Showing posts with label भांडारकर. Show all posts
Showing posts with label भांडारकर. Show all posts

Saturday, September 5, 2020

राष्ट्रपती असताना राधाकृष्णन यांनी स्वत:चा वाढदिवस "शिक्षकदिन" घोषित केला

 

५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.

ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत व स्वातंत्र्य चळवळीपासून दूर राहिलेले म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता. स्वातंत्र्य चळवळीपासून ते कायम फटकून राहिले.

आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या [उपराष्ट्रपती] पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राधाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.

ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे - तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याच्या नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, 

Repost

Sunday, July 5, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर













डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विद्याव्यासंग आणि भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था : संस्थेकडे जगातला सगळ्यात मोठा प्राचीन हस्तलिखितांचा खजिना- प्रा. हरी नरके

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान  प्राच्यविद्या पंडीत, स्कॉलर आणि बौद्ध साहित्याचे विद्वान संशोधक असल्याने त्यांना सर रा.गो. भांडारकर यांच्याविषयी आदर होता. भांडारकर हे मुंबई विद्यापीठाचे दुसरे भारतीय कुलगुरू होते. ते संस्कृत स्कॉलर, इतिहासकार व बौद्ध साहित्याचे जाणकार होते. थोर बौद्ध विद्वान राहुलजी सांकृत्यायन, धर्मानंदजी कोसंबी यांनी जगभरातून जमवलेले प्राचीन बौद्ध ग्रंथ व हस्तलिखिते यांचा मोठा संग्रह भांडारकर संस्थेकडे आहे. बाबासाहेबांनी भांडारकर संस्थेला भेटी दिलेल्या असून त्यांच्या सह्या संस्थेच्या भेट पुस्तकात आहेत. त्यांच्या भेटीची एक आठवण,        " समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या महत्वाच्या ग्रंथात थोर आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सन्मित्र विजय सुरवाडे यांनी प्रकाशित केलेली आहे. बाबासाहेबांचे निकटवर्ती भास्करराव भोसले यांनी लिहिलेल्या या आठवणीत दोन गोष्टींची नोंद महत्वाची आहे. (१) संशोधनपर लेखनासाठी बाबासाहेब भांडारकर संस्थेच्या दस्तऎवजांचा उपयोग करीत. (२) बाबासाहेबांना या संस्थेच्या कामाबद्दल कौतुक आणि आस्था होती.

भोसले लिहितात, " (बाबासाहेबांची) मोटार भांडारकर रिसर्च इन्स्टीट्यूटमध्ये जात होती. मी लगेच तिकडे मोर्चा वळवला व मोटारीतून डॉ.साहेबांसहीत उतरलेल्या माझ्या मित्रमंडळीत सामील झालो. डॉ. साहेबांना काही जुन्या प्रती चाळावयाच्या होत्या. पैजवन नावाच्या राजाचा उल्लेख कितीवेळा व कोणकोणत्या प्रतीत कोणत्या अर्थाने आला आहे, याचा त्यांना तलास लावावयाचा होता.

ते काम झाल्यावर आम्ही बाबासाहेबांसोबत मोटारीत बसलो. डॉ.साहेब आम्हाला म्हणाले, " पहा, जगाला विसरून हे लोक विद्याव्यासंगात निमग्न आहेत. सर्व्हन्टस ऑफ इंडीया सोसायटीचे लोकही याच प्रकारचे!"


त्यांना (बाबासाहेबांना) ब्राह्मण लोकांतील चांगल्या गुणांबद्दल आदर होता. विरोधकांच्या चांगल्या गुणांबद्दल आदर असणे लोकशाही यशस्वी होण्यासाठी अत्यंत जरूरीचे आहे, असा बाबासाहेबांच्या बोलण्याचा निष्कर्ष भोसले यांनी काढलेला आहे. आमच्या काही मित्रांना भांडारकर संस्थेबद्दल काही  वाजवी कारणांनी अढी आहे. त्यामुळे तिथल्या पाली व संस्कृतमधील प्राचीन बौद्ध साहित्याबद्दल त्यांना माहिती घ्यावीशी वाटत नाही, हे विद्याव्यासंगाला घातक आहे.


रा.गो. भांडारकर हे प्रार्थना समाजाचे होते. ते पुरोगामी होते. त्यांचा जीवन आदर्श संत तुकाराम हा होता. बाबासाहेबांनी बहिष्कृत भारत मध्ये तिनदा भांडारकरांचा गौरव केलेला आहे. पृ.४८, २६२ व ३३८ वर ते उल्लेख तुम्हाला वाचायला मिळतील. बाबासाहेब भांडारकरांना किती मानत होते, ही माहिती घेण्यासाठी आम्ही राज्य शासनातर्फे बाबासाहेबांचे जे साहित्य प्रकाशित केलेले आहे त्यातला " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक" हा मोठ्या आकारातील खंड अवश्य वाचा.


राज्यशासनातर्फे पाच प्रतिनिधी भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळावर नेमले जातात. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना डॉ. आ. ह. साळुंखे, मुस्लीम समाजातील संस्कृत विद्वान गुलाम दस्तगीर, डॉ. सदानंद मोरे, सुचेता धडफळे व मला शासनाने या संस्थेवर नेमले. " आंबेडकर आणि मार्क्स " या महाग्रंथाचे लेखक, सगळ्या डाव्यांचे महागुरू आणि माझे मार्गदर्शक डॉ. रावसाहेब कसबे यांनी या संस्थेच्या अधिकार मंडळावर अनेक वर्षे काम केलेले आहे.


या संस्थेच्या पदाधिकार्‍यांना संस्थेकडुन मानधन म्हणुन कोणतीही रक्कम दिली जात नाही. मी काही वर्षे भांडारकरचा उपाध्यक्ष होतो तरी मला भांडारकरकडुन एक रुपयाही मिळालेला नाही. आपण संस्थेकडुन माहिती अधिकारात ही माहिती घेऊ शकता.


ज्यांना माझा चेहरा आवडत नाही अशा अतिडाव्या आणि अतिउजव्या दोघांनीही फक्त माझ्या एकट्याच्याच नावाने शंख केलेला आहे. उरलेल्या चार बहुजन विद्वानांच्या भांडारकर संस्थेसोबत काम करण्याबद्द्ल ( जे मलाही आदरणीय आहेत ) संपुर्ण मौन बाळगलेले आहे.


त्याचे एकमेव कारण म्हणजे माझ्याबद्दलचा तीव्र आकस.


साळुंखेसर व  कसबेसरांनी वयाच्या सत्तरीनंतर बहुतेक सर्वच संस्थांवरून निवृत्ती स्विकारली. डॉ. सदानंद मोरे व मी आजही या संस्थेच्या नियामक मंडळावर काम करतो.


आम्हाला विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पात रस आहे. या संस्थेकडे अरबी, अवेस्ता, पाली, जैन महाराष्ट्री, संस्कृत व महाराष्ट्री प्राकृत या भाषांमधली ३० हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. एव्हढी मौलिक आणि प्राचीन हस्तलिखिते जगात दुसर्‍या कोणत्याही संस्थेकडे नाहीत. संस्थेच्या " महाभारत" व "हिंदु धर्माचा इतिहास" या खंडांना जागतिक मान्यता मिळालेली आहे.


ज्यांना धर्मशास्त्र, इतिहास, भाषा, संस्कृती यांच्या अभ्यासाचे मोल कळते ते या संस्थेबद्द्ल अतिशय आदराने बोलतात.


संभाजी महाराजांचा बुधभूषण हा ग्रंथ भांडारकरने सर्वप्रथम १९२६ मध्ये प्रकाशित केलेला आहे, हे माझ्या किती मित्रांना माहित आहे?

ज्यांच्या मनात भांडारकर संस्थेबद्दल काही वाजवी कारणांनी आक्षेप आहेत त्यांनी शांत डोक्याने संस्थेच्या प्राच्यविद्येच्या क्षेत्रातील संशोधनपर कामांची माहिती घ्यावी व आपला गैरसमज दूर करावा असे मी नम्र आवाहन करतो... संस्थेत काम करणार्‍या काही व्यक्तींवर तुमचा राग असू शकतो. पण तिबेट, ब्रह्मदेश, भुतान, श्रीलंका, चीन, जपान अशा देशांमधून धर्मानंद कोसंबी, राहूल सांकृत्यायन यांनी प्रचंड मेहनतीने जमवलेल्या प्राचीन बौद्ध ग्रंथांवर राग ठेवू नका. माझ्या ज्या अल्पशिक्षित मित्रांना प्राचीन बौद्ध साहित्याच्या संशोधनातले फारसे कळत नाही त्यांना मी याबाबत दोष देणार नाही, त्यांचा राग मी समजू शकतो.


-प्रा. हरी नरके, ५/७/२०२०


टीप- जेम्स लेनने राष्ट्रमाता जिजाऊ व राष्ट्रपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची भयंकर बदनामी केलेली असून मी त्या लेखनाचा व लेनचा तीव्र निषेध करतो.


संदर्भासाठी पाहा- १. "समकालीन सहकार्‍यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर", संपादक विजय सुरवाडे, लोकवाड्मय गृह, कॉ. भुपेश गुप्ता भवन, मुंबई, २००३, पृ. १२३/१२४

२. " डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत व मूकनायक", महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९०, पृ.४८/२६२/३३८

Saturday, October 19, 2019

पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर





पाली भाषा व साहित्याचे थोर विद्वान मो. गो. धडफळेसर- प्रा.हरी नरके
४० वर्षांपुर्वी धडफळेसरांची ओळख झाली. त्यांची थोरली मुलगी श्रुती आमच्या दर्पण या ग्रुपमध्ये होती. मंदार आमचा नेता. त्यांच्या दोन्ही मुली श्रुती आणि ऋतावरी ह्या बुद्धीमान आणि गुणी.

तेव्हा हे कुटुंब कसब्यात राहायचे. एकदा त्यांनी आम्हाला सगळ्यांना जेवायला बोलावले. जेवताना धडफळेसर आम्हाला नानाविध किस्से सांगून हसवत होते. इतक्या प्रसन्न आणि खेळकर वातावरणातले ते जेवन ४० वर्षे झाली तरी आजही मला लख्ख आठवते. सर अतिशय व्यासंगी, निर्भीड आणि वाकपटू होते. तेव्हा बोलताना एका सनातनी आणि कर्मठ विचाराच्या संघटनेचा विषय निघाला. धडफळे सर स्वच्छ प्रागतिक असल्याने, ते म्हणाले, " माझे असे प्रामाणिक मत आहे की प्रत्येक लहान मुलाला या संघटनेत पाठवावे."

मी अवाक झालो. आणि सरांनी पुढे षटकार ठोकला. " जी मुलं बुद्धीमान आणि कर्तृत्ववान असतात ती वयात येताच ही संघटना सोडतात. आणि जे वयात येऊनही तिथेच राहतात ते त्याच [सुमार] कुवतीचे असतात." आमच्या ग्रुपमध्ये एकजण तिथे जाणारा होता. तो अगदी गोरामोरा झाला. आजही ह्या संघटनेकडे बुद्धीमान लोकांची वाणवा आहे. आहेत ते बहुतेक सारे आदेशावर चालणारे भक्त.

सर आम्हाला उत्तमोत्तम ग्रंथ वाचायची शिफारस करायचे. घरातली पुस्तकं वाचायला द्यायचे. श्रुती माझी मैत्रिण असल्याने जरी मी धडफळे कुटुंबाशी जोडला गेलो होतो तरी माझी सरांशी खास गट्टी जमलेली होती. आमच्या ग्रुपमध्ये अनेकजण होते. त्यांच्या सर्वांच्या घरी मी जायचो. पण त्या मित्रमैत्रिणींच्या वडीलांशी एव्हढी दोस्ती जमली नाही. जशी आणि जितकी धडफळेसरांशी जमली होती. त्यांच्याशी मैत्र जडले त्याचं कारण सरांचा दिलखुलास, उमदा आणि हजरजबाबी स्वभाव.

१० ऑगस्ट १९३७ साली जन्म झालेल्या धडफळे यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर अध्यापनाचे कार्य हाती घेतले. प्राचीन भाषा आणि विशेषतः पाली भाषेचा त्यांचा गाढा अभ्यास होता. दिवंगत संशोधक लेखक धर्मानंद कोसंबी यांच्यानंतर पाली आणि बौद्ध संस्कृतीवर संशोधन करून लेखन करणारे मो. गो. धडफळे एकमेव मानले जातात. त्यांचा महाभारतावरही गाढा अभ्यास होता.

प्रदीर्घ काळ भाषासंशोधनामध्ये काम करत असताना धडफळे यांना देशातील, परदेशातील अनेक संस्था, विद्यापीठांनी सन्मानीत केले. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांनी प्राचीन भाषांवर व्याख्याने दिली. त्यांच्या नावावर सात प्रबंध आणि असंख्य शोधनिबंध आहेत. त्यांच्या परदेशातील व्याख्यानांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता. भाषेमध्ये संशोधन करणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या हातून घडले. ते देशविदेशात संशोधनाचे कार्य करत आहेत.

त्यांची कथनशैली लख्ख चित्रशैली होती. ते विद्वान असूनही अतिशय सोपं बोलत. त्यामुळेच ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. विद्वानांना विनोदाचे वावडे असते. धडफळेसरांची मात्र विनोदावर हुकुमत होती.
त्यामुळेच त्यांची जशी लक्ष्मणशास्त्री जोशींशी मैत्री होती तितकीच घट्ट मैत्री पु. ल. देशपांडे यांच्याशी होती.
श्रुती-मंदारच्या लग्नाल त्यामुळे हे दोघेही घरचे कार्य समजून आवर्जून उपस्थित राहिलेले होते.

मी प्राध्यापक व्हावे ही सरांचीच इच्छा. बहुजनांबद्दल सरांना विशेष आत्मियता होती. सरांनी मला भांडारकर संस्थेशी जोडले. प्रा. आ.ह.साळुंखे, सदानंद मोरे आणि माझी राज्य सरकारने भांडारकर संस्थेवर नियुक्ती केली. तेव्हा धडफळेसर बोरीचे मानद सचिव होते. सरांनी या संस्थेला उर्जितावस्था प्राप्त करून दिली. अनेक वर्षे त्यांनी या संस्थेच्या कार्याला वाहून घेतले. धडफळे-भाटे वाद गाजले. ते लढवय्ये असल्याने कोणालाही वादात ओढायला ते घाबरत नसत.

ते फर्ग्युसन महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि डेक्कन एज्युकेशन संस्थेचे सेक्रेटरीही होते.
त्यांची " पाली भाषेतील बौद्धसंत साहित्य" आणि इतर पुस्तकं, विद्वत्ता, संशोधन आणि मौलिकता यांचा मानदंड ठरावीत.

भांडारकरमध्ये त्यांच्यासोबत काम करता आले, त्यांच्याकडून संशोधनाची शिस्त, व्यासंग आणि निकोप-निरामय संशोधनवृत्ती यांचे धडे घेता आले.

अभिजात मराठीबाबत मी रंगनाथ पठारेसरांना घेऊन त्यांच्या घरी भेटायला गेलो होतो. तेव्हा सर सलग तीनतास आमच्याशी बोलत होते. त्यात शेकडो संदर्भ, युक्तीवाद आणि भाषक प्रवासाचे नमुने होते. वयोपरत्वे अलिकडे ते बोलताना सहजपणे इतर विषयात शिरायचे आणि तिथेही रमायचे. नानाविध विषयांचा ज्ञानकोश म्हणजे धडफळे सर. अतिशय चैतन्यदायी, उर्जादायी विद्वत्ता.

सर बोलायला जसे विनोदी होते तसेच ते कायम निर्भिड आणि टोकदारही होते. भांडारकरच्या एका बैठकीत बोलताबोलता त्यांनी एका भांडकुदळ सदस्याला सणसणीत चपराक लगावली होती. ते म्हणाले, " आपल्या संस्थेचे अध्यक्ष सकाळी जेव्हा फिरायला जातात तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचा कुत्रा आणि आणि *** असतात. [***संबंधित सदस्याचे नाव]

ते सदस्य इतके भडकले की त्यांना बोलताच येईना. धडफळेसर पुढे म्हणाले, " माझे हे म्हणणे खोटे असेल तर मी प्रत्यक्षदर्शींची साक्ष काढतो. काढू का?" ते सद्गृहस्थ निरूत्तर झालेले.

अलिकडेच त्यांनी अभिजात मराठीबाबत एक लेख लिहिला होता. त्यांच्या या बदलत्या भुमिकेबाबत त्यांच्याशी मला चर्चा करायची होती. पण आता ती कशी करणार?

सर, तुम्ही आम्हाला हवे होतात.

विनम्र आदरांजली.

प्रा.हरी नरके, १९ ऑक्टोबर २०१९

Thursday, September 5, 2019

राधाकृष्णन भांडारकरच्या निवडणुकीत पराभूत झाले होते






५ सप्टेंबर हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असल्याने शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो.
ब्रिटीश सरकारचे निष्ठावंत म्हणून त्यांना "सर" हा किताब देण्यात आला होता.
आयुष्यातील बहुतेक सगळा काळ त्यांनी परदेशी विद्यापिठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यात घालवला.

त्यांनी २ टर्म भारताचे उपराष्ट्रपती आणि एक टर्म राष्ट्रपती म्हणूनही काम पाहिले. ते अपक्ष असूनही या पदांवर नियुक्त केले गेले. वेदांतावरचे वलयांकित विचारवंत असल्याने त्यांना हे सन्मान दिले गेले. त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान "भारत रत्न " ही दिला गेलेला आहे.विशेष म्हणजे हा पुरस्कार त्यांना दिला गेला तेव्हा ते तो देणार्‍या पदावर कार्यरत होते. देणाराने स्वत:लाच पुरस्कार घ्यावा हे ग्रेट आहे. राष्ट्रपती हे आपल्या देशात सर्वोच्च पद आहे. त्या पदावर असताना स्वत:चा वाढदिवस शिक्षकदिन म्हणून सुरू करा असा आदेश देणारे सर्वपल्ली राढाकृष्णन मला अतिशय थोर वाटतात. शिक्षणाने / शिक्षकाने बालकांच्या मनावर चारित्र्याचे संस्कार करणे अभिप्रेत असते. डॉ. राधाकृष्णन यांच्या चारित्र्याचे जे वाभाडे त्यांच्याच मुलाने [ थोर विद्वान प्रो.गोपाल यांनी ] काढलेले आहेत ते वाचनीय आहेत.


ज्या अर्थी त्यांची जयंती शिक्षक दिन म्हणून पाळली जाते त्या अर्थी त्यांनी शिक्षक म्हणून काहीतरी असाधारण काम केलेले असणार. तथापि ते काम कोणते याबद्दल मी आजवर असंख्य शिक्षकांना विचारले असता त्याचे नेमके उत्तर एकही शिक्षक देऊ शकला नाही.

त्यांनी शिक्षण क्षेत्राला काहीतरी महत्वाचे योगदान दिलेले असेल या दृष्टीने माहिती घ्यायचा प्रयत्न केला असता परदेशात ते प्राध्यापक होते हेच त्यांचे सर्वात मोठे योगदान असल्याचे सांगितले गेले. त्यांनी शिक्षणशास्त्राला काहीतरी भरिव दिले असेल असे म्हणावे तर ना त्यांनी कोणतीही शिक्षणविषयक थिएरी मांडली ना ते शिक्षणशास्त्राचे शिक्षक, प्राध्यापक होते. ना त्या विषयावर त्यांनी काही लेखन केले.

ते धर्मशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे लेखन वेदांतावर आहे. ते उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती होते म्हणून त्यांच्या नावे शिक्षक दिन होत असेल असे म्हणावे तर आजवर डझनावारी लोक या पदांवर बसून गेलेत.

भारतविद्या, प्राचीन विद्या, धर्मशास्त्र, संशोधन या विषयातील सर्वोच्च काम असलेल्या भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेच्या निवडणुकीला ते उभे होते, तेव्हा मात्र त्यांचा दणदणीत पराभव झालेला होता. संस्थेच्या विद्वान मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले होते. विशेष म्हणजे तेव्हा ते देशाचे उपराष्ट्रपती होते आणि तरिही भांडारकरच्या निवडणुकीत ते हारले होते. उपराष्ट्रपती या पदावर असताना एका संस्थेच्या निवडणुकीत पराभूत होण्याचा विक्रम त्यांच्या एकट्याचाच नावे जमा आहे.

ज्या अर्थी त्यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो त्या अर्थी त्यांचे शिक्षक म्हणून देशाला काहीतरी अभुतपुर्व योगदान असणारच. ते नेमके कोणते यावर कोणी प्रकाश टाकील काय?

-प्रा. हरी नरके, ५ सप्टेंबर २०१९

Saturday, September 15, 2018

बुद्धीझम व पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान-धम्मानंद कोसंबी









आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

त्यांचा जन्म गोव्यात झाला. त्यांना पाली भाषा शिकायची होती. भगवान बुद्धाला भेटायचं होतं. लहान वयात लग्न झालं. पहिल्या मुलीचा जन्म झाला आणि ते घरातून पळाले.
ज्ञानाच्या-बुद्धाच्या,पाली भाषेच्या शोधात.

वाराणसीला जाऊन हालअपेष्ठा सोशित गंगेच्या घाटावर राहून धर्मशाळेत जेवत पंडीतांकडून संस्कृत शिकले.


त्यावेळी संपुर्ण भारतात पाली शिकवणारा एकही विद्वान नव्हता. केवळ त्यासाठी ते नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेशला गेले. तिथल्या धर्मगुरूंकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

ते श्रामनेर बनले. पुढे बौद्ध भिक्कू बनले. त्यानंतर आचार्य, स्थविर आणि महास्थविर बनले. ते बुद्धीझम आणि पालीचे पहिले आधुनिक भारतीय विद्वान ठरले. उमेदीच्या वयातली अनेक वर्षे त्यांनी बुद्धाच्या आणि पालीच्या शिक्षणात घालवली. आयुष्यातली ५० वर्षे त्यांनी बुद्धीझमला वाहिली.


लुंबिनीवनात ज्या ठिकाणी तथागतांचा जन्म झाला, तिथला सम्राट अशोकाने लावलेला शिलालेख वाचताना ते घळाघळा रडले. संपुर्ण बुद्धमय झाले. बुद्धगया, सारनाथ, कुशीनगरला रानावनात राहून त्यांनी बुद्धीझमची साधना केली.

त्यांच्या बौद्ध गुरूंनी त्यांना नाव दिले धम्मानंद. ते बंगाली, गुजराती, सिंहली, ब्राह्मी, नेपाळी, मराठी, हिंदी, कोकणी, पाली, अर्धमागधी, संस्कृत, इंग्रजी, रशियन अशा अनेक भाषांचे तज्ज्ञ होते.

आचार्य धर्मानंद कोसंबी, जन्म ९ आक्टोबर १८७६, निधन- २४ जून १९४७.

ते कलकत्याच्या नॅशनल कॉंलेजात पाली व बुद्धीझमचे पहिले भारतीय प्राध्यापक बनले. कलकत्ता आणि मुंबई विद्यापीठांमध्ये त्यांनी पाली विभाग सुरू करायला लावले. त्याकामात त्यांना ख्यातनाम विद्वान सर रा.गो. भांडारकर यांची खूप मदत झाली. या दोन्ही ठिकाणी त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना पाली आणि बुद्धीझम शिकवला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी कमी पगारावर नियुक्ती स्विकारून पालीचे विद्यार्थी घडवले.

मूळ पाली धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास करून पहिले बुद्ध चरित्र त्यांनी लिहिले. त्यांनी आपलं संपुर्ण आयुष्य पाली आणि बुद्धविचारांच्य संशोधनाला वाहिलं.

बड्योद्याला महाराजा सयाजीरावांनी त्यांची पालीसाठी नियुक्ती केली. त्यांनी धम्मावर अनेक ग्रंथ लिहिले. गुजरात विद्यापीठात त्यांनी काम केले.

त्यांच्या व्यासंगाचा आणि ग्रंथांचा विचार करून अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठाने त्यांना अनेकवार निमंत्रित केले. तिथे त्यांनी अनेक वर्षे बौद्ध ग्रंथांवर लेखन-संशोधन केले. दरमहा २५० रूपये पगाराची प्राध्यापकाची सन्मानाची नोकरी सोडून अवघ्या ५० रूपये मानधनावर हा माणूस पाली व बौद्धविचारांचा प्रचार-प्रसार करीत राहिला.

बुद्धाच्या शोधात आयुष्य घालवणार्‍या या विद्वानाने आधुनिक भारतातला पहिला बुद्धविहार मुंबईत उभा केला. या बहुजन विहाराने पुढचा रस्ता घडवला. पी.लक्ष्मीनरसू, अनागरिक धम्मपाल यांचे ते सहकारी.


सयाजीरावांना पाली साहित्याची त्यांनी गोडी लावली. मराठीतले पहिलेवहिले सगळे बौद्ध साहित्य आचार्य धम्मानंद, सर भांडारकर आणि महाराजा सयाजीराव या तिघांच्या प्रयत्नातून तयार झाले. त्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला पालीची गोडी लावली. पुढे या कार्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे, चलो बुद्ध की ओर असा नारा देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे स्नेही आणि सहकारी होते.

जागतिक किर्तीचे इतिहासकार, गणिती आणि शास्त्रज्ञ दामोदर तथा डी.डी.कोसंबी हे त्यांचे पुत्र होत.

आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे समग्र साहित्य खालील लिंकवर उपलब्ध आहे.
http://dharmanandkosambi.com/

-प्रा.हरी नरके, १५ सप्टेंबर, २०१८

Wednesday, September 5, 2018

आणि उपराष्ट्रपती पुण्याच्या संस्थेच्या निवडणूकीत पराभूत झाले -


प्रा. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे उपराष्ट्रपती असताना पुण्यातल्या एका संशोधन संस्थेच्या निवडणुकीला उभे होते.
ते निवडणुकीत चक्क पराभूत झाले.
त्यांना फार मोठा धक्का बसला.

एका आंतरराष्ट्रीय सेमिनारच्या निमित्ताने त्यांनी संस्थेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना दिल्लीला निमंत्रित केले.

रात्री उपराष्ट्रपती बंगल्यावर स्वागत समारंभाचे आयोजन करून सर्व उपस्थितांना भोजनाला बोलावले.

जेवन झाल्यावर अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी संस्थेच्या पदाधिकार्‍यांकडे निवडणुकीतील पराभवाचा विषय काढला.

पदाधिकारी म्हणाले, "तुमच्याबद्दल आम्हाला आदर आहे. परंतु तुम्ही देशाचे उपराष्ट्रपती आहात. राज्यसभेच्या कामांमध्ये व्यस्त असाल. तुम्ही आमच्या संस्थेला वेळ देऊ शकणार नाही. आम्हाला संस्थेच्या कामांसाठी पूर्णवेळ देणारा पदाधिकारी हवाय.

तुम्ही निवृत्त झाल्यावर अवश्य पुन्हा निवडणूक लढवा. आम्ही तुम्हाला बहुमताने निवडून देऊ. मात्र तेव्हा तुम्ही संस्थेला तुमचा वेळ द्यायला हवा."

उपराष्ट्रपतींना हे खडे बोल सुनावणारे ते पदाधिकारी सत्शील होते. जागतिक किर्तीचे महान संशोधक होते. त्यांचा नैतिक दबदबा एव्हढा होता की दस्तूरखुद्द उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनासुद्धा त्यांचे म्हणणे मान्यच करावे लागले.

-प्रा.हरी नरके, ५ सप्टेंबर २०१८

Friday, July 6, 2018

सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर- समाजसुधारक आणि प्राच्य विद्येचे महान पंडीत


सर रामकृष्ण भांडारकरांचा जन्म मालवणला 6 जुलै 1837 ला झाला.
1862 साली मुंबई विद्यापीठातून पहिली तुकडी पदवीधर झाली. त्यात न्या.रानडे आणि रा.गो. भांडारकर होते.
त्यांनी जर्मनीमधील गोटीन्जेन विद्यापीठातून 1885 ला पीएच.डी. पदवी प्राप्त केली.

मुंबईच्या एल्फिन्स्टन आणि पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते.
ते महिला शिक्षण, विधवांचे पुनर्विवाह, जातीनिर्मुलन यांचे पुरस्कर्ते होते.
त्यांनी 1917 साली मुंबईतील समता परिषदेत आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार केला होता.
ते पुण्याच्या हुजुरपागा शाळेचे संस्थापक होत.

ब्रिटीश सरकारने शिक्षणतज्ञ म्हणून त्यांची 1903 साली ब्रिटीश भारताच्या कौन्सिलवर निेयुक्ती केली होती. त्यांच्यासोबत गो.कृ.गोखले यांचीही नियुक्ती झालेली होती.
ते परम हंस सभा आणि प्रार्थना समाजाचे क्रियाशील पदाधिकारी होते. केशवचंद्र सेन, न्या.रानडे, महर्षि कर्वे, महर्षि वि.रा.शिंदे यांच्यासमवेत ते समाज सुधारणा चळवळीत आयुष्यभर क्रियाशील राहिले. परम हंस सभेचे अध्यक्ष आणि भांडारकरांचे निकटवर्ती रामचंद्र बाळकृष्ण राणे यांना महात्मा फुले यांनी आपला शिवाजी राजांचा पोवाडा अर्पण केलेला होता.
संत तुकाराम यांना ते आपला आदर्श मानत.

दख्खनचे इतिहासकार व संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी केलेले योगदान बहुमुल्य ठरलेले आहे. 1917 साली ब्रिटीश सरकारने त्यांना सर हा किताब बहाल केला.
ते प्राच्य विद्येचे जागतिक किर्तीचे महान पंडीत होते. त्यांच्या 80 व्या वाढदिवशी 1917 मध्ये त्यांच्या विद्यार्थी आणि चाहते यांनी पुण्यात भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेची स्थापना केली.

या संस्थेत पाली, संस्कृत, अरेबिक, अवेस्ता, प्राकृत आदी भाषांमधील 30 हजार प्राचीन हस्तलिखिते आहेत. या संस्थेने प्रसिद्ध केलेले छत्रपती संभाजी राजे लिखित बुधभूषण,[1927] भारत रत्न पां.वा. काणे यांचा धर्मशास्त्राचा इतिहास, [1964] आणि पाच पिढ्यांनी 55 वर्षे मौलिक संशोधन करून प्रकाशित केलेली 19 खंडातील महाभारताची चिकित्सक आवृत्ती जगप्रसिद्ध आहेत.

महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या संस्थेला अनेकदा भेटी देऊन संस्थेच्या संशोधनपर कार्याचा जाहीरपणे गौरव केलेला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत मध्ये सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा संत तुकाराम, संत कबीर, महात्मा फुले यांच्या मालिकेतील महान संत असा तीन वेळा गौरव केलेला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भांडारकर संस्थेत अनेक भाषणे दिलेली आहेत.
या संस्थेच्या नियामक मंडळावर महान पंडीत डॉ. आ.ह.साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. सदानंद मोरे आदींनी अनेक वर्षे काम केलेले आहे.
-प्रा.हरी नरके
...........................