, भाऊ पाध्ये इत्यादी बहुतांशी ब्राह्मण लेखकांच्या भाषेचाच दाखला देतात यावरून ते ब्राह्मणीविचारसरणीचे समर्थक ठरतात?
७. देशीवाद हा सौम्य अर्थाने हिंदुत्ववाद आहे...क्रमश: {पाहा भाग २..}
८.देशीवादी झूल ही प्रतिगामी, स्थानिक परंपराप्रधान सांस्कृतिक मूल्यं जपण्याच्या ओढीतुन निपजलेली निरर्थक संकल्पना आहे.ती बदलविरोधी नि न्यूनगंडग्रस्त मानसिकता आहे.
९.थोडक्यात संरजामी जातीवर्चस्वाचे तथाकथित राष्ट्रवादी सांस्कृतीक तत्वज्ञान परिभाषित करणारे ही विचारधारा आहे.ती या देशातील मूल आणि मूलतत्ववादी प्रवृती आहे.या देशीवादाची भूमिका संरजामी आणि ब्राह्मणी दोन्ही व्यवस्थेला पोषकच आहे.
या आरोपपत्राचे सार एका अभ्यासकाने पुढीलप्रमाणे दिलेले दिसते."देशीवाद हा लोकार्थाने जातीयव्यवस्थाच आहे.
बलूतेदारी आणि सरंजमशाहीची यांचे नेमाडे समर्थक आहेत. ते सधन कुटुंबातून आलेले असल्यामुळे त्यांना देशीवादाचे चटके आणि त्याचे उपद्रवमुल्ये याच्याशी देणे-घेणे नाही
उलट हा वाद आजही टिकला जावा आणि आपली सुभेदारी पुर्वीसारखीच अबाधित रहावी हाच या मंडळींचा खरा अट्टाहास आहे."
या सगळ्यांना उत्तरे देणे हे माझ्या कुवतीबाहेरचे काम आहे. मी ते करू शकणार नाही.
"देशीवाद हा लिंगभाव आणि जातीव्यवस्थेचा समर्थक आहे. तो सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेच्या आड येतो. तो दलित वर्गविषयक तुच्छतेचा दृष्टीकोन मांडतो." हा करण्यात आलेला आरोप जर खरा असेल तर देशीवाद सर्वथा टाकाऊ मानायला हवा.
मात्र याबद्दलचे पुरावे देऊन ही चर्चा सप्रमाण आणि टोकदारपणे करावी अशी आक्षेपकांना नम्र विनंती आहे........