Showing posts with label कादंबरी. Show all posts
Showing posts with label कादंबरी. Show all posts

Friday, January 15, 2021

भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके





भाऊ परतौनी आला-संजय सोनवणींची खिळवून ठेवणारी कादंबरी-प्रा.हरी नरके

संजय सोनवणी हे चतुरस्त्र लेखक आहेत. ज्या ताकदीने ते वैचारिक ग्रंथ लिहितात त्याच ताकदीने ते कादंबर्‍याही लिहितात. काही लेखक ललित लेखन उत्तम करतात पण ते वैचारिक साहित्यापासून दूर असतात. तर काही याच्या उलटही असतात. या दोन्हींवर मांड असणं म्हणजे एकाच वेळी दोन्ही हातात तलवारी घेऊन दोन्ही हातांनी लढण्याएव्हढे अवघड काम आहे. त्यांची नवी ऎतिहासिक कादंबरी वाचली. 


ही कादंबरी पानिपताच्या लढाईत गायब झालेल्या भाऊसाहेब पेशव्यांवर आहे. ती एकदा हातात घेतली की पुर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवता येत नाही. गतिमान कथानक, अनेक पातळ्यांवरची गुंफन, कलात्मकता आणि इतिहासावरची पकड यांच्यामुळे ही कादंबरी गारूड करते. यातला काळ १७६१ चा आहे. लेखकाचा इतिहासाचा अभ्यास इतका मजबूत आहे की तो काळ, त्यावेळचे समाजजीवन, पेशवाईतली सत्तेची साठमारी, अनागोंदी, नाना फडणवीसची कुटील राजनिती, निष्ठुरता याचे लेखकाने घडवलेले दर्शन चकित करणारे आहे.  


सोनवणी हे चित्रशैलीचे लेखक आहेत. जणू त्या घटना आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असे  प्रत्ययकारी, कलात्मक आणि पकड घेणारे रहस्य  ते आपल्याला उलगडवून दाखवतात. पानिपतच्या लढाईत भाऊ मारले गेले असेच मानले जाते. तरिही भाऊसाहेबांचे अनेक तोतये नंतर उपटले होते, त्यांची ओळख पटवून त्यांना शिक्षा करण्यात आली, हे आपल्याला माहित असते. इथे मात्र वेगळेच घडते. ते विस्मयकारी असूनही विश्वासार्ह आहे. रहस्यकथेचा थरार असलेली ही कादंबरी अनेक पातळ्यांवर वाचकांना गुंतवून ठेवते. वाचनियता, कलात्मकता आणि ऎतिहासिक विश्वासार्हता या मापदंडावर ही कादंबरी फार उंचीवर जाते. 

कादंबरीत घडोघडी वाटा, वळणे आणि उड्या यांची मजा आहे. तरिही विेषयांतर नाही. अपघात आणि धक्के असले तरी त्यामुळे रसभंग न होता वाचक अधिकच गुंतत जातो.

एक अफलातून कादंबरी असेच " भाऊ परतौनी आला" चे वर्णन करावे लागेल. अवघ्या १२४ पृष्ठांमध्ये जी जादूभरली सफर सोनवणी वाचकांना घडवतात ती बहारदार आहे.

काही जात्यंधांनी कादंबरी न वाचताच सोनवणींना ट्रोलिंग केले होते. सोनवणींची दृष्टी नितळ, निरामय आणि निर्वैर आहे. त्यांच्यावर जातीयतेचा आरोप करणारे विकृतच असले पाहिजेत. सोनवणी माझे इयत्ता आठवीपासूनचे वर्गमित्र आहेत.  गेल्या वीसेक वर्षात मी त्यांची शंभरेक पुस्तकं वाचली. त्यांचे संशोधन, निर्भिडपणा, लढाऊबाणा, शोधाच्या स्वतंत्र वाटा आणि विषयांची विविधता केवळ स्तिमित करणारी आहे. त्यांचा अवाका आणि झपाटा बहुपेडी आहे. त्यांच्या "असूरवेद"  व  "आणि पानिपत" यासारख्या कादंबर्‍या तर मराठीच्या लेण्या आहेत. 

कादंबरीची गुणवत्ता, वाचकावर गारूड करण्याची ताकद, प्राजक्त प्रकाशनचे जालिंदरभाऊ चांदगुडे यांची देखणी निर्मितीमुल्ये, संतोश धोंगडे यांचे कमाल मुखपृष्ठ आणि अवघी रुपये १६० इतकी रास्त किंमत यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकांनी अवश्य संग्रही ठेवायला हवे. अवघ्या महिन्यापुर्वी ती प्रकाशित झालीय. सर्व पुस्तक दुकानांमध्ये उपलब्ध आहे.

पुस्तकासाठी संपर्क- ९८९०९५६६९५, प्राजक्त प्रकाशन, १३२८/२९ शुक्रवार पेठ, बाजीराव रोड, पुणे, ४११ ००२,

-प्रा. हरी नरके,

१५/०१/२०२१

Monday, March 23, 2020

संग्रही असलेली, एकदा वा अनेकदा वाचलेली काही आवडती पुस्तकं



१. लिळाचरित्र, चक्रधर स्वामी २. तुकाराम गाथा, संत तुकाराम, ३. धग, उद्धव शेळके, ४. संत वाड्मयाची सामाजिक फलश्रुती, गं. बा. सरदार, ५. कोसला, डॉ. भालचंद्र नेमाडे, ६. राधामाधवविलासचंपू, संपादक वि.का. राजवाडे, ७. मृत्युंजय, शिवाजी सावंत, ८. गाथा सप्तसती, ९. श्यामची आई, साने गुरूजी, १०. मनुस्मृती : काही विचार, नरहर कुरूंदकर, ११. स्मृतीचित्रे, लक्ष्मीबाई टिळक, १२. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास, वि.का.राजवाडे, १३. पोटमारा, रवीन्द्र पांढरे, १४. जागर, नरहर कुरूंदकर, १५. रामनगरी, राम नगरकर, १६. युगांत, इरावती कर्वे, १७. बलुतं, दया पवार, १८. गावगाडा, त्रिं. ना. आत्रे, १९. आठवणीचे पक्षी, प्र. ई. सोनकांबळे, २०. भाऊसाहेबांची बखर,

२१. एक होता कार्व्हर, वीणा गवाणकर, २२. रणांगण, विश्राम बेडेकर, २३. वैर्‍याची एक रात्र, व्होल्गा ल्येंगेल, अनु. जी. ए. कुलकर्णी,  २४. एक झाड दोन पक्षी, विश्राम बेडेकर, २५. आणि माणसाचा मुडदा पडला, रामानंद सागर, २६. बनगरवाडी, व्यंकटेश माडगूळकर, २७. माझा प्रवास, वरसईकर गोडसे, २८. झाडाझडती, विश्वास पाटील,  २९. शिवाजी जीवन रहस्य, नरहर कुरूंदकर, ३०. शाळा, मिलिंद बोकील, ३१. शिवाजी कोण होता? गोविंद पानसरे, ३२. सती, प्रविण पाटकर, ३३. विद्रोही तुकाराम, डॉ. आ.ह. साळुंखे,  ३४. रारंग ढांग, प्रभाकर पेंढारकर, ३५. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती, डॉ. आ.ह. साळुंखे,   ३६. हंस अकेला, मेघना पेठे,  ३७. बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ३८. मुंबई दिनांक, अरूण साधू, ३९. फकीरा, अण्णाभाऊ साठे, ४०. जातीसंस्थेचे निर्मुलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर,

४१. गोलपीठा, नामदेव ढसाळ, ४२. सिंहासन, अरूण साधू, ४३. शतकाचा संधीकाल, दिलीप चित्रे, ४४. नागीण, चारूता सागर, ४५. श्री विठ्ठल : एक महासमन्वय, डॉ. रा.चिं. ढेरे, ४६. ताम्रपट, रंगनाथ पठारे, ४७. शेतकर्‍याचा असूड, महात्मा जोतीराव फुले, ४८. सात पाटील कुलवृत्तांत, रंगनाथ पठारे, ४९. सेकंड सेक्स, सिमॉन दि बोव्हा, ५०. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, जयंत पवार, ५१. अक्षरनिष्ठांची मांदियळी, डॉ. अरूण टिकेकर, ५२. इडापिडा टळो, आसाराम लोमटे, ५३. अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आनंद विंगकर, ५४. गुलामगिरी, महात्मा जोतीराव फुले, ५५. भिजकी वही, अरूण कोलटकर, ५६. वासुनाका, भाऊ पाध्ये, ५७. लांबा उगवे आगरी, डॉ. म.सु.पाटील, ५८. झोत, डॉ. रावसाहेब कसबे, ५९. पिंगळावेळ, जी.ए.कुलकर्णी, ६०. प्रकाशाची सावली, दिनकर जोषी,

६१. तमस, भीष्म सहानी, ६२. तुघलक, गिरिश कार्नाड, ६३. घासीराम कोतवाल, विजय तेंडुलकर, ६४. वाडा चिरेबंदी, महेश एलकुंचवार, ६५. शांतता कोर्ट चालू आहे, विजय तेंडुलकर, ६६. चक्र, जयवंत दळवी, ६७. बळी, मालती बेडेकर, ६८. मेटकॉफ हाऊस ते राजभवन, राम प्रधान, ६९. मर्ढेकरांची कविता, बा.सी. मर्ढेकर, ७०. शतपत्रे, लोकहितवादी, ७१. आहे मनोहर तरी, सुनिता देशपांडे, ७२. व्यक्ती आणि वल्ली, पु. ल. देशपांडे, ७३. बदलता भारत, भानू काळे, ७४. हमरस्ता नाकारताना, सरिता आवाड, ७५. लेखकाची गोष्ट, विश्राम गुप्ते, ७६. शोध, मुरलीधर खैरनार, ७७. माणसं, डॉ. अनिल अवचट, ७८. जेव्हा मी जात चोरली होती, बाबुराव बागूल, ७९. स्त्रीपुरूष तुलना, ताराबाई शिंदे, ८०. प्राचीन महाराष्ट्र, डॉ. श्री.व्यं. केतकर,

८१. मी कसा झालो, आचार्य अत्रे, ८२. माणसं आरभाट आणि चिल्लर, जी. ए. कुलकर्णी, ८३. प्रतिस्पर्धी, किरण नगरकर, ८४. बियॉण्ड दि लाईन्स, कुलदीप नय्यर, ८५. अजुनि वाढताती झाडे, रस्किन बॉण्ड, ८६. मैला आंचल, फनिश्वरनाथ रेणू, ८७. राग दरबारी, श्रीलाल शुक्ल, ८८. आत्मरंगी. रस्किन बॉण्ड, ८९. गोदान, प्रेमचंद, ९०. चालत दुरूनी आलो मागे, राजेंद्र यादव, ९१. तिरिछ, उदय प्रकाश, ९२. सेपियन्स, युवाल नोवा हरारी, ९३. माणूस, मनोहर तल्हार, ९४. रंग माझा वेगळा, सुरेश भट, ९५. आठवले तसे, दुर्गा भागवत, ९६. घातचक्र- अरूण गद्रे, ९७. क्लोरोफॉर्म, डॉ. अरूण लिमये, ९८. समग्र विंदा, विंदा करंदीकर, ९९. एक कहाणी अशीही, मन्नू भंडारी, १००. ओअ‍ॅसिशच्या शोधात, फादर फ्रान्सीस दिब्रिटो,

१०१. नचिकेताचे उपाख्यान, संजय भास्कर जोशी, १०२. चिरदाह, भारत सासणे, १०३. पण लक्षात कोण घेतो? हरी नारायण आपटे, १०४. बिढार, जरीला, झूल, हूल, हिंदू , डॉ. भालचंद्र नेमाडे, १०९. भुमी, सेतू, आशा बगे, १११. होमो डेअस, युवाल नोवा हरारी, ११२. एका कोळीयाने, पु. ल. देशपांडे, ११३. हसरे दु:ख, भा. द. खेर, ११४. उदकाचिये आर्ती, मिलिंद बोकील, ११५. वारूळ, बाबाराव मुसळे, ११६. शुभ्र काही जीवघेणे, अंबरिश मिश्र, ११७. शोध राजीव हत्त्येचा, डी. कार्तिकेयन, ११८. फ्रिडम अ‍ॅट मिडनाईट, डॉमनिक लॅपिए, ११९. मुकज्जी, शिवराम कारंत, १२०. कर्वालो, के.पी. तेजस्वी पूर्णचंद्र, १२१. खेळता खेळता आयुष्य, गिरीश कार्नाड, १२२. संवादु अनुवादू, उमा कुलकर्णी. १२३. सिटी ऑफ जॉय, डॉमनिक लॅपिए, १२४. महात्मा फुले : पंढरीनाथ सीताराम पाटील, १२५. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धनंजय कीर, १२६. आसूरवेद, आणि पानिपत, संजय सोनवणी, १२८. रस अनौरस, राजन खान, १२९. मोराची बायको, किरण येले, १३०. निळ्या डोळ्याची मुलगी, शिल्पा कांबळे,
१३१. वेटींग फॉर व्हीजा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, १३२. धर्मशास्त्राचा इतिहास, पा.वां.काणे, अनु. यशवंत आबाजी भट, 
तुम्ही यातली किती वाचली आहेत?

-प्रा.हरी नरके, २३ मार्च, २०२०


*** टीप- ही यादी सर्वसमावेशक नाही. माझ्या संग्रही चाळीस हजार पुस्तकं आहेत. मी अनेक ग्रंथालयांचा सदस्य आहे. माझ्या मित्रांचाही समृद्ध ग्रंथसंग्रह आहे. त्यातून मी वाचलेल्या पुस्तकातली मला आवडलेली एकुण पुस्तकं किमान एक हजार तरी भरतील. मला आवडलेली असूनसुद्धा जागेअभावी किमान ८६८ पुस्तकं या यादीत आलेली नाहीत. जी पुस्तकं या यादीत आलेली नाहीत त्यांच्या कर्त्यांनी लगेच नाराज होऊन हेत्वारोप करू नयेत. किंवा यादीत नाहीत याचा अर्थ ती पुस्तकं मी वाचलेलीच नाहीत असाही अर्थ लावू नये. एखादा पुरस्कार मिळाला म्हणून ते पुस्तक मला आवडलेच पाहिजे असा आग्रह कशासाठी?

Friday, August 16, 2019

लोकप्रियता विरूद्ध जाणत्यांची मान्यता








राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायण हे जागतिक साहित्याचे जाणते समीक्षक होते. १९४३ साली त्यांनी केरळ विद्यापीठातून सुवर्णपदक जिंकलेले होते. इंग्रजी साहित्य हा मुख्य विषय घेऊन त्यांनी ही पदवी मिळवली होती. त्यांनी याच विषयात पुढे एम.ए.ही केले होते. भारतीय विदेश सेवेत [आय.एफ.एस.] त्यांनी उच्च पदांवर काम केलेले होते. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेले नारायणनसर अतिशय नम्र आणि सौजन्यशील व्यक्तीमत्त्व होते.

आम्ही पुण्याचे काही साहित्यिक मित्र त्यांना भेटायला दिल्लीला गेलो होतो. पत्रकार-संपादक श्री अरूण खोरे हे आमच्या गटाचे नेते होते. त्यांची रितसर वेळ घेऊन आम्ही त्यांना भेटलो. आम्हाला त्यांच्या कार्यालयाने भेटीसाठी अवघा ३ मिनिटांचा वेळ दिलेला होता. प्रत्यक्षात मात्र ही भेट ५३ मिनिटे चालली. त्यांना आमच्याशी मराठी साहित्यावर भरभरून बोलायचं होतं. शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजयवर ते फिदा झालेले होते. त्यावर ते कितीतरी वेळ बोलले. मृत्युंजय ही माझी अतिशय आवडती कादंबरी. मराठीतली सर्वोच्च लोकप्रियता मिळालेल्या या कलाकृतीला नुकताच ज्ञानपीठ समकक्ष असलेला मुर्तीदेवी पुरस्कार त्यांच्या हस्ते देण्यात आलेला होता. त्यानिमित्ताने त्यांनी मृत्युंजय [इंग्रजी भाषांतर] वाचलेली होती.

या कादंबरीकडे मराठी समिक्षकांनी पाठ का फिरवली या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे नव्हते. ही कादंबरी १९६० च्या दशकात का गाजली यावर आम्ही बोललो. महाराष्ट्रात कुठेही जा तुम्हाला ही कादंबरी आवडलेले लोक भेटतील. पण जाणत्या समिक्षकांनी मात्र तिला नाकं मुरडली.

पुढे ते मराठी कवितेकडे वळले. ते म्हणाले, "बाबुराव बागूल हे माझे सर्वाधिक आवडते कवी आहेत. त्यांच्या अलिकडच्या कविता मला सांगा."

आमच्यातले एक साहित्यिक पटकन म्हणाले, "बागूल कवी नव्हेत. ते तर कथाकार आहेत."
तेव्हा नारायणनसर म्हणाले, " काय सांगताय? बाबुराव बागूल कवी नाहीत? मग ’वेदाआधी तू होतास’ ही कविता कोणाची आहे?"

"ती कविता बाबुराव बागूलांचीच आहे," मी उत्तरलो.

तेव्हा सर म्हणाले, " मग ते कवी नाहीत असे ह्यांनी का म्हटले?" त्यावर आमचा हा साहित्यिक मित्र निरूत्तर झाला.

नारायणन म्हणाले, "कवितांच्या संख्येवरून गुणवत्ता ठरत नाही. भले एकच कविता असेल पण ती जर श्रेष्ठ असेल तरी तो महान कवी आहे असे मी मानतो."


क्रमश:[१]

प्रा.हरी नरके, १६ ऑगष्ट २०१९

Tuesday, August 13, 2019

’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर







’रणांगण’ बरी लिहिलीय असं कोणीच म्हणालं नाही- विश्राम बेडेकर -प्रा.हरी नरके

विश्राम बेडेकर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा मी पुणे विद्यापीठात मराठी विभागात एम.ए.करीत होतो. त्यांचा त्यानिमित्त विभागातर्फे सत्कार करावा आणि त्यांचे भाषण ठेवावे असे आम्ही ठरवले. विभागप्रमुखांची रितसर परवानगी घेऊन मी बेडेकरांना त्यांच्या घरी जाऊन भेटलो. कार्यक्रम निश्चित केला.
ते आले. सत्कार घेतला,पण म्हणाले, " मी भाषण करीत नाही. आपण गप्पा मारू."
मग मी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.

प्रश्न- तुम्ही रणांगणसारखी श्रेष्ठ कादंबरी लिहिलीत. आणि पुढे मात्र २०-२५ वर्षे काहीच लिहिले नाही, हे कसे?

उत्तर- मी रणांगण लिहिल्यानंतर पहिली २०-२५ वर्षे ती बरी आहे असं मला कोणीही सांगितलं नाही. म्हणून मग पु्ढे मी काहीही लिहिलं नाही. २५ वर्षांनी एक समीक्षक  म्हणाले,"तुम्ही बरं लिहिलंय, मग मी पुन्हा लिहू लागलो."

प्रश्न- "तुमच्या आत्मचरित्रात { एक झाड आणि दोन पक्षी} सगळा भवताल चित्रशैलीत येतो. पण १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल तुम्ही फारसे काही लिहित नाही, असे का?"

उत्तर-" आम्ही भित्रे मध्यमवर्गीय लोक. घराची दारं-खिडक्या लावून बसलेलो होतो त्यावेळी. मी काही बघितलेच नाही मग कसे लिहिणार १९४२ चे आंदोलन, स्वातंत्र्य चळवळ याबद्दल?"
[ बेडेकरांनी "भित्रे" या शब्दाऎवजी अतिशय कडक शब्द वापरला होता. स्वत:बद्दल इतके प्रांजळ, पारदर्शक बोलायला लागणारे धाडस त्यांच्याकडे होते.]

बेडेकरांची रणांगण पहिली २०-२५ वर्षे का गाजली नाही? तर दुसर्‍या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांसाठी लोखंडी खाटा पुरवणार्‍या एका साहित्यप्रेमी कंत्राटदाराने पहिल्या आवृत्तीच्या सर्व प्रती खरेदी केल्या. प्रत्येक खाटेमागे जखमी सैनिकांना वाचायला एक प्रत भेट म्हणुन मिल्ट्री हॉस्पीटलला दिल्या. फार कमी प्रती चोखंदळ वाचक समीक्षक यांच्या हाती पडल्या. परिणामी पहिली २०-२५ वर्षे पुस्तक जाणकारांपर्यंत पोचलेच नाही.

[मुलाखतीमधून]

- प्रा.हरी नरके, १३ ऑगष्ट २०१९

Thursday, July 25, 2019

सरदेशमुखांच्या डायरीत हरी नरकेंच्या पुस्तकाच्या नोट्स







त्यांचे चित्रण तथ्यानुसार असावे म्हणूनही त्यांच्यावरील पुस्तके,संदर्भ नोंदलेत. य.दि.फडक्यांचे लठ्ठे चरित्र, ज्योतिरावांवरील हरी नरकेंचे पुस्तक यांतून केलेली टिपणे आहेत. संस्थानातले तपशीलही निव्वळ आठवणींवर वा कल्पनेपेक्षा तथ्यांवर आधारावेत यासाठी या काळातल्या मिळतील त्या वृत्तपत्रातल्या संस्थानिकांसंबधीच्या बातम्या कात्रणं काढून ठेवत वा नोंदी करत.
...........................................
डांगोरा एका नगरीचा'ही सरदेशमुखांची सर्वात महत्वाची , महत्त्वाकांक्षी अभिव्यक्ती . १९९८ मधल्या २० जूनला तिचे प्रकाशन आम्ही एकत्र जेवणाने साजरे केले .
'आशय'मधले सहकारी जयंत राळेरासकर यांच्या घरी सोलापुरातल्या साहित्य क्षेत्रातले १५-२० जण जमलो होतो . त्याआधी 'डांगोरा..'चे समारंभपूर्वक प्रकाशन व्हावे असा अपयशी प्रयत्न आम्ही केला . भागवतांनी फार आनंदाने मौज परिवारासह येण्याचे मान्य केले होते . यानिमित्ताने सरदेशमुखांच्या साहित्यावर एक दिवसीय चर्चासत्र घ्यावे असे सुचवून त्याचा आराखडाही सुचवला होता , पण जमले नाही , ( या अनुभवावरही कधी स्वतंत्र लिहीता येईल , बघु ) तसे भागवतांना कळवले . त्यांच्या उत्तरातले पहिले वाक्य होते , 'उदास वाटले फार' . पण तरी आम्ही काही करू , असे म्हणालो तर त्यांनी काही केलेत तरी त्यात सरदेशमुखांना या त्रयाबद्दल ( ते कादंबरीत्रय म्हणत ) बोलते करा , त्याचे शब्दांकन नंतर करता येईल , असे सुचवले , त्यानिमित्ताने मग २० जूनला जमलो .
कादंबरी फार कुणी वाचली नव्हती , त्यामुळे विवेकजी घळसासी , आणि मी त्यावर बोललो . बाकी सगळ्यांनी चर्चा केली , बहुतेकांना तिन्हीतल्या आत्मपर तपशीलासंदर्भात कुतुहल होते . सरांनी ते टाळले नाही , आनंदात होते , बोललेही बरेच . पण नंतर 'आशय' मध्ये ते सविस्तार लिहावे असा आग्रह मी करीत राहिलो . ' बखर , डांगोरा , उच्छाद , एक भूमिका ' हा लेख आशय दिवाळी ९८ मध्ये प्रसिद्ध झाला , भागवतांना यांचा फार आनंद वाटला .
मुळात सरांनी हे सगळे सांगावे या आग्रहामागे एक पार्श्वभूमी होती . या त्रयीसाठी , विशेषतः डांगोरा..'साठी त्यांनी दीर्घकाळ घेतलेले अफाट परिश्रम हे स्वतंत्र प्रबंधाचा विषय व्हावेत . १९६० च्या मे महिन्यात वि.म. सरदेशमुख गेले . त्याआधी सरदेशमुखांनी पौगंडावस्थेत अक्कलकोट सोडताना अनुभवलेले भयकारी दिवस , पुढे सोलापुरात असताना एकीकडे वडिलांनी सांगितलेल्या राजाच्या मैत्रीच्या रम्य आठवणी , दुसरीकडे त्यांचा सतत अन्यायनिवारणार्थ संस्थान आणि इंग्रज रेसिडेन्सी दोहोंशी एकाचवेळी सुरू असलेला अपयशी झगडा , या पार्श्वभूमीवर १९६३ साली कादंबरीचे बीज त्यांच्या मनात पडले . आरंभ आणि शेवट म्हटले तर एका महाकाव्याचे सर्ग असावेत तसे जोडलेले होते , म्हटले तर स्वतंत्र आस्वादमूल्य असलेल्या कथा , म्हणून त्यांनी त्या आधी लिहून ताण काहीसा कमी केला . तपशीलवार टिपणे काढणे अर्थात सुरू होतेच .
प्राध्यापकीतून निवृत्ती , सोबत आलेल्या कौटुंबिक अडचणी , हातातली धुके आणि शिल्प आणि रामदास ही प्रकाशने असे सगळे काहीसे मार्गी लागल्यावर १९८५ साली त्यांनी टिपणांचे बाड उघडले . काही दिवसांनंतर लगेच डोळ्यांचे दुखणे उद्भवले . दृष्टी जाईल काय भीतीत दोन-तीन वर्षे गेली . त्यातून बाहेर पडल्यावर लगेच जोमाने तयारी . जून १९८७ मध्ये प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात .
या तयारीच्या खुणा असलेल्या सहा डायऱ्या शिल्लक आहेत . या फक्त विविध तपशीलांच्या . मूळ हस्तलिखित , त्यांचे खर्डे ल.सिं.जाधव यांनी केलेली मुद्रणप्रत डोळ्यांखालून घातल्यावर लसिंच्याच घरामागे असलेल्या कंबर तलावाला त्यांनी स्वहस्ते अर्पण केले .
१३८ व्यक्तिरेखा असलेले हे मिनी महाभारत . दशकभराचा कालावधी , छोटेसे स्वतंत्र साईखेड संस्थान , सोलापूर जिल्हा , देश आणि जग सगळीकडे वेगवान घटितांची गजबज आहे , सगळ्यांचे घट्ट जोडलेले संदर्भ यात आहेत . महत्त्वाच्या पात्रांपासून छोट्यात , छोट्या सगळ्या पात्रांच्या पार्श्वभूमी असलेल्या स्वतंत्र कथा , त्यांच्या आपापसातल्या घट्ट वीणीने बांधलेले कथेचे एकसंध महावस्त्र .
'बखर' पासून 'उच्छाद' संपेतो २८ वर्षांचा कालावधी . यातल्या प्रमुख घटना आधी नोंदवून ठेवलेल्या . या तारखा इंग्रजी तारखा होत्या , त्यावेळच्या मराठी तिथ्यांची नोंद करता यावी म्हणून सर धुंडीराजशास्री दातेंकडे काही दिवस पंचांग शिकायला जात होते . जवळपास तीन दशकातली त्यांच्याकडची सर्व पंचांगं अभ्यासली , नोंदी केल्या .
तिन्ही कादंबऱ्यांत कायदेशीर कार्यवाहीचे - पोलिस आणि न्यायालयीन दोन्ही - तपशील आहेत . त्याची माहितीही सर अनेकांकडून घेत होते . काही पाने इंडियन पीनल कोडची त्याकाळातली कलमे , त्याअंतर्गत गुन्हे आणि होऊ शकणाऱ्या शिक्षा नोंदलेल्या आहेत .
सोलापूरचा मार्शल लॉ ही स्वातंत्र्यचळवळीतली तेजस्वी घटना . तिचे पडसाद कमी-अधिक संस्थानातही उमटले . ( डांगोरा'चा हाच काळ )याच काळात भगतसिंग आणि सहकाऱ्यांवर अटकेनंतर खटले चालू होते . जगातही काहीबाही घडत होते . या सगळ्यांचे तपशील मिळवण्यासाठी सोलापूरची त्यावेळच्या समाचार आणि कल्पतरू या दोन्ही वृत्तपत्रांचे या काळातले सर्व अंक , हिराचंद नेमचंद -दयानंद - संगमेश्वर अशा उपलब्ध ग्रंथातले संदर्भ , ते पुरे झाल्यावर भाचेजावई माधव मोहोळकर यांच्या मदतीने मुंबईचे एलफिस्टनचे ग्रंथालय , ब्रिटीश कौन्सिलचे ग्रंथालय ( इथून या काळातले बॉम्बे क्रॉनिकल व अन्य इंग्रजी वृत्तपत्रांचे अंक पाहिले , दोन वृत्तपत्रातले एकाच घटनेच्या बातम्यांच्या तपशीलातले फरक , मग अन्यत्र पाहून खरेखोटे करणे ) , वेगवेगळी गॅझेटियर्स अशा मिळतील तिथून , कळेल तिथून संदर्भ नोंदवणे , ते ताडून पाहणे . शेवटी शासनाच्या विधानमंडळातल्या ग्रंथालयात बसून केलेली सोलापूरच्या मार्शल लॉचे उमटलेले पडसाद , वेळोवेळी यासंदर्भात झालेली भाषणे यांचीही टिपणे आहेत .
कथेत अठरापगड जातीजमाती-धर्माचे लोक आहेत , राज्यातले शाहू , ज्योतिरावांसारखे महापुरूष ही अप्रत्यक्षरूपात आहेत , त्यांचे चित्रण तथ्यानुसार असावे म्हणूनही त्यांच्यावरील पुस्तके , संदर्भ नोंदलेत . य.दि.फडक्यांचे लठ्ठे चरित्र , ज्योतिरावांवरील हरी नरकेंचे पुस्तक यांतून केलेली टिपणे आहेत . संस्थानातले तपशीलही निव्वळ आठवणींवर वा कल्पनेपेक्षा तथ्यांवर आधारावेत यासाठी या काळातल्या मिळतील त्या वृत्तपत्रातल्या संस्थानिकांसंबधीच्या बातम्या कात्रणं काढून ठेवत वा नोंदी करत .
इतर अनेक क्षेत्रातल्या लोकांशीही सर बोलत . मिळालेले तपशील नोंदवत . उदा. तिन्हीत , विशेषतः उच्छाद ' मध्ये 'गांजेकस' या शब्दाचा वापर आहे . तर त्याचा नेमका अर्थ काय , वैद्यकीय परिभाषेत त्याने काय होते , तो ओळखावा कसा , लक्षणे कोणती ? यासंदर्भात एका चिठोऱ्यावर केलेली नोंद डायरीत टाचून ठेवली आहे .
या सगळ्या तपशीलांना अखेर वाट मिळाली ,९२ संपतासंपता , शारदीय चंद्रकळा'च्या प्रकाशनानंतर . ते पुरे झाले ९५ च्या १६ जूनला . आमच्या भेटीचा हा काळ . याकाळात अर्धेअधिक लिहून झाल्यावर त्यांची काहीशी दमछाक झाली . एक दिवस बोलावून म्हणाले ,' माझा थोडा गोंधळ होतोय . तपशील मागे आलेत का नाहीत लक्षात येत नाहीये . आलेत म्हणून गाळावे तर कदाचित राहून जाणार , घ्यावे तर कदाचित पुनरावृत्ती होणार .
आपण एकदा हे झालेले सलग वाचुया .' मग हुतात्मा स्मृती मंदिराच्या हिरवळीवर त्यांनी ते आम्हा काही लोकांसमोर सलग १५ दिवस वाचले . मग आत्मविश्वासाने पुरे केले . एफोर पेक्षा मोठ्या आकारातल्या बारीक अक्षरात गच्च भरलेल्या हजारांवर पानांच्या ४ फाईल्स . यानंतर बरोबर चार वर्षांनी २० जूनला आम्ही एकत्र जेवण घेऊन 'डांगोराचे प्रकाशन साजरे केले . त्याआधी १२ जूनला सरदेशमुखांनी मौजकडून आलेल्या गठ्ठ्यातली पहिली पर्यंत मला नाव घालून दिली .
हस्तलिखित पुरे झाले त्यादिवशी १६ जून ९५ यादिवशी सर हिरवळीवर येताना पेढे घेऊन आले होते .
Neeteen Vaidya

Saturday, May 11, 2019

मृत्यूनंतर

एखादे चटका लावून गेलेले पुस्तक वर्षानुवर्षे आठवत राहते. काळाच्या ओघात नवनवी पुस्तके वाचनात येतात. ते जुने पुस्तक विस्मरणात जाते.
का कोण जाणे मात्र कधीतरी अचानक ते जुने पुस्तक आठवू लागते. पुस्तकातले तपशील विसरलेले असतात. पुस्तकाचा गाभा डोक्यात पक्का कोरला गेलेला असतो.
फार पुर्वी शालेय वयात वाचलेले शिवराम कारंत यांचे एक पुस्तक असेच अचानक धडका मारू लागले. कादंबरी वाचून किमान ४० वर्षे झालेली. एका वृद्धाची नातेसंबंधातली फरपट चित्रित करणारी कथा परतपरत आठवू लागली.

पुस्तकाचे नाव मात्र आठवेचना. पुस्तक सापडेना.
दातात अडकलेल्या बडीशेपेच्या एखाद्या दाण्यानं यावी तशी अस्वस्थता येऊ लागली. पुस्तकाचं नाव आठवायचा खूप प्रयत्न करून झाला. शोधाशोध करून झाली.

पुस्तक सापडत नाही म्हटलं की बेचैनी येते. परतपरत तेच पुस्तक धडका मारू लागतं.
परवा घरातल्या सर्व पुस्तकांची साफसफाई करताना अचानक ते पुस्तक हाती लागलं. अशावेळी होणारा आनंद केवळ अपार नी असीम. हा क्षण जणू युरेका युरेका ओरडण्याचा.
"मृत्यूनंतर" हे ते पुस्तक. कादंबरी. नॅशनल बुक ट्रस्टने १९७५ साली तिचा मराठी अनुवाद प्रकाशित केलेला. अनुवादक केशव महागावकर.
अवघी १८६ पृष्ठांची ही कादंबरी. कारंतांनी १९६० मध्ये लिहिलेली.
कादंबरी अफाट ताकदीची. मानवी नात्यांमधली गुंतागुंत बारकाईनं टिपणारी. पैशासाठी माणसं किती खालच्या पातळीवर उतरतात, हैवान होतात त्याची अस्वस्थ करणारी कथा.यशवंतराव ह्या नायकाची भिडणारी गाथाच.
-प्रा.हरी नरके, ११ मे २०१९

Saturday, October 27, 2018

पुरस्कार




[१] १९४० सालची घटना. राज्य पातळीवरची एक कादंबरी लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. त्याकाळात ५०० रूपयांचा प्रथम पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली होती. अनेक नव्या जुन्या साहित्यिकांनी स्पर्धेत भाग घेतलेला होता.
स्पर्धेचा निकाल घोषित झाला.
आज ज्या कादंबरीला मराठीतील श्रेष्ठ आणि अभिजात कलाकृती मानली जाते त्या रणांगणला हा पुरस्कार विभागून मिळाला होता. कादंबरीकार विश्राम बेडेकर काहीसे खट्टू झाले. त्यांनी परिक्षक कोण होते अशी संयोजकांकडे चौकशी केली.
नाव कळले- साहित्यसम्राट न.चिं.केळकर आणि वि.सी.गुर्जर हे परिक्षक होते.
बेडेकर काय बोलणार?
पुरस्कार जिला विभागून मिळालेला होता ती दुसरी कादंबरी होती, पाणकळा, र.वा. दिघे यांची. हीही आज मराठीतील श्रेष्ठ आणि अभिजात कादंबरी ठरलेली आहे.

र.वा.दिघेंचे नाव तेव्हा अगदीच नवखे होते. त्यांना फारसे कोणी ओळखतही नव्हते. जमखिंडीच्या साहित्य संमेलनात पुरस्कार वितरण होणार होते. रेल्वेत आणि बसमध्ये काही नामवंत साहित्यिक मंडळी दिघे आणि पाणकळा यांची यथेच्छ टिंगलटवाळी करीत होते. दिघे मात्र शांतपणे ही निंदानालस्ती ऎकत होते.
या टिंगलखोरांचे नेतृत्व करीत होते, वि.स.खांडेकर.
त्यावेळी आपण पाणकळाला कमी लेखले हे आपले चुकलेच असे खांडेकरांनी पुढे जाहीरपणे कबूलही केले.

२. अनंत काणेकर हे नामवंत आणि पट्टीचे व्याख्याते होते.
ते झेवियर्स कॉलेजात शिकत असताना महाविद्यालयाने वक्तृत्व स्पर्धा ठेवली होती. रू.२५ चा पहिला आणि रू.२० चा दुसरा पुरस्कार देण्यात येणार होता.
तथापि या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाला नाही.
तेव्हा काणेकर आणि त्यांचे मित्र मोतिराम कर्णिक अशा दोघांनीच आपली नावे स्पर्धेत दाखल केली.

त्यांनी आपापसात ठरवून घेतले होते की पहिला आणि दुसरा क्रमांक कोणालाही मिळो पुरस्काराची रक्कम मात्र रूपये २२.५०/- अशी आपण समसमान वाटून घ्यायची.
आणि तसेच झाले.
-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

Friday, October 26, 2018

महाविद्यालयीन जीवनातली काळी करडी युवागाथा





श्री प्रणव सखदेव हे नव्या पिढीतले महत्वाचे लेखक आहेत. त्यांची या आठवड्यात प्रकाशित झालेली "काळे करडे स्ट्रोक्स" ही मजबूत कादंबरी आहे. सखदेव यांची लेखनकळा प्रवाही, चित्रशैलीतली आणि वाचकांशी गप्पा मारणारी आहे. मुंबईच्या रूईया महाविद्यालयात शिकणार्‍या तीन युवक युवतींची उत्तर आधुनिक काळातली चटका लावणारी गोष्ट या कादंबरीतून उलगडत जाते. समीर, सानिका आणि सलोनी या तिघांची वाचकांशी दोस्ती होऊन जाते. अरण्या उर्फ अरूण आणि दादूकाका ही भन्नाट अवलियांची जोडी तर काळजातच घुसते. रूईया महाविद्यालयाचा परिसर, दडकर कट्टा, दादर, फाइव्ह गार्डन, मुंबई लोकलचा व्हीडीयो कोच आणि हिमाचल प्रदेश मधलं मॅकलीओडगंज ही नुसती स्थळं न राहता या कादंबरीतली अफलातून पात्रं बनुन आपल्याला भेटतात. मुंबईचा पाऊस, विशेषत: २६ जुलैचा महाप्रलय, २६ अकराचा अतिरेकी हल्ला हे केवळ नेपथ्य न राहता या गोष्टीचा आलेख उंचावत नेणारं कलात्मक शक्तीस्थळ बनत जातं.

सखदेवांनी समकालीन युवकांची घुसमट अतिशय प्रभावीपणे चितारलेली आहे. प्रत्येक महानगरी माणूस हा आपापल्या ओझ्यांनी, अपार दु:खांनी गांजलेला असतो. जनरेशन गॅप, सामाजिक - सांस्कृतिक गोची आणि विस्कटलेली, पोकळीत जगणारी युवापिढी यांची ही सिंफनी मूळातून अनुभवायला हवी. आपल्या आजुबाजूच्या पर्यावरणातला समकालीन कोलाहल सखदेव भेदक पद्धतीनं टिपत जातात. सोनेरी युवावस्था आणि परिस्थितीचे काळे ढग यांची करडी काळी पोकळी वाचकाला तुफान घेरून सोडते. थेट दंशच करते.

मासकॉंम करणार्‍या समीरला चित्रपट दिग्दर्शक बनायचं असतं. सलोनीला तिच्या आजारावरच्या अत्त्याधुनिक उपचारांसाठी न्यूझीलंडला जायचं असतं. सानिकाला डेथविश असते.. काय होतं त्यांचं?
समीरला विलास सारंग आणि तारकोव्हस्की आवडत असतात. भन्नाट आयुष्य जगणार्‍या अरूणलाही.
अवघ्या २१९ पृष्ठांमध्ये सखदेव फार मोठा ऎवज आपल्यापुढे चितारत जातात. कथेतली पात्रं गोलगोल न फिरता सतत विकसित होत जातात. त्यांची मानसिक आंदोलनं आपल्याला जखमी करत जातात. छळतात. तरूण पिढीचा टिपलेला जिवघेणा संघर्ष, औदासिन्य, व्यसनं, सेक्स, हलकल्लोळ,कोलाहल,पोकळी आणि आरपार भिडत जाणारा रक्ताळलेला प्रवास यामुळे ही कादंबरी महत्वाची ठरते.

मरण काय असतं
जगण्याचा एक भाग बनून
अचानक फणा काढतं
आणि जातं डसून

इथून सुरू झालेली ही चित्तरकथा

उदासी
चमकत्या अंधाराच्या दिवसांची
जिच्या फण्यावर
हिंदळतोय
तुझ्या-माझ्या नात्याचा आस....

इथवर घेऊन जाते. कादंबरी संपली तरी तिच्या अनुभवातनं आलेली अस्वस्थता चिरत राहते.

रोहन प्रकाशनाची ही दर्जेदार ग्रंथनिर्मिती असून साजेसं मुखपृष्ठ अन्वर हुसेन यांचं आहे. अनुजा जगतापांनी ग्रंथ संपादन केलंय तर प्रकल्प समन्वयक आहेत रोहन चंपानेरकर

टिम रोहन आणि प्रणव सखदेव तुम्ही लय भारी काम केलेलं आहे.

-प्रा.हरी नरके, २५ ऑक्टोबर २०१८

काळे करडे स्ट्रोक्स, प्रणव सखदेव, रोहन प्रकाशन, पुणे, १८ ऑक्टोबर २०१८, दसरा, युथ एडिशन, रू. १९९/-, पृष्ठे २१९


Tuesday, September 18, 2018

बदलत्या ग्रामीण नातेसंबंधांचे पिळवटून टाकणारे चित्रण-



महानगरी जीवनावर मराठीत गेल्या अर्धशतकात फार ताकदीनं लिहिलं गेलंय. त्याचकाळातल्या ग्रामीण जीवनावरच्या धग, बनगरवाडी, माणूस अशांनी झपाटून टाकलेलं होतं. मात्र अलिकडच्या काळात नवं, ताकदीचं, आरपार हलवणारं कमी हाती लागत होतं. इडापिडा टळो, अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट, आगळ, पोटमारा, जू, आलोक यांनी अस्वस्थ केलं होतं. नव्या लेखकांच्या या श्रेष्ठ कथा, कादंबर्‍या सुन्न करतात. त्यात आता मिलिंद जाधव यांच्या हक्कसोडची दमदार भर पडलेली आहे.

आपलं समकालीन ग्रामीण जीवन प्रचंड वेगानं बदलतंय. भौतिक सुबत्ता येतेय. तंत्रज्ञान प्रत्येक हातात पोचलंय. जागतिकीकरणाचे भलेबुरे परिणाम दिसु लागलेत. हातात पैसा आला की बाजारमूल्यं माणसाच्या मानगुटीवर स्वार होतात. तुमचं सगळं जगणंच कब्ज्यात घेतात. आतड्याची, रक्ताची नाती परकी होतात. हाव वाढली की माणसांचे इसम आणि इसमाचे जिन्नस बनतात. आता जगण्याची जुनी परिमाणं कालबाह्य झाली. मोडीत निघालीत.

जाधवांची हक्कसोड आकारानं बारीक चणीची कादंबरी आहे. अवघ्या ९२ पृष्ठांची. पण वेगवान. आरपार भिडणारी. अतिशय परिणामकारक. पार भोवंडून टाकणारी.
आपल्या समाजात लिंगभाव, जात आणि वर्ग ही भेदभावाची, शोषणाची केंद्रं मानली जातात. माय, बहीण, मुलगी म्हणजे मायेचा सागर. पण आता तो आपला भूतकाळ होतोय.
हा सागर केव्हाच आटलाय. लेकीबाळी कोण कोण्हाच्या राहिलेल्या नाहीत असा अनुभव घेणारा महिपत आपल्या पोटात खड्डा पाडतो. खेड्यातल्या जमिनींना सोन्याचा भाव येऊ लागला आणि पुर्वी इतर हक्कात असलेल्या बहिणी भावाइतक्याच जमिनीच्या मालक झाल्या. हे कायद्याचं पाऊल योग्यच होतं. आवश्यकही होतं.

सत्ता, पैसा आणि मालमत्ता ताब्यात आली की पुरूषसत्ताक मानसिकता जशी बेमुर्वतखोर, शोषक बनते तशी आजवर अपार सोसलेली स्त्री होणार नाही असा एक भाबडा आशावाद होता.
हक्कसोड वाचताना त्याचा पार चोळामोळा होतो.

३० वर्षांपुर्वी कोल्हापूरच्या विषमता निर्मुलन शिबिरात बोलताना मी म्हणालो होतो, "स्त्रिया सरकारी नोकरीत आल्या की भ्रष्टाचार कमी होईल." अध्यक्षस्थानी असलेल्या प्रा.लीला पाटील [ना.सी.फडके यांच्या कन्या] खो खो हसल्या आणि मला म्हणाल्या, "तू भाबडा आहेस. आजचा उपेक्षित उद्या जेव्हा सत्तेवर येतो, मग ती स्त्री असो, गरिब असो की जातीनं हलका मानला गेलेला असो, तेव्हा तोही सत्तेच्या भल्याबुर्‍या गुणधर्मांनी वेढला जातो. त्यात झिंगतो. बाळा त्यात स्त्री, पुरूष, जात, वर्ग असला फरक राहत नसतो."

जाधवांनी ही कादंबरी "काडी काडी जमवून हौसेनं विनलेलं आपलं घरटं, आपल्याच पिलांच्या स्वार्थी हातांनी विस्कटलेलं पाहणं ज्यांच्या नशिबी आलंय अशा हरेक मातापित्यांना " अर्पण केलीय.

तुकोबा म्हणतात, आईबाप कसे असतात तर, " ऎशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रिती." पण मुलं कशी असतात तर, "जग हे दिल्या घेतल्याचे." या उक्तींचा होरपळून सोडणारा अनुभव मिलिंद जाधव हक्कसोडमधून वाचकाला देतात.

लोकवाड्मय गृहाची दर्जेदार निर्मिती, सतीश भावसारांचे अप्रतिम मुखपृष्ठ आणि मिलिंद जाधवांची दाहक अनुभव देणारी, भावकल्लोळांचा झंजावात निर्माण करीत वाचकांना एकप्रकारे चांगल्या अर्थाने छळणारी, दमवणारी आणि प्रचंड अस्वस्थ करणारी कादंबरी. मराठीत नवं काहीच लिहिलं जात नाही अशी तक्रार यापुढे तुम्हाला करता येणार नाही.
मिलिंद जाधव हे एक मराठीतलं आश्वासक नाव बनतं आहे.

हक्कसोड, मिलिंद जाधव, लोकवाड्मय गृह, मुंबई, पहिली आवृत्ती- २०१८,पृष्ठे ९२, किंमत रूपये १००/-
लेखकाचा भ्रमणध्वनी-७३८५५ ९९६००, प्रकाशकांचा दूरध्वनी-०२२- २४३७६०४२/२४३६२४७४, इमेल lokvangmaya@gmail.com lokvangmayagriha@gmail.com

-प्रा.हरी नरके, १८ सप्टेंबर २०१८

Wednesday, March 14, 2018

दैवी देणगी असलेले सर्वोच्च साहेब -



"अरे तू आठवल्यांचा नारायण ना? मागच्या वर्षीच्या प्रशिक्षण शिबिरात मी तुला पोळ्या विभागात पाहिलं होतं. छानय. कसं वाटलं तुला संघटनेचं शिबिर?"
नारायण उडालाच. एका अ.भा. संघटनेच्या द्वितीय वर्ष प्रशिक्षण शिबिरात तो सहभागी झालेला होता. त्याला एका खास गटाबरोबर संघटनेच्या सर्वोच्च नेत्यांची भेट घेण्याची संधी देण्यात आलेली होती. 
गेल्या वर्षीच्या शिबिराच्या काळात आपली ड्युटी पोळ्या विभागात असताना सर्वोच्च साहेब शिबिराची धावती पाहणी करीत तिकडून गेलेले होते. 
आपण किती किरकोळ व्यक्ती. पण साहेबांची किती अफाट स्मरणशक्ती. एक यत्कश्चित पोरगापण त्यांच्या वर्षभर लक्षात होता. 
वा, क्या बात है! धन्य धन्य ते सर्वोच्च साहेब नी कृत कृत्य आपण!
त्या गटात असलेल्या दहाच्या दहा जणांना सर्वोच्च साहेब नावानिशी ओळखत होते. आपण पाहणी केली त्यावेळी मागच्या वर्षी ते कोणत्या विभागात कार्यरत होते त्याची अचुक माहिती सर्वोच्च साहेब सांगत होते. प्रचंड कार्यमग्न असतानाही त्यांनी या दहाजणांच्या भेटीसाठी दहा मिनिटे काढली होते. त्यातही वेळ वाचवण्यासाठी समोरच्या फायली बघत त्यावर सह्या करीत ते बोलत होते.
ते दहाही जण नंतरचे आख्खे वर्ष हवेत होते.
ही नक्कीच दैवी देणगी असणार. सर्वांची अचुक माहिती सर्वोच्च साहेबांना असावी हा साक्षात चमत्कारच होय. गेल्या वर्षी कोण कुठे होता याचा बिनचुक तपशील. साक्षात ईश्वरी अवतार असणार!
तिसर्‍या वर्षी नारायणकडे साहेबांना भेटणार्‍या दहा जणांची व्यवस्था करण्याची जबाबदारी होती.
प्रत्येकाचे नाव,गाव, शिक्षण, गेल्या वर्षी सर्वोच्च साहेब फेरी मारताना तो कोणत्या विभागात कार्यरत होता याची बिनचुक माहिती असलेल्या दहा फायली तयार करायच्या होत्या.
त्या फाईलींना 1 ते 10 क्रमांक द्यायचे होते.
भेटीसाठी निवडण्यात आलेल्या त्या दहा जणांनाही 1 ते 10 क्रमांक देण्यात आलेले होते.
कडक शिस्तीचा भाग म्हणून त्यांनी त्यांना देण्यात आलेल्या त्या क्रमांकाच्या खुर्चीवरच बसायचे होते.यात अजिबात हयगय होता कामा नये असे त्यांना बजावण्यात आलेले होते.
ते नवे दहाजण ठरल्याप्रमाणे स्थानापन्न झाले.
सर्वोच्च साहेब आले, त्यांनी समोर ठेवलेल्या फायली वाचत वाचत पहिल्याला प्रश्न केला,
" अरे तू देवधरांचा वसंत ना? गेल्या वर्षी मी राऊंड घेत होतो तेव्हा तुला मी पाणी भरताना बघितले होते. छानय. कसं वाटलं तुला संघटनेचं शिबिर?"
दरम्यान देवधरांचा वसंत एव्हाना पार हवेत गेलेला होता.
सर्वोच्च साहेबांनी पहिल्या फाईलवर सही केली नी ते दुसर्‍या फाईलकडे वळले.
एव्हाना नारायणला सर्वोच्च साहेबांच्या अफाट, दैवी अशा स्मरणशक्तीचे रहस्य कळून चुकले होते.
[आगामी पुस्तकातून---]
-प्रा.हरी नरके
.................................