Showing posts with label म.टा.. Show all posts
Showing posts with label म.टा.. Show all posts

Tuesday, June 23, 2020

"बाबासाहेब आणि चीन" या लेखावरची एका चीनप्रेमीची पोटदुखी आणि जळफळाट - प्रा. हरी नरके


१. हरी नरके यांच्या "बाबासाहेब आणि चीन" या लेखाला एव्हढी भरमसाठ प्रसिद्धी कशाला? सध्या त्याचीच सगळीकडे धूम आहे. मोबाइलवर ओव्हरसबस्क्राईड.

२. लेख वाचण्यापुर्वीच मला तो लेख खोटा असणार अशी शंका होती. एका मित्राने मला विचारले, " हे खरे आहे काय?" मी तेव्हाच म्हणालो, "वाटत नाही."

कारण ५४ ला चीन केवळ पाच वर्षाचा होता. १९४९ ला चीनला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्यावर कशाला बाबासाहेब बोलतील? हरी नरके खोटे लिहित असणार.

३. हरी नरकेंनी ज्याच्या आधारे लिहिलेय तो "बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचा खंड १५ वा" मी वाचलेला नाही.

४. पण मी एका लेखकाचे दुसरे पुस्तक वाचलेय.

५. त्यानुसार बाबासाहेबांनी त्या भाषणात रशियाचा उल्लेख जास्त वेळा केलाय. चीनचा कमी वेळा केलाय. मग हरी नरके रशियावर का लिहित नाहीत?

६. बाबासाहेब चीन, माओ, कम्युनिझमवर बोललेत. पण कमी बोललेत.

७. परिस्थितीजन्य हंगाम येतात, जातात, प्रसिद्धि येते, अन जातेही.

८. हरी नरकेंना एव्हढी जास्त प्रसिद्धी मिळतेच कशी? काहीतरी लबाडी असल्याशिवाय हे कसे शक्य आहे? आम्ही इतके दिवस लिहितोय, आमचे लेखन का गाजत नाही? आम्हाला प्रसिद्धी का मिळत नाही? हरी नरकेचे का गाजते? कारण वाचक मुर्ख आहेत आणि हरी नरके खोटे लिहितात म्हणून ते गाजते. जे गाजते ते खोटेच असते.

९. हरी नरकेचा हा लेख वाचू नका. तो चीनवर आहे. त्याला सांगा रशियावर लिही. चीन मला आवडतो.


-प्रा. हरी नरके,
२३/६/२०२०

टीप- बाबासाहेबांचे संसदेतले २६ ऑगस्ट १९५४ चे ते भाषण २ तासांचे प्रदीर्घ, अभ्यासपुर्ण आणि द्रष्टे विचार मांडणारे मौलिक भाषण आहे. त्यात जागतिक प्रश्नांवरचे चिंतन आहे. चीन, रशियापासून अगदी पोर्तुगिजांच्या ताब्यातील गोवा, निजामाच्या ताब्यातील विदर्भ  असे अनेक विषय त्यात आहेत. एकुण छापील १३ पानांचा मजकूर आहे. मला एका पानाचा लेख लिहायचा होता. पुस्तक नव्हते लिहायचे.
माझा मुद्दा हा आहे की कोरोना कुठून आला? भारतावर हल्ला कुणी केलाय? चीन. सध्या चर्चेचा मुद्दा कोणता आहे? चीन. म्हणून मी जर चीन, कम्युनिझम आणि बाबासाहेब हा विषय प्रासंगिक विषय निवडलेला आहे. मी त्या लेखात आणखी याच्यावर का लिहिले नाही, त्याच्यावर का लिहिले नाही असले प्रश्न अनावश्यक आहेत - प्रा. हरी नरके

Monday, April 13, 2020

बाबासाहेब आणि चीन - @ प्रा. हरी नरके, भीमजयंती 20/3

आज चीनमुळे जगभर हाहा:कार माजला असताना,या धोकादायक देशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेकवार इशारे दिले होते. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या द्रष्टेपणाचे स्मरण...




साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे,   असा परखड इषारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट निती या विषयावर बोलत होते. पंतप्रधान नेहरू हे बाबासाहेबांचे भाषण काळजीपुर्वक ऎकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.

     आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर पसरवला गेलाय. ह्या वणव्यात सारे जग होरपळून निघत असून चीनच्या चुकीची शिक्षा आज भारतासह सार्‍या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोचवला यावर मतभिन्नता आहे. चीनने सार्‍या जगावर लादलेल्या या जैविक महायुद्धाने सारे जग पोळून निघाले आहे. चीनचे लालभाई सत्ताधिश महत्वाकांक्षी, हुकुमशाहीवृत्तीचे आणि आक्रमक आहेत हे आजवर अनेकदा सिद्ध झालेले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍या लाखो तरूणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीस क्रूरकर्मा आणि रानटी आहेत हे वेगळे सांगायला नको. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनिती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार [ व्हेटोचा अधिकार ] हे सारे बघितले की चीन काहीही करू शकतो यावर विश्वास बसतो. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात. जगातील सगळी प्रगत राष्ट्रं आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनितीपण असू शकते.

     बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा की त्यांनी साडेसहा दशकांपुर्वीच भारताला याबाबत जागे केले होते. " साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नितीमत्ताही नको असते. माओ हा चीनमध्ये ज्याप्रमाणे तिथल्या बौद्धांना अमाणूष वागणूक देत आहे ते पाहाता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधिश आहे, हे उघड दिसते. भारताने चीनबरोबर मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी," असेही ते म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, " साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजार्‍यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला फार महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण ह्याला मान्यता दिलेली असली तरी माओचा पंचशीलावर विश्वास नाही. चिनी राजनितीची २ तत्वे आहेत. एक- त्यांची राजनिती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे त्यांच्या जगात नितीला मुळी जागाच नसते. आजची निती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झालेला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्विकारतात त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे."

       नेहरू सरकारमधील कायदेमंत्रीपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली होती त्यातले एक नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनिती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये. बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते की चीन आणि पाकीस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून खतरा आहे असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकरच खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च  करावा लागतोय याबाबत बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षणनितीमध्ये भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौध्द तिबेटची जी ससेहोलपट केली त्यावर बाबासाहेब सक्त नाराज होते.

    खरं तर चीन आणि भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभलेला आहे. चीनसोबत आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध राहिलेले आहेत. रशियाने दुसर्‍या महायुद्धांनंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नितीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले महाविद्यालयीन उच्च शिक्षण घेताना बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्याकाळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. मात्र पुढीलकाळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्त्या करण्यात आली त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.

१९५४ साली मुंबईत बोलताना आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडीत असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाची १९३६ साली स्थापना केली, त्यावेळी काही कम्युनिष्ठ मित्रांशी त्यांची जवळीक होती. मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२ च्या लोकसभा निवडणूकीत आपली मतं कुजवा पण बाबासाहेबांना पराभूत करा हा डांग्यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला. कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातीप्रश्नावर मात्र मौन बाळगीत असे. स्त्रीप्रश्नही त्यांच्यादृष्टीने अग्रक्रमाचा नव्हताच. या सगळ्या पार्श्वभुमीवर नेपाळच्या काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी बुद्ध की मार्क्स याबाबत जाहीरपणे मार्क्स नाही तर बुद्धच आपला मार्गदाता असल्याचे घोषित केले. मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी आपल्या लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झालेली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला तरी कम्युनिष्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने व भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.

       बाबासाहेबांच्या दृष्टीने देश प्रथम होता. त्यामुळे आपल्या साम्यवादी मित्रांना काय वाटेल त्याची पर्वा ते करीत बसले नाहीत. चीन किंवा रशियामध्ये पाऊस पडला की इकडे छत्र्या उघडणारांचा अपवाद वगळता या चिनी हिंसक आणि हुकुमशाहीवृत्तीच्या नेत्यांच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)


https://epaper.timesgroup.com/Olive/ODN/MaharashtraTimes/PrintPages.aspx?doc=MTMUM/2020/04/14&from=6&to=6&ts=20200413211954&uq=20191018031251