Showing posts with label इतिहास. Show all posts
Showing posts with label इतिहास. Show all posts

Sunday, July 18, 2021

माणूस श्रेष्ठ की सिंह?


एकदा एक शिकारी आणि जखमी सिंह यांच्यात वाद चालू होता. माणूस म्हणे आम्ही श्रेष्ठ तर सिंह म्हणे सिंह श्रेष्ठ. वाद काही मिटेना. तेव्हा माणसाने सिंहाला एक प्राचीन शिल्प दाखवले,ज्यात माणसाने सिंहाला बाणाने मारलेले दाखवले होते. ते दाखवून माणूस म्हणाला,आता तरी पटले का की माणूस श्रेष्ठ असतो ते? सिंह म्हणाला नाही. या शिल्पात असे कोरलेय कारण हे शिल्प माणसाने तयार केलेय,सिंहाने नाही. दुसरी गोष्ट माणसाने नाही मारले,बाण हे शस्त्र माणसाकडे आहे, त्याने मारलंय. तर मित्रांनो, आजचे शस्त्र ज्ञान हे आहे.इतिहासात आपण कायम पराभूत का दाखवले गेलो,आपण मानसिक,धार्मिक,आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक गुलाम का राहिलो? याचा शोध घ्या... प्रगती करा..

प्रा. हरी नरके,
१८/७/२०२१

Tuesday, January 12, 2021

शहाजी राजे, राजवाडे, अभेद आणि अभ्यंकर- प्रा. हरी नरके

 




शहाजीराजे भोसले हे स्वराज्य संकल्पक होते अशी मांडणी इतिहासाचार्य राजवाड्यांनी १०० वर्षांपुर्वी केली. जयराम पिंडे या समकालीन कवीने शहाजीमहाराजांचे चरित्र लिहिलेले होते. त्याला राजवाड्यांनी अतिशय अभ्यासपुर्ण प्रस्तावना लिहिली. राजवाड्यांशी वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांच्या अभ्यासापुढे नतमस्तक व्हावे लागते. सारे आयुष्य त्यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या संशोधनात घालवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्या पिढीतील किती लोक इतिहास संशोधनाला वाहून घेणार आहेत? जयरामच्या पुस्तकाचे नाव आहे, "राधामाधवविलासचंपू" पुस्तक अवघे ७६ पृष्ठांचे आहे. राजवाड्यांची मौलिक प्रस्तावना मात्र त्याच्या तिप्पट म्हणजे २०१ पृष्ठांची आहे. अफाट आणि दणकट काम. शहाजीराजांच्या पदरी असलेल्या ७० गुणी व प्रतिभावंत सल्लागारांची माहिती राजवाड्यांनी या प्रस्तावनेत दिलेली आहे. त्यांच्या सल्ल्यामुळे राजांना ही स्वराज्यसंकल्पना सुचली असावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. 


यातील २७ क्रमांकावर गंगाधर अभेद यांची माहिती देताना राजवाड्यांनी कमाल केलेली आहे. राजवाडे भाषाशास्त्रज्ञ होते तरीही त्यांनी दिलेली ही व्युत्पत्ती विनोदीच म्हटली पाहिजे.

राजवाडे लिहितात, "अभेद गंगाधर- एकोजीरजा संभाजी राजाच्या मरणोत्तर युवराज झाला, त्याचा अमात्य. ह्याचे आडनाव अभेद. अभेद म्हणजे अभयद. अभयद म्हणजे अभयंकर. अभ्यंकर हे आडनाव चित्पावन दिसते." (पृ.२२) अभेद आणि अभ्यंकर यांचा संबंध नाही हे राजवाड्यांना नक्कीच माहित होते. तरिही शहाजींच्या दरबारात चित्पावन सल्लागार होते हे दाखवण्यासाठीचा हा अट्टाहास होता का? स्वराज्यसंकल्पनेच्या श्रेयात वाटेकरी कोणकोण होते हे दाखवण्यासाठी ही मोडतोड होती का? असा बादरायणी अभिनिवेश इतिहासलेखनात असावा काय?

राजवाड्यांची ही प्रस्तावना प्रत्येकाने एकदा तरी वाचायलाच हवी.

- प्रा. हरी नरके, १२/०१/२०२१

Tuesday, July 14, 2020

नामांतर आंदोलनातले तुरूंगातले दिवस - प्रा. हरी नरके (भाग २ रा)









माझ्या घरात महात्मा फुले व बाबासाहेबांचे फोटो मी इयत्ता चौथीत होतो तेव्हापासून लावलेले आहेत.


मी इयत्ता सहावीत असताना काढलेला फोटो. हातातले घड्याळ फोटो स्टूडीओतले असून, अंगठा तुटलेली प्लॅस्टीकची चप्पल माझीच आहे. जुन्या बाजारातून बारा आण्याला घेतलेली.सर्वात महत्वाचे हातातले पुस्तक- माझे सर्वाधिक आवडते पुस्तक "महात्मा फुले : समग्र वाड्मय"


इथून मी सुरूवात केली. नरकेवाडी, कासारी, तळेगाव ढमढेरे येथील १९८० च्या काळातील माझं घर आणि गोठा-



मुख्यमंत्री शरद पवार यांनी टाटांशी बोलून मला टेल्कोतून मंत्रालयात वि.का.अ. म्हणुन घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यात मी सम्पादित केलेला अंक-



नामांतर आंदोलनातल्या तुरूंगवासाबद्दल ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब गोरे यांच्या हस्ते सत्कार


ओबीसीत जाऊन काम करा असा मला अनाहूत सल्ला देणार्‍या "मित्रांसाठी खास", हे माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे.


जेव्हा दोनचार सरंजामदार तथाकथित डावे मला रा. स्व. संघाचा हस्तक म्हणुन हिनवत होते, वाळव्यात मला रितसर निमंत्रित करून त्यांच्याच स्टेजवर बोलू देत नव्हते, बाबरी विध्वंसनाला उत्तर म्हणुन तेव्हा मी भाई वैद्य आणि विलास वाघ यांच्यासमवेत सम्पादित केलेला ग्रंथ- धर्मनिरपेक्षता




श्री.छगन भुजबळ, प्रा.ना.स.फरांदे, श्री. मुकुंदराव ठकोजी पाटील, डी.के. माळी  आणि इतर नेत्यांसोबत १९९०



माझा जन्म निरक्षर शेतमजूर-मोलकरीण आईवडीलांच्या पोटी झोपडपट्टीत झाला. कोरेगाव पार्कच्या सध्याच्या फाईव्ह स्टार हॉटेल " वेस्ट इन" च्या शेजारच्या कबरस्थानात वयाच्या पाचव्या वर्षापासून मी नोकरी करीत पुणे मनपाच्या मुंढवा शाळेत शिकलो. माझा पहिल्या महिन्याचा पगार होता रुपये पाच. मी अकरा वर्षांनी जेव्हा ही नोकरी सोडली तेव्हा माझा दरमहा पगार होता साठ रूपये. माझ्या शाळेच्या शेजारी सर्वोदय कॉलनी हा " सेटलमेंट कॅंप" असल्याने माझ्या वर्गात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त मुलं भटक्या-विमुक्तांची होती. राष्ट्र सेवा दल, डॉ. बाबा आढाव यांचे महात्मा फुले समता प्रतिष्ठान, दलित पॅंथर यांच्याशी याच काळात मी जोडला गेलो. त्यामुळेच इतक्या लहान वयात मी नामांतर सत्याग्रहात सामील झालो होतो. निळूभाऊ फुले यांच्या प्रभावामुळे स्वजातीप्रेमापासून दूर राहायचं, आत्मटिका करायची, डिकास्ट व्हायचं, हे वळण अगदी लहान वयापासून पडलं. त्यामुळेच पुढे मी १९८६ साली जातीनिर्मुलनासाठी ठरवून आंतरजातीय विवाह केला. आंतरजातीय विवाहांना सतत प्रोत्साहन दिले. अशी काही लग्नं तर माझ्या घरातच लावली. अशा जोडप्यांना माझ्यापरीने सर्वतोपरी मदत केली.


मार्च १९७९ मध्ये मी सदाशिव पेठेतल्या महाराष्ट्र विद्यालयातून एसएससी परीक्षा पास झालो. त्यानंतर मी एफटिए म्हणून टेल्कोत शिकायला गेलो आणि फुले-आंबेडकरी चळवळीत जास्तच सक्रिय झालो. मोर्चे, निदर्शनं, भाषणं, सभा, संमेलनं, परिषदा यात रमून गेलो. मी महिला, भटके-विमुक्त, अनुसुचित जाती, जमाती, ओबीसी, अल्पसंख्यक चळवळीत काम करत राहिलो. म्हणता म्हणता याला  ४० वर्षे कधी झाली कळलंच नाही. मी " डीकास्ट"  झालोय, जातीबाहेर पडलोय अशाच गोड समजुतीत मी होतो. सामाजिक कामात तुम्ही तुमची जात विसरून गेलात तरी काही "ज्ञानीजन" तुम्हाला तुमची जात विसरू देत नाहीत. ते तोंडाने "जातीनिर्मुलनाची" भाषा करीत पुन्हापुन्हा तुम्हाला तुमच्या जाती-धर्मात ढकलायचा प्रयत्न करीत असतात.


हे लोक मूठभरच असतात. आहेत. त्यांना आपण अपवादात्मक लोक समजू शकतो. ते सर्वच जाती-धर्मात आहेत. एकुण समाजाचा विचार केला तर असे लोक एका लाखामागे एखाददुसरासुद्धा भरणार नाहीत. उरलेला सारा समाज माझ्यावर नितांत प्रेम करतो. जिवाला जीव देतो. त्यामुळे या हाताच्या बोटावर मोजता येतील एव्हढ्या अपवादात्मक लोकांचा राग मी समजून घेऊ शकतो. त्या माझ्या मित्रांचे तीन बारकुलेसे गट पडतात.

१. जे लोक तरूणतुर्क, अगदी नवे आहेत, ते अलिकडेच सोशल मिडीयात आलेले आहेत. त्यांनी माझे फारसे काहीच वाचलेले/ऎकलेले नाही. त्यांनी मी संपादित केलेले बाबासाहेबांचे रायटिंग्ज अ‍ॅण्ड स्पीचेसचे खंड १७ ते २२ बघितलेलेही नाहीत. जे खुद्द बाबासाहेबांचेही वाचत नाहीत त्यांनी माझी इतर पुस्तकं वाचली असण्याची सुतराम शक्यता नाही. एकुण ते मला ओळखतच नाहीत.

२. ज्यांनी मला अनेकदा त्यांच्या कार्यक्रमांना बोलावलं, पण मी त्यांना एकदाही वेळ देऊ शकलो नाही म्हणून ते माझ्यावर नाराज आहेत. गेली ४० वर्षे, वर्षाकाठी मला ५५० ते ६०० निमंत्रणं येतात. त्यातली वेळेअभावी ९० टक्के निमंत्रण मी स्विकारू शकत नाही. मी वर्षाकाठी अवघी ५० ते ५२ निमंत्रणं स्विकारू शकतो. उरलेले नाराज होतात. त्याला माझा नाईलाज आहे.

३. जे लोक मला स्पर्धक समजतात, याला कार्यक्रमला बोलावू नका, आम्हाला बोलवा, असं समाजाला सांगसांगून ते दमलेत. पण समाज त्यांचं ऎकतच नाही. त्यामुळे ते समाजावर संतापून आहेत. माझ्यावर डुख धरून आहेत. असो.

ही सारी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली दु:खी माणसं आहेत. चिडखोर माणसांसारखीच ती वागतात ह्यात आश्चर्यकारक असं काहीही नाही. शिवाय कशीही वागली तरी ती सारीच माझी भावंडं असल्याने मला त्यांचा राग नाही. त्यांना मी सांगू इच्छितो, दोस्तहो, आपण सोबत प्रवासाला सुरूवात केली होती, तुम्ही मागे पडलात हा माझा दोष नाही. तुमचे अपयश हा माझा गुन्हा नाही. तुमची म्हैस भाकड आहे म्हणून माझ्या दुभत्या म्हशीला शिव्या देऊन काय साध्य होणार? तुम्हाला परीक्षेत कधीही सेकंड क्लाससुद्धा मिळवता आला नाही म्हणून तुम्ही माझ्या सुवर्णपदकांवर जळता हे मला माहित आहे. तुमचा माझ्यावरचा जळफळाट मी अगदीच समजू शकतो. पण, मत्सराने प्रगती होत नाही, उलट मन आणि शरीर अधिक रोगट बनत जाते. मला तुमच्याबद्दल अपार कणव आहे. करूणा-मैत्रीभाव आहे. लवकर बरे व्हा भावंडांनो. Get Well Soon..


मी सम्यक सम्बुद्धांच्या मध्यम मार्गाचा प्रवासी आहे. आज जरी ते माझा रागराग करीत असले तरी उद्या तेही माझ्यावर प्रेम करतील असा मला विश्वास आहे. अनित्यता सिद्धांतावर माझा विश्वास आहे. मी माझ्याबाजूने त्यांच्यावर प्रेमच करतो.


माझं पहिलं पुस्तक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक बाळ गांगल यांच्यावर होतं. त्यांच्या महात्मा फुल्यांवरील गलिच्छ टिकेचा २२५ संदर्भांसह सप्रमाण प्रतिवाद करणारं ते पुस्तक आहे. १९८९ च्या मार्चमध्ये ते पु.ल. देशपांडे यांच्या हस्ते चंद्रपूरला प्रकाशित झालं. तेव्हा मी टेल्कोची रात्रपाळी करून विद्यापीठात एम.फिल. करीत होतो. त्यावेळी माझ्या पुस्तकाचे प्रकाशक, नामवंत आंबेडकरवादी बौद्ध विद्वान, सुगावा प्रकाशनाचे प्रा. विलास वाघ, उषाताई वाघ, दया पवार, यशवंत मनोहर, वामन निंबाळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. पु.लं.च्या भाषणाची जादू अशी की पुस्तकाच्या ५०० प्रती या कार्यक्रमातच संपल्या. महिनाभरात तीन हजार प्रतींची आवृत्ती संपली. पुस्तकाला अनेक नामवंत पुरस्कार मिळाले. अनेक मान्यवरांनी त्या पुस्तकावर लिहिले. त्यावर्षीचे ते सर्वाधिक लोकप्रिय व विद्वतमान्य पुस्तक ठरले.


तेव्हापासून आजवर सातत्याने मी संघाचं पोलखोल करणारं सर्वाधिक लेखन केलेलं आहे. अगदी परवा १४ एप्रिल २०२० ला जेव्हा रा.स्व.संघाने बाबासाहेब आमचेच असा दावा केला तेव्हासुद्धा दि प्रिंटमध्ये मी २ लेख लिहून संघाला उत्तर दिलंय. एप्रिल ते मे २०२० मध्ये मी संघाविरूद्ध सुमारे २५ लेख लिहिलेत. आणि संघाच्या बाबतीत संपुर्ण निष्क्रीय असलेले माझे काही मित्र मी संघाचा असल्याची आवई उठवतायत. सामान्य माणसं त्यांच्यावर कसा विश्वास ठेवतील? मग त्यांचा अधिकाधिक चडफडाट, तिळपापड होतो.


मी संघाचा असतो तर वर मोदींचे आणि खाली फडण२० यांचे  सरकार असताना त्यांनी मला
" १. महात्मा फुले ग्रंथ समिती,
२. राज्य मागासवर्ग आयोग,
३. महात्मा फुले अध्यासन,
४. बालभारती,
५. मराठी भाषा सल्लागार समिती,
६. अभिजात मराठी समिती,
या सर्वच शासकीय आस्थापनांवरून काढून का टाकलं असतं?


मी त्यांचा असतो तर उलट मला प्रमोशन, पदोन्नती मिळायला हवी होती.


आणि त्यांचं सरकार असताना मी त्यांचे " दि टाइम्स ऑफ इंडीया, डि.एन.ए, लोकसत्ता, म.टा. लोकमत, सकाळ, पुढारी, बेळगाव त.भा, दिव्य मराठी, आय.बी.एन.लोकमत, ए.बी.पी.माझा, झी २४ तास, दिव्य मराठी, साम टिव्हीवर तसेच माझ्या फेसबुक, ट्विटर, ब्लॉगवर अनेकवार वाभाडे काढले असते का?
तेव्हा तुम्ही कुठे होतात राजेहो? ऎन लढाईच्या वेळी जे कायम झोपी गेलेले असतात, होते, त्यांना जनता आणि जाणते मोजत नसतात.


मी महात्मा फुले समता परिषदेचा संस्थापक सदस्य आणि प्रमुख पदाधिकारी आहे. १९९२ पासून अ. भा. महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून श्री छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली आम्ही देशभर लक्षावधी ओबीसींच्या अनंत चळवळी केल्या. " ओबीसी बजेट,"  "ओबीसी जनगणना" असे प्रश्न आम्ही देशपातळीवर प्रथमच ऎरणीवर आणले. त्यावर सर्वथरात रान उठवले. ओबीसी जनगणनेवरचं माझं पुस्तक दहा वर्षांपुर्वीचं आहे. माझ्या ओबीसी आरक्षण विषयक एका पुस्तकाचे प्रकाशक कॉ. गोविंद पानसरे होते, तर दुसर्‍याचे मकरंद सावे. माझी अनेक पुस्तकं मुंबईला कम्युनिस्टांच्या कॉ. भुपेश गुप्ता भवनमध्ये छापली गेलेली आहेत.


महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आम्ही ओबीसींचे प्रबोधनाचे कार्यक्रम घेतलेत. आजही नियमितपणे घेत असतो. मुंबई, अमरावती, नागपूर, दिल्ली, पाटना, जयपूर, गोवा, हैद्राबाद, हजारीबाग अशा कितीतरी ओबीसी मेळाव्यांना ५ - ५ लाख इतर मागासवर्गीय बांधव उपस्थित होते. ओबीसी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात शंभराहून अधिक शिबिरं घेतलेली आहेत. माझे काही मित्र  "तुम्ही ओबीसीत का काम करीत नाही? तिकडे जा, आमच्याकडे येऊ नका." असा सल्ला मला देत असतात. त्यांच्या या मौलिक सल्ल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांनी माझ्या ब्लॉगला भेट दिली तर त्यांना ओबीसींच्या प्रबोधनाशी संबंधित माझे किमान २०० लेख ब्लॉगवर दिसतील. इंग्रजी पेपर " दि हिंदू " पासून मराठी, हिंदी आणि अन्य भारतीय भाषांमध्ये माझे ओबीसीविषयक लेखन प्रकाशित होत असते. झालेले आहे. माझा ब्लॉग वाचणारांची संख्या आज आठ लाख इतकी आहे.


ओबीसींच्या प्रबोधनावर मी जितके लिहिलेय, लिहितोय, बोललोय, बोलतोय त्यापेक्षा जास्त काम या मित्रांनी केलेले असणार! असे मी समजतो. तेव्हा त्यांचा प्रत्येक सल्ला मला शिरसावंद्य मानयलाच हवा! माझ्या मित्रांनो, तुमचा हा सल्ला मी नक्कीच अंमलात आणीन.


१९८२ च्या या नामांतर तुरूंगवासातले अनुभव अनेक मान्यवरांनी लिहून पुस्तकरुपाने प्रकाशित केलेले आहेत. त्यातल्या बहुतेकांनी माझा उल्लेख ठळकपणे केलेला आहे. युवक क्रांती दलाचे लढाऊ नेते, तुफानी वक्ते आणि संपादक-लेखक कुमार सप्तर्षी यांचे आत्मचरित्र २० वर्षांपुर्वी प्रकाशित झालेय. पुस्तकाचे नाव आहे, "येरवडा विद्यापीठातील दिवस", पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकाच्या आजवर पाच आवृत्या निघालेल्या आहेत. या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ३९० ते ३९२ वर सप्तर्षींसरांनी माझ्यावर भरभरून लिहिलेले आहे.
कुमार सप्तर्षी म्हणतात, " हरी नरके ( तुरूंगात ) सोबत होता. तो वयानं लहान. वागण्यात गोड. बोलण्यात चलाख. त्याची पथारी माझ्याशेजारी. बाळकृष्ण रेणके युक्रांदमधला माझा जुना सहकारी. त्याची पथारी माझ्या दुसर्‍या बाजूला. हरी नरके नंतर रेणक्यांचा जावई झाला. ठाणे तुरूंगामध्ये हरीने सासरा आगाऊ बुक केला. तेव्हा हरी मला कुमारदादा म्हणायचा. गोड शब्दात लडीवाळ बोलायचं, अन उचकवणारे खोचक प्रश्न विचारायचे ही त्याची खाशीयत..." सप्तर्षींनी माझ्याबद्द्ल आणखीही बरंच काही लिहिलंय. ते या पुस्तकातून मुळातूनच वाचण्याजोगं आहे.


तुरूंगांत मला ३ आठवड्यात माझ्या कुटुंबातलं कोणीही भेटायला येणं शक्यच नव्हतं. कारण त्यांचं हातावरचं पोट आणि माझं फुले-आंबेडकरी चळवळीत काम करणं त्यांना आवडतही नसावं... ज्या मुलाला चळवळीची कोणतीही कौटुंबिक पुर्वपरंपरा नव्हती अशा घरातला मी आहे. मी बाय बर्थ/जन्माने नाही तर बाय चॉईस बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरवादी आहे.


कोणाला हे उद्धटपणाचे वाटले तरी हरकत नाही, पण देशाच्या कानाकोपर्‍यात मी ओबीसी, भटके, विमुक्त, अनु. जाती, जमाती, बहुजनांवर जितकी भाषणं केलीत तितकी करणारा माझ्या पिढीतला दुसरा माणूस मला माहित नाही.


ज्या मूठभरांना माझ्याबद्दल तीव्र नफरत, विरोधीभक्ती आहे, माझा वर्षानुवर्षे द्वेश वाटत आलेला आहे, त्यांनी लाखो सामान्य लोक आणि तळमळीचे कार्यकर्ते माझ्यावर का जिवापाड प्रेम करतात, मला पुन्हापुन्हा भाषणाला का बोलावतात? माझी भाषणं का ऎकतात याचा शोध घ्यावा. त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आपोआप मिळून जातील.


ठाण्याच्या तुरूंगात मला प्रथम भेटायला आल्या त्या माझ्या सुहृद डॉ. नीलम गोर्‍हे. नीलमताई गेली अनेक वर्षे शिवसेनेच्या आमदार आहेत. नुकत्याच त्या विधान परिषदेच्या उपाध्यक्षही झाल्या होत्या. त्या उत्तम संघटक आहेत. त्यांचे वक्तृत्व आणि लेखन लक्षणीय असते. त्यांची माझी दोस्ती ४२ वर्षांची आहे.
तुरूंगाच्या लाऊडस्पीकरवरून भेटीची घोषणा झाली,  " हरी नरके, तुमची मुलाखत आली आहे." हे ऎकून मला गंमतच वाटली. मुलाखत आली आहे, कुठल्या पेपरला? मग मी तुरूंगाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच्या भेटीच्या कक्षात गेलो. नीलमताई भेटल्या. खूप जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या. त्याकाळात त्या हडपसरगावात व सातववाडीलाला दवाखाना/क्लिनिक चालवायच्या. मी त्यांचा कार्यकर्ता. पुढे आमची घनिष्ट दोस्ती झाली.
त्यानंतर बरेच मित्र मला ठाणे तुरूंगात भेटायला येत असत. इतकी वर्षे उलटली तरी आजही त्या भेटी ताज्या टवटवीत आहेत.


मी ठाणे जेलमधून पहिलं पत्र लिहिलं ते गारगोटीच्या माझ्या एका ज्येष्ठ प्राध्यापक मित्रांना. त्यांना मी लिहिलं होतं की, "  तुरूंगात मी खूप मजेत आहे. ठाण्याच्या तुरूंगात आमची व्यवस्था एकदम उत्तम आहे. खाण्यापिण्याची व्यवस्था बरी आहे. मुख्य म्हणजे बौद्धिक मेजवानी अपुर्व, दणकट आणि जंक्शान आहे." जेलमध्ये येणारे-जाणारे प्रत्येक पत्र सेंसॉर केले जाते. मला जेलर कार्यालयाकडून बोलावणे आले. त्यांनी मला दम दिला, " व्यवस्था एकदम उत्तम आहे असे लिहिलेले चालणार नाही. हे जेलच्या नियमांविरूद्ध आहे. ते खोडा." जेलरचे तसे फर्मानच निघाले. मग खोडले. काय करणार? जेलच्या व्यवस्थेला चांगले म्हटलेले चालत नाही, तसे नियमच आहेत म्हणे. हे भारी आहे ना?


जेलमध्ये आम्हाला प्रत्येकाला एक जर्मलचा मग दिलेला असायचा. तोच चहाला, कांजी, गंजी प्यायला, पाणी प्यायला आणि अंघोळीला वापरायचा. अर्थात शौचालयातही तोच. संडास अर्धे उघडे. जेवायला साधारणपणे कमाल कोळसा झालेल्या दोन भाकरी आणि पाण्यात हळद, मसाला, मीठ मिसळलेले, उकळलेले, सगळ्या झाडांचा पाला टाकलेले, पाणी असायचे. जेलच्या भाषेत त्याला बावन्नपत्ती म्हणतात. असा भन्नाट काढा की ज्याचा स्वाद केवळ थोर असतो. अर्थात त्याला तिकडे आमटी वगैरे म्हणतात. लिंबा एव्हढा भातही करपलेला, जाडाभरडा असायचा. घरी आपला जितका आहार असतो, साधारण त्याच्या निम्मा आहार जेलमध्ये प्रत्येकाला दिला जातो. त्यामागे कैद्याचे वजन वाढू नये असा सदहेतू असावा.


दररोज पहाटे पाचला आमचा जीवनक्रम कांजीने/गंजीने सुरू व्हायचा. भाताची पेज. दुपारचे जेवन ११ वाजता तर रात्रीचे जेवन संध्याकाळी ५ वाजता दिले जायचे. अंधार पडायच्या आत बराकींना कुलुपे लावली जायची. जी दुसर्‍या दिवशी पहाटे उघडायची.


जेलच्या खूप भन्नाट आठवणी आहेत. या तुरूंगात अंडा सेलमधले खुंखार कैदी ते किरकोळ गुन्हे केलेले कच्चे कैदी अशा अनेकांना मी भेटलो. त्यांच्या कहाण्या चटका लावणार्‍या आहेत. विदारक आणि भयावह आहेत. माझ्याकडे तुरंगातल्या नोट्सच्या पाच वह्या भरलेल्या आहेत.

मी टेल्कोच्या (टाटा मोटर्स) वसतीगृहात २ वर्षे राहिलोय. तिथल्या स्वावलंबी जीवनामुळे  माझे असे मत बनले आहे की प्रत्येक स्त्री-पुरूषाला शिक्षणाच्या काळात होस्टेलचा अनुभव असायलाच हवा. आणि तसाच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला जेलमध्ये जाऊन आल्याचा अनुभव असायला पाहिजे. म्हणून तर कुमार सप्तर्षी त्या दिवसांना "येरवडा विद्यापीठातील दिवस" असे म्हणतात. प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी आयुष्यात एकदातरी जेलचा अनुभव घेणे मस्ट आहे.


१९६३ मध्ये किंवा त्याआधी जन्मलेल्या, ज्यांनी ज्यांनी नामांतर आंदोलनात प्रदीर्घ तुरूंगवास भोगलेला आहे त्यांनी कृपया कमेंटमध्ये आपण कोणत्या जेलमध्ये होतात, त्याबद्दल लिहावे, म्हणजे त्यातून समविचारी मित्रमैत्रिणींची नवी/जुनी यादी तयार होऊ शकेल.

(भाग - २ रा समाप्त. क्रमश:)


- प्रा. हरी नरके,

१४/७/२०२०

संदर्भासाठी पाहा- कुमार सप्तर्षी, "येरवडा विद्यापीठातील दिवस," पद्मगंधा प्रकाशन, पुणे, प्रथमावृत्ती, २००१, पृ. ३९० ते ३९२


पुर्ण लेख वाचण्यासाठी https://harinarke.blogspot.com/?fbclid=IwAR2Q2U1HDiUbfHv42gYKYcIvZZIV7YSDRiUolGSuJUXlGxqi3_nlTb3DoEo  या लिंकवर क्लीक करा.



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी पदवीचे शिक्षण घेत असताना ३ वर्षात आंतर राज्य, आंतर विद्यापीठीय पातळीवरील १३३ वादविवाद-वक्तृत्व स्पर्धा जिंकल्या. देशाचे उपपंतप्रधान मा. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार स्विकारताना-



टेल्कोत रात्रपाळीची वेल्डरची नोकरी करून अण्णासाहेब मगर महाविद्यालयातून मी रेग्युलर बी.ए. केलं. पुणे विद्यापीठात पहिला आलो. तेव्हा राज्यपाल न्या. एस. के. देसाई यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि २५ पुरस्कार स्विकारताना- (१६/१०/१९८७)


सामाजिक-सांस्कृतिक कार्याबद्दलचा राज्यव्यापी महानगर पुरस्कार मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू राम जोशी यांच्या हस्ते स्विकारताना, शेजारी गो.रा.खैरनार व इतर मान्यवर


रतन टाटा यांच्या हस्ते गुणवंत कामगार पुरस्कार स्विकारताना, शेजारी जे. ई. तळौलीकर

Thursday, July 9, 2020

राजगृह: जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र, विश्वाचे ज्ञानकेंद्र- प्रा. हरी नरके






दादर परिसरातील राजगृहाला तिहेरी महत्व आहे. मुळात तिथे पुस्तकं राहात होती आणि उरलेल्या जागेत आंबेडकर कुटूंबिय राहात होते. ते जागतिक वारसा केंद्र, बौद्धांचे उर्जाकेंद्र/प्रेरणास्थान आणि सार्‍या विश्वाचे ज्ञानकेंद्र आहे. ज्ञानसूर्य बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे स्थळ हे फक्त एक घर नाही. १९३४ ते १९५६ या काळात बाबासाहेब तिथे राहात असत. त्यांनी अनेक पुस्तकं तिथं लिहिली. त्यांचे दोन मास्टरपीसेस "अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट" आणि "वेटींग फॉर व्हीसा" इथेच लिहिले गेले. "स्वतंत्र मजूर पक्षाचा" जन्म इथेच झाला. २७ मे १९३५ मातोश्री रमाबाईंचे महानिर्वाण इथेच झाले. बाबासाहेब सुमारे २८ वर्षे मुंबईच्या चाळीतच राहिले. जेव्हा ते शासकीय विधी महाविद्यालयात प्रोफेसर झाले तेव्हा पोय बावडीची चाळीतली जागा पुस्तकांसाठी फारच अपुरी पडू लागल्याने दादरच्या हिंदू कॉलनीच्या परिसरात त्यांनी दोन प्लाॅट खरेदी केले. बॅंकेचे कर्ज काढून १९३१ ला राजगृहाचे बांधकाम त्यांनी सुरू केले. १९३३ च्या अखेरीस राजगृह बांधून तयार झाले. १९३४ च्या प्रारंभी बाबासाहेब, रमाबाई, यशवंतराव, लक्ष्मीबाई, मुकुंदराव हा आंबेडकर परिवार तिथे राहायला गेला.


आपल्या बंगल्याला "राजगृह" हे नाव देण्यामागे बाबासाहेबांचा एक ठाम विचार होता. बिहार मधल्या नालंदा जिल्ह्यातल्या राजगिर किंवा राजगृहला तथागत अनेकवेळा राहिलेले होते. त्यांनी त्याठिकाणी धम्मप्रवचने दिलेली होती. राजगृह ही मगधांची पहिली राजधानी. बिंबीसार व अजातशत्रू या बौद्ध राजांची कारकिर्द या शहराने पाहीली. सम्राट अशोकाने या स्थानाला भेट दिली होती. इ.स.पुर्व २००० मधील बांधकामाचे अवशेष या शहरात मिळतात. बौद्ध आणि जैन या दोन्ही धर्मांचे पवित्र स्थान म्हणुन या शहराला महत्व आहे. पहिली बौद्ध धम्म संगिती इथेच झाली. "विनयपिटक" या पवित्र बौद्ध ग्रंथाची निर्मिती २२५० वर्षांपुर्वी इथेच झाली. या ग्रंथात महाराष्ट्राचा स्पष्ट उल्लेख मिळतो.


 १९३३ मध्ये राजगृहाचे बांधकाम चालू असताना बाबासाहेबांनी त्यांचे मित्र सुभेदार सवादकर यांना लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. त्यात आपला धर्मांतराचा निर्णय झालेला आहे व आपला कल बौद्ध धम्माकडे आहे असे त्यांनी स्पष्ट लिहिलेले आहे. येवल्याला त्यांनी १३ ऑक्टोबर १९३५ रोजी जी धर्मांतराची  महागर्जना केली ते भाषण राजगृहातच लिहिले गेले होते. काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडच्या चवदार तळ्याची केस लढण्याची तयारी करणे, शेतकर्‍यांची आंदोलने, खोती विरोधी बिल, कुटुंब नियोजन बिल ह्या सार्‍या ऎतिहासिक गोष्टी राजगृहावरच जन्माला आल्या.



जल उर्जा, सौर उर्जा, औष्णिक उर्जा  या महत्वाच्या असल्या तरी त्यात भारनियमन /लोडशेडींग असू शकते. पण बाबासाहेबांच्या राजगृहातून मिळणारी बौद्धिक उर्जा मात्र कोणतेही भारनियमन नसलेली.


बाबासाहेबांचा ग्रंथसंग्रह गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही दृष्टींनी देशातला सर्वात मोठा खाजगी ग्रंथसंग्रह होता. सुरूवातीला त्यात ५० हजार ग्रंथ होते. त्यात सतत भर पडत राहिली. नंतर बाबासाहेबांचे बरेचसे वास्तव्य दिल्लीला राहिले. त्यामुळे राजगृहावरील काही पुस्तके तिकडे हलवण्यात आली. नंतर काही पुस्तके सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई व मिलिंद महाविद्यालय, औरंगाबादच्या ग्रंथालयांना दिली गेली.


बाबासाहेबांचा हा ग्रंथसंग्रह त्या काळात बनारस हिंदु विद्यापीठाचे मालवियजी आणि पिलानीचे बिर्ला शेट यांनी खरेदी करण्याची इच्छा दर्शवली होती. त्यांनी काही कोटी रुपये देऊ केलेले असताना व बाबासाहेबांना त्याकाळात आर्थिक निकड असतानाही बाबासाहेबांनी हा ग्रंथसंग्रह विकला नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, " माझा समाज ज्ञानाचा भुकेला आहे. त्याला शतकानुशतके ज्ञानाची उपासमार सोसावी लागली. त्यांची ही अपुरी राहिलेली तहानभुक माझ्या एकट्यामध्ये सामावलेली असल्याने मी रात्रंदिवस, प्रत्येक सेकंद वाचतच असतो."

राजगृह हे वाचन संस्कृतीचं माहेरघर आहे. ते सार्‍या जगाचे ज्ञानकेंद्र आहे. तमाम बौद्धांचे ते पवित्र तीर्थक्षेत्र आणि प्रेरणास्थान आहे.

बाबासाहेब हे सामाजिक न्यायाचे व ज्ञान निर्मितीचे जागतिक प्रतिक आहेत. राजगृह हे ज्ञाननिर्मितीचे महाकेंद्र आहे.


- प्रा. हरी नरके,
हरी नरके, ९/७/२०२०



Monday, June 29, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके



" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) ...............................

शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,

Saturday, June 27, 2020

हे घ्या अस्सल पुरावे- बाबासाहेबांनी चीन, कम्युनिझम आणि माऒ यांचे काढलेले वाभाडे - प्रा. हरी नरके


















माझा "बाबासाहेब आणि चीन" हा १४ एप्रिल २०२० चा लेख तुफान गाजल्याने आता अडीच महिन्यांनी या लेखामुळे अडचणीत आलेल्या काही डाव्या मित्रांनी " बाबासाहेब असे बोललेच नव्हते, हरी नरकेंनी बाबासाहेबांच्या तोंडी खोटी वाक्ये टाकली" असा धादांत खोटा प्रचार सुरू केलेला आहे.

विचारांचे विश्लेषण करताना त्याचे वेगवेगळे अर्थ निघू शकतात. मतभेद होऊ शकतात. पण मूळ कोटेशन्समध्ये बदल होऊ शकत नाही. मी गेली ४० वर्षे लेखन-संशेधनाच्या क्षेत्रात आहे. वैचारिक मतभेद असण्यात गैर काहीच नाही. पण बाबासाहेब असे म्हणालेच नव्हते असे सांगणे हा प्रकार अक्षम्य आहे. मुद्दा विश्वासार्हतेचा आहे.

खाली मी बाबासाहेबांच्या पुस्तकांमधले संबंधित उतारे दिलेले आहेत. हे मोजकेच आहेत. हा फक्त एक नमुना आहे. डाव्यांची जर इच्छाच असेल तर वर्षभर दररोज मी बाबासाहेबांच्या पुस्तकामधले "असे" उतारे टाकू शकेन.

मी बाबासाहेबांच्या चीन, कम्युनिझम, माऒ, पंचशील विषयक मताचा सारांश पुढीलप्रमाणे सांगितला होता.

साम्यवादी चीन हा पसरणार्‍या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी नजिकच्या भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे असा परखड इशारा भारतीय संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला होता. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. ते राज्यसभेत भारतीय परराष्ट्र निती या विषयावर बोलत होते.

"बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे खंड १५ मधले काही उतारे आहेत तर काही खंड १८ भाग २ मधले आहेत.
"बाबासाहेबांना चीनबद्दल प्रेम होते" असा प्रचार हे फेसबुकवर करीत आहेत.

मी कम्युनिस्टांना शत्रू मानत नाही. वैचारिक मतभेद जरूर आहेत. वैचारिक टिकेचे मी स्वागत करतो, मात्र व्यक्तीगत बदनामी, टोकाची वैयक्तिक शेरेबाजी, चारित्र्यहनन कराल तर मग मला गप्प बसता येणार नाही.

निदान सध्याच्या भारतीय राजकीय वातावरणात तरी मला कम्युनिस्टांशी भांडण करायचे नव्हते, नाही. शहीद कॉ. गोविंद पानसरे हे माझे मार्गदर्शक होते. आज या चळवळीत असलेल्या इतर अनेक मान्यवरांना मी अतिशय मानतो. आमच्या छावण्या  भल्या वेगवेगळ्या असतील पण अनेक मुद्यांवर आम्ही सोबत होतो. राहू.   पण कोणी अर्धवट डावे जर माझ्यावर भांडण लादणारच असतील तर मग माझाही नाईलाज होईल... लक्षात ठेवा, " ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी." तुर्तास समजनेवालों कों इतना इशारा काफी हैं....

- प्रा. हरी नरके,
२७/६/२०२०

(संदर्भासाठी पाहा - १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर : लेखन आणि भाषणे, खंड,१८ वा, भाग २, महाराष्ट्र शासन, मुंबई, २००२, पृ. ५८३ ते ५८६ )

Thursday, June 25, 2020

छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?- प्रा. हरी नरके




" फुले आणि आंबेडकर हे दोघे तत्वज्ञ आहेत, त्यांच्या पंक्तीला शाहू महाराजांना बसवू नका " अशी मांडणी थोर विद्वान शरद पाटील यांनी १९९५ साली वाळव्याच्या दलित-आदिवासी - ग्रामीण साहित्य संमेलनात केली होती. त्यानंतरच्या सत्रात मी एक निमंत्रित वक्ता होतो. शरद पाटील यांच्या प्राच्यविद्येच्या अभ्यासाविषयी मला अपार आदर असला तरी त्यांचा हा मुद्दा मला पटलेला नव्हता. तो मी पुराव्यानिशी खोडायला लागलो तेव्हा मराठा समाजाचे कार्यकर्ते किशोर ढमाले यांनी त्यांच्या पंटरलोकांसोबत स्टेजवर घुसून मला शिवीगाळ, धक्काबुकी, घोषणाबाजी व मारहाण केली होती. आज शाहू महाराजांचे वंशज मराठा समाजाचे नेते म्हणून मान्यता पावलेत. भाजपाने त्यांना राज्यसभा सदस्यत्वही दिलेय. एकुण दिवस बदलताहेत. चांगले आहे. आनंद आहे.

बाबासाहेबांनी माणगाव परिषदेत १०० वर्षांपुर्वी शाहूराजांचा वाढदिवस सणाप्रमाणे साजरा करण्याचा ठराव मांडला होता. हे माझ्या वाचनात आल्यापासून गेली २५ वर्षे मी हे सर्वत्र मांडतोय. जयंती करतोय,करायला लावतोय. बाबासाहेब म्हणाले होते, "शाहूराजे हे सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते." अगदी सार्थ आणि उचित गौरव.


शाहूराजांच्या मृत्युला ६ मे २०२० ला ९८ वर्षे झालीत. पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल. महाराज फार अकाली गेले. अवघ्या ४८ व्या वर्षी ते गेले. एव्हढ्या वर्षांनी मागे बघताना आजही त्यांच्या विचारांचा रिलेव्हन्स काय दिसतो?


१) १९०२ सालचे महाराजांचे एक भाषण आहे. त्यात ते म्हणतात, " ग्रामीण महाराष्ट्राचा योग्य विकास झाला नाही, तर लोक रोजगारासाठी शहरांकडे धाव घेतील. शहरात झोपड्या वाढतील. शिक्षण, आरोग्यव्यवस्था यावर ताण पडेल. गुन्हेगारी वाढेल आणि शहरं ही अशांततेची केंद्रं बनतील." आज महाराजांचे हे उद्गार पटतात की नाही? होता की नाही माणूस द्रष्टा? काळाच्या पुढचं बघणारा?


२) महाराजांनी १०३ वर्षांपुर्वी शिक्षण हक्क कायदा केला. प्राथमिक शिक्षण, मोफत, सक्तीचे आणि सार्वत्रिक केले. जे काम स्वतंत्र भारताला करायला त्यानंतर ९३ वर्षे लागली.
"गाव तिथे शाळा," "गाव तिथे ग्रंथालय", ह्या त्यांच्या लोकप्रिय घोषणा होत्या. १९१७ ते १९२२ याकाळात महाराज कोल्हापूर संस्थानच्या बजेटमधला २३ टक्के पैसा शिक्षणावर खर्च करीत असत. १९२२ साली कोल्हापूरच्या शेकडोपट मोठ्या ब्रिटीश मुंबई प्रांतात आधुनिक विचाराच्या ब्रिटीशांनी शिक्षणासाठी तरतूद केली होती रुपये सत्तर हजार आणि त्याच वर्षी मुंबईप्रांताच्या टिकलीएव्हढ्या आकाराच्या कोल्हापूरसाठी शाहूराजांनी बजेटमध्ये शिक्षणासाठी पैसे राखून ठेवले होते रुपये १ लाख. आजही आपण जीडीपीच्या साधारणपणे तीन टक्के पैसा शिक्षणावर खर्च करतो. महाराज किती पुढे होते बघा. एव्हढा खर्च तर जगातला कोणताच देश करीत नाही.


३) महाराजांनी १९०९ साली राधानगरी धरण बांधायला घेतले. ते म्हणाले, " इट इज माय ड्रीम प्रोजेक्ट." १९१८ साली हे धरण पुर्ण झाले तेव्हा १४ टक्के कोल्हापूर ओलीताखाली आले. सिंचनाची ही टक्केवारी गाठायला फुले- शाहू- आंबेडकरांच्या महाराष्ट्राला २०१४ उजाडले. आज महाराष्ट्रात हजारो शेतकर्‍यांनी आत्महत्त्या केल्यात. कोल्हापूर याला अपवाद का आहे? कारण शाहूराजांचा द्रष्टेपणा. गोकुळ आज देशात अमूलच्या खालोखाल अव्वल आहे. बंधू अरूण नरके आणि त्यांच्या टिमने केलेला हा पराक्रम आहे. आज देशातली सहकार चळवळ आणि कोल्हापूरातली सहकार चळवळ यांची तुलना करा, कोल्हापूर नंबर एक आहे. का?


४) महाराजांनी जयसिंगपूरची आधुनिक व्यापारपेठ वसवली. कोल्हापूर हे कला, क्रिडा, कृषी, सहकार, चित्रपट, व्यापार, संगित, नाट्य, शिक्षण आणि आणखी कितीतरी बाबतीत नंबर एक बनले. कुणामुळे?


५) महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली. महाराष्ट्रात आजही मोठमोठे नेते "राजश्री" असा चुकीचा उल्लेख/उच्चार करतात. राजांमधला ऋषी. राजर्षि.


६) शाहूराजांच्या आरक्षण, सामाजिक न्याय, सत्यशोधक चळवळ, बाबासाहेबांना ओळखणं, ते देशाचा नेता होतील असं १९२० साली जाहीर भाकीत करणं, अपुर्‍या राहिलेल्या उच्च शिक्षणासाठी भरीव अर्थसहाय्य करणं, मूकनायकाला पहिली देणगी रुपये अडीच हजारांची देणं, नोंदी करीत जा, संपता संपत नाहीत.


७) छत्रपती शाहूंचा जन्म १८७४ चा. त्यांनी उच्चशिक्षण राजकोटच्या राजकुमार महाविद्यालयात घेतले. त्यांचे दिवाण आणि पहिले अधिकृत चरित्रकार अण्णासाहेब लठ्ठे यांनी त्यांची जयंती २६ जुलैला असल्याची नोंद केली. तीच सर्वांनी उचलली. आम्हीही २१ वर्षांपुर्वी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना भेटून अर्ज दिला, शाहू जयंती शासनाच्या वतीने राज्यभर झाली पाहिजे. ग्रामपंचायत ते मंत्रालय झाली पाहिजे. बराच पाठपुरावा करावा लागला.पण आदेश निघाला. नोकरशाहीने वेदोक्ताची मानसिकता दाखवली खरी. पण श्री भूषण गगराणी यांची मला साथ होती. बाबासाहेबांच्या पत्रामुळे ही जयंती २६ जुलै नसून २६ जून असल्याचे कळले. आमचे मित्र खांडेकर यांनी मेहनतीने शोध घेतला आणि जयंती २६ जूनलाच असल्याचे सिद्ध झाले. पुन्हा नवा आदेश काढावयासठी धडपड. झटापट. मंत्रालयात पहिली शाहू जयंती केली एका बौद्ध अधिकार्‍याने. त्यांचे नाव आयु. शुद्धोधन आहेर. वक्ता म्हणून त्यांनी मला निमंत्रित केले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. सर्व उपस्थितांना आवडला. मात्र त्रिपाठी नावाच्या सचिवाने शुद्धोधनवर डुख धरला. खोटा आणि खोडसाळ गोपनीय अहवाल लिहून आहेरांचे प्रमोशन पंधरा वर्षे रोखले. तेव्हा ना छत्रपतींचे सोयरे मदतीला आले, ना मंत्री. असो. चालायचेच. आपणही महाराजांचे देणे लागतोच.


८. मी २२ वर्षांपुर्वी महाराजांवर राज्यभर ५०० व्याख्याने दिली. समारोप कोल्हापूरला भवानी मंडपात झाला. त्याला विद्यमान शाहू महाराज व दोन्ही युवराज उपस्थित होते. तोवर महाराजांवर लिहिणारे बोलणारे चारपाचजणही नव्हते. मुख्य योगदान आहे ते अण्णासाहेब लठ्ठे, आमदार पी. बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ. गो. सुर्यवंशी, डॉ. रमेश जाधव, प्रा. य. दि. फडके, प्रा. जयसिंगराव पवार, प्रा. एस.एस. भोसले, प्रा. विलास संगवे, आप्पासहेब पवार, माधवराव बागल, बाबूराव धारवाडे, कुलगुरु कणबरकर, कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे, प्रा. अर्जून जाधव, मंजूषा पवार आदींचे.


९) शाहूंनी आपल्या बहिणीचे लग्न एका धनगर राजाशी लावले. त्यानिमित्ताने अशीच इतरही लग्नं आंतरजातीय व्हावीत म्हणुन भरीव निधी बंडोपंत पिशवीकर यांच्याकडे दिला व किमान १०० लग्नं लावायची कामगिरी सोपवली. आज मराठा समाजात महाराजांना स्विकारण्याची मानसिकता येतेय तर हाही विचार हा समाज आज नाही तर उद्या नक्की स्विकारेल असा विश्वास करूया. कोल्हापूरचे माझे एक पत्रकार मित्र म्हणतात, महात्मा फुल्यांमागे माळी समाज आहे. वस्तुस्थिती अशी आहे का? बहुतांश माळ्यांनी नावापलिकडे महात्मा फुल्यांचे विचार समजून घेतलेत का? नाही. प्रत्येक माळ्याच्या घरात डझनभर देवदेवतांचे फोटो सापडतील. महात्मा फुले-सावित्रीबाईंचा फोटो सापडेल का? १०० तल्या ९९ च्या घरी नाही सापडणार. त्यांचे एक वर्ष असे जात नाही की ते शिर्डी, बालाजी, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोटला, शेवगावला जात नाहीत. फुलेवाड्यावर आयुष्यात एकदा तरी गेलात का असे विचारा? १००तले ९९ फिरकलेलेच नाहीत तिकडे. लांब कशाला, पुण्यात राहणारे माळीसुद्धा फुलेवाड्यावर गेलेले नसतात. पटत नसेल तर विचारून पाहा. खात्री करून घ्या. महात्मा फुले यांची जन्मतारीख माळ्यांना विचारून बघा. १०० तल्या एकाला तरी सांगता येते का बघा. नाही येणार.

१०) .............................................




शाहू छत्रपतींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

-प्रा. हरी नरके,
२५/६/२०२०

राजर्षि शाहू छत्रपती



राजर्षि शाहू छत्रपतींच्या जन्माला उद्या १४६ वर्षे होतील.

महाराज फार अकाली गेले. वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी.

पुढील वर्षी त्यांची स्मृतीशताब्धी सुरू होईल.

गेल्या ९८ वर्षात महाराजांविषयी दर्जेदार लेखन, संशोधन करुन ज्यांनी महाराजांच्या ऎतिहासिक कामगिरीचे दस्तावेजीकरण करून ठेवले त्यात
अण्णासाहेब लठ्ठे,
आमदार पी. बी. साळुंखे,
धनंजय कीर,
कृ. गो. सुर्यवंशी,
डॉ. रमेश जाधव,
प्रा. य. दि. फडके,
प्रा. जयसिंगराव पवार,
प्रा. एस.एस. भोसले,
प्रा. विलास संगवे,
बाबूराव धारवाडे,
कुलगुरु कणबरकर,
कादंबरीकार श्रीराम पचिंद्रे,
प्रा. अर्जून जाधव,
मंजूषा पवार आदींना फार मोठे श्रेय जाते.

तुम्ही यातल्या कुणाकुणाचं वाचलंय? कमेंटमध्ये लिहा.

-प्रा.हरी नरके,
२५/६/२०२०

Friday, June 19, 2020

चीन हा लोकशाही जाळणारा वणवा : भारताला चीनच्या आक्रमणाचा धोका- प्रा. हरी नरके












साम्यवादी चीन हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्मसात करीत जातोय, अगदी लोकशाहीसुद्धा, त्याच्यापासून दूर राहा. आज नसला तरी भविष्यात चीन भारतावर आक्रमण करण्याचा धोका उद्भवणार आहे, असा परखड इशारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेत बोलताना २६ ऑगस्ट १९५४ रोजी दिला होता.
१९६२ साली चीनने भारतावर आक्रमण करून आणि फार मोठा भूभाग गिळंकृत करून तो खरा ठरवला. १९६२ साली ज्या गलवान खोर्‍यावरून चीनने आक्रमण केले होते तोच मुद्दा पुढे करून चीनने आपल्या २० बहादूर जवानांचे लाखमोलाचे जीव घेतलेले आहेत. सीमेवर पेट्रोलिंग करताना शस्त्र सोबत असले तरी फायरिंग करायची नाही म्हणुन आपल्या जवानांनी गोळीबार केला नाही असे परराष्ट्रमंत्री म्हणतात. कुणाचा जीव घेणे हा कायद्याने गुन्हा असला तरी स्वसंरक्षणार्थ एखाद्याचा जीव घ्यावा लागला तर तो क्षम्य असतो, मग चीनचे जवान आपल्या सैनिकांवर दगडगोटे, तीक्ष्ण हत्त्यारे, यांचा मारा करीत असताना त्यांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करता आला असता, मग त्यांना कोणी रोखले याचे उत्तर मिळालेले नाही. राज्यसभेत परराष्ट्रनीतीवर बोलत असताना बाबासाहेबांनी काढलेले उद्गार सुरूवातीला मी दिलेले आहेत. पंतप्रधान नेहरू बाबासाहेबांचे भाषण काळजीपूर्वक ऐकत होते. एका सदस्याने या भाषणात अडथळा आणला असता अध्यक्षांनी त्या सदस्याला फटकारले.


आज कोरोनाचा विषाणू चीनमधून जगभर गेला आहे. बाबासाहेबांची भाषा वापरून सांगायचे, तर या वणव्यात सारे जग होरपळत असून, चीनच्या चुकीची शिक्षा भारतासह साऱ्या जगाला भोगावी लागते आहे. हा विषाणू निसर्गातून जन्मला, की चीनने प्रयोगशाळेत तयार करून जगात पोहोचवला, यावर आरोपप्रत्यारोप होत आहेत. चीनने लादलेल्या या जैविक महायुद्धामुळे सारे जग पोळून निघाले आहे.


चीनचे लालभाई सत्ताधीश अतिमहत्त्वाकांक्षी, हुकूमशाही वृत्तीचे आणि आक्रमक आहेत, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या लाखो तरुणांना रणगाड्यांखाली चिरडून मारणारे चिनी सत्ताधीश क्रूरकर्मा आणि रानटी आहेत, हे वेगळे सांगायला नको. आज गलवान खोर्‍यावर कब्जा करायला पुढे सरसावलेला चीन अतिदुष्ट साम्राज्यवादी आहे हे अनेकवार सिद्ध झालेले आहे. आज चीनची मुजोरी, इतर देशांना छळण्यासाठी वापरली जाणारी बाजारू अर्थनीती आणि संयुक्त राष्ट्र संघटनेत चीन वापरीत असलेला नकाराधिकार (व्हेटो), हे सारे बघितले की चीन शेजारी देशांवर आक्रमण करू शकतो हे सिद्ध होते. सत्तेसाठी हे भयंकर आक्रमणकारी लोक काहीही करू शकतात.


जगातील सगळी प्रगत राष्ट्रे आज चीनच्या विषाणूमुळे कोलमडून पडली आहेत. ही चीनची पद्धतशीर रणनीतीही असू शकते.


डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा असा, की त्यांनी साडेसहा दशकांपूर्वीच भारताला याबाबत जागे केले. 'साम्यवाद्यांना लोकशाहीचे वावडे असते. त्यांना नीतीमत्ताही नको असते.


माओ हा चीनमध्ये तिथल्या बौद्धांना जी अमानुष वागणूक देत आहे, ती पाहता तो पंचशील पायदळी तुडवणारा सत्ताधीश आहे, हे उघडच दिसते. भारताने चीनशी मैत्री करू नये. भारताने लोकशाहीवादी राष्ट्रांशी मैत्री करायला हवी,' असेही बाबासाहेब म्हणाले. राज्यसभेचे सदस्य म्हणून बोलताना बाबासाहेब पुढे म्हणाले, 'साम्यवाद आणि लोकशाही कधीच एकत्र नांदू शकत नाही. साम्यवादी देशांच्या शेजाऱ्यांनी सतत सावध राहायला हवे. चीनला आपली सरहद्द भारताला भिडविण्यासाठी भारताने मदत करावी, हे दुर्दैवी आहे. ही चूक भारताला महागात पडू शकते. चीनला आक्रमणाची चटक लागलेली आहे. माओने तिबेट करारात पंचशील आणि अनाक्रमण याला मान्यता दिलेली असली, तरी माओचा पंचशिलावर विश्वास नाही.

चिनी राजनीतीची दोन तत्त्वे आहेत. पहिले, त्यांची राजनीती ही सतत बदलणारी असते. दुसरे म्हणजे, त्यांच्या जगात कोणत्याही नीतीला मुळी जागाच नसते. आजची नीती उद्याला नाही. आशिया हा त्यांच्यामुळे आज रणक्षेत्र झाला आहे. साम्यवादी जीवन आणि शासन पद्धती जी राष्ट्रे स्वीकारतात, त्यांच्यापासून भारताने दूरच राहावे.'

नेहरू सरकारमधील कायदेमंत्रिपदाचा १९५१ साली राजीनामा देताना बाबासाहेबांनी राजीनाम्याची जी पाच कारणे दिली,

त्यातले एक म्हणजे नेहरू सरकारची मवाळ परराष्ट्रनीती त्यांना मान्य नव्हती. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध ठेवणे हे प्रथमदर्शनी योग्य असले, तरी व्यवहाराचा आणि संभाव्य धोक्यांचा विचार डोळ्याआड होता कामा नये.

बाबासाहेबांना मनापासून असे वाटत होते, की चीन आणि पाकिस्तान हे दोन शेजारी देश भारताचा विश्वासघात करणार. भविष्यात भारताला या दोघांपासून धोका आहे, असे त्यांनी बजावले होते. जे पुढे फार लवकर खरे ठरले. स्वातंत्र्योत्तर भारतावर सगळ्या लढाया लादल्या त्या या दोन देशांनीच. या दोन देशांमुळेच भारताला संरक्षणावर अतोनात खर्च करावा लागतो आहे. याबाबतही बाबासाहेबांनी चिंता व्यक्त केलेली होती.

संरक्षण धोरणात भाबडेपणाला स्थान असता कामा नये. चीनने बौद्धबहुल तिबेटची जी ससेहोलपट केली, त्यावरही बाबासाहेब अतिशय नाराज होते. खरे तर चीन व भारत या दोघांनाही प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचा महान वारसा लाभला आहे. चीनशी आपले अनेक शतकांपासून व्यापारी संबंध आहेत. रशियाने दुसऱ्या महायुद्धानंतर शेजारचे दहा देश बळकावले होते. त्यामागे असलेला विस्तारवादी, आक्रमणशील नीतीचा मुद्दा रशिया आणि चीन दोघांनाही लागू पडतो, असे बाबासाहेब सांगतात.

अमेरिका आणि इंग्लंडमध्ये अर्थशास्त्रातले उच्च शिक्षण घेताना, बाबासाहेबांना अनेक शीर्षस्थ मार्क्सवादी विचारवंतांचा सहवास लाभला. त्या काळात त्यांनी मार्क्सवादाचे सखोल अध्ययन केले. पुढील काळात ते जसजसा बुद्धाचा अभ्यास करू लागले आणि चौफेर शोध घेऊ लागले, तसतसे ते हिंसक मार्गावर आधारलेल्या मार्क्सवादापासून दूर गेले. दरम्यानच्या काळात चीन आणि रशियामध्ये लोकशाहीची जी नृशंस हत्या करण्यात आली, त्यामुळे सच्चे लोकशाहीवादी बाबासाहेब कम्युनिझमपासून दूर गेले.


१९५४ साली मुंबईत 'आपण महात्मा फुल्यांना कधीही सोडणार नाही,' असे सांगताना बाबासाहेबांनी मार्क्सला आपण सोडत असल्याचे जाहीरपणे सांगितले.

बाबासाहेबांनी 'स्वतंत्र मजूर पक्षा'ची १९३६ साली स्थापना केली. त्यावेळी काही कम्युनिस्ट मित्रांशी त्यांची जवळीक होती; मात्र पुढे या मार्क्सवादी मंडळींनी बाबासाहेबांचे काही सहकारी, कार्यकर्ते पळवले.

१९५२च्या लोकसभा निवडणुकीत मते कुजवा; पण बाबासाहेबांना पराभूत करा, हा कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी केलेला विश्वासघात बाबासाहेबांच्या जिव्हारी लागला.
कोणताही विधीनिषेध न बाळगणारी ही विचारधारा जातिप्रश्नावर मात्र मौन बाळगत असे. स्त्रीप्रश्न हाही त्यांना अग्रक्रमाचा नव्हता.

या सगळ्या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये काठमांडूच्या जागतिक धम्म परिषदेत बाबासाहेबांनी 'बुद्ध की मार्क्स?' या प्रश्नावर जाहीरपणे 'मार्क्स नाही, तर बुद्धच आपला मार्गदाता' असल्याचे घोषित केले.
मार्क्सवादाची सखोल चिकित्सा बाबासाहेबांनी लेखनात केलेली आहे. या विषयावर त्यांच्या महापरिनिर्वाणानंतरही ढाले-ढसाळ वादातून खूप चर्चा झाली आहे. हा विषय कायम चर्चेचा आणि वादाचा राहिलेला असला, तरी कम्युनिस्ट चीन हा धोकादायक देश असल्याने भारताने आणि भारतीयांनी त्याच्यापासून सावध राहायला हवे, हा त्यांचा इशारा आज अतिशय मोलाचा ठरलेला आहे.
बाबासाहेबांच्या दृष्टीने देश सर्वप्रथम होता. या  हिंसक आणि हुकूमशाही वृत्तीच्या चिनीच्या वागण्याचे कुणीही समर्थन करणार नाही.


-प्रा. हरी नरके,@Hari Narke

(लेखक समाजशास्त्रांचे संशोधक असून ते 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : रायटिंग्ज अँज स्पीचेस' या ग्रंथमालेचे संपादक होते.)

दि. १४ एप्रिल २०२० रोजी म.टा.मध्ये प्रकाशित झालेला माझा हा लेख किंचित भर घालून रिपोस्ट केला आहे.


(संदर्भासाठी पाहा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे प्रदीर्घ भाषण एकुण १३ पृष्ठांचे असून ते संपुर्ण वाचण्यासाठी पाहा- Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.15, Govt of Maharashtra, Mumbai, 1997, pp.874 to 886

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय सुरक्षा, डॉ. विजय खरे, सुगावा प्रकाशन,पुणे,२०१०)

Thursday, June 18, 2020

विवेकवादी गोपाळ गणेश आगरकरांचा १२५ वा स्मृतीदिन : प्रा. हरी नरके









वयाच्या अवघ्या ३९ व्या  वर्षी  अकाली वारलेल्या गोपाळराव आगरकरांना जाऊन काल १२५ वर्षे झाली.          (जन्म, टेंभू, सातारा, १४ जुलै १८५६; मृत्यू : पुणे, १७ जून १८९५)  कोरोना आणि एकुणच मराठी समाजाचा आगरकरांबद्दलचा थंडपणा यामुळे त्यांचे स्मरण फारसे कोणाला झाले नाही. हेही आपल्या रितीला धरूनच झाले म्हणा! आगरकरांनी ज्या मध्यमवर्गीयांच्या सुधारणेसाठी आपली हयात घालवली त्यांनी आगरकरांचा विचार स्विकारला, त्यानुसार उच्चशिक्षण घेतले, आधुनिक राहणीमान, जीवनमान स्विकारले पण आगरकारांचं नाव मात्र टाकून दिलं. विचारसुद्धा सगळा नाही घेतला. सोयीचा तेव्हढा घेतला. त्यांचा ध्येयवाद, त्यांचे समर्पण नाही घेतले. त्यांचा सुधारणावाद, बुद्धीप्रामाण्यवाद नाही घेतला. त्यांच्या विवेकनिष्ठेऎवजी त्यांच्या विरोधकांचा धार्मिक उन्माद आणि तुच्छतावाद मात्र आवर्जून घेतला. विज्ञाननिष्ठा नाकारली आणि पुरोहितशाहीची  मानसिकता घेतली.

अशा आप्पलपोट्यांसाठी आगरकर हकनाकच गेले म्हणायचे. आगरकर विवेकवादी होते. ते गरिबीतून कष्टाने शिकले. उत्तम सरकारी नोकरी आणि छान कमाई झाली असती तर तिच्यावर पाणी सोडून मध्यमवर्गीयांच्या अंधश्रद्धा दुर व्हाव्यात, स्त्रियांनी आधुनिक केशभुषा, वेशभुशा स्विकारावी, भरपूर शिकावे, कर्तबगारी गाजवावी, बालविवाह करू नयेत, विधवांचे पुनर्विवाह सन्मानाने व्हावेत, विधवांचे केशवपन करू नये, सती जाण्याची गरज नाही हे विचार लेखनाद्वारे मांडीत राहिले.  त्यावरून टिळकांशी मतभेद झाल्यावर आपला स्वत:चा "सुधारक" हा पेपर काढून विचारकलहाला घाबरू नका, चर्चेमुळे, वादविवादामुळे समाज समृद्ध होतो, मराठी माणूस हा मुलत: कलहशील आहे. कळवंड करणारा, भांडकुदळ आहे, त्याला चेतवित राहिले. जागवित राहिले.

"सुधारक" या पेपरला ब्राह्मणवाद्यांचा किती विरोध असावा? पुढे फाशी गेलेल्या चाफेकर बंधूंनी सुधारकाच्या संपादकाला अंधारात गाठून मारहाण करण्यासाठी तरूण हवेत अशी जाहीरातच वर्तमानपत्रात दिलेली होती.

ते आधी केसरी, मराठाचे व नंतर सुधारकाचे संपादक असताना लोकशिक्षण, लोकजागृती, लोकसंघटन आणि लोकरंजन हे सुत्र उराशी बाळगून लिहित राहिले. कोल्हापूरच्या शिवाजीराजांना ब्राह्मण दिवाण बर्वे त्रास देत होते. त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. बर्व्यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. ब्रिटीश कोर्टाने दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. त्याकाळचे (१८८०-८१) दहा हजार रुपये म्हणजे आजचे सुमारे दहा कोटी रुपये. अशा संकटाच्या घडीला त्यांनी रात्री अकरा वाजता तार केली. मदत मागितली. महात्मा जोतीराव फुले त्यांच्या मदतीला धावले. सत्यशोधक समाजाचे खजिनदार रा. बा. उरवणे यांनी रोख दहा हजार रुपये मुंबईला कोर्टात पोचते केले. पुढे टिळक-आगरकरांना न्यायालयाने साडेतीन महिन्यांची शिक्षा सुनावली. ते सुटले तेव्हा जोतीरावांच्या सुचनेवरून सत्यशोधकांनी डोंगरीच्या तुरूंगाबाहेर जल्लोश केला. एका रथातून त्यांची मिरवणूक काढली. त्यांचा जंगी सत्कार केला. त्यांना मानपत्र दिले. हे सगळे खुद्द टिळकांनीच पुढे केसरीत लिहिलेय. तिथूनच मी हे उद्धृत करतोय. (पाहा: केसरी, ३ ऑक्टोबर १८८२)

जोतीरावांनी त्यांच्याशी काही वैचारिक मतभेद असतानाही कायम त्यांना पाठींबा दिला, सहकार्य केले. विवेकवादी असूनही आगरकरांची वैचारिक भुमिका  ही होती की, "जे काही करणे ते मूळ आर्यत्व न सांडता करावे," याच्याउलट फुले आर्यत्वाचे कणखर विरोधक होते.

लोकहितवदी, न्या.रानडे, आगरकर, कर्वे ही भलीच माणसं होती. पण महापुरूषांनाही मर्यादा असतातच. काही काळाच्या, काही स्वत:च्या. आगरकरांनी ज्या कुटुंबसुधारणेचा ध्यास घेतला होता ती आता बर्‍यापैकी साध्य झालेली आहे. लोकहितवादी आयुष्यभर लोकहितार्थ झटले. पण त्यांची लोकांची कल्पना बघितली तर ती सर्वसमावेशक दिसत नाही. ती लोक म्हणजे अभिजन अशी मर्यादित दिसते, अशी टिका ख्यातनाम इतिहासकार अरविंद देशपांडे यांनी केलेली आहे. (पाहा: महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, महाराष्ट्र शासन, १९९८, पृ. ५ ) न्या. रानडे प्रकांडपंडीत होते. सुधारक होते. पण व्यक्तीगत जीवनात सुधारणा करताना पाय मागे घेणारे होते असे त्यांचे चरित्रकार न.र.फाटक सांगतात. ( पहिली बायको वारल्यावर विधवेशी लग्न करण्याऎवजी ९ वर्षांच्या मुलीशी जिल्हा न्यायाधिश असलेल्या ३२ वर्षांच्या रानड्यांनी लग्न केले.) कर्व्यांनी विधवांच्या शिक्षणासाठी काम केले पण फक्त ब्राह्मण विधवांसाठीच ते काम करीत राहिले.

या पार्श्वभुमीवर जोतीराव फुले यांची समाजक्रांतीची भुमिका या समकालिनांना पेलवली नाही. या विवेकी माणसाने जोतीराव वारले तेव्हा ती बातमीही दिली नाही. टिळकांनी दिली नाहीच पण आगरकरांनीही सुधारकात ती दिली नाही याबद्दल इतिहासकार य. दि. फडके यांनी खेद व्यक्त केलेला आहे. जोतीराव धर्मांतर करून कधीही ख्रिस्ती झाले नाहीत. त्यांनी "सत्यधर्मा"ची मांडणी केली. तरिही आगरकर त्यांना "रेव्हरंड जोतिबा" असे हिनवतात. आगरकरांचे भावविश्व शहरी होते. त्यामुळे त्यांच्या लेखनात शेती, शेतकी, शेतकरीजगत यावर फारसे काही लिहिलेले आढळत नाही.


सामाजिक समता, स्त्री-पुरुषसमता आणि विज्ञान‌निष्ठा‌ ही आगरकरांची जीवनमुल्ये होती.  ते बाळ गंगाधर टिळकांचे समकालीन, आधी मित्र आणि नंतर कट्टर विरोधकही. ते केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना टिळक व आगरकर एकत्र आले. दिनांक १ जानेवारी १८८० रोजी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाली. आगरकर १८८१ मध्ये एम.ए. झाल्यावर या शाळेत शिकवू लागले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले. पुढे  टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व १८८५ मध्ये फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

ते थोर प्रबोधनकार होते. भौतिकता, ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मुल्यांवर आधारलेला मराठी समाज उभा राहावा यासाठी ते झुंजले. महाराष्ट्रसमाजाला समाजपरिवर्तन, विवेक, बुद्धिप्रामाण्यवाद व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देण्यासाठी ते बोलत-लिहित राहिले. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती मिळावी या कारणे त्यांनी देह झिजवला. आपल्या समाजात विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन यावा, ग्रंथप्रामाण्य नष्ट व्हावे, बुद्धीला पटेल तेच स्वीकारले जावे, केवळ अंधानुकरण करीत रूढीवादी जीवन जगु नये असा प्रचार ते करीत राहिले. रुढीप्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त अशी समाजधारणा बनावी हे त्यांचे स्वप्न होते. स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत, आधुनिक पादत्राणे वापरली पाहिजेत, स्त्रियांनी पुरूषांच्या बरोबरीने काम करावे हे आज सहज स्विकारले गेलेले विचार ज्याकाळात समाज नाकारीत होता तेव्हा आगरकर भांडत होते. ज्यांच्यासाठी ते भांडत होते त्यातल्या ९९ टक्क्यांना मात्र याची आज जाणीवसुद्धा नाही. आठवणीचा मुद्दाच नाही.

आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी समाजसुधारणा? या वादात ते आधी समाजसुधारणा या मताचे होते. त्यांचे सुधारक हे वर्तमानपत्र इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काहीकाळ ना. गो.कृ. गोखले यांनी सांभाळली होती.

बुद्धीला जे पटेल ते बोलणार व शक्य ते आचरणात आणणार हा त्यांचा बाणा होता. " विचारकलह" हा समाजस्वास्थ्यासाठी अत्यावश्यक आहे, प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे ह्याचे ते पुरस्कर्ते होते. त्यावेळी सनातनी आजच्यासारखेच आक्रमक होते. संघटित होते. हिंसकही होते. ब्रिटीश राज्य असले तरी सामाजिक जीवनात अजूनही पेशवाईच होती. त्यामुळे पुण्यातल्या सनातन्यांनी सर्व सुधारकांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.

वयाच्या अवघ्या एकोणचाळीसाव्या वर्षी आगरकर गेले.

आचार्य अत्रे यांनी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुण्यात १९३४ मध्ये आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.

आज त्यांच्या नावे काही पुरस्कारही दिले जातात. साहित्य संस्कृती मंडळाने तीन खंडात आगरकर-वाङ्मय प्रकाशित केलेले आहे. (संपादक : म. गं. नातू. दि. य. देशपांडे) त्यातल्या निवडक लेखांचा संग्रह प्रा. ग.प्र. प्रधान यांनी संपादित केलेला असून त्याचे प्रकाशन साहित्य अकादमीतर्फे झालेले आहे. "शोध बाळगोपाळांचा" हे य.दि.फडके यांचे पुस्तक व विश्राम बेडेकरांचे "टिळक-आगरकर" हे नाटक प्रसिद्ध आहे. "डोंगरीच्या तुरुंगांतील आमचे १०१ दिवस", हे आगरकरांचे स्वत:चे अनुभवकथन व त्यांनी शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीत केलेले भाषांतर ’विकार विलसित’ वाचनीय आहे.

या विवेकपुरूषाला विनम्र आदरांजली.

- प्रा. हरी नरके, १८/६/२०२०