Showing posts with label आत्मचरित्र. Show all posts
Showing posts with label आत्मचरित्र. Show all posts

Monday, March 23, 2020

संग्रही असलेली, एकदा वा अनेकदा वाचलेली काही आवडती पुस्तकं



१. लिळाचरित्र, चक्रधर स्वामी २. तुकाराम गाथा, संत तुकाराम, ३. धग, उद्धव शेळके, ४. संत वाड्मयाची सामाजिक फलश्रुती, गं. बा. सरदार, ५. कोसला, डॉ. भालचंद्र नेमाडे, ६. राधामाधवविलासचंपू, संपादक वि.का. राजवाडे, ७. मृत्युंजय, शिवाजी सावंत, ८. गाथा सप्तसती, ९. श्यामची आई, साने गुरूजी, १०. मनुस्मृती : काही विचार, नरहर कुरूंदकर, ११. स्मृतीचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, १२. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, वि.का.राजवाडे, १३. पोटमारा, रवीन्द्र पांढरे, १४. जागर, नरहर कुरूंदकर, १५. रामनगरी, राम नगरकर, १६. युगांत, इरावती कर्वे, १७. बलुतं, दया पवार, १८. गावगाडा, त्रिं. ना. आत्रे, १९. आठवणीचे पक्षी, प्र. ई. सोनकांबळे, २०. भाऊसाहेबांची बखर,

२१. एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर, २२. रणांगण, विश्राम बेडेकर, २३. वैर्‍याची एक रात्र, व्होल्गा ल्येंगेल, अनु. जी. ए. कुलकर्णी,  २४. एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर, २५. आणि माणसाचा मुडदा पडला, रामानंद सागर, २६. बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर, २७. माझा प्रवास, वरसईकर गोडसे, २८. झाडाझडती, विश्वास पाटील,  २९. शिवाजी जीवन रहस्य, नरहर कुरूंदकर, ३०. शाळा, मिलिंद बोकील, ३१. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे, ३२. सती, प्रविण पाटकर, ३३. विद्रोही तुकाराम, डॉ. आ.ह. साळुंखे,  ३४. रारंग ढांग, प्रभाकर पेंढारकर, ३५. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, डॉ. आ.ह. साळुंखे,   ३६. हंस अकेला, मेघना पेठे,  ३७. बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३८. मुंबई दिनांक, अरूण साधू, ३९. फकीरा, अण्णाभाऊ साठे, ४०. जातीसंस्थेचे निर्मुलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

४१. गोलपीठा, नामदेव ढसाळ, ४२. सिंहासन, अरूण साधू, ४३. शतकाचा संधीकाल, दिलीप चित्रे, ४४. नागीण, चारूता सागर, ४५. श्री विठ्ठल : एक महासमन्वय, डॉ. रा.चिं. ढेरे, ४६. ताम्रपट, रंगनाथ पठारे, ४७. शेतकर्‍याचा असूड, महात्मा जोतीराव फुले, ४८. सात पाटील कुलवृत्तांत, रंगनाथ पठारे, ४९. सेकंड सेक्स, सिमॉन दि बोव्हा, ५०. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, जयंत पवार, ५१. अक्षरनिष्ठांची मांदियळी, डॉ. अरूण टिकेकर, ५२. इडापिडा टळो, आसाराम लोमटे, ५३. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आनंद विंगकर, ५४. गुलामगिरी, महात्मा जोतीराव फुले, ५५. भिजकी वही, अरूण कोलटकर, ५६. वासुनाका, भाऊ पाध्ये, ५७. लांबा उगवे आगरी, डॉ. म.सु.पाटील, ५८. झोत, डॉ. रावसाहेब कसबे, ५९. पिंगळावेळ, जी.ए.कुलकर्णी, ६०. प्रकाशाची सावली, दिनकर जोषी,

६१. तमस, भीष्म सहानी, ६२. तुघलक, गिरिश कार्नाड, ६३. घासीराम कोतवाल, विजय तेंडुलकर, ६४. वाडा चिरेबंदी, महेश एलकुंचवार, ६५. शांतता कोर्ट चालू आहे, विजय तेंडुलकर, ६६. चक्र, जयवंत दळवी, ६७. बळी, मालती बेडेकर, ६८. मेटकॉफ हाऊस ते राजभवन, राम प्रधान, ६९. मर्ढेकरांची कविता, बा.सी. मर्ढेकर, ७०. शतपत्रे, लोकहितवादी, ७१. आहे मनोहर तरी, सुनिता देशपांडे, ७२. व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे, ७३. बदलता भारत, भानू काळे, ७४. हमरस्ता नाकारताना, सरिता आवाड, ७५. लेखकाची गोष्ट, विश्राम गुप्ते, ७६. शोध, मुरलीधर खैरनार, ७७. माणसं, डॉ. अनिल अवचट, ७८. जेव्हा मी जात चोरली होती, बाबुराव बागूल, ७९. स्त्रीपुरूष तुलना, ताराबाई शिंदे, ८०. प्राचीन महाराष्ट्र, डॉ. श्री.व्यं. केतकर,

८१. मी कसा झालो, आचार्य अत्रे, ८२. माणसं आरभाट आणि चिल्लर, जी. ए. कुलकर्णी, ८३. प्रतिस्पर्धी, किरण नगरकर, ८४. बियॉण्ड दि लाईन्स, कुलदीप नय्यर, ८५. अजुनि वाढताती झाडे, रस्किन बॉण्ड, ८६. मैला आंचल, फनिश्वरनाथ रेणू, ८७. राग दरबारी, श्रीलाल शुक्ल, ८८. आत्मरंगी. रस्किन बॉण्ड, ८९. गोदान, प्रेमचंद, ९०. चालत दुरूनी आलो मागे, राजेंद्र यादव, ९१. तिरिछ, उदय प्रकाश, ९२. सेपियन्स, युवाल नोवा हरारी, ९३. माणूस, मनोहर तल्हार, ९४. रंग माझा वेगळा, सुरेश भट, ९५. आठवले तसे, दुर्गा भागवत, ९६. घातचक्र- अरूण गद्रे, ९७. क्लोरोफॉर्म, डॉ. अरूण लिमये, ९८. समग्र विंदा, विंदा करंदीकर, ९९. एक कहाणी अशीही, मन्नू भंडारी, १००. ओअ‍ॅसिशच्या शोधात, फादर फ्रान्सीस दिब्रिटो,

१०१. नचिकेताचे उपाख्यान, संजय भास्कर जोशी, १०२. चिरदाह, भारत सासणे, १०३. पण लक्षात कोण घेतो? हरी नारायण आपटे, १०४. बिढार, जरीला, झूल, हूल, हिंदू , डॉ. भालचंद्र नेमाडे, १०९. भुमी, सेतू, आशा बगे, १११. होमो डेअस, युवाल नोवा हरारी, ११२. एका कोळीयाने, पु. ल. देशपांडे, ११३. हसरे दु:ख, भा. द. खेर, ११४. उदकाचिये आर्ती, मिलिंद बोकील, ११५. वारूळ, बाबाराव मुसळे, ११६. शुभ्र काही जीवघेणे, अंबरिश मिश्र, ११७. शोध राजीव हत्त्येचा, डी. कार्तिकेयन, ११८. फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट, डॉमनिक लॅपिए, ११९. मुकज्जी, शिवराम कारंत, १२०. कर्वालो, के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र, १२१. खेळता खेळता आयुष्य, गिरीश कार्नाड, १२२. संवादु अनुवादू, उमा कुलकर्णी. १२३. सिटी ऑफ जॉय, डॉमनिक लॅपिए, १२४. महात्मा फुले : पंढरीनाथ सीताराम पाटील, १२५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, १२६. आसूरवेद, आणि पानिपत, संजय सोनवणी, १२८. रस अनौरस, राजन खान, १२९. मोराची बायको, किरण येले, १३०. निळ्या डोळ्याची मुलगी, शिल्पा कांबळे,
१३१. वेटींग फॉर व्हीजा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १३२. धर्मशास्त्राचा इतिहास, पा.वां.काणे, अनु. यशवंत आबाजी भट, 
तुम्ही यातली किती वाचली आहेत?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च, २०२०


*** टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. माझ्या संग्रही चाळीस हजार पुस्तकं आहेत. मी अनेक ग्रंथालयांचा सदस्य आहे. माझ्या मित्रांचाही समृद्ध ग्रंथसंग्रह आहे. त्यातून मी वाचलेल्या पुस्तकातली मला आवडलेली एकुण पुस्तकं किमान एक हजार तरी भरतील. मला आवडलेली असूनसुद्धा जागेअभावी किमान ८६८ पुस्तकं या यादीत आलेली नाहीत. जी पुस्तकं या यादीत आलेली नाहीत त्यांच्या कर्त्यांनी लगेच नाराज होऊन हेत्वारोप करू नयेत. किंवा यादीत नाहीत याचा अर्थ ती पुस्तकं मी वाचलेलीच नाहीत असाही अर्थ लावू नये. एखादा पुरस्कार मिळाला म्हणून ते पुस्तक मला आवडलेच पाहिजे असा आग्रह कशासाठी?

काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा

१. " डागतर, पईले दावलो तवा फकस्त पू येऊलालाता, आता वास घान मारूलालाय." पेशंट तक्रार करीत होता.
कान तपासला. त्यानं कानात ठेवलेला कापसाचा बोळा काढला. बघतो तर आत दुसरा बोळा. तो काढला तर काय आत तिसरा बोळा. एकुण सात बोळे काढले. त्यानं ठोकून ठोकून सातसात बोळे कोंबल्यामुळे दुर्गंधी येत होती. मी चिडलो. हा काय मुर्खपणा आहे? तर तो म्हणाला," सायब, तुमीच मनलो व्हतो की आंगोळीच्या टायमाला कानात कापसाचा बोळा ठिवा मनून, म्हनुन ठिवलो. आंगोळ जाल्यावर काडा मनलो अस्तो तर काडलो अस्तो बगा. माजी काय चूक?" मी कपाळाला हात लावला. कानात ठेवलेला बोळा आंघोळीनंतर काढा असं मी कुठं सांगितलं होतं हा त्याचा प्रश्न बिनतोड होता.

२. एका पेशंटनं मला बुचकळ्यात टाकलं. " डागतर, तुमी गोळ्या तर दिलाव, पन जिरंना गेल्यात. अप्पूट जाईनाबी गेलीय. आन जिरंनाबी गेलीय. काय उपेग?" सखोल विचारपूस केल्यावर कळलं, तो काय म्हणतोय ते. त्याचं म्हणणं गोळी कानात जात नाहीये. दोन तुकडे करून घातली तरी ती कानात जिरत नाहीये.
तुम्हाला गोळी कानात घालायला कोणी सांगितलं? अहो ती तोंडातून घ्यायची गोळी आहे.
कानात घालायच्या ड्रॉपच्या खाली गोळ्या लिहिल्याने त्यानं गोळी पण कानात घालायचीय असा समज करून घेतलेला.

३. शाखेत जाणारा मित्र सांगत होता, त्याला एक दिवस आदेश मिळाला, "लोहगाव विमानतळावर जायचें. तिथे दिल्लीवरून *** *** **** येतील. त्यांना घेऊन शाखेवर यायचें.
आणि हो, काही कारणानें ते आले नाहीत तर तू मात्र परत यायचें हो, काय समजलें?"
सुचना कशा फुलप्रूफ हव्यात.

फटाके, ढोल, महाआरत्या, वाजतगाजत मिरवणुका, शेकडोंनी एकत्र जमून केलेला जल्लोश, हे बघितलं की हा देश किती महान लोकांचा आहे त्याचे दर्शन होते.
जे सर्वांचे होणार तेच आपल्याही वाट्याला येणार. कारण आपण सारे एकाच हवेत श्वास घेतो. सर्वांची नियती एकच.

वाजवा म्हणताना वाजवून झालं की थांबा असंही सांगायला लागतंय, हे अनुभवी लोक कसे काय विसरले? की त्यांनाही हेच हवं होतं?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च २०२०

१ व २ चा संदर्भ- डॉ. संजय कुलकर्णी, कुलकर्ण्याचा दवाखाना, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१९,

Tuesday, August 13, 2019

’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर







’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर -प्रा.हरी नरके

विश्राम बेडेकर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा मी पुणे विद्यापीठात मराठी विभागात एम.ए.करीत होतो. त्यांचा त्यानिमित्त विभागातर्फे सत्कार करावा आणि त्यांचे भाषण ठेवावे असे आम्ही ठरवले. विभागप्रमुखांची रितसर परवानगी घेऊन मी बेडेकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. कार्यक्रम निश्चित केला.
ते आले. सत्कार घेतला,पण म्हणाले, " मी भाषण करीत नाही. आपण गप्पा मारू."
मग मी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

प्रश्न- तुम्ही रणांगणसारखी श्रेष्ठ कादंबरी लिहिलीत. आणि पुढे मात्र २०-२५ वर्षे काहीच लिहिले नाही, हे कसे?

उत्तर- मी रणांगण लिहिल्यानंतर पहिली २०-२५ वर्षे ती बरी आहे असं मला कोणीही सांगितलं नाही. म्हणून मग पु्ढे मी काहीही लिहिलं नाही. २५ वर्षांनी एक समीक्षक  म्हणाले,"तुम्ही बरं लिहिलंय, मग मी पुन्हा लिहू लागलो."

प्रश्न- "तुमच्या आत्मचरित्रात { एक झाड आणि दोन पक्षी} सगळा भवताल चित्रशैलीत येतो. पण १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल तुम्ही फारसे काही लिहित नाही, असे का?"

उत्तर-" आम्ही भित्रे मध्यमवर्गीय लोक. घराची दारं-खिडक्या लावून बसलेलो होतो त्यावेळी. मी काही बघितलेच नाही मग कसे लिहिणार १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल?"
[ बेडेकरांनी "भित्रे" या शब्दाऎवजी अतिशय कडक शब्द वापरला होता. स्वत:बद्दल इतके प्रांजळ, पारदर्शक बोलायला लागणारे धाडस त्यांच्याकडे होते.]

बेडेकरांची रणांगण पहिली २०-२५ वर्षे का गाजली नाही? तर दुसर्‍या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी लोखंडी खाटा पुरवणार्‍या एका साहित्यप्रेमी कंत्राटदाराने पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती खरेदी केल्या. प्रत्येक खाटेमागे जखमी सैनिकांना वाचायला एक प्रत भेट म्हणुन मिल्ट्री हॉस्पीटलला दिल्या. फार कमी प्रती चोखंदळ वाचक समीक्षक यांच्या हाती पडल्या. परिणामी पहिली २०-२५ वर्षे पुस्तक जाणकारांपर्यंत पोचलेच नाही.

[मुलाखतीमधून]

- प्रा.हरी नरके, १३ ऑगष्ट २०१९